मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
दोन बाजी

दोन बाजी

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( चाल---फटक्याची )

त्या शूरानें भगवा झेंडा हिंदुस्थानीं नाचविला.
निजराष्ट्राचें वैभव नेलें एकसारखें बढतीला;
जिकडे तिकडे समशेरीची कीर्ति आपुल्या गाजविली,
खूप शर्तिनें कदर आपली गनीमांस त्या लावियली,

आणिक तुवां रे ! --- त्वा नीचानें पाठ आपुली दादुनियां
रणांतुनी पौबारा केला, शेपुट भ्याडा वळवुनियां ?

गुणी जनाची पारख करुनी त्या धीरानें गौरविलें,
उत्साहाच्या वातें अपुल्या तेज तयांचें चेतविलें;
प्रतापदीपज्योति पोषिली सुजनस्नेहा वाढवुनी,
गनीममशकें कितीक गेलीं तिच्यामधें खाक्‍ होवोनी !

आणिक तूं रे ? -- नाचलासि तूं नग्नच संगें अधमांचे,
धूळ खात गेलास---लाविले सर्वत्र दिवे शेणाचे !

भटांस जे रणधुरंधर तयां पाचारुनि त्या सिंहानें
माराया कीं मरावया अरिवरि नेलें आवेशानें,
’ हरहर !’ शब्दा परिसुनि वळली कितिकांची घाबरगुंडी
’ अला मराठा ! ’ म्हणत पळाल्या सैरावैरा किती लंडी !

तूंहि भटाला पाचारियलें, काय त्यांसवें परि केलें ?---
यथेच्छ लाडू मात्र झोडिले---नांव हाय रे बुडवीलें

घोडयावरिच हुरडा चोळित शत्रुशासना धांवोनी
तो गेला --- तूं बिछान्यावरी राहिलास रे लोळोनी !
वीर भले खंबीर आणखी मुत्सद्दीते सद्‍बुद्धि
त्यांच्या साह्यें निजसत्तेची त्यानें केली रे वृद्धि.

पण तूं रे ?--- तूं नगरभवान्या नाच्येपोर्‍ये घेवोंनी
दौलतलादा केला --- धिग्‍ धिग्‍ भटवंशीं रे जन्मोनी !

या भटवंशी महाप्रतापी ख्यात जाहले असूनिया
तुळशीमध्यें भांग निघाली अभद्र ऐशी कोठुनिया !
निजनामाचा ’ गाजी ’ ऐसा अर्थ उरवुनी तो गेला,
तर हळहळली आर्यमाउली ऐकुनि त्याच्या निधनाला

मरणाआधिंच मरून आणुनि काळोखी निजराष्ट्रला,
तूं गेलासी करून ’ पाजी ’ अहह ! पितामहनामाला !

मुंबई १६ फेब्रुवारी १८९५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP