मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री तुलसीदास चरित्र १

श्री तुलसीदास चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
उत्तरदेशीं झाले श्रीतुलसी कान्यकुब्ज जातींत ॥
राजापुर ग्रामी हो, परिसा श्रोते तदीय हे चरित ॥१॥

॥ ओवी ॥
पाराशर गोत्रांतरीं । आत्माराम हुलासीचे उदरीं ॥
हा जन्माला हिरा निर्धारी । शके चौदाशे पंचावनीं ॥२॥

॥ दिंडी ॥
लहान असतां सोडून या हिर्‍यासी ।पिता जननी जाहली स्वर्गवासी ॥
कुणी नुरले सांभाळ करायला । निवाराया दु:साध्य दैवघाला ॥३॥

॥ साकी ॥
श्रीमंताचा पुत्र म्हणूनी पाठक दिनबंधूने ॥
अपुली कन्या रत्नावली त्या अप्रियली सन्मानें ।
जात्या सुंदर ती । वाटे जन्मली फिरून रती ॥४॥
हें जोडपें ऐन तारूण्याच्या भरांत आले असतांना,

॥ लावणी ॥
तरूणपणाच्या ऐन भरामधि आलीं तीं उभयंता ।
वयपरत्वें पंचशराची ज्योत झोंबली चित्ता ।
शिशुपणिं वाटें दैवत क्रीडा स्मर तारूण्यामधीं ।
परस्परांचा विरह न साहे परस्परांना कधीं ॥५॥

॥ श्लोक (मालिनी)
रजनि दिवस सारा काम चेष्टेत घाली ।
म्हणुनि तदिय देहा क्षीणता साच आली ॥
परि नच त्यजवें त्या भोग-मंदीर कांता ।
गमत कधिं पतंगा दीप कां प्राण घेतां? ॥६॥

॥ आर्या ॥
येतां मुळ माहेरचे निच कांतेलागि न्यावयासाठी ।
त्या पाहुनि तो तुलसी घाली भाला अठी, मनीं कष्टी ॥७॥
बायकोला माहेरी न पाठवण्याच्या खोटयानाटया सबबी तुलसीदास मुर्‍हाळ्यास सांगू लागला.

॥ लावणी ॥
सध्यांच तिला माहेरी, धाडुं कशितरी, तिथी वडिलांची ।
आलिसे कुणी ना घरीं ॥
त्यांतुन जिवाला नसे, बरें मग कसें, करूं तरी सांगा ।
ठेवूं भार कुणाच्या वरी ॥
पुढें मागें देईन धाडून, जा हो परतून नका करूं शीण ।
पहा कामांधा, जनरीत नावडे खरी ॥८॥

॥ ओवी ॥
ऐसें कित्येक वेळा त्यांनी । मूळ लाविलें परतवोनी ।
हें श्वशुरें जाणोनी । आला स्वत: न्यावया ॥९॥
व आल्याबरोबर जावयास मोठया रागाने म्हणाला,

॥ पद ॥
कन्या दिधली हा का तुजसी अपराध मि केला?
माहेरि दुष्टा येउं न देशी सांग कसा तिजला?
लग्न जहाल्या अजुनि न झालीं त्रय वर्षे पुरतीं ।
तोंच तुझा हा जाच मदांधा ही कां लोकरिती? ॥
आलों न्याया परंतु न आतां लावुं नको मजला ।
लोकरितीने वागत जावें धाड मदिय बाला ॥१०॥
तें काहीं नाही, या वेळेस माझ्या मुलीला तुला मजबरोबर पाठविलेच पाहिजे. हें ऐकून तुलशीदास हंसले व म्हणाले,

॥ श्लोक ॥ (शार्दुलविक्रीडीत)
तुम्ही थोर विचारवंत अवघ्या प्रज्ञांत विद्वन्मणी ।
ऐसे आसुनि बोलतां तरि कसें तत्वाप्रती सोडुनी? ॥
येतें कां परतोनि पुण्यसरिता त्या सागरा त्यागुनी ।
सह्याद्रीतनया शुची विमलशी गोदा जगत्पावना? ॥११॥
या नायाने तुमच्या मुलीला तुम्हांला परत माहेरी नेता येणार नाही. असें पुष्कळ वेळां झाले. सरतेशेवटी तुळसीदासाचें कुटंब

॥ ओवी ॥
ऐके दिवशी तदीय भार्या । गेली माहेरी निघूनिया ।
तुलसीची नजर चुकवूनिया । पांथस्थाच्या समागमें ॥१२॥
बायको घरांत नाही असें पाहून तुळसीदास घरास विचारूं लागला.

॥ पद ॥
गेली कुठें मम रमणी? सदना! ॥
चारूतनू जी पंकजनयना । सिंहकटी शशिवदनी ॥
उदार होउनि सांग तियेची । शुध्दि सख्या मम कानीं ॥१३॥
घर बोलत नाहीं असे पाहून,

॥ पद ॥
सांग शुका गेलि कुठें मदिय सुंदरी? ॥
प्रेम जिचे प्राणाहुनी बहुत तुजवरी ॥
ज्या करिंची मधुर तुंवा चाखिली फळें ।
अंकी जिने घेउनि तव पुरविले लळे ।
सदन जिच्याविण आज शून्य जाहलें ॥
ऐशि तुझी धनिण सख्या! कुठें ये अवसरी ॥१४॥
तुलसीदासाची स्थिति कांतेच्या विरहाने अशी वेडयासारखी
झाली असें पाहून शेजारी म्हणाला, अरे तुलसी, असा वेडयासारखा होऊं नको. घर आणि पांखरे कां कोठे बोलत असतात?

॥ आर्या ॥
पुससि शु का सदनातें भार्येची शुध्दी काय हे मूढा! ।
गेलि सकाळी ती तत-जननी-गेहा न हो वृथा वेडा ॥१५॥
बायको माहेरीं गेली आहे ते ऐकून, तुलसीदासहि रात्रबेरात्र न पहातां आपुल्या सासुरवाडीस निघाले. ती रात्रीची वेळ होती.

॥ लावणी ॥
तारकापुंज कशिदा हा, भूषवि या चिरालागूनी ।
तमरूप असा तो शालू नेसली असे यामिनी ।
(चाल) नक्षत्र- संघ कंठात, हार साक्षात,भालिं आरक्त ।
तिलक कुंकवाचा । मंगळ पुत्र भूमिचा ॥१६॥

॥ पद ॥
दिवाभीत घुत्कार करिती वनीं फार ।
सर्वत्र अंधार दाही दिशांला ॥
‘टी टी’ असा होत टिटवी ध्वनी ।
खाति धुंडाळुनि तरस पुरल्या शवाला ॥
पिशाच्चें भुतें याक्षिणी आसरा त्या ।
आल्या सेवण्यासी चितेच्या धुमाला ॥
वेताळ झोंटिग ते थयथयाटा ।
करिती, अशी भयद ती फार वेळा ॥१७॥

॥ ओवी ॥
सरितेस पाणी अपरंपार । आलें तेधवां साचार ।
गाठावयां पैल तीर । उपाय कांही न चले कीं ॥१८॥
ते सासुरवाडीपर्यंत आले. पण वेळ रात्रीची, नदीला अपरंपार पाणी आलेले याचें चित्त तर पलीकडे कांतेच्या भेटीस जाण्याविषयी अतुर झालेले.

॥ दिंडी ॥
तयीं एक्या प्रेतास तुलसीदास । धरूनि गेलें हो पैल्लतटाकास ॥
पंचवाणे जो विव्हळ असे झाला । भान बुधहो काहीं न उरत त्याला ॥१९॥
तुलसीदास एका प्रेताचा भोपळ्यासारखा उपयोग करून पलिकडच्या काठांस गेले.

॥ दिंडी ॥
आला तुलसी रात्रीस श्वशुरगेही । हका मारी परि जागे कुणी नाहीं ॥
धरूनि शेवटि भितींस चढुन गेला । माडिवरती ना भान मदांधाला ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP