मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग

संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग

जो पर्यंत संतू तेली व संताजी जगनाडे हे भिन्न आहेत, हे निश्चित होत नाही, तोपर्यंत प्रस्तुत - अभंग संताजी जगनाडे यांचेच आहेत असे मानणे भाग ठरते.


माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ॥ माझिया जातीचा मजशीं मिळेल । कळेल तो सर्व समाचार ॥ संतु म्हणे येथें पाहिजे जातीचे । येरॅं गबाळाचें काम नाही ॥१॥
एकादिशी दिनी संतु तुका वाणी । राऊळा आंगणी उभे होते ॥ तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना । पांडुरंग चरणा नमियेले ॥ तेथुनी तो आला तुका जेथें होतां । आलिंगन देतां झाला त्याशीं ॥ तुका म्हणे संतु पुसतो तुजला । सांगतो तुजला संतु म्हणे ॥२॥
तुजशीं तें ब्रह्मज्ञान कांहीं आहे । किंवा भक्तिमाय वसे पोटी ॥ काय तुझ्या मागें कोण तुज सांगे । काय ते अभंग जाणितले ॥ घाणाची घेऊनी बैसलासि बुधा । जन्म पाठिमागा कां गेला ॥ तुका म्हणे सर्व सांग तुं मजला । सांगतों तुजला संतु म्हणे ॥३॥
मजशीं तें ब्रह्मज्ञान काहीं नाहीं । आपुल्या कॄपेनें होईल सर्वथाहीं ॥ होइल मज आणि माझिया कुळांशीं । पांडुरंग मुळाशीं सर्व आहे ॥ संतु म्हणे ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे । आपुलें तें मन सुधारलें ॥४॥
भक्ति ते माऊली माझे नच पोटी । जाणें उठा उठी देवराया ॥ भक्ति या भावाची करूनिया लाट । आलिंगितो तीस रात्रंदिन ॥ संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद द्यावा वारंवार मजलागी ॥५॥
मज मागें घाणा सांगे द्वारकेचा राणा । मज मागें संसार सांगे रूक्मिणीचा वर ॥ मज मागें घेव देव सांगे रुक्मिणीचा राव । मज मागें निद्रा आहार सांगे उमा सारंगधर । किर्तीविना कांहीं मागें तें राहिना । संतु सांगे खुणा तुकयाशी ॥६॥
ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग । देह आपुला भंगतो माति मिळोनियां जातो ॥ त्याचें होइनाच काहीं अंतरीं शोधुनियां पाही । प्राण जातो यमपाशीं दुःख होतें ते मायेशीं ॥ संतु म्हणे असा अभंग गाईला । पुझें चालुं केला देहावरी ॥७॥
जन्मलों मी कुठे सांगतां नये कांहीं । निरंजन निराकार आधार नव्हतां ठाई ॥ तेथें मी जन्मलों शोधुनियां पाही । जन्मले माझें कुळ आशेच सर्वही ॥ असाच हा जन्म पाठी मागा गेला । पुन्हा नाहीं आला कदा काळीं । संतु म्हणे वनमाळी । चुकवा जन्माची हे पाळी ॥८॥
सगुण हा घाणा घेऊनि बैसलों । तेलीजन्मा आलों घाणा घ्याया ॥ नाहीं तर तुमची आमची एक जात । कमी नाहीं त्यांत आणु रेणु । संतु म्हणे जाती दोनच त्या आहे । स्त्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ॥९॥
आमुचा तु घाणा त्रिगुण तिळाचा । नंदी जोडियला मन पवनाचा । भक्ति ही भावाची लाट टाकियली । शांती शिळा ठेवली विवेकावरी । सुबुद्धीची वढ लावोनी विवेकांस । प्रपंच जोखड खांदी घेतीयले ॥ फेरे फिरो दिले जन्मवरीं । तेल काढियलें चैतन्य तें ॥ संतु म्हणे मी हे तेल काढियले । म्हणूनी नांव दिले संतु तेली ॥१०॥
देह क्षेत्र घाणा ऐका त्याच्या खुणा । गुदस्थान जाणा उखळ ते ॥ स्वाधिष्टानावरी मन पुरचक्र । विंदु दंत चक्र आनु हात ॥ एकविस मनी खांब जो रोविला । सुतार तो भला विश्वकर्मा ॥ मनाशीं जुंपले फेरे खाऊं दिले । तेल हाता आले सुटे मन ॥ संतु म्हणे माझा घाणा हो देहांत । चालवि आपोआप पांडुरंग ॥११॥
निंदक हा घाणा म्हणावा तो जरी । विवाहा भितरी फिरे कैसा ॥ ब्राह्मण पुरोहित आणिक ते जोशी । भरा आधीं घाणा म्हणती सर्वांशी ॥ भरल्यावांचुनी कार्य सिद्धी नाहीं । शोधुनिया पाहीं संतु म्हणे ॥१२॥
निंदक हा घाणा म्हणावा तो जरी शुभ कार्या आधिं भरतात ॥ श्रीकृष्णाचे लग्नी भरीयला घाणा । म्हणवेना कोणा निंदक तो ॥ संतु म्हणे म्यां तो घाणा भरियला । सिद्धीस तो नेला पांडुरंगे ॥१३॥
आणिक तो घाणा कोणता सादर । सोहं ब्रह्मध्वनी अनुहात गजर ॥ ब्रह्मांड शिखरीं ठोक वाजे । दशनाद होती सर्वांचें ब्रह्मांडीं ॥ संतु म्हणे हा तो देवा घराचा घाणा । सद्गुरु वांचोनी कळेनाच कोणा ॥१४॥
घाण्याचा कर करा पुसलासी मज । तरी तुकया गुज सांगु आतां ॥ दशनाद होती सर्वांचे ब्रह्मांडीं ॥ तुझे काय पिंडी वाजताती ॥ संतु म्हणे माझे घाण्याचा करकरा । दशनादाचा तो खरा जगा माजी ॥१५॥
आशा मनाशा तृषा माया पाचरौचारी आणुन । दुर्गतीचा खील त्यांमधी दीला ठोकून ॥ त्याच्या योगें चारी पाचरी आल्या आवळून । सरकायासीं जागा नाहीं मुळापासून ॥ संतु म्हणे ह्या घाण्याच्या पाचरी । जग भुलव्या नारी खर्‍याच ह्या ॥१६॥
भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशीं । आणिक नारदाशी त्याच रीती ॥ ब्रह्मदेवा आणि विश्वाही मित्रांशीं । तसेच भुलविले इंद्रा आणि चंद्राशीं ॥ संतु म्हणे अशा ह्या घाण्याच्या पाचरी । काढाव्या वेगशीं देहांतुनी ॥१७॥
हरिचंद्रराजाने पाचरी ओळखिल्या । हाकलुनि दिल्या घरांतुनी ॥ अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी । गोरोबानी आणि तुकारामजिनी ॥ संतु म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी । सद्गुरुबांचोनी ओळखिना कोणी ॥१८॥
पाचरीनीं प्रताप दाखविला शंकरा । भुलवोनी गेला भिल्लीनीशी ॥ विश्वामित्रासी रंभेनें कुत्रा बनविला । मागें मागें नेला घराप्रती ॥ संतु म्हणे अशा घाण्याच्या पाचरी । दाखविल्या चारी सद्गुरुजिनी ॥१९॥
सद्गुरुवांचोनी दाखविना कोणी । संसार मोहनी पाडली असे ॥ संसार करूनि पांचरी ओळखिल्या । उद्धरूनि नेल्या तुकोबाने ।
। संतु म्हणे माझ्या सद्गुरुच्या कृपेनें । पाचरी बसविल्या घाण्यामाजी ॥२०॥
मनोभक्तिची करूनी लाठ । गुरुकृपेचा बसविला कठ ॥ आंगावरि घेऊनी नेट । दाखवि वैकुंठीची वाट ॥ अशी ही संतु तेल्याची लाट । कळिकाळाची ..... फाट ॥२१॥
लाट उचलली जगामधीं कोणी । मार्कंड ऋषिनी आणि विदुरानी ॥ वाल्मीकानी आणि शवरिनी ॥ अर्जुनानी आणिक सुदामानी ॥ लत उचलली भक्तिची । संतु तेल्याचे मुक्तिची ॥२२॥
संतु तेलियाचे घाण्याची ती लाट । उचलितो कोण देऊनियां नेट ॥ नेट तो दिधला लंकेचे रावणे । उचलेना तेने कदापिही ॥ संतु म्हणे माझे घाण्याचि ती लाट । सुदामा उचली तेव्हांच ती ॥२३॥
सुदामाशी शक्ति कांहींच नव्हती । रावणाशी होती पुष्कळच ती ॥ रावणा उचलेना सुदामा उचली । मती गुंग झाली रावणाची ॥ संतु तेली म्हणे सद्गुरुवांचोनी । लाट ही उचलेना कदाकाळीं ॥२४॥
लाठ माझा आता लाठ माझा पिता । लाठी विना कांता विद्रुपची ॥ लाठी हिनें मजला दिधली ती लाट । चुकविली वाट जन्म मरणाची ॥ संतु म्हणे उचला घाण्याची ती लाट । व्यर्थचि खटपट करू नका ॥२५॥
मन मोहाची करुनि खुटी । लाठीस ठोकली बळकटी ॥ फिरे गरगरा लाठी भोंवताली । ध्यान जाईना लाठीवरी ॥ संतु म्हणे माझ्या घाण्याची ती खुटी । पहा उठाउठी अगोदर ॥२६॥
खुटिनें प्रताप कोणास दाखविला । दशरथ राजाला आणि नारदाला ॥ दशरथाचा अंत खुंटीनेंच केला । नारद तो झाला नारदीच ॥ संतु म्हणे अशीहि खुंटी ती मोलाची । विश्वाच्या तोलाची एकटीच ॥२७॥
खुंटीनें खुंटलें घाने ते घ्यायाचें । मनी नाहीं आलें अगोदर ॥ आतां तरी सावध व्हारे लवकरी । खुंटीविना घाणा घ्यावयाशीं ॥ संतु म्हणे माझें घाणे ते राहू द्या । खुंटीशीं पाहु द्या अगोदर ॥२८॥
खुंटीनें प्रताप कैकईस दाखविला । वनवसा राम गेला गादी दिली भरताला ॥ भरतानी त्याग केला पादुकास मान दिला । दुःखतें होतसे कैकइच्या जिवाला ॥ संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुंटी । केली तुटा तुटी मायलेका ॥२९॥
अशिया खुंटिला धरूं नये हाती । करिल ती माती सर्वत्रांची ॥ असेच खुंटिनें गोपिचंदा फसविले । धातुचे पुतळे जळोनियां गेले ॥ संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुंटी । सद्गुरुवांचोनी सोडविना मिठी ॥३०॥
मन झोंपेची करुनी शेंडी । लाठिच्याही ठोकुनि तोंडी ॥ काळ मोडुन टाकिल मुंडीं । कितीहि आल्या झुंडीच्या झुंडी ॥ सोडविना कोणी सद्गुरु वांचोनी । पहा तपासुनि संतु म्हणे ॥३१॥
शेंडिच्या नादाने किती ते फसले । फसले अवघे जन त्रैलोकींचे ॥ तुका वाणी यानें शेंडिशीं बांधले । कधीं नाहीं भ्याले रात्रंदिन ॥ संतु म्हणे ऐशीं शेंडी ती बांधावी । जोड ती करावी विठ्ठलाची ॥३२॥
आणिक ते शेंडी उभी हो कोणाची । नारद मुनिची असेच कीं ॥ जेव्हा कोठें कांहीं कळहि मिळेना । तेव्हां ती कडादे आपोआप । संतु म्हणे अशी शेंडी ज्याची आहे । शरण त्यांनी जावे सद्गुरूसी ॥३३॥
आणिक शेंडीने फसविलें कोणा । रावणाच्या भावा कुंभकर्णा ॥ कुंभकर्णाशीं होती झोंप फार । तेणे तो आहार फार करी ॥ संतु म्हणे शेंडी नसावीं बा अशी । कुळक्षय लाशी आपोआप ॥३४॥
झोपेंत असतांना दिलें दान । राजा हरिचंद्रानें साडे तीन भार ॥ भार सुवर्ण होईना तें पुरे । पुरे सर्व देऊन घेतलें स्वतःच विकून ॥ संतु तेली म्हणे हो म्हणेही झोंप । हिचा सर्वाहीं करा करा कोप ॥३५॥
मनोसुविचाराची करुनि कातर । शेंडिस टांगली वर हो शेंडिस टांगली वर ॥ लाटिचा आधार तिला फार हो लाठि । फिरे गरगरा जोरानें हो फिरे गरगरा ॥ मन पावन चाले तोर्‍यानें हो मन पवन चालें ॥ संतु वा म्हणे हो म्हणे ही कातर हो । धरावी ध्यानीं ध्यानीं सर्वांनी ॥३६॥
कातरिनें कातरला दुष्टाचा तो गळा । सांवल्याचा मळा सांभाळला । कातरीनें कातरला रावणाचा मळा । लंकेचा डोंबाळा तिने केला ॥ संतु म्हणे कातर आणिल जो ध्यानीं । आवडेल तो प्राणी सर्व जगा ॥३७॥
कातरीनें कातरला दुःशासन कौरव । आणिक भस्मासुर भस्म केला ॥ आणिक कातर चालली ती कशी । अहि महि लंकेशीं बळी दिले ॥संतु म्हणे कातर ज्याचें देहीं आहे । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३८॥
कातरीनें धरियले पांची पांडवांशीं । सोडुनिया दिले लक्षागृहीं ॥ आणिक शत्रुघ्न भरत धरियला । सोडुनियां दिला अश्वमेधीं ॥ संतु म्हणे कातर ज्यांनी ओळखिली । मोडोनिया गेली आपोआप ॥३९॥
कातर मोडली कोणाचिये हाते । तारामती आणि हरिचंद्र मते ॥ तशीच कातर कोणी ते मोडली । आनुसया आणि सती सावित्रीनी ॥ संतु म्हणे माझे घाण्याची कातर । फिरे निरंतर सर्वां देहीं ॥४०॥
मन शांतिची करुनी शिळ । तिजवर बसलें माझें कुळ ॥ तिच जन्म मरणाचे मुळ । असे माझें सांगणें समुळ ॥ संतु म्हणे ही शिळ जेथें आहे । तेथें यम पाश उभा राहे ॥४१॥
असा यम पाश लागला कोणाशीं । लागतो सर्वांशी शेवटी तो ॥ आणिक कोणाशीं लागला तो पाश । मार्कंड ऋषी आणि सत्यवानाशीं ॥ संतु म्हणे धरा शांती तुम्ही देहीं । नरकाचे डोही जाऊं नका ॥४२॥
मार्कंड ऋषीचें गळी पडतां पाश । केला तेणें ध्यास शंकराचा ॥ सत्यवाना गळीं पडतांच पाश । केला त्याचा नाश सावित्रीने ॥ संतुम्हणे माझ्या घाण्याची ती शिळ । देतें तिळ गुळ यमा होतीं ॥४३॥
क्षमा शांती जया नराचिये देहीं । दुष्ट तया कांहीं करीत नाहीं ॥ जरि ही कोणाशीं राग फार आला । तरि तुं धरिरे शांती फार ॥ संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली । तेथें उडी आली यमाजिची ॥४४॥
आशिच ही शिळा होते कोठें कोठें । अहिल्या आणि गोरोबाचे येथें ॥ आणिक कंसाचे दारी होती शिळा । आपटि तिजवरी कृष्णाजिचें कुळा ॥ संतु म्हणे तुम्ही ध्यानीं धरा शिळा । उद्धराया कुळ आपुलिया ॥४५॥
सुबुद्धिची वढ घेऊन । विवेक कातरीस बांधून ॥ मन पवन अढी जोरानें । मग तो घाणा चाले मौजेनें ॥ संतु म्हणे माझ्या घाण्याची वढ । करा वढावढ जन्मवरी ॥४६॥
अशीच ती ओढ कोठें ती ओढली । देवा आणि दैत्यांनीं मिळोनियां ॥ मंथन तें केलें सप्त समुद्राचें । हाता काय आलें काळकुट ॥ संतु म्हणे ओढ फार ओढुं नये । तुटेल ती पाहे सहजची ॥४७॥
आणिक ती ओढ पाहिली कोठें होती । कृष्णाच्या गोकुळी गोपी हाती । घुसळण करी देवकी ती माता । लोणी खात होता जगदात्मा ॥ संतु म्हणे माझ्या घाण्याची ती वढ । जन्माची ती जोड हची माझी ॥४८॥
मारुतीस वढ दिली रामचंद्राने । तशीच कृष्णाजीनें दिली अर्जुनास । कर्णानेंही दिली सारथी शल्यास । आणिक ती दिली धर्मानीं कौरवांस ॥ संतु म्हणे ही वढ जो जाणील । तोच कुला उद्धारुनी स्वर्गीं नेइल ॥४९॥
अंगदानीं वढ दिली रावणाशीं । ऐकेना कोणाशीं कदाकाळीं ॥ मागुनि तो आला मारुती हा बळी । लंका मग जाळी दशकंठाची ॥ संतु म्हणे वढ आहे अवघड । हिशीं काधा तोड कांहीं तरी ॥५०॥
संसाराचे धरूनी जोखड । जिजाबाई ह्याच्यासाठी रडे ॥ तुकाचे नावें फोडी खडे । विठ्याशीं बोटें मोडी कडकडे ॥ संतु म्हणे हे जोखड वाईट । याचा योवो विट सर्वांलागीं ॥५१॥
नको नको जोखड म्हणे तुकापाणी । जिजाबाई राणी हानी मारी ॥ म्हणे कैसें तुला लागलें हें वेड । संसारात जोड करि कांहीं ॥ संतु म्हणे असें आहे हें जोखड । करा कांहीं जोड देवाजिची ॥५२॥
प्रपंचाचे घेऊनि जोखड । युवतिच्या करि पुढें पुढें ॥ देवाची करिना कधीं जोड । हींव भरी झालाशीं बिनतोड ॥ संतुबा म्हणे हे जोखड । ह्यांस पाहतां संत रडे ॥५३॥
नको तो जोखड म्हणे गोरा कुंभार । रोहिदास चांभार तेची म्हणे ॥ नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे । आमुचिही मनें बिघडविली । संतु तेली म्हणे घाण्याचें जोखड । आहे फार जड जगामाजी ॥५४॥
जोखडानी फसविलें नारद मुनिशीं । आणिक वाल्मीकासी फसविलें ॥ फसविलें आणिक कैकेयी मातेशी । मंथरा दासीसी त्याच वेळीं ॥ संतु म्हणे तुम्हीं फसुं नका यांस । सद्गुरुची कास धरा वेगीं ॥५५॥
मग मत्सराचा धरुनि हात । बसविला विवेक कातरीचे अंत । तरी आकळेना बहुत याची मात । पाडली तीन भोकें मस्तकांत ॥ संतु म्हणे हा मोठा बोका । मस्तकीं बाहुली ठोका ॥५६॥
मत्सर धरियला जगांमध्ये कोणी । सत्यभामा रुक्मिणी ॥ भांडण तें केलें कृष्ण या देवासी । फुल पारिजातक मिळवावयासी ॥ सतु म्हणे हा मत्सर । जगामध्ये महा चोर जागामध्यें ॥५७॥
आणिक मत्सर धरियला कोणी । सुमित्रा आणि कैकेयीनें ॥ भांडण तें केलें राजा दशरथाशीं । गादी भरताशी मिळावया ॥ संतु म्हणे हा मत्सर । तुकोबाचा घरचा केर ॥५८॥
आणिक तो हात पाहिला कोठें । सुलोचना अंगणीं पडियला । हातानी त्या लिहीला सकळ समाचार । उडविला जो कहर लंकेवरी ॥ संतु म्हणे असा हात तो हुशार । केला जार जार सुमित्रानें ॥५९॥
आरिक तो हात पाहिला कोठें । गोरोबाचे येथें मंदिरात । गोरोबानें हात तोडुनि घेतले । पुन्हां मग दिले विठ्ठलानें ॥ संतु म्हणे असा आहे हो हा हात । त्याची गेली मात त्रैलोक्यांत ॥६०॥
औट हाताचे बाहुले करून । घाण्या भोंवती फिरे पाहुन ॥ प्रपंच जोखड शिरीं घेऊन । चाले मन पवन आनंदाने ॥ संतु म्हणे हें बाहुलें । जन्मावरी करी हुल हुल ॥६१॥
अशीं हीं बाहुलीं नाचवी पांडुरंग । जगांत जन्मासी घालुनियां ॥ केव्हां केव्हां म्हणे जन्माशीं येतांच । आखेर वैमानी झालेच ते ॥ संतु म्हणे माझा विठ्ठल तूं सखा । आम्हां जन्मासीं घालुं नका ॥६२॥
जन्मोनियां इहलोकीं काय केलें । पुष्कळच ते धन मिळविलें ॥ आणिक मिळविलें वतनवाडिशीं । रांडा आणि पोरां आवघ्याशीं ॥ संतु म्हणे तुम्हीं मागें ते सरावें । मरावें परी किर्तीरूपे उरावें ॥६३॥
तुझिया सांगातीं येते कांहीं कांहीं । कोणी येत नाहीं बाप आणि माई ॥ सोयरा न येतों बंधू ही येईना । येईना रांडा पोरें अंतकाळी ॥ संतु तेली म्हणे उरलिया वेळीं । आठवा वनमाळी रात्रंदिन ॥६४॥
संसाराकरितां जन्म वायां गेला । काळ न्याया आला आवचित् ॥ सोडी सोडी यमा मज क्षणभरी । घरातील ठेवा दाखवूं दे ॥ संतु म्हणे यम कसा तो सोडील । नाडील आवघ्यासीं सावध व्हारे ॥६५॥
सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यानों । आवघ्या जनानों सावध व्हारे । काळाचिये उडी पडेल बा जेव्हां सोडविना तेव्हां माय बापा ॥ संतु तेली म्हणे सावध कोण झाला । देहासहित गेला तुकावाणी ॥६६॥
मन पवनाचा करुनि नंदी । पाहुनि संसारमधीं संधीं ॥ जोखड घेऊनियां खांदी । भ्रमाची झांपडी बांधी ॥ संतु तेली म्हणे हा नंदी । करिता सर्व जगाची चांदी ॥६७॥
मन हें ओढाळ गुरु फार आहे ॥ परधन पर कामिनीकडे धांवें ॥ असेच हें मन राहिना हो स्थिर । नेहमीं हुरहुर लागली असे ॥ संतु म्हणे मन करा तुम्हीं स्थिर । राऊळा आंगणीं जाऊनियां ॥६८॥
मनाला तो बोध रामदासांनें केला । उपदेश दिला जगामाजीं ॥ चंचल हें मन धांवें सैरावैरा । यानेच मातेरा केला देहाचा ॥ संतु म्हणे मन लावा देवावरी । विठ्ठल विटेवरी उभा असे ॥६९॥
आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश । आमुचा उद्देश घराकडे ॥ हालवितो माना ऐकुनियां खुणा । विसरलों जाणा घरीं जाता ॥ संतु म्हणे तुम्हा सांगतों मी वेळीं । आयत्या वेळीं कांहीं होणें नाहीं ॥७०॥
पवन तो नंदी असे शंकराचा । आणीक बळीचा शेतकिचा ॥ नंदीनें घेतला सर्वांचा तो भार । कळेना तो पार कोणासही ॥ संतु म्हणे नंदी मारील हो तुम्हां । दर्शनाशीं न जातां शंकराच्या ॥७१॥
घेऊनिया घाणा तेल काढियले । गिर्‍याइक संत मंडळीचे आले ॥ कसे देतां तेल सांगावें संताजी । तुम्हीं काय घेता घेणार तो तुका ॥ संतु म्हणे तेल जो कोणी घेईल । कानीं तें फुंकिल बाबाजी महाराज ॥७२॥
संतु म्हणे तेल आणीक कोण घेतो । तुका वाणी येतो घ्यावयास ॥ घाला तुम्हीं तेल आवघ्याच नळ्य़ांत । गळ्यांत जो आहे त्यांतही घाला ॥ संतु म्हणे तेल घालुनि उरले । मोल त्याचे दिलें पांडुरंगे ॥७३॥
आणीक हें तेल घेतलें कोणी । निवृत्ती ज्ञानोबांनी आणि सोपानानी ॥ मुक्ताबाईनी आणि एकनाथजिनी । तेल हें घेतलें नामदेवाजिनी ॥ संतु म्हणे तेल कोणी जो घेईल । दुकाना येईल विठलाच्या ॥७४॥
आणिक तें तेल घेतलें कोणी । गोर्‍या कुंभारानीं चोख्या महारानीं ॥ तसेच नरहारी सोनारानीं । कबीरानीं आणि रोहिदास चांभारानीं ॥ संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल । त्याचे तुम्हां मोल देईल पांडुरंग ॥७५॥
आणिक तें तेल घेतलें कोणी । सांवतामाळी यांनी आणि विदुरांनी ॥ तसेच हे तेल घेते जनाबाई । मागें पुढें पाहीं कान्हुपात्रा । संतु तेली म्हणे तेल आवघें झालें । पुष्कळ तें नेलें तुकोबानें ॥७६॥
संतु म्हणे मी जें सांगितलें तुम्हां । आपले कृपेनें फळ दिलें आम्हां ॥ नाहीं तरी आम्हां कैचें ज्ञान कांही । मुळींच तें नाही पाठांतर ॥ संतु म्हणे कांही सांगितलें नाही । पांडुरंग पायीं धरियलें ॥७७॥
मारवाडी मारवाडचा, गुजर गुजराथेचा । कानाडी कानड्याचा, मुसलमान तो दिल्लीचा ॥ मराठी महाराष्ट्राचा, कोंकणी कोकणचा । संतु तुका या देशीचा, वाणी होस की तो साचा ॥ संतु म्हणे वाणी तुका । विठल चरनीं वाहु बुका ॥७८॥
देवासीं अवतार भक्तांसीं संसार । दोहींचा विचार एकपणें ॥ भक्ताशीं सेहळे देवाचिये आंगे । देव त्यांच्या संगे सुख भोगी ॥ देवें भक्तारूप दिलासे आकार । भक्ति त्याचा परिवार देव देव भक्त ॥७९॥
दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठल सखे । एक उभा राऊळा आंगणीं ॥ एक घाना बैसे जाऊनि । एक जपे जप माळ, एक वाजवितो टाळ ॥ एका आंगा लाविले गंध । एका अंगा येई सुगंध ॥ एक वाजवितो ठाव ॥८०॥
एक कुडी वैष्णवाची । एक कुडी ती स्नेहाची ॥ एक कुडी घातलें शिट । एक कुडी दिसे तेलकट ॥ एके कुडी घातली माळा । एकीचा रंग दिसे सांवळा ॥ संतु म्हणे कुडी टोपन । हिचे करूं नका जोपन ॥८१॥
आमुची तीं रूपें दिसतात दोन । परि पाहों मन सारखेच ॥ नांवाच्या अक्षरांची करितां ताडातोडी । परि तेहीं जोडी होय पुन्हां ॥ संतु म्हणे ह्याचे कारण तें काहीं । शोधुनियां पाहीं ग्रंथांतरी ॥८२॥
आम्हीं तों आहोंत या देशीचे वाणी । आम्हीं तो विकतो तेल सौदा दोन्हीं ॥ तुका विकी सौदा आणिक मिरची । संतु विकी तेल लागुनि चुरशी ॥ तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे । तुकयाशी खुण पतली असे ॥८३॥
धन्य धन्य संतु होशील तूं जाण तुजलागी ज्ञान फार आहे ॥ व्यर्थ तुझी निंदा करिताती लोक । मजलागी देख कळो आलें ॥ ज्ञानाचा सागर होशील तू योगी । नेणती हें जगीं मूढ जन ॥ तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञन । ऐकतां वचन गोड लागे ।८४॥
जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता । काय तुज आता सांगू वर्म ॥ किंचित तो अर्थ जरी भरे मना । मग त्याच्या ज्ञाना पार काय ॥ यमाच्या घरची जाचनी चुकली । मूळ भेदी खोली उंच पहा ॥ संतु म्हणे मी तों देहींच पाहीलें । पुढील चुकविलें गर्भवास ॥८५॥

संत श्रीसंताजीमहाराज जगवाडे - अभंग समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP