मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
कवि

कवि

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( शार्दूंलविक्रीडित )

जज्जेचीं निज जो फुलें पसरितो आयुष्यमार्गावरी,
आहे अदभुत रम्य का अधिक तें त्याहूनि कांहींतरी ?
चाले तो धरणीवरी तर पहा ! जेथूनि तो चालिला ,
धूलि तेथिल होतसे कनकिता !--- घेऊं नका भ्रान्तिला.

तो गम्भीर वदे रवा, तर, मुक्या पृथ्वीस या वाटतें,
कीं ” मातें श्रति लक्षसंख्य फुटल्या, ” आणीक ती ऐकते !
दृष्टी तो फिरवी वरी, तर लवे आकाश तें खालती,
तारांचे गण गावयास वरुनी स्तोत्रें अहा लागती
लीलेनें स्वकरांत तो धरितसे कांडी बरूची जधीं,
सार्‍या सुन्दर वस्तु त्या झडकरी येती समाधीमधीं ---
त्याच्या, येउनि त्या तयास वदती ” आम्हांस दे भूषणें,
दिव्यें, आणि शिकीव लौकरि अम्हां तीं अप्सरोगायनें ! ”

श्वासोच्छ्‍वास करी परी नवल हें---जीवित्वसंहारक
वायू घेउनि आंत, तो त्यजितसे वायूस त्या पोषक !
राही तो तर देव भूमिवरतीं येतात हिंडावया,
जातां स्वर्ग धरेस उतरे त्यालागीं धुंडावया !

दादर १४ मार्च १८९१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP