मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय ४० वा सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४० वा ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhaपोथीसिध्दान्त बोध अध्याय ४० वा Translation - भाषांतर श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥ आतां नमू एकाकीं एक ॥ अवघा आपणची प्रकाशक ॥ श्रोत्र चक्षु वदन नासिक ॥ एके अंगीं शोभलीं ॥१॥सूप चाळणी दुरडी करंडी तट्टे ॥ वेळु अंगीं पदार्थ उमते ॥ खांब तुळई कडी किलचा चौकटे ॥ पदार्थ काष्ठ एक असे ॥२॥यापरी ईश्वरकरणी ॥ आपण नटला सर्व गुणीं ॥ तोचि कवीच्या हृदयभुवनीं ॥ हालवी वाचा बोलवीं शब्द ॥३॥आपण आपणा करी गमन ॥ जैसा तरंग सागरां शरण ॥ किरणें रवीशीं अनन्य ॥ तेवीं नयन पैं माझें ॥४॥देऊळ लिंग नंदी पायरी ॥ उंचनीच कल्पना करी ॥ अंगण माजघर वोसरी ॥ महीस विभाग हे कैंचे ॥५॥जगदीश जनार्दन ॥ यालागीं विश्वास केलें नमन ॥ माझें मला घडलें बंधन ॥ मीच विश्वबिंबीं विश्वात्मा ॥६॥मोती मीठ गार ॥ एका जळाचे तीन प्रकार ॥ तेवीं विश्वरुपाचा विचार ॥ इतर प्रकार काल्पनिक ॥७॥गूळ गोडी आणि ढेंप ॥ तीं नामें एकचि रुप श्वेत ॥ प्रकाश उष्ण दीप ॥ किंवा मूळ त्वचा आणि शाखा ॥८॥विजात स्वजांत स्वगत ॥ तीन प्रकारें बोले वेदांत ॥ अन्वय आणि व्यतिरिक्त ॥ हाही एक प्रकार ॥९॥विजात म्हणावें मोत्यांस ॥ स्वजात म्हणावें मिठास ॥ स्वगत बोलिजे तरंगास ॥ उदक एकचि असे ॥१०॥विजात म्हणजे प्रपंच पाहे ॥ स्वजात तों जीव होय ॥ स्वगत स्फुरण आहे ॥ मुळींचा उल्लेख मी ब्रह्म ॥११॥अन्वयव्यतिरिक्तांची गोष्टी ॥ तेही परिसा कर्णपुटीं ॥ यांत संशय कल्पना नुठी ॥ तैशा रीती सांगतों ॥१२॥मायेपासोनि प्रपंचरचना ॥ तो व्यतिरिक्त पदार्थ जाणा ॥ या विरहित ओळखिजे निर्गुणा ॥ अन्वय त्यास म्हणावें ॥१३॥आणिक एक प्रकार जाणणें ॥ तरंगास व्यतिरिक्त म्हणणें ॥ उदकांतें संचेलपणें ॥ हाही एक अनुभव ॥१४॥कोठें मृगजळ माया धरिली ॥ कोठें तरंगवत् कल्पिली ॥ दों प्रकारें शास्त्रीं बोधिली ॥ गुरुमुखें समजावें ॥१५॥कांहीं एक करणी वांचोन ॥ नकळे स्वरुप ज्ञान ॥ यालागीं अभ्यास पूर्ण ॥ सत्संग शास्त्रीं असावा ॥१६॥ध्रुवबाळ सत्संगे जाहला ॥ श्रीव्यासें पुराणीं गाइला ॥ त्याची कथा स्वामी कार्तिकाला ॥ अगस्तीनें पुसिली ॥१७॥श्रोता वक्ता दोघे समर्थ ॥ उभयतां भाषणीं अद्भुत ॥ त्याचा भाव किंचित ॥ श्रोते हो परिसावा ॥१८॥अगस्ति पुसे स्वामीस ॥ ध्रुवें कैसें केलें तपास ॥ स्वामी म्हणे बरवें परीस ॥ सांगतों त्याची मूळकथा ॥१९॥सूर्यवंशीं गा नृपती ॥ उत्तानपाद नामें विशाळकीर्ती ॥ दोघी भार्या तयाप्रति असती ॥ कनिष्ठ प्रिय वडिल अमान्य ॥२०॥कनिष्ठ अष्टौप्रहर सेवेस ॥ प्रीतीनें मोहिला नरेश ॥ वेगळें ठेविलें वडिलीस ॥ अप्रिय म्हणोनी ॥२१॥तिचें पोटीं जाहला कुमरु ॥ आवडीं नाम ठेविलें धुरु ॥ सभाग्याचा नरु ॥ नीटनेटका गोजिरा ॥२२॥अवलोकुनि जननी ॥ म्हणे पिता दावीं नयनीं ॥ येरी म्हणे राजचूडामणी ॥ मुख्य जनक तो तुझा ॥२३॥पिता परिसोनि आवडीं ॥ हरुषाची उभाविली गुढी ॥ मातेस वंदोनि तांतडी । जनकभेटी तो आला ॥२४॥बैसावें पित्याचे जानुवर ॥ भार्या वदें मागें सर ॥ तुज नसे अधिकार ॥ रायापुढें बैसावया ॥२५॥जानूवरी बैसले माझा कुमर ॥ त्यांसीच राज्यपदीं अधिकार ॥ तुझीया दैवीं दरिद्र घोर ॥ राज्यभोग लेश मिळेना ॥२६॥ऐसें वदतां सावत्र जननी ॥ आश्रुबिंदु पातले नयनीं ॥ महाखेद पावोनि मनीं ॥ जननीपासीं तो गेला ॥२७॥पाहोनि बाळकाची उद्विग्न दशा ॥ माय म्हणे रे राजसा ॥ कायनिमित्त शोकपाशा ॥ अवलंबिलें मज सांग ॥२८॥ध्रुव म्हणे वो जननी ॥ पिता अवलोकूनी नयनीं ॥ हर्षें बैसावें जानूवरी जाऊनी ॥ तों सावत्र मायेनें वर्जिलें ॥२९॥म्हणे राज्यीं बैसावें माझिया सुतें ॥ धिक्कारुन लाविलें मातें ॥ खेद पावलों हृदयांतें ॥ तो परिहार दिसेना ॥३०॥जननी म्हणे सत्य गोष्टी ॥ विधात्यानें लिहिलें ललाटीं ॥ दरिद्र पातलें आमुचे भेटी ॥ राज्यवैभव कैंचे आम्हां ॥३१॥देव देईल तेंचि घ्यावें ॥ आपुल्या संचितासी रुसावें ॥ पेरावें तेंचि उगवे स्वभावें ॥ अधिक मिळे कशानें ॥३२॥पदरीं बांधिली दरिद्र नरोटी ॥ परीस कोठून होईल शेवटी ॥ आतां पुत्रा न होईं कष्टी ॥ शोक पोटीं जिरों दे ॥३३॥राज्यभोग मुक्त पदवी ॥ प्राप्तीस अपार सुकृतें व्हावीं ॥ यालागी आराधना करावी ॥ एकनिष्ठा ईश्वरीं ॥३४॥सुकृताचा भरला होता ॥ मातृवचन लागला पालिता ॥ भडका उडाला अनुताप त्वरितां ॥ भरतें जेवीं सागरीं ॥३५॥आधींच दैवाचा पुतळा ॥ शुध्द अनुतापें तापला ॥ अग्नि जैसा प्रज्वळिला ॥ तेवीं जाहलें ध्रुवासी ॥३६॥करोनि मातेसी नमन ॥ संगें अनुताप घेऊन ॥ राज्यलोभ मानून वमन ॥ ग्राम त्यागोनी चालिला ॥३७॥हेर सांगती रायासी ॥ ध्रुव जातो वनवासी ॥ राव म्हणे पंचग्रामांसी ॥ अर्पितो सुखी असावें ॥३८॥ध्रुव बोले देईल जगदीश ॥ कोण पुसे पंच ग्रामास ॥ पिता बोले अर्धराज्यास ॥ देतो संतोषें आपुल्या ॥३९॥ध्रुव म्हणे हरी वांचून ॥ कोण घेतो राज्य सिंहासन ॥ राजा म्हणे सर्व देईन ॥ ध्रुव म्हणे नलगे ताता ॥४०॥तुटके उपानह देती टाकून ॥ तेवीं राज्य त्यागिलें ध्रुवान ॥ जैसा कुडीतून गेला प्राण ॥ पुन्हा प्रवेश करीना ॥४१॥त्वचा त्यागिल्या उरंगें ॥ नसें लोभ न पाहे मागें ॥ कीं लंका जानकीरंगें ॥ दिली इच्छा नसे कीं ॥४२॥तेवी निराश होऊन मना ॥ पुढे भाग्याचा उदयो जाणा ॥ ध्रुव चालिला मधुवना ॥ सप्तऋषि भेटले ॥४३॥रोगियास प्राप्त सुधारस ॥ किंवा रंकास सांपडें परिस ॥ नातरी गर्भाधास ॥ देखणी काळा उदेली ॥४४॥सप्तऋषी पाहोन ॥ ध्रुव घाली लोटांगण ॥ म्हणे तुम्ही दीनाकारण ॥ अवतार घेतला या सृष्टी ॥४५॥क्षुधार्थियास क्षीरसिंधू ॥ अनुभवियासी प्राप्त ज्ञानबोधू ॥ भाविकासी भेटे साधू ॥ तेवीं आनंदू मन वाटे ॥४६॥काय पुसावें स्वामीस ॥ हें नेणें माझें मानस ॥ राज्यभोगीं आला त्रास ॥ इतुकें चित्तीं जाणावें ॥४७॥तुम्ही भेटवाल ईश्वर ॥ जाहला कर्माचा परिहार ॥ ऐसें वदोनि आला गहिंवर ॥ अश्रु नेत्रीं लोटले ॥४८॥कश्यप म्हणे रे बाळका ॥ तुझ्या भाग्याची श्रेष्ठ रेखा ॥ भय न धरीं आवांका ॥ सांगतों विवेक स्वयें करीं ॥४९॥ईश्वर प्राप्तीकारण ॥ आधीं पाहिजे वैराग्य पूर्ण ॥ वैराग्यवांचोनि साधन ॥ निष्फळ दिसती सर्वही ॥५०॥दाराकुमरां कंटाळोन ॥ होईना संसार बहुत ऋण ॥ उठोनि जाय त्रासून ॥ त्रास वैराग्य या नांव ॥५१॥जोंवरी बैसती मसणखाई ॥ सांगती वैराग्याची नवाई ॥ म्हणती संसारी कांहीच नाहीं ॥ स्मशानवैराग्य या नांव ॥५२॥कोनीं निघता तिडका उठती ॥ तेव्हां म्हणे नलगे पती ॥ पुन्हां तेचि कर्मीं प्रवर्तती ॥ प्रसूतिवैराग्य या नांव ॥५३॥मैथुनीं दावी विलास ॥ वीर्यपतनीं मानी त्रास ॥ विटे पुन्हा उठे भोगास ॥ मैथुनवैराग्य या नांव ॥५४॥मूळ वैराग्य शुध्द अनुताप ॥ चित्तीं वसे ईश्वरस्वरुप ॥ उडे वासनेचा कल्प ॥ संसारभान दिसेना ॥५५॥माझिया आशीर्वादें हेंचि दशा ॥ तूतें घडों पुण्यपुरुषा ॥ पुन्हा न घडो जन्मवळसा ॥ अक्षयी कल्याण हो तुझें ॥५६॥अत्रि म्हणे ध्रुवालागुन ॥ वैराग्यासारिखा विवेक निपुण ॥ विवेकासारिखी शांति जाण ॥ तेव्हां शोभे सर्वही ॥५७॥तुंबा दांडी तिसरी तार ॥ एकत्र होतां नाद मधुर ॥ तेवीं विवेक वैराग्य शांतीचें घर ॥ तिन्हीं ज्यापासी तो धन्य ॥५८॥गंगा यमुना सरस्वती ॥ एकत्र होतां त्रिवेणी म्हणती ॥ रक्तमांस मीनल्या अस्थी ॥ तेव्हां बंदोबस्ती शरीरीं ॥५९॥नौबत चाम वाजविणार ॥ नाद घुमघुमे घनघोर ॥ लावण्य तारुण्य श्रृंगार ॥ निरखितां तृप्ति लोचनीं ॥६०॥यापरी शांति विवेक वैराग्य ॥ वसती तेथें सुखाचें सौभाग्य ॥ त्यासीच साधे महायोग ॥ न भंगे अभंग धैर्याचा ॥६१॥ज्यापासी विवेक शांति नसती ॥ वैराग्याची नसतां संपत्ती ॥ जेवी केली लग्नाची आइती ॥ नवरा घरीं राहिला ॥६२॥संन्यासवेष घेऊनियां शठ ॥ मार्गीं बैसे अंतरीं कपट ॥ शिकविलें तैसें नाचे मर्कट ॥ स्वतां बुध्दी ते नव्हे ॥६३॥प्रपंचीं परमार्थीं विवेक ॥ करी तोचि शाहणा देख ॥ स्वत: शांति अधिक ॥ हें काय लागे सांगणें ॥६४॥ज्यापुरुषासि शांति नाहीं ॥ त्याचा पुरुषार्थ व्यर्थ पाहीं ॥ पर्णिली नोवरी घ्राण नाहीं ॥ काय सौंदर्य जाळावें ॥६५॥पतिपत्नी उभयतां मुकीं ॥ संसारवेग चुकाचुकी ॥ लग्न समयीं नवर्यास लागली धुकधुकी ॥ सावधान तरी होऊं दया ॥६६॥तोत्रा चाटया तोत्रा गिर्हाईक ॥ बोलतां दोघांस राग अधिक ॥ मग कलहप्रसंग देख ॥ लोकांत तमाशा सहजचि ॥६७॥यापरी ज्यापासी शांति नाहीं ॥ तो अवघाचि विलग परमार्थ पाहीं ॥ घरा आलिया जांवई ॥ कन्या उपयोगा पडेना ॥६८॥भ्रतार कर्ता चतुर शाहणा ॥ स्त्री गुणाढय लावण्य वर्ते पतीच्या वचना ॥ पुत्र राहाटे उभयतांच्या रक्षूनियां मना ॥ मग किती गोड सांगावें ॥६९॥आतां माझिया वर ॥ विवेकशांतीचा होय सागर ॥ वृत्ति राहे तदाकार ॥ हो कल्याण अक्षयी ॥७०॥भारद्वाज म्हणे नृपकुमरा ॥ उडो संताप उर्मीचा थारा ॥ जाय कुवासना घेऊन मत्सरा ॥ न बाधे जरा दशा नूतन ॥७१॥काम क्रोध मद मत्सर ॥ हे षड्वैरी अनिवार ॥ यांनीं बुडविलें बहुतांचें घर ॥ केले कष्ट वृथाचि ॥७२॥ऐसे जे दुर्जन वैरी ॥ हे न वसोत तुझिया अंतरीं ॥ माझिया वरदकल्लोळ करीं ॥ हो कल्याण अक्षयीं घर ॥७३॥विश्वामित्र म्हणे ध्रुवराया ॥ धरीं धैर्य वरें माझिया ॥ बळकट असो तुझी काया ॥ निश्चभ वसो मेरुसम ॥७४॥बैसे पद्मासन घालून ॥ एकत्र मिळतील पंचप्राण ॥ षट्चक्रांतें भेदून ॥ कुंडलिनी प्राशील सत्रावी ॥७५॥लागेल मुद्रा खेचरी ॥ प्रगटेल अगोचरी चांचरी ॥ बैसेल कळाशी भूचरीं ॥ लक्ष लागो अक्षयीं ॥७६॥वृत्ति मिसळो सहस्त्रदळीं ॥ लागो ब्रह्मानंदीं टाळी ॥ अजर अमर काया हो सकळी ॥ आशीर्वादें आमुच्या ॥७७॥ गौतम वदे दया करुन ॥ सर्व शास्त्रीं मति दारुण ॥ चौदा विदया गुणसंपन्न ॥ वसोत हृदयीं तुझिया ॥७८॥ चातुर्य परीक्षिका चौसष्टी कळा ॥ बुध्दीस बोध भासत आगळा ॥ सदा शुची शुध्द निर्मळा ॥ पापमळ न लागो ॥७९॥तुझा संकल्प जाय सिध्दी ॥ तूतें विघ्न कदापि न बाधी ॥ सेवे तिष्ठती अष्टसिध्दी ॥ होय निधी विधीचा ॥८०॥ज्या सुखासी नाहीं भंग ॥ तें सुख असो तुज अव्यंग ॥ तूतें न छळो अनंग ॥ माझिया वरें सुजाणा ॥८१॥वसिष्ठें धरुनि हनूवटी ॥ शंख लाविला कर्णपुटीं ॥ बीजपुत्र फुंकिला होंटीं ॥ ज्याचें तेज ब्रह्मचि ॥८२॥म्हणे बाळका समसमान ॥ दिसो सबाह्य चैतन्य ॥ अद्वैत बोधें ज्ञानसंपन्न ॥ प्रकाशो तुर्या अक्षयी ॥८३॥भेटी देवोनि पुरुषोत्तम ॥ दिसो पिंडब्रह्मांडब्रह्म ॥ उडो भेद भ्रांति भ्रम ॥ होय सुगम देहबुध्दी ॥८४॥माझिया वराचें हेंचि बिरुद ॥ तूतें जोडो अक्षयी पद ॥ जेथें न बाधी प्रळय द्वंद्व ॥ करीं आनंद तें पदीं ॥८५॥जमदग्नि वदे माझे वज्रकवचें ॥ न लगती चपेटे विघ्नशरांचे ॥ भय न वाटे मृत्यूचें ॥ कृतांतवायु स्पर्शेना ॥८६॥यापरी सप्त ऋषि मिळोन ॥ सभाग्य केला राजनंदन ॥ ध्रुवानें घातलें लोटांगण ॥ अदृश्य जाहले ते समयीं ॥८७॥ध्रुवास अष्टविध भाव उदेला ॥ प्रेमा हृदयीं बहु दाटला ॥ मग तेथेंचि स्वस्थ बैसला ॥ मेरु जैसा चळेना ॥८८॥ऋषि अभय पुरतां शिरीं ॥ अष्टांगयोग बाणला शरीरीं ॥ गहन गंभीर निर्भय अंतरीं ॥ तपें तपला अत्यंत ॥८९॥ध्रुवतप चुंबकान ॥ इंद्रलोखंड कंपायमान ॥ मग अष्टनायका पाचारुन ॥ तपहरिणी प्रेरिल्या ॥९०॥त्या पातल्या श्रृंगार करुन ॥ केलें सप्तस्वरीं गायन ॥ ध्रुव वदे तुम्ही मातेसमान ॥ स्तनपान देऊं पातलां ॥९१॥लज्जित अप्सरा होऊनी ॥ ध्रुवास नमोनि गेल्या परतोनि ॥ हें जाणोनि कुलिशपाणी ॥ यक्षिणी प्रेरी विघ्नासी ॥९२॥ती विक्राळ भयानक ॥ पुढें धांवली पसरोनि मुख ॥ आरडोनि मारी हाक ॥ दचके कृतांत जयापरी ॥९३॥बहुतांपरी दावूनि रुप ॥ खटाटोप केला अमूप ॥ ध्रुवाचें मन गगनरुप ॥ यक्षिणी-वायूनें चळेना ॥९४॥मग इंद्र पाचारी वरुणा ॥ त्वां शिळावृष्टि करोनि नाना ॥ मारावें उत्तानपादनंदना ॥ दोष तूतें नसेचि ॥९५॥मही जल अनल अनिल नभासी ॥ पाप नाहीं तुम्हां पांचांसी ॥ यालागीं मारुन ध्रुवासी ॥ राखें आम्हासी निर्भय ॥९६॥अगस्ति पुसे स्वामीस ॥ पाप नसे पंचभूतांस ॥ शेखीं न दिसे आत्मयास ॥ पाप कोणासी हें सांगा ॥९७॥स्वामि म्हणे ऋषि समर्था ॥ पाप कोणतें तत्व पाहतां ॥ हे मनाची कल्पकता ॥ पाप पदार्थ असेना ॥९८॥पाप काय स्वतां भूत ॥ जें संचरे शरीरांत ॥ पोटीं जन्मला नाहीं सुत ॥ मृत्युचिंता कासयाची ॥९९॥रात्र न दिसे दृष्टीं ॥ मग सूर्याच्या करी कवण गोष्टी ॥ पापचि नाहीं सृष्टीं ॥ पुण्याची राहाटी कासया ॥१००॥पापाचें मूळ ते वासना ॥ वासनेचें मूळ ते मनोमयकल्पना ॥ कल्पनेचें मूळ अंत:करण जाणा ॥ अंत:करण तोचि विष्णू ॥१॥विष्णु तोचि उल्लेख ॥ उल्लेख तोचि ब्रह्मा देख ॥ शाखामूळ वृक्ष एक ॥ संशय धरणें कासया ॥२॥अगस्ति म्हणे कळली खूण ॥ यास वेदवेदांत प्रमाण ॥ पुढें ध्रुवाचें आख्यान ॥ निवेदा स्वामी स्वयें मुखें ॥३॥स्वामी म्हणे मुनिवर्या ॥ वरुणास इंद्रें आज्ञापिलिया ॥ हें जाणोनि नारद लवलाह्यां ॥ वार्ता सांगे विष्णूपासीं ॥४॥राज्य त्यागून वनांत ॥ ध्रुव बैसला परम भक्त ॥ इंद्रे प्रेरिलें वरूणास ॥ शिलावृष्टि करावया ॥५॥अवघें ठाउकें असें तूतें ॥ माझा स्वभाव वदतों येथें ॥ विष्णु उठोनियां त्वरितें ॥ चक्र घेऊनि धाविन्नला ॥६॥निवारोनि विघ्नासी ॥ अढळपदीं बैसविलें ध्रुवासी ॥ त्वां पुशिल्या प्रश्नासी ॥ निवेदिलें म्यां मुनिवरा ॥७॥एके दिवशीं पुसे भवानी ॥ शिवासि प्रार्थी करुणावचनीं ॥ लोपामुद्रा जानकी मिळोनी ॥ संवादलीं तें सांगा ॥८॥हांसोनि बोले त्रिपुरारी ॥ बरें परिसें हिमालयकुमारी ॥ रामें रावण संहारिल्यावरी ॥ अयोध्येसी चालिला ॥९॥सवें जनकाचि बाळा ॥ मागें चाले जैसी चपळा ॥ पुढें ऋषिआश्रम देखिला ॥ मनोरम वरुणसुताचा ॥११०॥महीसुतेचा धरुनि कर ॥ प्रसन्नवदनें वदे रघुवीर ॥ म्हणे कुंभोद्भवाची नार ॥ बुध्दि-बोधें आगळा ॥११॥ज्ञानप्रकाशाची खाणी ॥ चातुर्यरत्नशिरोमणी ॥ हंसगमना शोभे पद्मिनी ॥ विवेकें बोलकी सर्वज्ञा ॥१२॥तुझी जाहलिया भेटी ॥ ती पाहील अनुभवकसवटी ॥ सेतुबंधन प्रकाश राहाटी ॥ तिच्या पर्णपुटी न प्रेरीं ॥१३॥सुचवूनि पुढील गुह्यार्थ ॥ चालता देखिला भूपुत्रसुत ॥ त्यास देखोनी जनकजामात ॥ एकमेकां लक्षिलें ॥१४॥रामअगस्तींसी पडली मिठी ॥ न सुटे बैसल्यास वज्रगांठी ॥ विवादें जोडे फळ ब्रह्म देठीं ॥ न सरे गोष्टी दूसरी ॥१५॥महोदधि रत्नाकर ॥ तेवीं अगस्तिरघुवीर ॥ किंवा भेटले हरिहर ॥ अथवा आनंदीं स्वानंद मिळाला ॥१६॥दोन्ही दीप एकत्र करितां ॥ घरांतील बाहेरील म्हणावा कोणता ॥ तैसें अगस्तिरघुनाथा ॥ अंतर काय सांगावें ॥१७॥जैसी गंगा यमुनेवर लोटली ॥ तैसी लोपा जानकीवर धांवली ॥ किंवा शांतीनें क्षमा आलिंगिली ॥ नातरी दया करुणा जाहल्या मिश्रित ॥१८॥त्वंपद तत्पद असिपदावर ॥ तेवीं राम ऋषि स्वानंद वोसरीवर ॥ बैसोनि उभयतां गादीवर ॥ बोलती सुखाच्या निज गोष्टी ॥१९॥तुर्या उन्मनी उल्लेखनगरी ॥ तेवीं सीता लोपा परेच्या माजघरीं ॥ बैसोनि बोलती नवलपरी ॥ तें चतुरीं परिसावें ॥१२०॥लोपा म्हणे जनकनंदिनी ॥ तूं लावण्य सुकुमार दिव्यदामिनी ॥ राज्य टाकोनि निघतां वनीं ॥ हृदयीं दु:ख जाहलें असेल ॥२१॥ऐसें लोपेनें पुसतां ॥ उत्तर वदे श्रीरामकांता ॥ बाई रामासवें विचरतां ॥ तें सुख कैचें राज्यपदीं ॥२२॥राज्यपदीं कारभार व्यसन प्रगटे ॥ सेवक मंत्री समुदाय मोठे ॥ मज एकांती राम भेटे ॥ ऐसा समयो होता तो ॥२३॥वनीं मागें मी पुढें मी ॥ शयनीं मी सेवेशि मी ॥ अष्टही प्रहर समागमें मी ॥ वियोग नसे दिवानिशीं ॥२४॥अखंड राम पाहें उघडा ॥ निवती डोळे जाय पीडा ॥ माझिया सुखासि नाहीं जोडा ॥ नसे लेश दु:खाचा ॥२५॥चमत्कारिली अगस्तिदारा ॥ म्हणे इचा सद्भाव दिसे खरा ॥ इणें केलें प्रखर उत्तरा ॥ जनककुमारी होय कीं ॥२६॥लोपा पुसे जनकनंदिनी ॥ नूतन दिसे वेणीफणी ॥ साजुक फुलें गुंफिलीं आणोनी ॥ कोणें करणी हे केली ॥२७॥जानकी म्हणे विचरतां वनीं ॥ भेटली अत्रीची कामिनी ॥ केश विंचरोनि घातली वेणी ॥ पुष्पें गुंफिलीं स्वहस्तें ॥२८॥चौदा वर्षें आजिपासोनी ॥ न सुकती पुष्पें नूतन वेणी ॥ माझें अभयवर तुजलागोनी ॥ अनसूया माया ते वदली ॥२९॥लोपा म्हणे सुकुमार चरण ॥ मार्गीं कंटक रुपती दारुण ॥ तेव्हां कंठीं येतसेल प्राण ॥ संताप ऊर्मी बहुदु:ख ॥१३०॥सीता वदे मही जननी ॥ माझी अवस्था देखोनी ॥ लोण्यासारिखा मार्ग करोनी ॥ चालतां संतोष मज वाटे ॥३१॥सखे मध्यान्हीं पातल्या भानू ॥ उष्णकिरणें कर्पे तनू ॥ कासाविस होतसे प्राणू ॥ तेही व्यथा अनिवार ॥३२॥बाई सूर्य पूर्वज जाणा ॥ मजकडे पाहोनी येतसे करुणा ॥ स्नुषा भावोनि रघुनाथअंगना ॥ शीतळ किरणें स्पर्श करी ॥३३॥सखे ग्रीष्मऋतूचें उष्ण अफाट ॥ कठिण विशाळ लंपट ॥ तेंही संकट महादुर्घट ॥ कैसें तूतें लोटत ॥३४॥सखे लपेट येतां दुर्धर ॥ तेव्हां समीर करी विचार ॥ माझिया पुत्रस्वामीची नार ॥ केवीं स्पर्शों इजलागीं ॥३५॥बाई तुज नेलें निशाचरीं ॥ रामें सोडविलें कवणेपरी ॥ वारोनी तुझी खेदलहरी ॥ विजयी जाहला तो कैसा ॥३६॥परिसोनि लोपामुद्रेची बोली ॥ जानकीस आली हृदयकमळी ॥ म्हणे रामें मजसाठीं केली ॥ अघटित कळा या लोकीं ॥३७॥मेळवूनि कपि अचाट ॥ पाषाणांचा बांधला घाट ॥ शुक्रपत्रापरी हळुवट ॥ तरती उदकीं हें नवल ॥३८॥लंकेपर्यंत शतगावें ॥ सेतु बांधिला श्रीराघवें ॥ उतरला कपींचा समुदावे ॥ सुवेळपर्वतीं वेंधला ॥३९॥ऐसें वदे श्रीरामभार्या ॥ परिसोनि वदे ऋषीची जाया ॥ म्हणे रामें कष्ट करावया ॥ कारण नव्हतें श्रमातें ॥१४०॥माझिया पतीस येतां शरण ॥ करिता एकचि सिंधूचें आचमन ॥ पदीं चालोनि वानरगण ॥ जाते उडया मारित ॥४१॥लोपावचन वज्रधार ॥ खोंचलें जानकीचें अंतर ॥ म्हणे वदला होता रघुवीर ॥ तेंचि वचन प्रतीती येतसे ॥४२॥मग स्मरोनि रघुवीर ॥ उत्तर करी सुंदरा ॥ म्हणे ऋषिमूत्र समुद्र खरा ॥ पवित्र कपी न स्पर्शती ॥४३॥यालागीं पाषाण तारुनी ॥ कपी उतरले पवित्र गुणी ॥ हें वचन ऐकोनी ॥ चकित जाहली ऋषिभार्या ॥४४॥मग म्हणे वो जानकी ॥ गोष्टी सांगीसी विवेकी ॥ राम प्रवेशोनि लंकेसी ॥ कैसा रावण मारिला ॥४५॥जानकी म्हणे कार्मुक वोढूनि ॥ शरें रावणहृदय भेदूनी ॥ सर्व राक्षसांतें मारुनी ॥ विजयी जाहला श्रीराम ॥४६॥लोपा म्हणे श्रीराम ॥ मनुष्य किंवा परब्रह्म ॥ जानकी वदे पुरुषोत्तम ॥ सर्वांघटी तो नांदे ॥४७॥परिसोनि जानकीची बोली ॥ लोपा म्हणे भली भली ॥ रावण हृदय कमळीं ॥ आत्माराम होता कीं न होतां ॥४८॥जानकी जाहली कुंठित ॥ म्हणे काय जीव दों रघुनाथ ॥ राम प्रवेशोनि हृदयांत ॥ ज्ञानकळा प्रवेशली ॥४९॥रामीं काम नाहीं ॥ काम रावणाचे ठायीं ॥ यालागीं संग न घडे पाहीं ॥ हिर्य़ापंक्तीस कैसा कोळसा ॥१५०॥सर्प धरुं नये हातीं ॥ जेवूं नये श्वान पंक्तीं ॥ मिठी घालूं नये व्याघ्राप्रती ॥ विंचूं कंठीं बांधूं नये ॥५१॥राम रावणघटीं होता ॥ त्याची विषयकामीं अलिप्तता ॥ निष्काम राम ब्रह्म असतां ॥ सकामीं कैसा घडेल ॥५२॥जानकी म्हणे चित्रींची सेना ॥ पोतेरे फिरवितां संहारे जाणा ॥ कोण जित्यामेल्याची करी गणना ॥ तैसा खेळ संसारीं ॥५३॥खांबासूत्राची बाहुली ॥ दोरी तुटतां उलथोनि पडली ॥ तैसी निशाचरांची बोली ॥ काय पुससी साजणी ॥५४॥मृगांबूचे चिखलीं ॥ त्यांत काय लावाव्या साळी केळी ॥ गगनसुमनांची माळ गुंफिली ॥ वंध्यापुत्रें घालावया ॥५५॥जें जन्मलेंच नाहीं ॥ त्याचें मरण पुससी काई ॥ सटवल्याचें बारसें पाहीं ॥ लज्जा वाटे कर्तया ॥५६॥पंचभूतांचें काय मरावें ॥ आत्मा तो अविनाश स्वभावें ॥ तेथील तेथेंच संचलें आघवें ॥ घडमोड तरंगवत ॥५७॥लोपा म्हणे उडाली भ्रांती ॥ धन्य विशाळ तुझी मती ॥ स्वल्प उरलीसे गुंती ॥ तें तूं सांगें सुजाणे ॥५८॥राम पूर्णब्रह्म सांगसी ॥ विषयलेश नसे त्यासी ॥ तूं आपुल्या संभोगासी ॥ कैसें करिसी सांगपां ॥५९॥जानकी म्हणे कोंडें ॥ इणें मज घातलें अवघडें ॥ कैसें उगवूं सांकडें ॥ काय तोंडें सांगावें ॥१६०॥मग जानकी करी हास्यवदन ॥ म्हणे बरी भेटलीस विचक्षण ॥ नाहीं तेंचि पुससी खोदून ॥ सांगता लज्जा वाटे कीं ॥६१॥राम केवळ निष्काम ॥ मी कैसी त्यासी लावूं काम ॥ माझ्य़ा भोगाचा संभ्रम ॥ कोण्या युक्तीनें वारावा ॥६२॥मी म्हणें राम भोक्ता ॥ तरी येऊं पाहे बध्दता ॥ नाहीं म्हणों तरी माझी संभोगता ॥ कोणासी म्यां सांगावी ॥६३॥यापरी समजोनि चतुरी ॥ श्रीराम स्मरल्या हृदय मंदिरीं ॥ बुध्दि सांवरोनि उत्तर करी ॥ ज्यांत संतोषे ऋषिभार्या ॥६४॥निष्काम राम कल्पतरु समर्थ ॥ म्यां कल्पिलें फळ देऊनि पुरवी मनोरथ ॥ माझ्या कामनेंत मी तृप्त ॥ विषयातीत राम शुध्द ॥६५॥कल्पतरुपासी पदार्थ नाहीं ॥ जो कल्पी तो पदार्थ देई ॥ तैसा रामीं विषय नाहीं ॥ माझी कल्पनेंत मी पूर्ण ॥६६॥राम सहज विषयातीत ॥ मीही अनुभवें अलिप्त ॥ हाही तूतें ज्ञानार्थ ॥ उघड सांगतें परिसावें ॥६७॥ऐकावें बोलावें ॥ हे गुण आकाशाचे जाणावे ॥ स्पर्शावें सुवास घ्यावे ॥ हे तो गुण वायूचे ॥६८॥नेत्रीं पहावें अन्न भस्म करावें ॥ हे गुण वन्हीचे जाणावे ॥ रस चाखावे मैथुन करावे ॥ हे क्रिया स्वयें आपाची ॥६९॥आहार स्वीकारावे मळ त्यागावे ॥ हे गुण महीचे जाणावे ॥ पंचभूतांचे विषय ओळखावे ॥ माझा आत्मा अलिप्त ॥१७०॥मी स्वयंप्रकाश परिपूर्ण ॥ विश्व विस्तारे माझे किरण ॥ विषयीं स्फुरे स्फुरण ॥ चित्त चैतन्य मीच कीं ॥७१॥मीच मनाचें मुळीं ॥ उठवीं मनाची उकळी ॥ मीच बध्द मीच मोकळी ॥ मीच उकळी गिळी सगळें ॥७२॥मीच विश्व विस्तारावें ॥ मीच सर्व रक्षीं स्वभावें ॥ म्यांचि विश्व संहारावें ॥ सखीं विश्व मीच कीं ॥७३॥हे माझी अनुभव किल्ली ॥ श्रीरामकृपें तुज निवेदिली ॥ तूं भेटलीस माउली ॥ माय बहिण गणगोत ॥७४॥ऐसें बोलोन गहिंवरली ॥ प्रेमें हृदयीं दाटली ॥ लोपामुद्रा मिठी घाली ॥ आनंदाश्रु पातले ॥७५॥दोन्ही ओघ एकत्र मीनलें ॥ स्वयें सुखाचे प्रयाग जाहले ॥ श्रवणें श्रोतयां स्नान घडलें ॥ जाती त्रिपात निवे तनू ॥७६॥दोघीं हृदयीं प्रेमलहरी ॥ एकमय मिसळल्यास सुंदरी ॥ निमग्न होऊनि अंतरीं ॥ स्वस्थ बैसल्या निवांत ॥७७॥अगस्ति पुसे रामालागून ॥ सुखरुप आलां स्वस्थ कल्याण ॥ राम म्हणे तुमच्या दर्शनें ॥ क्षेम कल्याण अक्षयी ॥७८॥यापरी लोपामुद्रा संवाद ॥ तूतें सांगीतला सुबुध्द ॥ परिसोनि बहु पावली आनंद ॥ संतोषली जगदंबा ॥७९॥जाहला ग्रंथाचा शेवट ॥ आहे तेंचि बोलिलों स्पष्ट ॥ अनुभवें उघडिला स्पष्ट ॥ उठविला लोट ज्ञानाचा ॥८०॥आतां सांगतों चार पुरुषार्थ ॥ परिसा दुतर्फा अर्थ ॥ ज्यांत नुरे भ्रांत ॥ तैसी रीती सांगतों ॥८१॥शूरपणें भीष्म पुरुषार्थी ॥ दानीं कर्ण हरिश्चंद्र तारामती ॥ औदार्यें एक शाहाणी चांगुणा सती ॥ धैर्य पुरुषार्थ ॥ मयूरध्वजाचा ॥८२॥धर्म म्हणावा भगवद्भक्ती ॥ अंबरीष रुक्मांगद प्रल्हादमूर्ती ॥ ईश्वरीं निष्ठा पुरुषार्थी ॥ चळणें नाहीं अरिष्टा ॥८३॥सांगितले धर्म पुरुषार्थ ॥ ऐका अर्थिकांचा अर्थ ॥ द्रव्य मेळवूनि बहुत ॥ करी संसार जोडोनि लौकिक ॥८४॥वेदशास्त्रें शोधून ॥ अर्थ घेइजे निवडोन ॥ होय ब्रह्मज्ञानी पूर्ण ॥ अर्थ पुरुषार्थ या नांव ॥८५॥निमाली वासना स्थिर बुध्दी ॥ निष्काम साधन गेलें सिध्दी ॥ मन मीनले निजानंदी ॥ काम पुरुषार्थ मुख्य हा ॥८६॥जन्मपर्यंत पुण्य जोडोन ॥ पापवासना नातळोन ॥ प्रतापें जिंकीं स्वर्गभुवन ॥ मोक्ष पुरुषार्थ या नांव ॥८७॥माझा मीच पूर्णब्रह्म ॥ उडाला साधनकष्टभ्रम ॥ जिंकिला परमार्थ जाहला सम ॥ मोक्ष पुरुषार्थ मुख्य हा ॥८८॥तिन्हीं पुरुषार्थ त्यागून ॥ चौथा त्यागी तोचि धन्य ॥ जेवीं त्रयमात्रा निरसोन ॥ चौथी स्वीकारिती निजज्ञानी ॥८९॥वायूनें कांपे दीपकळी ॥ भय नाहीं सूर्यमंडळीं ॥ तेवीं चौथा पुरुषार्थ बळी ॥ अक्षय सुखी तो एक ॥१९०॥नहुष इंद्रपदाहून पावे पतन ॥ ध्रुव अढळपदीं पूर्ण ॥ यारीतीं चतुरीं समजोन ॥ धक्का न सोसे तें कीजे ॥९१॥जन्ममरणांछी राहाटी ॥ किती पडावें शोकसंकटीं ॥ यालागीं बैसिजे ज्ञानमठीं ॥ चरमगुरुचें भय नाहीं ॥९२॥किती हुडकाल संसारमडकीं ॥ ज्यांत बैसेल काळाची धडकी ॥ सोडा देहबुध्दी सुडकी ॥ हुडकी आत्मा आपुला ॥९३॥ओढाळीमुळें लोढणें गळां ॥ कुसंगखोर पायीं आगळा ॥ साधुसंगें मोक्ष गेला ॥ दुर्जनासंगें नरकीं पडे ॥९४॥संसारसमुद्र गहन जाणोन ॥ सिध्दांतबोध नौकेंत बैसोन ॥ सायुज्यतीरा उतरोन ॥ सुखी नांदा भय नाहीं ॥९५॥सिध्दांतबोध सूर्यापासी ॥ भ्रांति दिशा न ये स्वप्नासी ॥ अमृतसागरीं बुडणें ज्यासी ॥ मरण त्यासी काय करी ॥९६॥सिध्दांतबोध समुद्रांतून ॥ जो अर्थरत्नें काढी निवडोन ॥ तो निजकर्मीं लेवोन ॥ दिसेल स्वानंदीं साजिरा ॥९७॥सिध्दांतबोधाचा लावूण तुरा ॥ तो ब्रह्मानंदीं मारील लहरा ॥ होईल ब्रह्मज्ञानाचा हिरा ॥ चमके सर्वांचे मस्तकीं ॥९८॥उगींच अक्षरें जोडोन ॥ नाहीं केलें ग्रंथलेखन ॥ येथें श्रीगुरु अंत:करण होऊन ॥ उठविला लोट कवितेचा ॥९९॥गुरुसमुद्र अंत:करण होऊन ॥ मतीस भरते आलें पूर्ण ॥ ज्ञान लाटा उसळोन ॥ तुषार ग्रंथचि विस्तारला ॥२००॥या ग्रंथाची अक्षरवटिका ॥ गुरुकृपेनें केली पीठिका ॥ जैसी सत्रावी चंद्रिका ॥ सोळाकळांवरी विराजे ॥१॥ग्रंथ समाप्त येथून ॥ हर्षें करितों गुरुचें स्तवन ॥ तें परिसावें सज्जन ॥ कैसा उपदेश मज जाहला ॥२॥एकाएकीं एक ॥ मुनींद्र गुरुचा हस्तक ॥ प्रकाशला ज्ञानदीपक ॥ सबाह्य चिन्मय कोंदलें ॥३॥यापरी शहास उपदेशे ॥ मुनींद्र गुरुचा पुरता असे ॥ तोही प्रकार अनायासें ॥ समाप्तींत सांगेन ॥४॥इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये चत्वारिंशोध्याय: ॥४०॥ अध्याय ॥४०॥ ओव्या ॥२०४॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP