मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
काव्य कोणाचें ?

काव्य कोणाचें ?

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( दिंडी )

“ कवे ! कोणीं हें काव्य लिहीयेलें ?”
“ मींच ---” कविनें प्रतिवचन बोलिजेलें,

“ बरें तर ! हें वाचून अतां पाहूं,
श्लोक सुन्दर यांतील सदा गाऊं.”

मनीं वाचक तों दंग फार झाला,
क्लृप्ति आढळली सरस एक त्याला;

म्हणे कविता “ ही रम्य फार आहे ?”
वदे कवि “ ती मम पंक्ति कीं नव्हे ते.”

पुढें वर्णन पाहून रेखलेलें,
वाचकाचें रममाण चित्त झालें;

कविस शंसी तो “ धन्य ! ” अशा बोलें
त्यास “ वर्णन मम न तें ” कवी बोले.

“ काव्य लिहिलें हें सत्य तूं असून,
“ नव्हे माझें हें --- नव्हे तें ” म्हणुन

सांगसी, तर परकीय कल्पनांतें
तुवां घेउनि योजिलें, गमे मातें,”

‘ नव्हे ऐसेंही ?’ कवी वदे त्यातें,
“ काव्य लिहिले मीं खरें, परी मातें

शारदेनें जो मंत्र दिला कानीं,
तसें लिहिलें मीं;--- काव्य तिचें मानीं !”

“ दिव्य शक्तीनें स्फुरें गंध पुष्पीं,
रंग खुलतीही तिनें इंद्रचापीं;

सृष्टिमाजीं जें रम्य असे कांहीं
तीच कारण त्या शक्ति असे पाहीं ”

भडगांव, ७ ऑगस्ट १८९७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP