मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग ३४५ ते ३५०

पांडुरंग प्रसाद - अभंग ३४५ ते ३५०

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


३४५

यम नियम पाप पुण्य आम्हासी ।

आपण भलतेंचि करिसी ।

तुझिया थोरपण बिहुनी असावें

कवणें शंकावें रायासी ।

प्रत्यक्ष जगी बाटली नारी

तिचें स्मरण लोकांसी ।

पुराणी डांगोरा पिटिताति

हें पतिव्रतापण तयेसी रया ॥१॥

आवडे तें करिसी देवा कवण

करी तुझा हेवारे ॥ध्रु०॥

बहुता परी उणें ऐकिजे पांडवा

सांगो या गोष्ठी ।

पांचांपासुनि जन्मले पांचैजण

येक पत्नीच्या पोटीं ।

गोत्रवधु करुनि राज्य करिती

विश्वास वंद्य शेवटीं ।

जन्मेजया ऐसें बोलिला सत्य तो

पापिया जाला कुष्टी ॥२॥

प्राण जाई तंव बोलिल तुज ।

पतन तया दशरथा ।

गणिका एक पाखिरु पोखिलें होतें

पाचारिलें प्राण जातां ।

कीं तयेसी ऊर्ध्वगति ऐसीं

बोलती पुराणें कासया न मिळे पाहतां ।

बोलणें खुंटलें तुजपासी देवा

वेव्हारु नाहीं सर्वथा ॥३॥

तपाचा जो राशी पुण्यपणें थोर ।

तीर्थरुप सर्वां तीर्थमंत्राचा अवतार ।

देव आणि शक्ती सूर्य तैसा विचारितां ।

तो मांडव्य ऋषि वाहिला सुळीं

येक ऊजाला वधिता ।

पुत्रा पाचारिलें पापिये दुर्जनें

तो वैकुंठी आजामेळु सरतारे रे ॥४॥

यज्ञमुखीं अवदानें देति त्या

करिसी वांकडें तोंड ।

लोणी चोरावया जासी घरोघरीं

उघडिसी त्यांची कवाडें ।

छप्पन कोटि यादव संगती हे तुझे

ते त्वां केले शापावरपडे ।

कोळियानें तुज विंधिलें पायीं ।

त्यासी सायुज्यता कोडें रया ॥५॥

अष्टांगयोगे शरीर दंडिले तुजलागीं

जालीं पिसी ।

पुत्रदारा धन सांडूनियां जन

हिंडताती वनवासी ।

गाती वाती पूजिती तूतें

त्यांसि निजपद सायासीं ।

विष पाजूं आली पूतना राक्षसी

सायुज्यता देणें तियेसी रया ॥६॥

वारया मोट बांधेल कोण

आकाशासी कुंप कायसा ।

सूर्यापुढें दिवा लाऊनिया

चालणें वाऊगाची शिण जैसा ।

विचित्र तुझें रुप अव्हेरुन जासी ।

सर्वेशा ज्ञानदेव म्हणे देवादिदेवा ।

जन भांबांविला ऐशा मावा रया ॥७॥

३४६

म्हणोनि तुझें रुप देखिलिया दिठी ।

जयसच्चिदानंदपदेंसी मिठी ।

ओंकारेंसी त्रिपुटी ।

न साहे तो तूं सगुण जगजेठी ॥

या दृष्टीचेनि सुखें माये ह्रदयीं भासलें रुप ।

शेखीं पाहतां कां आम्हा

चाळविसी रया ॥१॥

आतां सेवेलागीं सेवा करणें

कोणाच्या अंगें ।

स्वामीपणें जगीं होउनि ठेले ॥२॥

ते सांवळिये प्रमाण न दिसे अनुआन ।

शेखीं ध्यानीं विरालें ते मन गे माये ॥

रुप खुंतलें पण हाचि हा संपूर्ण ।

तेथें द्वैताद्वैतापण हारपलें रया ॥३॥

आतां बुध्दियोग इंद्रियांचा तो तूं

गोपवेषे साचा ।

भक्तियोगाचा सौरसु दाविसी आतां ।

बापरखुमादेवीवरा विठ्ठलाच्या पायी सुख ।

तेंच दरुशन येक जालें रया ॥४॥

३४७

आठवीं तंव तूंचि जवळिके

नाठविसि तरी निजमुखें ।

आठव न विसरु पाहे तंव

सगुणचि ह्रदयीं एक रया ॥१॥

तुझ्या नामाचा आठऊ रुपाचा

आठऊ ध्यानाचा आठऊ असो मना ॥२॥

विसरु पडे संसाराचा आठव

होता तुझ्या रुपाचा ।

येथें नाम रुप ठसा ह्रदयीं राहो ॥

जिवाचिया जिवलगा माझिया श्रीरंगा ।

गोडि घेऊनिया द्वैत पाहे रया ॥३॥

बापरखुमादेविवरा विठ्ठला

सगुणी सुमनीं गुंफिले ।

प्रीति आवडे तों कोंदाटलें

सुमनीं हें विरालें ॥४॥

जाली नामरुपीं ऐक्यभेटीं ।

नामरुप सार जाणोनि जीवन

संसारा जाली तुटी रया ॥५॥

३४८

कितिये स्तुति स्तवने स्तविती

स्तोत्रें विधिगुणें ॥

विधि तूं तें कर्म करणें परि

नेणती मार्ग ॥

अकर्मी विकर्मी जगीं शब्द म्हणती ।

हा ब्रह्म कर्माचा भागु ।

शेखीं ब्रह्मकर्म तो योग चुकलें

पंथ शेखीं ब्रह्म तें तूंचि आतां ॥

सगुण ह्रदयीं धरुनि ।

अनु नातळे वाणी रया ॥१॥

तुझा गोपवेष सौरसु मज

सुखाचें सुख निजप्रेम देई रया ॥२॥

म्हणोनि यज्ञ यज्ञादिकें तपें व्रतें अटणें ।

बहुविधि अनेकें पंचाग्नि गोरांजनें ।

सुखें करिती विधि द्वादश

अग्नि जळवास ।

ऐसा धरुनि हव्यास परि

ते चुकले कार्यसिध्दि ॥

तुझें भजन सगुण मज

प्रिय गा दातारा ।

अनु न लगती मजलागीं

आधि रया ॥३॥

बापरखुमादेवीवरा उदारा सोईरा ।

सगुणागुणाचिया निर्धारागुंतल्या येसी ।

मना पुरली हांव विश्वीं अळंकारला

देव कीं दिठी न विकारें अनुध्यासीं ॥

येणें निवृत्तिरायें खुणा दाऊनि सकळ

सुखीं सुखावोनि ठेलें निजध्यासें रया ॥४॥

३४९

आपुलिये खुणें आपणपे दावी ।

कीं सगुणबुंथी चोख मदवी ।

ऐसा सुंदर गोपवेष ।

कीं तत्त्वमस्यादि सौरसु जेथें

श्रुति नेति नेति ठेल्या पायीं ।

तो तूं सगुण निर्गुणी निजानंदें

सहजचि कळे विदेहीं रया ॥१॥

एक म्हणतां दुजे नाहीरे तेथें

शून्य तूं सांगसी काई ।

निरशून्य तें आतां सगुण ते

निराळलें तेथें हे कल्पना काई रया ॥२॥

नामरुपछंद गोडी ऐसी इंद्रियांची आवडी ।

परतोनि पाहे घडिघडी तोचि तूं ॥

तेथें आठऊ ना विसरु ।

परी तोचि गा तूं थोरु

ऐसा निर्धाराचा धीरु धरी ॥

ऐसें जाणोनिया जरी सांडी मांडी करिसी ।

तरी पावसी कोण येरझारी रया ॥३॥

तोचि तूं जगदात्मा विसावा घडि

क्षण न विसंबावा ।

हाचि होऊनि रहावा प्राण माझा ॥

म्हणोनि धीरु धीरु

बापरखुमादेविवरा विठ्ठला आतां ।

प्रपंचीं न गुंते साचे आम्हा

जितांचि मरणें कां मेलिया

कल्पकोडी जिणें धरि

या निवृत्तिची आंत रया ॥४॥

३५०

अगुणाचिया पा समंधा गुणसंबंध करु ।

नकळे हा वेव्हारु लोकांमाजी ।

हा नाटकु विंदाणी न कळे

याची करणी ।

दाटोनि अंत:करणीं रिघों पाहे ॥१॥

सरसर परता गुणाचिया गुणा ।

निजसुखानिधानां तूंचि एकु ॥२॥

तुझ्या गुणागुणीं वेधलीं मुनिवृंदें ।

मानसाचिया छंदें वर्तसी तूंचि ॥

आपुलें निज सोंग भुलविलें जयासी ।

अखंड मानसीं जवळी आहे ॥३॥

ऐसा हा नवलावो विस्मो हा वाटला ।

भाव हा गळाला काय सांगों ।

रखुमादेविवरु विठ्ठलु ह्रदयीं वसे ।

बाह्यअभ्यंतरी केव्हां वेगळा

नव्हे रया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP