मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
कीर्तनभक्तीचा आदर्श

कीर्तनभक्तीचा आदर्श

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली .


११७
नवल भजनाचा भावो । स्वत: भक्तचि होय देवो । वाचे करिता हरिकीर्तन । उन्मनी मन निशीदिनी । नाही प्रपंचाचे भान । वाचे सदा नारायण । एका जनार्दनी मुक्त । सबाह्य अभ्यंतरी पुनीत ।
भावार्थ:
कीर्तन \भक्तीचा महिमा एवढा आश्चर्यकारक आहे की, कीर्तनात रंगलेला भक्त स्वत:च देव बनतो. मन एका उच्च पातळीवर पोचून तेथेच स्थिर होते. ह्या उन्मनी अवस्थेत मन रात्रंदिवस गुंतुन राहते. वाचेने सतत हरिनामाचा जप अखंडपणे सुरू असतो. प्रपंचाचे भान हरपून जाते. आंतरबाह्य शुध्द झालेले मन देहबंधनापासून मुक्त होते असा अनुभव एका जनार्दनी येथे व्यक्त करतात. 
११८
आजी नवल झाले वो माझे । पाहण्या पाहणे दृष्टि धाये । ऐसा लाघवी सुखकर मूर्ति । संतसंगे झाली मज विश्रांति । योगीश्वर जया चिंतिती । सनकादिक जया ध्याती । योग-साधन नातुडे जो माये । एका जनार्दनी कीर्तनी नाचतु आहे ।
भावार्थ:
योगी-मुनीजन ज्याचे सतत चिंतन करतात आणि सनकादिक श्रेष्ठ मुनी ज्याच्यावर निरंतर ध्यान लावतात, अशा पांडुरंगाचे दर्शन योगसाधनेने मिळत नाही. हरिची लाघवी, सुंदर मूर्ती पाहून डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी धावत असताना नवल घडले आणि संतकृपेने मिळालेल्या दर्शनसुखाने मन अपार भरून विश्रांत झाले. आनंदाने एका जनार्दनी कीर्तनरंगी रंगून गेले. 
११९
जे पदी निरुपण तेचि हृदयी ध्यान । तेथे सहजी स्थिर राहे मन । कीर्तनासी तोषोनि कळिकाळ । तुष्टला समाधीसी समाधान रे । कीर्तनी सद्भाव अखंड अहर्निशी । पाप न रिघे त्याच्या देशी । निज-नामे निष्पाप अंतर देखोनि । देव तिष्ठे तयापाशी रे । हरि-नाम-कीर्तने अभिमान सरे । आणिक श्रेष्ठ आहे काज । सद्भावे कीर्तनी गाता पै नाचता । लोकेषणा सांडी लाज रे । व्रता तपा तीर्था भेटे जो न पाहता । तो कीर्तनी सापडे देवो । तनु मनु प्राणे कीर्तनी विनटले । भावा विकिला वासुदेवो रे । एका जनार्दनी कीर्तन भावे । श्रोता वक्ता ऐसे लाहावे । गर्जत नामे निशाण लागुनी । सकळिका वैकुंठासी जावे रे ।
भावार्थ:
कीर्तनातील पदात ईश्वरीतत्वांचे जे निरुपण केले असेल त्याचे हृदयात ध्यान करीत असतांना तेथे मन सहजपणे स्थिर राहते. कीर्तनात रंगलेला कळिकाळसुध्दा आनंदी होवून समाधानाने समाधिस्त होतो. अत्यंत सात्विक भावाने जो अखंडपणे दिवस-रात्र कीर्तनात रंगतो त्याच्याकडे पाप प्रवेश करीत नाही. नामजपाने निष्पाप बनलेले अंत:करण पाहून देव त्या ठिकाणी उभा राहतो. हरि-नाम-कीर्तनात रंगून गातांना, नाचतांना भक्त लौकिकाची, लाज-लज्जेची चाड विसरून जातो. अभिमान, मीपणा पिकलेल्या फळाप्रमाणे गळून पडतो. जो परमेश्वर अनेक प्रकारच्या व्रतांनी, खडतर तपाने, तीर्थक्षेत्री भेटत नाही तो कीर्तनात हमखास सापडतो. कीर्तन भक्तीभावाला वासुदेव हरि विकला गेला आहे. एका जनार्दनी म्हणतात, कीर्तनभक्तीत श्रोता, वक्ता हाती हरिनामाचा झेंडा घेऊन हरिचा नामघोष करित वैकुंठाची वाटचाल करतात. 
१२०
नित्य नवा कीर्तनी कैसा ओढावला रंग । श्रोता आणि वक्ता स्वये झाला श्रीरंग । आल्हादे वैष्णव करिती नामाचा घोष । हरि-नाम गर्जता गगनी न माये हरुष । पदोपदी कीर्तनी निवताहे जग मन । आवडी भुकेली तिने गिळिले गगन । एका जनार्दनी गाता हरीचे नाम । निमाली इंद्रिये विषय विसरली काम ।
भावार्थ:
कीर्तनभक्तीत रंगून गेलेले श्रोते आणि वक्ते श्रीरंगात तल्लीन होऊन स्वत: श्रीरंगमय होतात. जेव्हा वैष्णव हरिनामाचा जयघोष करतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. भक्तांच्या प्रत्येक पदागणिक श्रोत्यांचे मन निवत जाते, विश्रांती पावते. एका जनार्दनी म्हणतात, हरिचे नाम गातांना इंद्रिये विषयवासना विसरून जातात, मन निष्काम बनते; हा एक अलौकिक पारमार्थिक अनुभव आहे. 
१२१
कीर्तनाची मर्यादा कैसी । देव सांगे उध्दवासी । गावे नाचावे साबडे । न घालावे कोडे त्या काही । मिळेल तरी खावे अन्न । अथवा पर्णे ती भक्षून । जाईल तरी जावो प्राण । परी न संडावे कीर्तन । किरकीर आणू नये । बोलू नये भलती गोष्टी । स्वये उभा राहून । तेथे करी मी कीर्तन । घात आलिया निवारी । माता जैसी बाळावरी । बोले उध्दवासी गूज । एका जनार्दनी बीज ।
भावार्थ:
या भजनात श्रीहरी उध्दवाला कीर्तनभक्तीच्या मर्यादा विशद करुन सांगत आहेत. हरिभजनात गावे, नाचावे. मिळाले तर अन्न खावे नाहीतर झाडाची पाने खाऊन भुक भागवावी. प्राण गेला तरी कीर्तन सोडू नये. कीर्तनात कोणतीही तक्रार करु नये किंवा अजाणतेपणी भलत्याच गोष्टींची चर्चा करु नये. कीर्तनकाराच्या ठिकाणी आपण स्वत: उभा असून कोणतेही संकट निवारण्यास सज्ज असतो, जशी माता आपल्या बाळाचे संकट निवारण करते. एका जनार्दनी म्हणतात, कीर्तन-भक्तीचे हे रहस्य देव भक्त उध्दवाला सांगतात. 
१२२
सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी । सज्जन-वृंदे मनोभावे आधी वंदावी । संत-संगे अंतरंगे नाम बोलावे । कीर्तन-रंगी । देवा-संनिध सुखे डोलावे । भक्तिज्ञानविरहित गोष्टी इतरा न कराव्या । प्रेमभरे । वैराग्याच्या युक्ति विवराव्या । जेणे करुनी मूर्ति ठसावे । अंतरी श्रीहरिची । ऐशी कीर्तन-मर्यादा हे संताचे घरची । अद्वय-भजने अखंड-स्मरणे । वाजवी कर-टाळी । एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी ।
भावार्थ:
सज्जनांच्या समुदायाला मनोभावे वंदन करुन परमेश्वराची अत्यंत पवित्र अशी सगुण-चरित्रे कीर्तनात वर्णन करावी. संतजनांबरोबर मनापासून ईश्वर नामाचा जयघोष करावा. प्रेमाने, विवेकाने वैराग्य कसे मिळवता येईल याचे विवरण करावे. श्रोत्यांच्या अंतकरणात श्रीहरिची स्पष्ट प्रतिमा स्थापन करावी. ही संतांची कीर्तनभक्तीची पध्दत आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीच्या अखंड नाम स्मरणाने अद्वैत निर्माण होऊन भक्त ईश्वराशी एकरुप होऊन तात्काळ भव-बंधनातून मुक्त होतो. 
१२३
धन्य तोचि जगी एक हरि-रंगी नाचे । राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे । सुख दु:ख समान सकळ जीवांचा कृपाळ । ज्ञानाचा उद्बोध भक्ति-प्रेमाचा कल्लोळ । विषयी विरक्त जया नाही आप-पर । संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार । जाणीव शाहणीव ओझे सांडूनिया दूरी । आपण वस्तीकर वर्ततसे संसारी । एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन । आसनी शयनी नित्य हरीचे चिंतन । एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन । आसनी शयनी नित्य हरीची चिंता ।
भावार्थ:
राम कृष्ण वासुदेव या नामाने स्मरण करुन हरिकीर्तनात दंग होऊन नाचतो तो धन्य होय. या हरिभक्ताच्या दृष्टीने सुखदु:खे समान असतात. तो सुखाने हरखून जात नाही आणि दु:खाने खचून जात नाही. तो सृष्टीतील सर्व जीवांवर प्रेम करतो. त्याच्या अंतरात भक्ती-प्रेम उसळून येते व बुद्धीत विवेकाचा संचार होतो. विवेकातून वैराग्याचा उगम होतो, मी-तूपणा, आपपर भाव लयास जातो. तो सदा संतुष्ट, समाधानी असतो. ज्ञानाचे ओझे दूर फेकून तो एखाद्या वाटसरूसारखा विरक्तपणे संसारात राहतो. आसनावर बसून किंवा मंचावर शयन करतांना तो सतत हरीकीर्तनात, चिंतनात मग्न असतो. त्याचा हरिभक्तीचा निर्धार पक्का असतो. असा भक्त धन्य होय असे एका जनार्दनी म्हणतात.  सत्संगती आणि गुरुभक्ती
१२४
वैष्णवा घरी देव सुखावला । बाहीर न वजे दवडो निघातला । देव म्हणे माझे पुरतसे कोड । संगत या गोड वैष्णवांची । जरी देव नेउनी घातला दूरी । परतोनि पाहे तंव घराभीतरी । कीर्तनाची देवा आवडी मोठी । एका जनार्दनी पडली मिठी ।
भावार्थ:
वैष्णवांच्या गोड संगतीत देव सुखावला, कारण देवाला कीर्तन-भक्ती अतिशय प्रिय आहे. वैष्णव देवाच्या सर्व इच्छा पुरवतात. वैष्णवांची संगत देवाला आवडते. वैष्णव देवाला दूर करतात, पण देवाला वैष्णवांचा दुरावा सहन होत नाही. एका जनार्दनी म्हणतात, देव आनंदाने कीर्तन-भजनात भक्तांशी एकरुप होतो. 
१२५
संता-अंकी देव वसे । देवा-अंकी संत बैसे । ऐसी परस्परे मिळणी । समुद्रतरंग तैसे दोन्ही । हेम-अलंकारवत । तसे देव-भक्त भासत । पुष्पी तो परिमळ असे । एका जनार्दनी देव दिसे ।
भावार्थ:
देव व संत यांचा निकटचा संबंध वर्णन करतांना एका जनार्दनी म्हणतात, सागराच्या पृष्ठभागावर जसे लाटांचे तरंग उमटतात तसे देव व संत एकरुप असतात. सोने आणि सुवर्णाचे अलंकार भिन्न-रुप भासतात, परंतु ते एकरुप असतात. सुमन आणि सुगंध जसे वेगळे करता येत नाहीत तशी संत व देवाची संगत असते. 
१२६
संत आधी देव मग । हाचि उमग आणा मना । देव निर्गुण संत सगुण । म्हणोनी महिमान देवासी । मुळी अलक्ष लक्षा नये । संती सोय दाविली । एका जनार्दनी संत थोर । देव निर्धार धाकुला ।
भावार्थ:
संताची थोरवी वर्णन करतांना एका जनार्दनी सांगतात, भक्तिमार्गावर साधकाला संत आधी भेटतात. संताच्या मार्गदर्शनाने देव ओळखता येतो. संत सगुण असून देव निर्गुण आहे. संत आपल्या विवेकाने, विचारांनी, वाणीने, कृतीने देवाला निर्गुणातून सगुणात आणतात. दृष्टीला जो अगोचर असतो तो प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा करतात. संत वाल्मिकींनी निर्गुण विष्णुरूप रामरुपाने सगुणात आणले. त्यामुळे देवाचा महिमा वाढला. संत हे देवापेक्षा थोर आहेत हे समजून घ्यावे. 
१२७
संताचा महिमा देवचि जाणे । देवाची गोडी संतासी पुसणे । ऐसी आवडी एकमेका । परस्परे नोहे सुटिका । बहुत रंग उदक एक । या परी देव संत दोन्ही देख । मागे पुढे नव्हे कोणी । शरण एका जनार्दनी ।
भावार्थ:
देवाच्या नवविधा-भक्तीची गोडी चाखण्यासाठी संतांच्या सहवासात राहावे आणि संतांचा महिमा देवच जाणतो. देव आणि संत एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. जसे पाण्याचे रंग वेगवेगळे दिसतातम् पण उदक एकच असते. एका जनार्दनी म्हणतात, देव आणि संत दोन्ही सारखेच प्रत्ययकारी असतात. दोघांना समदृष्टीने बघावे. 
अभंग १२८
अभक्ता देव कंटाळलो । परी सरते करिती संत त्या । म्हणोनी महिमा त्यांचा अंगी । वागविती अंगी सामर्थ्य । मंत्र-तंत्रा नोहे बळ । भक्ति प्रेमळ पाहिजे । आगम-निगमाचा पसारा । उगाचि भारा चिंध्यांचा । वेद-शास्त्रांची घोकणी । ती तो कहाणी जुनाट । एका जनार्दनी सोपा मार्ग । संत-संग चोखडा ।
भावार्थ:
अभक्तांना देव कंटाळतो, परंतु संतकृपेने तो भवसागर तरुन जातो. असे सामर्थ्य संताच्या अंगी असते. प्रेमळ भक्तीचे बळ मंत्र-तंत्रापेक्षा अधिक असते. वेद-शास्त्रांचे पाठांतर ही जुनाट पध्दत असून वेद, उपनिषदे हे केवळ कालबाह्य, जीर्ण भांडार आहे असे सांगून एका जनार्दन म्हणतात, संतांचा सहवास हा सर्वात सोपा व अचूक मार्ग आहे. 
अभंग १२९
संतासी जो नांदी देवासी जो वंदी । तो नर आपदी आपदा पावे । देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय । कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्य-सदनी पदवी पावे । एका जनार्दनी गूज सांगे कानी । रहा अनुदिनी संत-संगे ।
भावार्थ:
संतांची निंदा करून जो भक्त देवाला वंदन करतो, तो परमेश्वरी कृपेला पात्र होत नाही. पण संतांना आदरभावाने वंदन करतो आणि देवाची निंदा करतो. असा भक्त मात्र गोविंदाला आपलासा वाटतो हे पटवून देण्यासाठी एका जनार्दनी कंसाचे उदाहरण देतात. कंस सतत कृष्णाचा द्वेष करतोम् पण नारदांचा सन्मान करत असतो. त्याला सायुज्य मुक्तीचा लाभ होतो. सतत संतांच्या सहवासात रममाण व्हावे असे एकनाथ महाराज सांगतात. 

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP