मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
उपनयनसंस्काराचा विचार

उपनयनसंस्काराचा विचार

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


उप ( जवळ किंवा कडे ) नी ( नेणे ) म्हणजे पित्यानें किंव पालकानें अध्ययनाकरिता आचार्याकडे नेणे. चूडाकर्मापर्यंतचे बालकाचे सर्व संस्कार पित्यानेंच करावयाचे असून उपनयन हा संस्कार अध्ययन सांगणार्‍या गुरुने करावयाचा असतो विद्वान श्रोत्रियावांचून उपनयन कोणी करूं नये असा स्पष्ट नियम आहे. परंतु विद्यार्थ्यानें गुरुगृही विद्याभ्यासास जाण्याची चाल सोडाल्यापासून पित्यानेंच पुत्राचा उपदेश कर्ता होऊन उपनयनसंस्कार करण्याची चाल सुरूं झाली. गायत्रीमंत्राच्या उपदेशाला, ‘ देवसवितरेषते ब्रह्मचारी ’ आणि मंगलाष्टकानंतर बटूचे आचार्य जे मुख निरीक्षण करतो यापैकीं एकेकाला उपनयन समजणारे तीन पक्ष आहेत. वेदाध्ययनाला सुरवात या दृष्टीनें गायत्रीमंत्राच्या उपदेशाला फ़ार महत्त्व देण्यांत येते. आपल्या सर्वाचा मूळ जो प्रजापति त्याला बटु अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणून त्याचे परंपरा या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. यज्ञोपवीत, जानवे वगैरे प्रजापतीचे रूप घेण्याची साधनें आहेत. आपला मूळ जो प्रजापति त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न करणे. या प्रमाणावरून पहातां ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करावयाचा असा मूळ उद्देश दिसतो. म्हणून सर्व संस्कारांत उपनयनसंस्कार श्रेष्ठ आहे. उपनयनसंस्कारानें होणारा जो वेद्याधयनाकरितां जन्म तोच खरा व अजरामर जन्म असे म्हटले आहे. मातापितरापासून प्राप्त होणारा जो जन्म तो केवळ मनुष्यदेह देणारा जन्म होय. जन्म होताक्षणीच जर बालकाचा मातेपासून वियोग झाला तर बालकाचे संरक्षण होने फ़ार दुर्घट असते. त्याचप्रमाणे उपनयनरूप जन्म प्राप्त होताक्षणी ती जन्म देणारी सावित्रीमाता जर कुमाराने सोडून दिली तर त्याचे संगोपन व्हावयाचे कसे माता गेल्यानंतर वर घातलेल्या दुधाने मूल जिवंत राहाते पण वर दूधही मुळीच मिळाले नाहीं तर ते बालक एक दिवसही जिवंत राहण्याचा संभव नाहीं. सांप्रत उपनयनसंस्काराचे वेळी गायत्रीमंत्राचा उपदेश होतो परंतु त्या गायत्रीमंत्राचा जप उपनयन हा संस्कार होताक्षणीच करण्याचे सोडून देतात. कारण संध्यावंदन कर्मच जर केले जात नाहीं तर गायत्रीजप कोठून होणार. गायत्रीजप हे कुमाराला जिवंत ठेवणारे वेदमातेचे स्तन्य ( दूध ) होय. तसेंच वेदाध्ययनार्थ आचार्याचाही आश्रय ते करीत नसल्यामुळे बापापासूनही उपजताक्षणीं त्यांची ताटातूट होते. तात्पर्य आईबापाशिवाय मूल जगणार कसे. म्हणून यज्ञोपवीत धारण करून श्रेष्ठ जन्म देणार्‍या गायत्रीमंत्ररूप मातेचे व वेदाध्ययन सांगणार्‍या आचार्याचे अवलंबन करणे अवश्य आहे
उपनयनसंस्कार बंद पडल्यास प्रायश्चित :- बाप व आजा हे दोघेही उपनयन रहित असतील तर ते ब्रह्मघातकी होत. म्हणून त्यांची भेट घेऊं नये. त्यांचे अन्न सेवन करूं नये आणि त्यांच्याशी विवाहही करूं नये. उपनयनकाल अतिक्रांत झाला असेल तर एक ऋतु लोटेपर्यंत त्रैविद्यक ब्रह्मचर्य ( १ गुरुशुश्रुषा २ अग्निसेवा ३ अध्ययन ) व्रत आचरावे नंतर उपनय, स्नान आणि अध्ययन वगैरे करावीत. उपनयन रहित लोकांची इच्छा असल्यास त्यांना प्रायश्चित द्यावे. एक वर्ष कालातिक्रम झाला असल्यास जसे एक ऋतु लोटेपर्यंत प्रायश्चित्त सांगितले आहे. तसेंच जितक्या पिढ्या अनुपनीत गेल्या असतील तितकी वर्षे लोटेपर्यंत प्रायश्चित करीत राहावें. असा या धर्मसूत्राचा अर्थ थोडक्यांत आहे.
या आपस्तंवसूत्राप्रमाने प्रत्येक पिढीला एक वर्ष याप्रमाणे तरुउण पिढीच्या बाबतींत ( निदान सहा पिढ्यापर्यंत सहा वर्षे ) हे प्रायश्चित्त सर्वांना पटण्यासारखे आहे. इतरांच्या बाबतीत प्रायश्चित्ताचा विचार सहानुभूतीने करावयाचा असल्यास शास्त्र कांहीं आडवे येणार नाहीं. प्रायश्चित्त योग्य गुरुजनांकडून घ्यावे.
मनु व याज्ञवल्क्य अशा महान् अधिकारी धर्मशास्त्र प्रयोजकांनीं अडचनीच्या काळा करितां जी वाट ठेविली आहे, तिचा उपयोग करून घेण्याचे औदार्य दाखविले तरी सुद्धा पुष्कळ कार्य होणार आहे. सुदैवाने ही बुद्धी लवकरच झाली तर भारताचे नांव राही. उपनयन हा वैदिक धर्माच्या दीक्षेचा संस्कार असल्यामुळें प्रत्येक* हिंदूने करण्यास हरकत नाहीं. शक. हूण वगैरे अनार्याकडून व्रात्यस्तोम संस्कार करून मोठेमोठे यज्ञ करविल्याबद्दल शिलालेख आहेत उपनयनापासून अग्नीची उपासना सुरूं होते आणि तो अग्नि ‘ पंचजनांचा ’ सर्वांचा असतो. सध्या अग्नीपासून इतरांना निवृत्त करण्यांत आले आए, हा प्रकार अलीकडचा आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP