मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग ९३१ ते ९४०

अप्रसिद्ध अभंग - अभंग ९३१ ते ९४०

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


९३१
तेंचि ब्रह्मरूप जाणिजे निश्चळ ।
शद्ध तें निर्मळ मनाहुनी ॥१॥
स्थूळ दृष्टी करुनि जयासी लक्षितां ।
तत्त्वता भास कांहीं ॥२॥
सहज निवृत्तिदास तो उदास ।
अनुभव सौरस सांगितला ॥३॥
अर्थ:-
जे ब्रह्म स्थूल दृष्टीने पाहिले तर दिसत नाही जे मनाहून अत्यंत निर्मळ व निश्चळ आहे. तेच ब्रह्मस्वरुप होय.आम्ही ही अनुभवाची गोडी तुम्हांला सहज सांगितली. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.

९३२
मन हे अवघे परब्रह्मीं ।
क्रियाकर्मधर्मी अलिप्त तें ॥१॥
देह जावो राहो संबंधचि नाहीं ।
नामरुप कांहीं न दिसे मज ॥२॥
प्राचिनानें वर्तो जाणो या शरीरी ।
जैसा वेठी करी राबताहे ॥३॥
निर्विकल्प स्थिति हेतु नाहीं आथी ।
अज्ञानाची बुंथी काढियली ॥४॥
म्हणे ज्ञानेश्वर उरी नाहीं आन ।
जाहालों तल्लीन निजरूपी ॥५॥
अर्थ:-
माझे मन परब्रह्माच्या ठिकाणी बसले आहे. क्रिया, कमें वगैरेचे ठिकाणी मुळीच नाही. देह जावो किंवा राहो त्याचा माझा मुळीच संबंध नाही. जगातील नामरूपामुळे येणारा भेद मला मुळीच दिसत नाही. ज्याप्रमाणे बिगारीस धरलेला मनुष्य सांगावे तिकडे जातो. त्याप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे या शरीराने मी वागत आहे.अज्ञानाचे आवरण काढल्यामुळे व अंतःकरणांत दुसरा कोणताही हेतु नसल्यामुळे मी निर्विकल्प स्थितीत आहे. माझ्या ठिकाणी दुसरी कसलाही वासना न राहिल्यामुळे. आत्मस्वरूपांत मी निमग्न झालो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९३३
सगुणी निर्गुण निर्गुणी सगुण ।
दोन्ही भिन्नपण नसे मुळीं ॥१॥
हेम अलंकार अलंकारी हेम ।
मृण्मयेचि धाम धाम तेंचि ॥२॥
किंचित् महत उपाधि कल्पित ।
मुळीं तें अंशीक एकमेव ॥३॥
इह तेचि पर पिंड तें ब्रह्मांड ।
ब्रह्मचि अखंड ज्ञानदेव ॥४॥
अर्थ:-
जसे सोने तेच अलंकार व अलंकार तेच सोने किंवा मातीने केलेले घर आणि माती एकच त्याप्रमाण सगुण निर्गुण यांच्यात भेट नसुन ते दोन्ही एकच आहेत. उपाधि लहान मोठी कल्पिल्यामुळे त्यांच्यात भेद दिसतो. पण उपाधिचा निरास केल्यानंतर सगुण व निर्गुण हे दोन्ही एक परमात्मस्वरुप आहे म्हणुन इहलोक असो अथवा परलोक असो. व्यष्टिरुय असो. अथवा समष्टिरुप ब्रह्मांड असो सर्वत्र एक परमात्माच भरलेला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

९३४
पिंडचि ब्रह्मांड ब्रह्मांडचि पिंड ।
ब्रह्मचि अखंड ब्रह्मरुप ॥१॥
कांहीं भेद नाही किंचित् महत् ।
उपाधि कल्पित स्वाभाविक ॥२॥
अनुभव योगें दोन्हीं जाण सम ।
नाहींचि विषम अणुभरी ॥३॥
सहजचि सृष्टी जाणा हे घडली ।
सहजचि गेली शेखीं आथी ॥४॥
एकमेव सर्व म्हणे ज्ञानेश्वर ।
नाहीं भिन्न कीर ओळखतां ॥५॥
अर्थ:-
पिड ते ब्रह्मांड व ब्रह्मांड ते पिंड हे दोन्ही तात्विक दृष्टीने एकच आहेत कारण त्यांना अधिष्ठान असणारे ब्रह्म दोन्ही ठिकाणी अखंड एकरूपच आहे. पिंड ब्रह्माडांमध्ये बिलकूल भेद नाही. जर भेद दिसत असलाच तर तो उपाधिचाच होय ब्रह्माडांची उपाधि पिंडापेक्षा मोठी आहे. अनुभवाच्या दृष्टीने पाहाल तर त्यात विषमता मुळीच नाही. दोन्ही अगदी एकच आहेत. ही सृष्टी त्या अधिष्ठान ब्रह्मावर जशी मायेमुळे भासते. तशी मायेच्या बाधेने ती नाहीशी होते. सर्व काही एकमय आहे. खरोखरच दुसरी वस्तुच नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात

९३५
पाहातें पाहूं गेलों पाहणे विसरलों ।
ब्रह्मानंदें धालों देवराया ॥१॥
माझें रुप आतां काय म्यां पाहावें ।
जाहलों अवर्षे विश्व मीची ॥२॥
दुजें नाहीं नाहीं वाहतों तुझी आण ।
चौदाही भुवन एकरुप ॥३॥
तुझें माझें द्वैत तेंही उरलें नाहीं ।
मूळी मी हे कांहीं नाठवेचि ॥४॥
एकांती एक वर्ते तोचि साक्षात्कार ।
जाहला ज्ञानेश्वर तेथें लीन ॥५॥
अर्थ:-
ब्रह्म वस्तूला पाहूं गेलो असता मी त्या ब्रह्माहून वेगळा न राहता ब्रह्मानंदातच निमग्न होऊन गेलो ज्याला पाहावयाचे तेच माझे रुप असल्यामुळे पाहावयाचे काहीच उरले नाही. सर्वच ब्रह्मांड माझे रुप असल्यामुळे मला दुसरे काही दिसेनासे झाले. मला चवदाही भुवने ब्रह्मरुपच दिसू लागली. हे पंढरीनाथा तुला शपथ घेऊन सांगतो की, तुझ्या माझ्यामध्ये देवभक्तपणाही उरला नाही. या ठिकाणी मीपणा गेल्यामुळे एकच वस्तु सर्वत्र भरली आहे.असा मला साक्षात्कार झाला. मीपण तद्रूप होऊन गेलो त्यामुळेच दुसरी वस्तु असल्याची ओळख नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९३६
जयाचिये ठायीं नाहीं मीतूंपण ।
तेचि सनातन एक ज्ञानी ॥१॥
धैर्याचे मंडप तेचि स्तंभ जाले ।
कोंभ जे निघाले परिणामा ॥२॥
क्षेत्रज्ञ संन्यास घेतला श्रीहरि ।
तेथूनियां दूरी नवजेची ॥३॥
रायाची संगती घडतां निमिष ।
तरी होती वश्य अष्टसिद्धी ॥४॥
धाले तेच पूर्ण कीर ब्रह्मानंदें ।
ज्ञानेश्वर बोधे बोधीयला ॥५॥
अर्थ:-
ज्याच्याठिकाणी मी तूं हे द्वैत भान नाही. तेच मुरलेले ज्ञानी समजावे. ते धैर्यरुप मंडपाचे जणू खांबच होत. त्याच्या रुपाने जणू काय ब्रह्मालाच कोंभ फुटले म्हणावयाचे. त्या ज्ञानवानांच्या ठिकाणी श्रीहरिने क्षेत्रसंन्यास केला आहे. म्हणून त्याला त्या संतांच्या हृदयांतून बाहेर जाताच येत नाही. ज्याप्रमाणे राजाच्या क्षणभर संगतीने अष्टसिद्धीप्रमाणे सर्व लोक अनुकूल होतात. त्याप्रमाणे तेच पुरुष ब्रह्मानंदाने पूर्ण तृप्त आहेत. व तोच बोध मला निवृत्तिरायांनी दिला असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९३७
अक्षरची ब्रह्म तेंचि तें क्षरलें ।
काल्पनिक झाला अनेकत्व ॥१॥
जिवेश्वर खाणी तेथें उमटती ।
शेखी तेथे जाता मिळोनियां ॥२॥
ब्रह्म अनुपम्य संवितेशी नये ।
अनुभव सोये तरी कळे ॥३॥
पाथराची टाकी जरी होष तीख ।
नये रंध्र शलाख मुक्तिकेशी ॥४॥
सर्वाहुनी पर म्हणे ज्ञानेश्वर ।
ब्रह्मज्ञान कीर अगोचर ॥५॥
अर्थ:-
अविनाशी असणारे ब्रह्न तेच काल्पनिक असलेल्या अनेकात्वाला प्राप्त झाले. त्यात एक जीवसृष्टी व दुसरो ईशसृष्टी ही असून शेवटी विचाराने यांचा बोध झाल्यावर या दोन्ही सृष्टी एकरूप होतात. अनुभवावाचून निरुपमेय ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होऊ शकत नाही. पाथरवटाची टाकी कितीही बारीक असली तरी तिने मोत्याचा तुकडा पाडाता येत नाही.. किंवा त्यास भोक ही पाडता येत नाही. त्याप्रमाणे सूक्ष्म ज्ञानदृष्टी वाचुन ब्रह्मज्ञान होणार नाही ब्रह्मज्ञान हे अव्यक्त असून अत्यंत अगोचर आहे असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९३८
वासनेचे बीज भजोंनी टाकिलें ।
मानसासी केलें देशधडी ॥१॥
संसाराशी आगी लाविली स्वकरी ।
अहंतेशी दूरी दवडिलें ॥२॥
काम क्रोध लोभ मोह दंभ मद ।
केला याचा छेद ज्ञानशस्त्रे ॥३॥
विवेक वैराग्य बोध क्षमा शांति ।
राखिली संपत्ति दैविकीजे ॥४॥
राहे ज्ञानेश्वर एकचि एकट ।
ब्रह्मरस घोट घोटूनियां ॥५॥
अर्थ:-
आम्ही वासनेचे बीज जे अज्ञान हे भाजून टाकल्यामुळे आता संकल्प विकल्प करणाऱ्या आमच्या मनाला देशोधडीला लावले. आम्ही संसारास ज्ञानाग्नी लावून दिला व अहंकाराला दुर घालवून दिले. काम, क्रोध, लोभ मोह मद मत्सर यांचा ज्ञानरूपी शस्त्राने नाश करून टाकला. मोक्षोपयोगी असणारे विवेक, वैराग्य क्षमा शांती हे देवी संपत्तिचे गुण आम्ही आमच्या जवळ ठेवले.आम्ही ब्रह्मरसाचा भोग घेऊन एकरूप झालो.आता आम्हाला द्वैताची प्रतीती उरली नाही असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९३९
मंत्र तंत्र मंत्र सर्वही अबध्द ।
जव नाही शुध्द अंतःकरण ॥१॥
गुरुशिष्यपण हेंही मायिकत्व ।
जंव निजतत्व न ओळखी ॥२॥
प्राप्त जरी झाली अष्टसिद्धी जाण ।
मागुती बंधन दृढ होय ॥३॥
आत्मरुपावीण साधन अन्यत्र ।
भ्रमाशीच पात्र होईजे कीं ॥४॥
सर्व वृत्ति शून्य म्हणे तोचि धन्य ।
ज्ञीनदेव मान्य सर्वस्वेंशी ॥५॥
अर्थ:-
जोपर्यंत अंतःकरण शुद्ध झाल नाहा. तो पर्यंत मंत्र तंत्र व यंत्र या ज्ञानप्राप्ती करता केलेल्या खटपटी व्यर्थ आहेत. जोपर्यंत आत्मदर्शन झाले नाही तो पर्यंत गुरुशिष्यपणाही व्यर्थ आहे. योगाभ्यास करून अष्टमहासिदी प्राप्त झाल्या, तरी त्या बंधनालाच हेतु आहेत.आत्मज्ञान प्राप्तीवांचून केलेली सर्व साधने भ्रममूलकच आहेत.आत्मज्ञानाने ज्याच्या सर्व वृत्ति बाधित झाल्या तोच एक पुरुष धन्य आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

९४०
नाथिलें आभाळ जेवीं कां गगनीं ।
माया मुळींहुनी तैशी जाहली ॥१॥
ब्रह्मादिक काळ व्याली हे ढिसाळ ।
आथी रजस्वला इयेपरी ॥२॥
विवर्तक जाली विस्तारिलें जग ।
नव्हे भिन्न भाग एकमेव ॥३॥
मायोपाधी तेंचि जाहलें सगुण ।
येर तें निर्गुण जैसे तैसें ॥४॥
तेंचि निरुपण तोचि सर्वेश्वर ।
म्हणे ज्ञानेश्वर राजयोगी ॥५॥
अर्थ:-
आकाशांत दिसणारे ढग जसे आकाशातच नाहीसे होतात. त्याप्रमाणे ज्ञान झाल्यावर ब्रह्मावर भासणारी माया ब्रह्मरुपच होते.ब्रह्मदेवापासून मुंगी पर्यंत काळादि एवढे मोठे जगत सामान्य स्त्रीप्रमाणे ह्याच मायेपासून निर्माण झाले. वस्तुतः ब्रह्मावर विस्तारलेल्या जगताला ती विवर्तक मिथ्या भासवण्यात कारणीभूत झाली. ती ब्रह्माहून भिन्न ही नाही व ब्रह्माशी एकमेव अभिन्नहीं नाही तेच ब्रह्म मायोपाधीमुळे सगुण झाले. त्या उपाधीचा बाध झाला की ते पूर्ववत निर्गुण आहे, तो राजयोगी भगवान श्रीकृष्ण सगुणही आहे व निर्गुणही आहे, असे वर्णन वेदशास्त्राने केले आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP