मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
ताडासन *

ताडासन *

‘प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(यालाच समस्थिती म्हणतात)  (चित्र क्रमांक १)
ताड म्हणजे पर्वत आणि सम म्हणजे सरळ, स्थिर; स्थिती म्हणजे स्थिर उभे राहाणे किंवा निश्चलता. पर्वताप्रमाणे ठामपणे आणि सरळ ज्या आसनात उभे राहावे लागते ते ताडासन. उभे राहण्याची ही सर्वसाधारण व मूलभूत मुद्रा आहे.

पध्दती
१. पावले जुळवून ताठ उभे रहा. टाचा व पायाचे अंगठे एकमेकांशी जुळलेले असू द्या. पायाचे चवडे खाली ठेवून बोटे बेचक्यातून ताठ करा.
२. गुडघे आवळून घ्या. गुडघ्यांच्या वाटया वर ओढून धरा. पुठ्ठा आकुंचित करा आणि मांडयांचे मागचे स्नायू वर ताणून धरा.
३. पोट आत घेऊन छाती फुगवा. पाठीचा कणा ताणलेला आणि मान सरळ असू द्या.
४. शरीराचा भार टाचांवर किंवा पायांच्या बोटांवर न ठेवता दोन्हीकडे सारखाच जाणवेल अशा तर्‍हेने उभे राहा.
५. खरे म्हणजे ताडासनामध्ये हात डोक्याच्या वर लांबवले पाहिजेत. परंतु सोयीसाठी ते मांडयांजवळ ठेवले तरी चालतील. अभ्यासक हात मांडयांजवळ ठेवून ताडासनात उभा राहिला म्हणजे यानंतर वर्णन केलेली उभ्या स्थितीतील आसने सुकरतेने करता येतात.

परिणाम
योग्य तर्‍हेने उभे कसे राहावे याचा लोक विशेष विचार करीत नाहीत. काहीजण एकाच पायावर भार देऊन उभे राहतात, किंवा एक पाऊल दुसर्‍याशी काटकोनात ठेवून उभे राहातात. काही लोक टाचांवर किंवा पायाच्या आतल्या बाजूंच्या कडांवर किंवा बाहेरच्या बाजूंच्या कडांवर सगळा भार टाकतात. अशा व्यक्तींच्या बुटांचे किंवा चपलांचे तळवे व टाचा कोणत्या बाजूला झिजल्या आहेत हे पाहिल्यावर त्यांच्या उभे राहण्याच्या सवयी ध्यानात येऊ शकतात. उभे राहाण्याची सदोष पध्दती आणि पावलांवर सम प्रमाणात शरीराचा भाग वाटून न देण्याची प्रवृत्ती यांमुळे पाठीच्या कण्याचा लवचिकपणा कमी करणार्‍या विशिष्ट विकृती निर्माण होतात. दोन पावलांमध्ये बरेच अंतर ठेवले तरीही टाचा व बोटे ही माध्यमिक समतळाशी समांतर ठेवावी; एकमेकांशी कोन करुन ठेवू नयेत. या पध्दतीमुळे पुठ्ठा आकुंचित होतो, पोट आत खेचले जाते आणि छाती फुगवली जाते. शरीर हलके वाटूअ लागते आणि मनाला चपलता येते. शरीराचा भार केवळ टाचांवर दिला तर शरीराचे गुरुत्व बदलताना जाणवते. पुठ्ठा सैल पडतो, पोट पुढे येते, शरीर मागे झुकते आणि कण्यावर ताण पडतो. परिणामी आपल्याला लवकरच थकवा येतो आणि मनही मंद बनते. म्हणूनच योग्य तर्‍हेने उभे राहाण्याचे कसब साध्य करुन घेणे अत्यावश्यक आहे.  

N/A

References : N/A
Last Updated : September 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP