मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
परिवृत पश्चिमोत्तानासन *

परिवृत पश्चिमोत्तानासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १६५)
परिवृत म्हणजे वळविलेले किंवा फिरविलेले. पश्चिम म्हणजे डोक्यापासून टाचांपर्यंत संपूर्ण शरीराची मागची बाजू. उत्तान म्हणजे तीव्रतेने ताणलेले. पश्चिमोत्तानासनाच्या या प्रकारामध्ये धड एका बाजूला वळवावयाचे असते.

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. गुडघे आवळलेले असू द्या. आणि गुडघे, घोटे, टाचा, आणि आंगठे एकमेकांशी जुळवा. (चित्र क्र. ७७)
२. श्वास सोडा आणि उजवा हात डाव्या पावलांकडे लांबवा. कोपरापुढील उजवा हात आणि उजवे मनगट अशा रीतीने वळवा की ज्यामुळे उजवा आंगठा जमिनीकडे आणि उजवी करंगळी वरच्या दिशेला राहील. उजव्या हाताने डाव्या पावलाची बाहेरची बाजू पकडा; एक श्वास घ्या.
३. आता श्वास सोडा.
४. श्वास सोडा आणि कोपरे वाकवून आणि एकमेकांपासून दूर पसरुन धड ९० अंश डावीकडे वळवा. (चित्र क्र. १६४) एकदा श्वास घ्या. श्वास सोडा. डोके हातांच्या मध्ये न्या आणि वर पहा. उजव्या दंडाच्या वरच्या बगलेजवळच्या भागाची मागची बाजू डाव्या गुडघ्यावर टेकलेली राहील. उजवीकडील बरगडया डाव्या मांडीवर टेकविण्याचा प्रयत्न करा. (पुढील दृश्य : चित्र क्र. १६५ ब; मागील दृश्य : चित्र क्र. १६६.) धड एका बाजूस वळविल्यामुळे श्वसन जलद होऊ लागेल. या स्थितीत सुमारे २० सेकंद राहा.
५. श्वास घ्या. हात मोकळे करा आणि धड वळवून मूळ स्थितीला आणा. (चित्र क्र. १६३)
६. आता धड उजवीकडे वळवा आणि आधीच्याच इतका वेळ वर दिलेल्या पध्दतीप्रमाणे हे आसन पुन्हा करा. मात्र वर सांगितलेल्या सूचनांमध्ये ‘उजवा’ व ‘डावा’ या शब्दांची उलटापालट करा.

परिणाम
या शक्तिदायक आसनामुळे पोटाचे अवयव सुधारतात आणि त्यांना मंदपणा येत नाही. ह्या आसनामुळे मूत्रपिंडही सुधारतात. पाठीच्या संपूर्ण कण्यामध्येही नवे चैतन्य येते आणि पचनक्रिया सुधारते. धड बाजूला वळविल्यामुळे पाठीच्या कण्यामध्ये रक्ताभिसरण अधिक चांगल्या तर्‍हेने होऊ लागते आणि पाठदुखी नाहीशी होते. ओटीपोटाच्या भागाला ताण बसत असल्यामुळे त्या भागात आँक्सिजनयुक्त रक्त अधिक प्रमाणात खेचले जात आणि त्यापासून जननग्रंथी आवश्यक ती द्रव्ये शोषून घेतात, त्यामुळे जीवनशक्ती वाढते आणि जननेंद्रियांवरील ताबा वाढतो.

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP