मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री भक्त गोराकुंभार चरित्र २

श्री भक्त गोराकुंभार चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


संतापानें फणफणून निघालेली ती गोरोबाची बायको माहेराला पायीं कशी जाऊं म्हणून पाठाळ पाहूं लागली. तोंच तिला जागृति देण्याकरितां गोरोबा म्हणतात :--

॥ लावणी ॥
पाठाळ कशाला पाहसि निराळें तरी ।
अभिमानरूपि नेहमींच्या गाढवावरी ॥
बैसोन करावें गमन पित्याच्या घरीं ।
निन ददातिचें जित्राप दुजें न यापरी ॥
( चाल ) लोभाचि रतिबी चंदि सुरूं तुझि त्यासी ॥ प्रतिदिवशीं
मोहाचि जबर होटाळि आहे तोंडासी ॥ पाठीसी ॥
दंभचि बडी वाकळ झांकाया त्यासी ॥ वेगेंसी ॥
क्रोधाचा तुझा कोरडा घेइजे करीं ।
गणु म्हणे गोरोबा सांगे वधुस यापरी ॥३६॥

॥ आर्या ॥
अभिमानरूप गर्दभ या भव सौख्याचिया उकिरड्यांत ।
चरत सद गे ! पाही ते नच गवसे कदापि इतरत्र ॥३७॥
एकाएकीं माहेराला मूल न घेतांच आलेली पाहून तिचे मायबाप घाबरून तिला विचारतात :--

॥ पद ( मित्र मम ) ॥
दु:खाश्रू नयनीं का ? सांग वाहती ।
बा टाकुन काय तुला बोलला पती ॥
अथवा तुज भाऊबंद कोणि बोलले ।
वा पतिनें सदनांतुन हांकुन लाविलें ।
सांग कुठें ठेविलेस त्वदिय तान्हुलें ॥
यापरी ते मायबाप तिज विचारिती ॥३८॥

॥ ओवी (  जात्यावरील ) ॥
जरी देशिल चोळी मला । अक्षयिची घालायाला ।
तरि सांग अवघें तुशीं । दु:खाचा डोंगर झाला ॥३९॥

॥ पद ॥
रडुं नको मुली तूं सांग हकिकत आज मला सगळी ।
तुजपेक्षां नच अधिक कांहीं देइन खचित चोळी ॥
वर वर नच हें भाषण माझें मुली मनीं आण ॥
इच्छा अवघी पुरविन आजी यास तुझिच आण ॥४०॥

॥ ओवी ॥
मातापित्याचें वचन । घेऊनिया करि भाषण ।
धाकुटिचें कन्यादान । माझ्याच पतीशीं करावें ॥४१॥
दुसर्‍या कन्यादानाचें काय कारण म्हणून मायबापांनीं विचारल्यानंतर त्या चतुर पतिव्रतेनें मोठ्या खुबीनेम उत्तर दिलें. स्त्री ही पतीची अर्धांगी. नवर्‍याकडून मूल मारलें गेलें असें न सांगतां ती म्हणाली,

॥ आर्या ॥
माझ्या सव्यकरानेम मच्छिशुचा घात जननि ! जैं झाला ॥
तैं क्रोधावश होऊनि पति माझा तो करी प्रतिज्ञेला ॥४२॥

॥ ( ओवी ) ॥
आजपासोन तुजसी । स्पर्श न करी निश्चयेंसी ।
मारिसी पोटिच्या लेकरासी । लाव तूं हें कळून आलें ॥४३॥

॥ दिंडी ॥
ज्येष्ठ कन्येची भीड तोडवेना । दिली कन्या गोर्‍यास दुजी जाणा ॥
लग्न झालें थाटांत श्वशुर - गेहीं । सासु -श्वशुराच्या सुखा पार नाहीं ॥४४॥
धाकट्या मुलीचा हात गोरोबाच्या हातांत देतांना सासुसासर्‍यांनीं त्यांना म्हटलें,

॥ श्लोक ॥
पहिलोई परचि दुसरी नित वागवावी ।
दृष्टी समान विबुधा ! अपुली असावी ॥
एकीस सौख्य, दुसरीस न दु:ख द्यावें ।
हे शब्द नित्य अमुचे मनिं वागवावे ॥४५॥
रुकार देतांना गोरोबांनीं आपल्या शपथेच्या अडचणीचा विचार करून म्हटलें,

॥ आर्या ॥
पहिली समान दुसरी वा दुसरीच्या समान पहिलीला ।
लेखावें म्यां सांगा मागुन ठेवूं नका मला बोला ॥४६॥
भोळ्या सासर्‍यानें रीतीप्रमाणें सहजच म्हटलें,

॥ कामदा ॥
वागवी दुजी पहिलिच्या परी । तेणें सुख अम्हा होय अंतरीं ॥
शपथ तुजला, फ़रक यामधीं । जावया ! नको करुंस बा ! कधीं ॥४७॥
लग्नसमारंभानंतर गोरोबा दोन्ही स्त्रियांसह घरीं आले. परंतु :--

॥ ओवी ॥
दोन्ही कामिनी टाकुन । गोरा करी पृथक् शयन ।
काम विकारें ज्यांचें मन । लिप्त न कदा जाहलें ॥४८॥
हा प्रकार धाकट्या बहिणीच्या लक्षांत येतांच ती वडील बहिणीस म्हणत्ये,

॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
नाहीं केलेंस माझें बरें । ना बहीण तूं वैरिण ॥
असुनिया पति नाहिंसा । झाला लग्नाच्या पासुन ॥४९॥

॥ पद ॥ ( भूपती खरे )
धाकटी म्हणे थोरली प्रती रागानें ।
कापिली तुवाम मम मान खचित कपटानें ॥
तारुण्यरूपि काननीं काम हा वन्ही ।
भडकला, त्यांत मी एक गवसले हरिणी ॥
नवर्‍यानें वाहिली शपथ जणुं तारेचें ।
कुंपण यास, यांतून कठिण सुटण्याचें ॥
( चाल ) हें तुझ्यामुळें कीं सारें जाहलें ।
केलेंस तूंच वाटोळें मम भलें ।
मायबाप थाप देऊनी फ़सविलें ।
गाळांत लोटिली गाय फ़ेडशिल कोठें ।
गणु म्हणे स्त्रियांना ब्रह्म रती - सुख वाटे ॥५०॥
वडिलांचा तरी काय उपाय होता ? बापानें वचन घेतांनाच घोटाळा झाला. तेव्हां आतां धाकटीचें समाधान तरी कसें करावयाचें ? तथापि ती म्हणत्ये,

॥ आर्या ॥
चंदन सुवास घ्याया म्यां तुजला एथ आणिलें बाई ।
परि सर्पदंश झाला तव दैवें; बोल तो मला नाहीं ॥५१॥

॥ दिंडी ॥
नको सोडूं तूं व्यर्थ धीर बाई । युक्ति यातें ती आज करूं कांहीं ॥
निशी झालीया आपण एक होऊं । बलात्कारें निज हेत तडिस नेऊं ॥५२॥
॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
देतो मन्मथ ताप फ़ार म्हणुनी तत्पारिपत्यास्तव ।
पूजूं ये प्रभु नीलकंठ भगवान् जो का मृडानीभव ॥
शाळुंका निज वक्ष कल्पुनि बरें वक्षोज लिंगावरी ।
गोर्‍याचे कर बिल्वपत्र बरवें वाहूं गडे ! सत्वरी ॥५३॥
ठरल्याप्रमाणें रात्रीं ‘ दोन्हीकडे दोन्ही जाया, मध्यें गोरोबाची शय्या ’ या जनाबाईंनीं वर्णन केल्याप्रमाणें दोघींनीं गोरोबांचे दोन्ही हात आपल्या अंगावर घेतांच ते खडबडून जागे झाले व पाहातात तों हातांकडून असा प्रमाद घडला. लागलीच ते उठले. त्यांना चुकून इंद्रियांकडून घडलेल्या प्रमादाबद्दल पश्चाताप वाटून ते म्हणतात,

॥ पद ॥
करुं मि तरि काय करें घडलें । पाप भयंकर शपथ मोडुनी ॥
तुझी विठोबा नितीपथा त्यजिलें ॥ध्रु०॥
( चाल ) तोडून टाकिन कर हे आतां ॥ भिमातट - निवासिया अनंता ! ॥
त्या दुष्टांची संगत करितां ॥ दुष्ट जगीं मी बनेन बरें कळलें ॥५४॥

॥ ओवी ॥
घेतले हात छेदून । गोरा झाला थोटा पूर्ण ।
तें पाहून जगज्जीवन । अश्रूं ढाळूं लागला ॥५५॥।
देवाच्या डोळ्यांतून अश्रुपात होतो आहे असें पाहून रुक्मिणीनें आतुरतेनें विचारिलें. तेव्हा देवांनीं तिला सर्व वर्तमान सांगितलें.

॥ पद ॥ ( नमुं तुजला )
कर माझे छेदिले ! । भक्तवरानें कमले । माझ्या ।
कां कीं गोरस गोकुळांत मीं याच करें हरिलें ॥ध्रु०॥
( चाल ) त्याचें नच ते, माझे तुटले ॥ माझेंपण तें त्यानें हरिलें ॥
चित्त तयाचें अभेद गे । गणुनें ज्या गायिलें ॥५६॥
गोरोबांनीं हात तोडून घेतल्यामुळें मडकीं घडण्याचें काम सहजच बंद पडलेले पाहून गांवांतील कुटाळांना व संतनिंदकांना तो एक चर्चेचा विषयच झाला. ते परस्पर म्हणूं लागले

॥ आर्या ॥
शपथेसाठीं तोडुन कर थोटाअ होउनी पहा बसला ।
भीमातटस्थ प्रस्तर पाहूं अतां पोषितो कसा याला ॥५७॥

॥ पद ( गुरुदत्तदिगंबर )
भक्तार्थ विठाबाई । जाहली कुलाल की पाहीं ॥
वैजयंति वनमाळा टाकुनि किरिट शिरींचा मोठा ।
क्षेत्र पंढरी त्यजूनि निघाली माय बालेघाटा ॥
मांजरपाठी बंडी अंगीं; धोतर जाडें भरडें ।
गरुडाचें त्या केलें हरिनें लांबकानि घोडे ॥
प्रेम - भातुकें गोणिंत भरुनी ‘ झा झा ’ करित निघाला ।
दासगणू म्हणे अंतरिक्षीं सूर वानितात देवाला ॥५८॥
खाण्याच्या पदार्थांची रेलचेल करून परमात्मा ‘ मी तुमच्या माहेराहून बापाच्या सांगण्यावरून आलों ’ असें त्या दोघी स्त्रियांना सांगून निघून गेला. वारीहून परत आल्यावर गोरोबांना बायकांकडून सर्व वर्तमान कळलें. घरीं सुबत्ता झालेली पाहून दोघींनीं पंढरीला वारीला येण्याची इच्छा दर्शविल्यावरून

॥ ओवी ॥
दोघी कांता बरोबरी । गोरा आला करण्यास वारी ।
बैसला कीर्तनामाझारीं । नामयाच्या श्रवणार्थ ॥५९॥

॥ पद ( सत्त्वहरायासी ) ॥
कीर्तनांत बदला । नामया । कीर्तनांत वदला ॥
पाणिपताका उभारूनियां ‘ विठ्ठल मुखिं बोला ’ ॥
( चाल ) ऐकुन तयाचे बोल सर्व त्यापरी ॥
वर्तलें विबुध हो ! श्रोते अत्यादरीं ॥
मृदुंग वाजती मधुर टाळ झल्लरी ॥
दु:खित तैं झाला । गोरोबा । दु:खित तैं झाला ॥
पाणिपताका करुं कशाच्या थोतेपण मजला ॥६०॥

॥ श्लोक ॥
यावें कराया कर ते पताका । या कीर्तनीं भो ! मम लाज राखा ।
थोटेपणा तो बरवा प्रपंचीं । भक्ता कदा ना प्रभुराज वंचीं ॥६१॥

॥ आर्या ॥
कीर्तनगजरीं फ़ुटलें कर गोर्‍यासी अनंद सर्वत्र ।
राहील अशुभ कैसें जेथ उभा भक्तवरद श्रीकांत ॥६२॥
भजनांत गोरोबाला दोन्ही हात फ़ुटलेले पाहतांच दोन्ही स्त्रिया आश्चर्यानें थक्क झाल्या. नामदेवरायाच्या कीर्तनांत परमात्मा प्रगट झालेले पाहून,

॥ लावणी ॥
धांवल्या दोघी कामिनी जशा काय काननिंच्या वाघिणी ।
धरुनिया करा बोलल्या प्रभुस गर्जुनी ।
दिसतोसी बरा बाहेरी, परी अंतरी कुटिल कोळसा ।
तव नादें जाहला पती आमुचा पिसा ॥
संसारें मुळीं होइना, माग तूं लागलास कीं शनी ।
टाकिलें पतीनें बाळ पदीं तुडवनी ॥
लाविना अम्हला हात, मिळेना अन्न खावया घरीं ।
तळतळाट तुज लागेल विचारा करी ॥
नवर्‍यासी दिलेसी हात, कसें त्वां टाळ कुटाया तरी ।
येऊं दे तसें दुडदुडा, कीर्तनीं बाळ माझें रांगत ।
ना तरी डोकें फ़ोडीन जाण मी इथं ॥
यापरी गोर्‍याची वधू, बोलतां तटस्थ झाली सभा ।
गणु म्हणे दिसेना असुन विठोबा उभा ॥६३॥

॥ श्लोक ॥ ( शार्दूलविक्रीडित ) ॥
काळ्या ! तूं विभवीं न सार म्हणुनी लोकांप्रती सांगसी ।
आणी आपण नेसुनी भरजरी पीतांबरा बैससी ! ॥
कंठा, गोफ़, कडीं, कशास तुजला मेल्या ! मुदी चौघडा ।
घेतें सर्व हिरावुनी मग सुखें वाजीव तो चौघडा ॥६४॥

॥ आर्या ॥
वाक्यसुमनें हीं सेवुन प्रेमें झाला प्रसन्न भगवान ।
खाय कण्या विदुराच्या कौरव - पतिचें रुचेम न पक्वान्न ॥६५॥
त्या दोघींच्या विनंतीला मान देऊन गोरोबाच्या पदरीं पडल्याचें भाग्य xखाणून देव म्हणतो,

॥ पद ॥ ( नृपममता )
नेई न कदा त्या काळ । ज्याचा करीन मी सांभाळ ॥ पाही गे ॥
रक्षिलें तुझें मुल बाई । अजवरि मी होऊनि दाई । साच गे !
( चाल ) नवर्‍याचा राग सत्वरीं, तान्हुल्यावरी, काढिशील खरी ।
भितिहि अंतरीं । वाटली मजला ॥
यासाठीं येथ बाळाला ॥ आणिलें ॥६६॥

॥ कटाव ॥
अंगि अंगि ती मखमालीची । बहुत मजेची, शिरीं असे ज्या भरजरि कुंची । केस वाकडे कुटील काळे । पदी सांखळ्या तोडर वाळे । कटिं करगोटा सुवर्णाचा, घुंगुराचा । गळ्यांत कंठा तो मोत्यांचा । बिंदलि कड्यानें मंडित पाणी । रांगत येतां हलती दोन्ही । डूल भोंकरें ज्याच्या कानीं । दृष्टमणी मनगट्यामधोनी । जोड दंड कडे दंडीं ज्याच्या । खालिं कोपर्‍या नागमोडिच्या । बावनकशी सुवर्णाच्या । भालीं पिंपळपानावरती । नानापरिचीं रत्नें असती । किरणें ज्यांचीं केंसावरती । पडुन अतीशय शोभा देती । सजलघनीं जणुं वीज तळपती । गालबोट गालास लाविलें । काजळ डोळ्यांमधें घातलें । भालिं कस्तुरी चिन्ह रेखिलें । रंगित रिंगणें हस्तीं धरिलें । असें बाल तें रांगत आलें । निज जननीच्या पायापाशीं । येऊन ओढी करें लुगड्यासी । बहु अतुरतें पाहें मुखासी । त्या सोहोळ्यासी पाहुनी घाला । भक्तवरद श्रीपंढरिवाला । दासगणू ज्या अंकित झाला ॥६७॥

॥ ओवी ॥
शिशुरूपी चंद्राप्रत । पाहून मन तें चंद्रकांत ॥
मणी स्रवतें झालें तेथ । आलें भरतें प्रेमासी ॥६८॥

॥ श्लोक ( शिखरिणी ) ॥
जसें वर्षाकाळीं जलद जलधारा महिवरी ।
करीती वर्षावा स्तनयुगुल त्याची कृति वरी ।
पयातेम प्रेराया दम न धरितां हो ! घडिभरी ।
हजारी कारंज्यासम स्रवति धारा शिशुवरी ॥६९॥

॥ ओवी ॥
पुढें आदिमाया श्रीरुक्मिणी । गोर्‍याच्या वधू करीं घेऊनी
बोलती झाली मधुरवचनीं । तया भक्तवरातें ॥७०॥

॥ साकी ॥
या तव भार्या आज तुला मी पहा पुनरपी देतें ।
‘ शपथ मोकळी ’ म्हणे विठोबा, ‘ घाल मला भिक्षेतें ॥
जनरितीं दोघींला । वागिव, मागत हें मी तुला ॥७१॥
याप्रमाणें गोरोबांनीं प्रभू - इच्छेला मान देऊन पुन: संसार केला.

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP