मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
कविता आणि प्रीति

कविता आणि प्रीति

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( भुजंगप्रयात )

फिरावयास मी मित्र घेवोनि गेलों;
बघोनी सुरम्य स्थळा एक ठेलों;
किती हारिनें वृक्ष ते दाट होते,
जलाचे तळीं पाट होते वहाते;

तृणाच्या मधीं, राखिल्या गार जागा
कडेनें तयांच्या, लतांच्याहि रांगा---
फुलांच्या बहारांत त्या शोभताती;
अलींचे थवे त्यांवरी धांव घेती;

मधूनी किती पक्षि ते गोड गाती.
मृगेंही मघें स्वैर तीं क्रीडताती;
मयूरें अहा ! दाखवीती पिसारे;
बघूनी मना तोष होई अहा रे !

मधें अंगना स्पृष्ट ज्या यौवनानें
नजाऽव्याजरूपास साध्या मदानें
इथूनी तिथें चंचला नाचवीती,
पदालंकृति झंकृति तैं करीती;

मुलें खेळती नाचतीही मजेनें,
तयांचा अहो कोण उल्हास वाने ?
फुलें, तारका, ते दंवाचे तुषार,
तशीं मुग्ध हीं बालकें दिव्य फार !

अशी तेथली पाहुनी रम्य लीला,
मुखीं घालूनी ठाकलों अंगुलीला;
वदे मित्र मातें---“ पुढें चालणें ना ? ”
परी पाय तेथूनियां काढवेना !

( वसंततिलका )

बोले सखा “ गढुनि कां इतुका मनीं तूं ? ”
मी बोललों “ बघ मनांत विचारुनी तूं ”
तेव्हां पुसे “ अडविते कतिता ? ”---“ नव्हे रे,
प्रीती मला भूलविते-नच हालवे रे ! ”

मुंबई, ७ जानेवारी १८९०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP