मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


७७६.
गीताभागवती उपदेश केला । अर्जुना दाविला देवकृष्णे ॥१॥
कृष्णे दाखविला देव तो वेगळा । बोलिजे आगळा सर्वांहूनि ॥२॥
सर्वांहूनि सार देव तो साचार । दास म्हणे पार कल्पनेचा ॥३॥

७७७.
कल्पनेच्या देवा कल्पनेची पूजा । तेथे कोणी दुजा आढळेना ॥१॥
आढळेना देव आढळेना भक्त । भावनेने मुक्त भावितसे ॥२॥
भावितसे मन त्याहुनी ते भिन्न । दास म्हणे ज्ञान ओळखावे ॥३॥

७७८.
भावनेचा देव भावार्थे भाविला । देव भक्त जाला भावनेचा ॥१॥
भावनेचा देव भावनेचा भक्त । भावनेने मुक्त भावितसे ॥२॥
भावितसे मन त्याहुनी ते भिन्न । दास म्हणे ज्ञान ओळखावे ॥३॥

७७९.
संसारीचे दुःख बहुसाल होते । ते जाले परते विचाराने ॥१॥
विचाराने सर्व संग वोरंगला । रामरंग जाला असंभाव्य ॥२॥
असंभाव्य सुख मर्यादेवेगळे । विचाराच्या बळे तुंबळले ॥३॥
तुंबळले सर्व चंचळ निश्चळ । द्वैत तळमळ तेथे नाही ॥४॥
तेथे नाही दैन्य वस्तु सर्वमान्य । तयासी अनन्य देवदास ॥५॥

७८०.
कुमारीच्या पोटां ब्रह्मचारी आला । विचारितां जाला तोचि बाप ॥१॥
बापचि पुरुष ते तो मायराणी । शब्द विचक्षणी विचारावा ॥२॥
विचारितां होय नातूही पणतू । प्रपिता हे मातु मिथ्या नव्हे ॥३॥
मिथ्या नव्हे कदा हा देहसंबंधू । विस्तारे विविधु सोयरीक ॥४॥
सोयरीक संबंधु नाही त्या निर्गुणा । शाश्वताच्या खुणा दास म्हणे ॥५॥

७८१.
ज्ञाता ज्ञान ज्ञेय ध्याता ध्यान धेय । बोधे साध्य होय साधक तो ॥१॥
साधकु तो वस्तु होउनी राहिला । दृश्य द्रष्टा गेला हरपोनी ॥२॥
हरपोनी गेले कार्य ते कारण । चुकले मरण येणे जाणे ॥३॥
येणे जाणे गेले निरुपणासरिसे । ब्रह्म निजध्यासे ब्रह्मरुप ॥४॥
ब्रह्मरुपातीत अच्युत अनंत । दास म्हणे संतसंग धरा ॥५॥

७८२.
एक देव आहे खरा । येर नाथिला पसारा ॥१॥
हेंचि विचारे बाणावे । ज्ञाता तयास म्हणावे ॥ध्रु०॥
साच म्हणो तरी हे नासे । मिथ्या म्हणो तरी हे दिसे ॥२॥
पाहूं जातां आकारला । मुळी नाही कांहीच जाला ॥३॥
कैसा देही देहातीत । कैसा अंताचा अनंत ॥४॥
रामदासाचे बोलणे । स्वप्नामाजी जागे होणे ॥५॥

७८३.
विदेशासी जाता देशचि लागला । पुढे सांपडला मायबाप ॥१॥
मायबाप राम या विश्वलोकांचा । तो स्वामी आमुचा सर्व देशी ॥२॥
सर्व देशी आहे विचारे पाहतां । जाता न राहता सारिखाचि ॥३॥
रारिखाचि देव कदा पालटेना । राहे त्रिभुवना व्यापुनीयां ॥४॥
व्यापुनीयां दासा सन्निधचि असे । विचारे विलसे रामदासी ॥५॥

७८४.
मनाहूनि विलक्षण । तेचि समाधिलक्षण ॥१॥
नलगे पुरुनी घ्यावे । नलगे जीवेंचि मरावे ॥२॥
अवघा वायु आटोपवा । नलगे ब्रह्मांडासी न्यावा ॥३॥
डोळे झांकूनि बैसला । परि तो मने आटोपिला ॥४॥
नाना साधनी सायास । मने केला कासावीस ॥५॥
रामदास म्हणे वर्म । हेंचि मनाचे सूगम ॥६॥

७८५.
दृढ होतां अनुसंधान । मन जाहले उन्मन ॥१॥
पाहो जातां माया नासे । द्वैत गेले अनायासे ॥२॥
होता बोधाचा प्रबोध । जाला शब्दाचा निःशब्द ॥३॥
ज्ञान विज्ञान जाहले । वृत्ति निवृत्ति पाहिले ॥४॥
ध्यानधारणेची बुद्धि । जाली सहज समाधि ॥५॥
रामीरामदास वाच्य । पुढे जाला अनिर्वाच्य ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP