मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री तुलसीदास चरित्र ५

श्री तुलसीदास चरित्र ५

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


तुलसीदास सूरदासजीला म्हणतात,

॥ दिंडी ॥
असुन प्रेमळ तूं परि न तुला होत । भेट ईशाची काय चुकी त्यांत ॥
होत आहे ती कळुन मला आजी । आलि बाप्पा ऐकण्याहोय राजी ॥२१॥

॥ पद ॥(शिवदर्शन)
तूं टाक भजन कृष्णाचें ॥
गोकुलवासी नंदसुताचें । तें नच होय हिताचें ॥
(चाल) चरित्र त्याचें अतिशय ओंगळ । रसिका वाटे गाथा प्रेमळ ।
परि न घालवी मनिचा कधि मळ । बोल ऐक हे गणुचे ॥२२॥

॥ श्लोक (वसंततिलका) ॥
शेजार साधिव्स बरा नच कुंटणीचा ।
होईल ना सुखद स्नेह किं तस्कराचा ॥
ढेकूण संगत हिर्‍याप्रति ना बरी रे ।
ध्यायी निरालसपणें प्रभु राम बा रे ॥२३॥

॥ दिंडी ॥
नको सांगुस बनवुनी या कथेसी । मुकुंदाची न ये सरी राघवासी ॥
कुठें माझा भगवान नंदपूत । रडत नाहीं फिरला किं अरण्यात ॥२४॥

॥ लावणी ॥ (तूं चारु तनु)
तुलसि, ना कथावी त्याचि, काव्यांत व्यर्थ गाइला ॥
आलि नाहिं त्याचि त्यालाच रक्षिंता भली ।
बायको, तोच असुरानें लंकेत नेवुन ठेविली ॥
(चाल) ऐसा तो मुळचिं नादान, त्याचे करें जाण, कुठुनि रक्षण ।
होइल अन्याचें । नको सांगुं भूषण रामाचे ॥२५॥

॥ श्लोक(वसंततिलका) ॥
त्या तूं त्यजून तुलसी भज या हरीतें ।
नादान भ्याड नवळा कथुं काय हरीतें ।
कृष्णापरी त्रिभुवनीं नच देव कोणी ।
हा पूर्ण अंश प्रभुचा कथिंले मुनींनीं ॥२६॥
त्यावर तुलसीदास म्हणाले,

॥ श्लोक ॥
तुम्हि सूरदासा विचारी असून । असंबध्द भाषा कधीहीं करा न ।
अयोध्यापती राम हा रावणारी । जपे नित्य ओठी सदा मन्मथारी ॥२७॥

॥ लावणी ॥ (भ्यावेस काय)
रामानें नेलि वैकुंठि । अवघीच अयोध्यापुरी ।
कृष्णाने तसें नच केलें । शोधून पहा अंतरि ॥
(चाल) यादवकूल बुडविलें, अखेरिस भलें शरिर ठेविलें ।
पहा भूमीस । हें कां न विदित बा तुसी ॥२८॥
यावर सूरदास म्हणाले,

॥ दिंडी ॥
तुम्हीं माझे की तुलसि आयकावे । खरा मोठा तो कोण विचारावें ।
तुम्ही आपुल्या उपास्य राघवासी । नको करणें या वादविवादासी ॥२९॥
त्यानंतर पुढें एक दिवस तुलसीदासांनी श्रीरामचंद्रप्रुभूला विचारलें की,

॥ आर्या ॥
सांग मला श्रीरामा! कोण तुम्हा उभयंतात उत्तम रे ।
तूं सांगितल्यावाचुन हा अमुचा वाद येथ मुळि न सरे ॥३०॥
श्रीरामचंद्रप्रभु प्रगट होऊन म्हणाले,

॥ पद ॥ (रजनिनाथ हा)
आम्ही प्रभुचे अंश खरोखर ।
पूर्णपणा अमुच्यांत न तिळभर ॥
(चाल) वासुदेवाचा कृष्ण तसा ना स
ऐसें भागवत कथित जनांना ।
भज तूंही त्या नंदनंदना ।
मजहुनि हरि तो श्रेष्ठ मनीं धर ॥३१॥
तें ऐकून तुलसी म्हणाले,

 ॥ श्लोक ॥ (वसंततिलका)
काहीं असो तुजविणें नच श्रेष्ठ कोणी ।
ज्या राघवा सतत ध्यात पिनाकपाणी ॥
जे थोर तेच धरिती जगिं लीनतेला ।
माझेंच साच चुकलें पुसलें तुम्हांला ॥३२॥

॥ पद ॥(कृपा करो रघुनाथ)
कहो किसनजी इस घडि हमसे साची साची बात ।
तुम बडे वा रघुकुलभूषण राम अयोध्यानाथ ॥३३॥
कृष्णपरमात्मा म्हणाले,

॥ दिंडी ॥
सूरदासा पाहिल्या साधकाआ । आहे भजणें आवश्य राघवाला ।
न्याय, निती शिकवील राघवाचें । चरित तुजला हें कथित गणु वाचें ॥३४॥
तें ऐकून सूरदास म्हणतात,

॥ श्लोक  ॥ (पृथ्वी) ॥
खरें न कथिलें तुवां अजवरी कुणाला हरी ।
लबाड ठक चोरटा म्हणितलें वज्राभीतरीं ॥
तुला, विदित हें असे सकल संत साधूप्रती ॥
मला न बघणें तया, मजसि थोर तूं श्रीपती ॥३५॥

॥ आर्या ॥
मग दोघांनी दोघां आळवुनिया प्रगट आपुल्या पुढती ।
साच करविलें बुधहो! परि झाली प्रगट एकची मूर्ती  ॥३६॥

॥ दिंडी ॥
तीच मूर्ती तुलसी दिसे राम । सुरदासाला तीच घनश्याम ॥
असे पाहुनि द्वय भक्त अचंब्याला । करिति, परि ना कुणि बघति इंगिताला ॥३७॥
अशा प्रकारे दोघेहि भक्त गहन विचारांत पडले आहेत असें पाहून भगवान खंत: होऊन बोलूं लागले.

॥ लावणी ॥ ( भला जन्म हा)
मुळीं विचारीं तुम्हि न पडावें मीचहि अवघा असें ।
उपासनेरूप तुम्हांला दिसे ॥
(चाल) येण्यास प्रथमता अवघ्या भक्तिस्थिती ।
आहे रामरचित तें मी सांगू किती ।
मी सर्व घटांमध्ये आहे कवण्या रितीं ।
हे कळण्याला कृष्ण-चरित हें योग्य सर्वतोपरी ।
धरा ना संशय चित्तांतरी ॥३८॥

॥ ओवी ॥
येथून पुढें तुम्हांसी । सांगणे आहे अहर्निशी ।
रामकृष्ण या भजनासी । सद्भावे कीं करावें ॥३९॥
हा वाद झाला त्यावेळी काहीं पंढरीचे वारकरी तीर्थयात्रेला तिकडे गेले होतें त्यांनी हें ऐकले आणि विचार केला कीं तर आपल्या पंढरीक्षेत्राला नुसत्या रामाचे
किंवा कृष्णाचे भजन उपयोग नाही. तर आपल्या पंढरीत ‘रामकृष्णहरी’ या भजनाची प्रथा सुरू केली पाहिजे. तरच आपला तरणोपाय होऊन महाराष्ट्राचे कल्याण होईल. त्याप्रमाणे वारकर्‍यांनी, तुलसीदास व सूरदासजींनी परमेश्वराची प्रार्थना केली.

॥ श्लोक (वसंततिलका) ॥
हे रामकृष्ण भगवान निजबोधरूपा ।
हे विश्वव्यापक प्रभो हरणें त्रिपाता ॥
त्राता न अन्य तुजवाचुंनि या जगांत ।
पावा, न वेळ करणें, गणु जोडि हात ॥४०॥

॥ पद ॥ (भैरवी-दादरा)
जय जय प्रभु रामकृष्ण विठ्ठला हरी ॥
पायीं वीट नजर नीट । पंढरि हें आद्यपीठ ।
भक्तांची बघत वाट । अतुरतें खरी ॥
कार्तिकास भीड अती । संत सकल गर्जताती ।
तव नामें टाळ हातीं । हर्ष अंतरी ॥
नाम तरणि हीच तारी । साधकास धरून करीं ।
कधिं न दगा देत खरी । या महीवरी ॥
दासगणुच त्वरित तार । भयचिंता सकल वार ।
प्रेम हृदयि वाढो फार । विनति आदरीं ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP