मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ३० वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ३० वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ३० वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ लोमश म्हणे राया धर्मा ॥ ऐकें हरिश्चंद्राचा महिमा ॥ ज्याचे सत्त्वधीरपणाची सीमा ॥ जाहली ब्रह्मांडमंडपीं ॥१॥जो अयोध्येचा नृपती ॥ पुराणीं महिमा जयाचा वर्णिती ॥ सूर्यवंशींचा चक्रवर्ती ॥ हरिश्चंद्र राजेंद्र ॥२॥पृथ्वीचे सकल नृपवर ॥ हरिश्चंद्रासी देती करभार ॥ दानशील सत्त्वसमुद्रा ॥ सेना अपार तयाची ॥३॥दुःख दरिद्र दुष्काळ पाहीं ॥ अयोध्येंत नसे कांहीं ॥ लोक सभाग्य सकळही ॥ द्रव्या नाहीं मिति तेथें ॥४॥अयोध्येचें सुंदरपण ॥ पाहूनि लाजे शक्रभुवन ॥ सदा सफल दिव्य वन ॥ वसंत देखोन सुखावे ॥५॥जो व्यासवाल्मीकींचा गुरु ॥ जो सर्वसिद्धांमाजी मेरु ॥ तो नारद मुनीश्वरु ॥ अयोध्येसी पातला ॥६॥रायें साष्टांग केलें नमन ॥ करी नारदाचें पूजन ॥ ऋषि म्हणे राया तूं धन्य ॥ पूर्ण निधान पृथ्वीवरी ॥७॥नारद तेथूनि निघाला ॥ वेगें इंद्रसभेसी पातला ॥ सभा घनवटली ते वेळां ॥ नारदें वर्णिला हरिश्चंद्र ॥८॥आजि पृथ्वीवरी हरिश्चंद्र ॥ परमसत्त्वधीर नृपवर ॥ ज्याची कीर्ति पवित्र ॥ त्रिलोकामाजी विस्तारली ॥९॥नारदें हरिश्चंदासी वर्णितां ॥ वसिष्ठें डोलविला माथा ॥ म्हणे सत्त्वराशि पुरता ॥ हरिश्चंद्राऐसा नसेचि ॥१०॥विश्वामित्र क्रोधावला ॥ म्हणे आपुला शिष्य वर्णिला ॥ करीन सत्त्वहीन तयाला ॥ क्षणमात्र न लागतां ॥११॥कीं महिषापुढें मशक ॥ राजेंद्रापुढें जैसा रंक ॥ कीं सूर्यापुढें दीपक ॥ मंडन कोठें पैं त्याचें ॥१२॥सत्त्वीं ढाळीन हरिश्चंद्र ॥ तरीच हा ऋषि विश्वामित्र ॥ तूं गुरु म्हणोनियां थोर ॥ अभिमान धरिसी तयाचा ॥१३॥मग बोले वसिष्ठऋषी ॥ जरी हरिश्चंद्र टळेल नेमासी ॥ तरी मी मद्यपानी निश्चयेंसीं ॥ कल्पवरी जाहलों ॥१४॥हरिश्चंद्र सत्त्व टाकील पूर्ण ॥ तरी मी ब्राह्मण्या वेगळा होईन ॥ विधवा जारकर्मी जाण ॥ तें गर्भस्थान मी पावेन ॥१५॥मग विश्वामित्र बोले ॥ कोटिवर्षें तप केलें ॥ लोहपिष्ट भक्षिलें ॥ पंचाग्निसाधन बहुकाळ ॥१६॥सत्त्वा न टळे हरिश्चंद्र ॥ तरी हें तप देईन तया समग्र ॥ वसिष्ठ म्हणे ईश्वर ॥ ऐसेंचि करो निश्चयें ॥१७॥विश्वामित्र म्हणे वसिष्ठासी ॥ त्वां श्रुत हें न करावें रायासी ॥ येरू म्हणे निश्चयेंसीं ॥ कळूं राया नेदींच ॥१८॥दोघे आश्चमां गेले ॥ वसिष्ठें तप आरंभिलें ॥ अपयश न यावें वहिलें ॥ हरिश्चंदा म्हणूनि ॥१९॥कापटयानुष्ठान घोर ॥ द्वेषें करीत विश्वामित्र ॥ पराजय पावे हरिश्चंद्र ॥ ऐसा प्रकार ॥ मांडिला ॥२०॥अकरा कोटी महाव्याघ्र ॥ वनांत सोडी विश्वामित्र ॥ मनुष्यें भक्षिती समग्र ॥ वाट अणुमात्र चालेना ॥२१॥वनीं न वागे मनुष्य ॥ कच्चीं पिकें पडलीं ओस ॥ समाचार हा रायास ॥ सांगती लोक नगरींचे ॥२२॥राजा म्हणे प्रजा पीडती ॥ मग मी कासया नृपती ॥ लेंकुराऐशा प्रीतीं ॥ प्रजा निश्चयें पाळीन मी ॥२३॥सिद्ध करूनि चतुरंग सेना ॥ हरिश्चंद्र चालिला वना ॥ सवें तारामती अंगना ॥ निघती जाहली कौतुकें ॥२४॥वनोवनीं धांवे हरिश्चंद्र ॥ करीत व्याघांचा संहार ॥ अनेक श्वापदें पीडाकर ॥ मारी नृपवर तेधवां ॥२५॥सिद्धाश्रमीं वसे विश्वामित्र ॥ कळला त्यासी समाचार ॥ क्रोधावला ऋषीश्वर ॥ कपट थोर मांडिलें ॥२६॥मायेचे मृग दोन करूनी ॥ पाठविले तये वनीं ॥ हरिश्चंद्रें ते देखोनी ॥ तुरंग वेगें लोटिला ॥२७॥दोघेही मृग पळत ॥ आले सिद्धाश्रमीं धांवत ॥ हरिश्चंद्र पावला तेथ ॥ अपूर्व देखे सिद्धाश्रम ॥२८॥गायी आणि व्याघ्र ॥ तेथें चरती निर्वैर ॥ सर्प मुंगुस मित्र ॥ द्वेष अणुमात्र नसेचि ॥२९॥पक्षी करिती वेदाध्ययन ॥ वाखाणिती शास्त्रपुराण ॥ हरिश्चंद्रें तें देखोन ॥ आश्चर्य पूर्ण मानिलें ॥३०॥तों तारामती आणि प्रधान ॥ मागें सेना येत संपूर्ण ॥ ऐकोनि पक्ष्यांचें भाषण ॥ मन ॥ संतोषलें सर्वांचें ॥३१॥तों देखिलें शिवस्थान ॥ काश्मीराचें देऊळ जाण ॥ लिंग मणिमय प्रभाघन ॥ देखतां मन निवालें ॥३२॥परिवार तेथें राहिला ॥ रायें नित्यनेम सारिला ॥ शिव षोडशोपचारें पूजिला ॥ श्रम गेला समस्ता ॥३३॥विश्वामित्रें ते क्षणीं ॥ दोघी पाठविल्या मातंगिणी ॥ उत्तम गायन करूनी ॥ राव भुलवुनी मोहिला ॥३४॥रंभेऐसें सुंदर ॥ गायन करिती त्या सुस्वर ॥ प्रसन्न जाहला हरिश्चंद्र ॥ म्हणे कांहीं वर मागा ॥३५॥त्या म्हणती ऐक राया ॥ आम्ही होऊं तुझ्या भार्या ॥ तारामती दूर करूनियां ॥ भोग आम्हां देइंजे ॥३६॥तों सत्कीर्तिप्रधान ॥ क्रोधावला ऐकून ॥ दूतांसी सांगे निग्रहेंकरून ॥ यांसी बाहेर घालवावें ॥३७॥या दोघी चांडाळिणी ॥ आहेत केवळ मातंगिणी ॥ दूतीं बाहेर घातल्या ढकलूनी ॥ गेल्या ते क्षणीं ऋषीपाशीं ॥३८॥सांगती सर्व वर्तमान ॥ आम्हां बाहेर घातलें ढकलून ॥ विश्वामित्र क्रोधेंकरून ॥ संगें शिष्य घेऊन चालिला ॥३९॥कोपें कांपें थरथरां ॥ देवळांत आला सत्वर ॥ म्हणे चांडालकुमारा ॥ मज विश्वामित्रा नेणसी ॥४०॥माझा महिमा न कळे तुला ॥ तुझा त्रिशंकु पिता म्यां उद्धरीला ॥ इंद्रपदा पाठविला ॥ याग करूनि स्वहस्तें ॥४१॥पितृगुरुद्रोह गोहत्या ॥ घडल्या होत्या तुझिया पित्या ॥ केवळ चांडाळ जाहला होता ॥ तो म्यां तत्त्वतां उद्धरिला ॥४२॥तें अवघें विसरून ॥ केला माझे दासींचा अपमान ॥ माझीं श्वापदें संपूर्ण ॥ तुज काय कारण वधावया ॥४३॥श्वापदें माझीं बाळें सत्य ॥ क्रीडत होतीं वनांत ॥ तूं कोण वधावया येथ ॥ सांगें त्वरित दुर्जना ॥४४॥तुझ्या गुरूचे शंभर पुत्र ॥ मीं वधिले न लागतां क्षणमात्र ॥ तो मी ऋषि विश्वामित्र ॥ माझें चरित्र न कळे तूतें ॥४५॥म्यां ब्रह्ययाशीं वाद करून ॥ प्रतिसृष्टि केली निर्माण ॥ तूं वैभव मजलागून ॥ दाखवावया आलासी ॥४६॥तों सत्कीर्तिप्रधाना समवेत ॥ राव घाली दंडवत ॥ तारामती चरण धरीत ॥ आम्ही सत्य अपराधी ॥४७॥क्षमा करणें तुम्हीं ऋषिराया ॥ म्हणूनि मागुती लागती पायां ॥ ऋषि म्हणे श्वापदें वधावया ॥ कां या ठाया आलासी ॥४८॥ऐसें विश्वामित्र बोलोन ॥ गेला आश्रमा कोपून ॥ राव परम श्रमून ॥ शिवभुवनीं प्रवेशला ॥४९॥राव परम चिंताक्रांत ॥ निद्रा करी एक मुहूर्त ॥ तारामती मांडी देत ॥ उसां रायाचे तेधवां ॥५०॥रायें देखिलें स्वन्प ॥ एक आला ब्रह्मण ॥ त्याचे पाय धुऊन ॥ राज्य दान दिधलें पैं ॥५१॥ब्राह्मण म्हणे ते क्षणीं ॥ अंकुश लगाम लेखनी ॥ राया दे मजलागूनी ॥ येरें ते क्षणीं दीधलीं ॥५२॥सवेंचि एक विवशी ॥ येऊनि झोंबे रायासी ॥ राव गजवजूनि मानसीं ॥ जागा जाहला तेधवां ॥५३॥करूनियां हरिस्मरण ॥ तारामतीस सांगे स्वन्प ॥ समुद्र वलयांकित संपूर्व ॥ राज्य बाह्मणा दिधलें पैं ॥५४॥तों विश्वामित्र वेष पालटून ॥ होऊन आला ब्राह्मण ॥ राया दिधलें आशीर्वचन ॥ नृपें पूजन पैं केलें ॥५५॥रायासी म्हणे ब्राह्मण ॥ मज औटभार दे सुवर्ण ॥ राजा बोले प्रीतीकरून ॥ अवश्य घेऊन जाइंजे ॥५६॥राव म्हणे ब्राह्मणासी ॥ चलावें आतां अयोध्येसी ॥ दक्षिणा देईन निश्चियेंसीं ॥ म्हणोनि भाक दीधली ॥५७॥वारूवरी बैसला ब्राह्मण ॥ राव चालिला अयोध्येलागून ॥ सुखासनीं आरूढोन ॥ तारामती चालिली ॥५८॥पुढें वेत्रधार जाती धांवोन ॥ अयोध्या श्रृंगारिली संपूर्ण ॥ मंदिरीं प्रवेशतां विघ्न ॥ विश्वामित्रें मांडिलें ॥५९॥सुखासनीं तारामती ॥ मांदिरामाजी जात होती ॥ द्वेषें लोटूनि परती ॥ पाडिली क्षितीं तियेसी ॥६०॥कोठें गे तूं जातेसी ॥ म्हणोनि ओढिली धरोनि केशीं ॥ देड हाती घेऊनि तियेसी ॥ मारिता जाहला द्वेषानें ॥६१॥घाय उमटे जेथें ॥ चळचळां रक्त वाहे तेथें ॥ थरथरां कांपे चंडवातें ॥ केळी जैसी सुकुमार ॥६२॥धांवूनि आला नृपनाथ ॥ ब्राह्मणाचे चरण धरीत ॥ येरू थरथरां कांपत ॥ क्रोधें बोलत तयासी ॥६३॥म्हणे माझें औटभार सुवर्ण ॥ दे रे आधीं आणून ॥ तूं घरांत बैससी जाऊन ॥ माझें स्मरण तुज कैंचें ॥६४॥मी आतां द्र्व्य घेईन ॥ तुज करूं नेदीं उदकपान ॥ रायें आणविलें सुवर्ण ॥ भांडारियां सांगोनियां ॥६५॥पुढें केली सुवर्णराशी ॥ हें आमुचें आम्हांस म्हणे देसी ॥ हें धन माझें तूं कां घेसी पडली कैसी भ्रांति तूतें ॥६६॥आमुचें आम्हांसी देऊन ॥ काय करिसी मूर्खा दान ॥ गुरु वसिष्ठें शिकवण ॥ हेंचि शिकविलें तुलागीं ॥६७॥तुवां सकल राज्य दान ॥ दिधलें मजला पाय धुऊन ॥ अंकुश लगाभ लेखनी जाण ॥ तुवांदान दीधलीं ॥६८॥रायें चरणीं ठेविला माथा ॥ म्हणे मज धन्य केलें आतां ॥ राज्यांतीं नरक तत्त्वतां ॥ कोणीं भोगावा स्वामिया ॥६९॥माझें ओझें उतरलें ॥ कृपाळुवा पावन केलें ॥ विप्र म्हणे बहुत न बोलें ॥ माझी दक्षिणा दे आधीं ॥७०॥मग प्रधानादि सकल जनां ॥ राजा सांगे करोनि प्रार्थना ॥ राज्य दिधलें ब्राह्मणा ॥ याची आज्ञा पाळिंजे ॥७१॥माझी दक्षिणादे मजलागूनी ॥ दोघें बांधिलीं तये क्षणीं ॥ तारामतीचे केश धरोनी ॥ क्रोधेंकरूनि पाडीत ॥७२॥जिचा मुखप्रकाश देखोनी ॥ चंद्र लाजे अधोवदनीं ॥ तिचे हात बांधिले आंवळोनी ॥ सर्व जनांचे देखतां ॥७३॥विश्वामित्रासी लोक शिव्या देती ॥ नगरा कैंचा आणिला म्हणती ॥ नरनारी प्रजा रडती ॥ तारामतीस पाहोनी ॥७४॥तोंडावरी दोघांसी मारीत ॥ अशुद्ध भडभडां वाहात ॥ लोक सद्नद होती समस्त ॥ पीडा देखोनि तयांची ॥७५॥नगर व्यवहारी धांवती ॥ म्हणती सोडवूंया नृपती ॥ आम्हां द्र्व्या नाहीं मिती ॥ मेळवूं निश्चितीं आणिका ॥७६॥मग बोले हरिश्चंद्र ॥ प्रजाद्रव्य घेती जे नृपवर ॥ ते परम चांडाळ दुराचार ॥ भोगिती थोर रौरव ते ॥७७॥विश्वामित्र म्हणे तयांचें द्रव्य घेसी ॥ परी मी देऊं नेदींच तयांसी ॥ सकल पृथ्वीचे धनासी ॥ स्वामी मीच निर्धारें ॥७८॥मागुती तारामतीतें ॥ विप्र मारी कठिणहस्तें ॥ येरी धांवोनि धरी पायांतें ॥ गहिंवर लोकांतें न धरवे ॥७९॥तंव रोधिदास पुत्र येऊन ॥ धरी विश्वामित्राचे चरण ॥ स्वामी मी गहाण राहीन ॥ फेडीन द्र्व्य तुमचें पैं ॥८०॥विश्वामित्र म्हणे ते वेळे ॥ कोणाचें पोर हें मध्यें आलें ॥ बडबड करी आगळें ॥ म्हणोनि मारिलें तोंडावरी ॥८१॥राव म्हणे माझा कुमार ॥ असे तुमचा जी किंकर ॥ विप्र म्हणे दावेदार ॥ पुढती राज्य घेईल हा ॥८२॥म्हणोनि फडफडां मारीत ॥ बालक भूमीवरी लोळत ॥ मी हें राज्य न घें सत्य ॥ बापें तुम्हां दिधलें तें ॥८३॥विप्र म्हणे तिघें जणें ॥ माझे राज्यांतूनि आतां जाणें ॥ माझी दक्षिणा आणूनि देणें ॥ वेगेंकरूनि आतांचि ॥८४॥राव म्हणे नवखंडा बाहेरी ॥ जाईन वाराणसी नगरीं ॥ तुमची दक्षिणी निर्धारीं ॥ भलतेपरी फेडीन ॥८५॥सातवे दिवशीं फेडीन ऋण ॥ म्हणोनि दिधलें भाषदान ॥ मग त्याची आज्ञा घेऊन ॥ तिघें चालिलीं काशीस ॥८६॥तों विश्वामित्र धांवत ॥ तारामतीचे केश धरीत ॥ माझे वस्त्रालंकार समस्त ॥ फेडूनि जावें वनांतरा ॥८७॥तिघांचीं वस्त्रें अलंकार ॥ घेऊनि उघडीं करी समग्र ॥ वल्कलें वेष्टूनि सत्वर ॥ निघतीं जाहलीं तेधवां ॥८८॥नगरांतूनि उघडीं चालिलीं ॥ तेव्हां एकचि हांक जाहली ॥ सकल प्रजांनीं ते वेळीं ॥ शिरें आपटिलीं धरणीसी ॥८९॥म्हणती सर्वेशा नारायणा ॥ हें कां दुःख दाविसी नयनां ॥ वना जातो हरिश्चंद्राराणा ॥ चरणचालीं चालत ॥९०॥हरिश्चंद्रा ऐसा नृपती ॥ न देखों आम्ही पुढतपुढती ॥ लोक रडत पाठीं धांवती ॥ करिती खंती फार तेव्हां ॥९१॥जन रडती धाय मोकलून ॥ पशुपक्षी करिती रोदन ॥ आकान्त जाहला दारुण ॥ कोणा अन्नपान नाठवे ॥९२॥विश्वामित्र म्हणे रायाप्रती ॥ लोक कां तुजमागें येती ॥ मग काय करावें नि़श्चितीं ॥ ओस नगर सांग पां ॥९३॥तों रायें सकळ लोक ॥ फिरविले जोडूनि हस्तक ॥ तिघें चालिलीं नैष्ठिक ॥ चरणालीं पुढती पैं ॥९४॥पुढें हरिश्चंद्र नृपवर ॥ मागें तारामती सुंदर ॥ हळू हळू रोहिदास कुमार ॥ चरणीं जात वनातें ॥९५॥सूर्यासी म्हणे विश्वामित्र ॥ आतां उघडीं द्वादश नेत्र ॥ तों तपों लागला दिनकर ॥ विश्वामित्राज्ञेनें तैं ॥९६॥तीव्र तपे वासरमणी ॥ पाषाण उलती उष्ण धरणी ॥ वृक्ष गेले सर्व करपोनी ॥ उदक मेदिनीं असेना ॥९७॥वरुणासी सांगे विश्वामित्र ॥ उदक ठेवूं नको अणुमात्र ॥ समीरा तू होईं स्थिर ॥ नको येऊं यांवरी ॥९८॥वृक्षासी फळ नाहीं ॥ सूर्य तीव्र तपे पाहीं ॥ सरांटे पसरले महीं ॥ वाट कांहीं दिसेना ॥९९॥उष्णें तापलई मही अत्यंत ॥ शेषाचाही माथा पोळत ॥ तळव्याची आग माथां येत ॥ तृषेनें जात प्राण त्यांचे ॥१००॥तिघें तापलीं उष्णेंकरून ॥ तोंडीं खरस आली दता क्षमा अपार ॥ शांत धीर महाराज तो ॥१०१॥माथा डोलविती सकल जन ॥ म्हणती याचें मोल करील कोण ॥ कांटां घातलें त्रिभुवन ॥ तरी न्यून हरिश्चंद्राशीं ॥१०३॥घेतां हरिश्चंद्राचें नाम ॥ सकल पातकें होती भस्म ॥ कैंचा ब्राह्मण अधम ॥ छळी ऐशा महाराजा ॥१०४॥तेथोंचा वीरबाहु महार ॥ त्यापाशीं द्र्व्य असे अपार ॥ तेणें सुवर्ण देऊनि दोन भार ॥ हरिश्चंद्र घेतला ॥१०५॥प्रेतांचें द्र्व्य बहुत ॥ त्यापाशीं असे अमित ॥ द्रव्याविण निश्चित ॥ प्रेतें जाळूं देईना ॥१०६॥राव म्हणे डोंबालागून ॥ तुम्ही सांगाल तेण काम करीन ॥ परी न घें तुमचें अन्न ॥ करोरडें धान्य मज द्यावें ॥१०७॥दोन भार सुवर्ण ॥ विश्वामित्रासी अर्पून ॥ रायें धरिलें चरण ॥ म्हणे म्यां श्रमविलें स्वामीस ॥१०८॥जावें आतां अयोध्येस ॥ राज्य करावें सावकाश ॥ मग डोंबासंगें नरेश ॥ जाता जाहला गृहा त्याचे ॥१०९॥तों मांसाची दुर्गंधि येत ॥ प्रेतें पडलीं असंख्यात ॥ अस्थींचे असती पर्वत ॥ घराभोंवते तयाच्या ॥११०॥राव मनीं कंटाळत ॥ म्हणे बाप रे कर्म बळिवंत ॥ तों महारीण आली त्वरित ॥ पत्नी वीरबाहुची ॥१११॥म्हणे हाचि काय आणिला विकत ॥ हा तों सुकुमार श्रीमंत ॥ रक्तोत्पला ऐसे हात ॥ काय पूजिसी देव्हारां ॥११२॥तुम्हां कोणीं बुद्धि दिधली सांगा ॥ हा सेवक नाहीं आम्हां जोगा ॥ राव म्हणे कर्मभोगा ॥ काय मागुती टाकील ॥११३॥मग म्हणे डोंबालागून ॥ मी सांगितलें काम करीन ॥ दोन भार सुवर्ण ॥ वेंचिलें कीं मजलागीं ॥११४॥पांघरावया पटकुर ॥ हरिश्चंद्रासी देत महार ॥ झाडी आंगण समग्र ॥ केर बाहेर टाकीतसे ॥११५॥रायाहातीं महारीण दळवीत ॥ तरतरां फोड हातासी येत ॥ रक्त असे वाहत ॥ परी न दावी तयांसी ॥११६॥ज्या हातें करोनि दान ॥ केले सुखी पृथ्वीचे ब्राह्मण ॥ त्याचि हातें करून ॥ करी दळण डोंबाघरीं ॥११७॥रायांचे मुकुट समस्त ॥ ज्याचे चरणीं लोळत ॥ तो शिरीं घागर घेत ॥ पाणी वाहत डोबाघरीं ॥११८॥तेज फांके दशदिशांतरीं ॥ ऐसा किरीट ज्याचे शिरीं ॥ पाणी भरूनि घेई घागरी ॥ रात्रंदिवस सर्वदा ॥११९॥विश्वामित्र ते अवसरीं ॥ गुप्त रूपें फोडी घागरी ॥ दुजा घट देत महारी ॥ म्हणे हा तरी सांभाळीं ॥१२०॥तोही फोडूनि टाकीत ॥ राजा थरथरां कांपत ॥ महारीण येऊनि लात ॥ मारी राया हरिश्चंदा ॥१२१॥तिसरी दिली तेहीं फोडिली ॥ डोंबानें आणिक दिधली ॥ चुंबळ शिरींची नीट केली ॥ मनीं ते वेळीं भीतसे ॥१२२॥शिव्या देत महारी ॥ कैंचा हा आणिला घरीं व्यर्थ द्र्व्य निर्धारीं ॥ बुडोनि गेलें आमुचें ॥१२३॥चवथी घागर दिधली ॥ ते मेल्यानें दारवंटां फोडिली ॥ मग महारीण कोपली ॥ मरी ते वेळीं काष्ठदंडें ॥१२४॥आणिक घट दिले ते क्षणीं ॥ मग पाणी भरीत रांजणीं ॥ विश्वामित्रें ते क्षणीं ॥ रांजणा छिद्र पाडिलें ॥१२५॥अवघा वेळ पाणी भरिलें ॥ रांजणांत कांहीं नसे उरलें ॥ डोंब जेवावयाचे वेळे ॥ आला घरासी तेधवां ॥१२६॥डोंब पाणी मागत ॥ तों रिता रांजण खडबडित ॥ केशीं धरोनि नृपनाथ ॥ तांब्या हाणीत डोंब तेव्हां ॥१२७॥वेळ सारा पाणी भरिलें ॥ रांजणीं कांहीं नाहीं उरलें ॥ लांकूड मोळीचें घेतलें ॥ पुढती मारिलें डोंबानें ॥१२८॥म्हणती मांस रांधीं वहिला ॥ राव चुलीपुढें बैसला ॥ अग्नि फुंकितां ते वेळां ॥ जळूनि गेल्या दाढीमिशा ॥१२९॥सूर्य अस्तमाना गेला ॥ कोरडें धान्य देती त्याजला ॥ तें दळून घेऊनि आला ॥ भागीरथीतीरातें ॥१३०॥स्नानसंध्यादि कर्म जाहलें ॥ पिठाचे पानगे भाजले ॥ तयाचे भाग दोन केले ॥ अतिथीचा आणि आपुला ॥१३१॥वेष पालटूनि विश्वामित्र ॥ म्हणे यजमाना भूक फार ॥ ते समयीं अन्न समग्र ॥ जेवी विप्र क्षणमात्रें ॥१३२॥ब्राह्मण म्हणे ते वेळां ॥ उपवास कालचा मजला ॥ अवघें अन्न जेविला ॥ मिटक्या देत तेधवां ॥१३३॥ब्राह्मण सवेंचि गुप्त जाहला ॥ ऐसा एक संवत्सर लोटला ॥ राव पोट बांधूनि ते वेळां ॥ डोंबाघरीं काम करी ॥१३४॥हरिश्चंद्र बहुत रोडला ॥ पंजर अस्थींचा उरला ॥ महारीण म्हणे रोग याला ॥ लागलासे निर्धारें ॥१३५॥येणें आम्हांसी नागविलें ॥ दोन भार सुवर्ण व्यर्थ गेलें ॥ मसण राखावया वहिलें ॥ डोंबें ठेविलें हरिश्वंद्रा ॥१३६॥म्हणे तुवां मसण राखावें ॥ द्रव्याविण प्रेत जाळूं न द्यावें ॥ राव म्हणे बरवें ॥ आज्ञा प्रमाण मजलागीं ॥१३७॥सूर्योदयीं करोनि स्नान ॥ ह्रदयीं आठवी वसिष्ठाचे चरण ॥ राखीत बैसे स्मशान ॥ रात्रंदिवस नृपवर ॥१३८॥हरिश्चंद्र काशीस गेला ॥ मृत्यु नगरींचा खुंटला ॥ महारीण म्हणे आणिला ॥ निर्दैव कैंचा घरासी ॥१३९॥यासी घरास आणिलें ॥ माणूस मरायाचें राहिलें ॥ दुखण्यास कोणी न पडे वहिलें ॥ व्याधिदुःख गेलें गांवांतूनि ॥१४०॥आमुचे हातींचें द्रव्य गेलें ॥ कारटें ब्राह्मण उपवासी मेले ॥ याचें ऋण द्यायाचें होतें भलें ॥ दोन भार सुवर्ण ॥१४१॥इकडे काळकौशिकाचे घरीं ॥ तारामती भावें काम करी ॥ उसंत नसे दिवस रात्रीं ॥ नानापरीम कष्ट करी ॥१४२॥कालकौशिकाचे मुख्य शिष्य ॥ त्यांत असे रोहिदास ॥ ब्राह्मण म्हणे समस्तांस ॥ जावें तुळशी आणावया ॥१४३॥दर्भ समिधा कमळें ॥ आणावया पूजेचे वेळे ॥ वनासी अवघे निघाले ॥ रोहिदासासमवेत ॥१४४॥पुष्पें तुळशी तोडिती ॥ समिधा दर्भ खुडिती ॥ तों सरोवरीं कमळांप्रती ॥ रोहिदासें देखिलें ॥१४५॥विश्वामित्रें तक्षक पाठविला ॥ तो कमळीं जाऊनि बैसला ॥ रोहिदास ते वेळां ॥ कमलें तोडी तांतडीं ॥१४६॥तों अकस्मात दंशला हातास ॥ भयें हांक फोडी रोहिदास ॥ बत्तीसलक्षण बाळ डोळस ॥ मूर्च्छित पडला भूमीवरी ॥१४७॥सकल शिष्य आले धांवोनी ॥ तों रोहिदास पडला धरणीं ॥ बाळें रडती आक्रंदोनी ॥ बा तुझे जननीस काय सांगूं ॥१४८॥रोहिदास म्हणे बाळांसी ॥ माता राहवीत होती भोजनासी ॥ मी तैसाचि आलों वनासी ॥ सत्वर येतों म्हणोनियां ॥१४९॥तुम्ही जाल आतां घरास ॥ माता पुसेल कोठें रोहिदास ॥ तरी माझा नमस्कार मातेस ॥ जाऊनियां सांगा हो ॥१५०॥तीस शोक करूं न द्यावा कांहीं ॥ म्यां तिची सेवा केली नाहीं ॥ तों झेंडू आला ते समयीं ॥ प्राण सोडिला रोहिदासें ॥१५१॥बाळें रडत आलीं घरासी ॥ समाचार सांगती मातेसी ॥ येरी मूर्च्छित धरणीसी ॥ पडली कल्पान्त ओढवला ॥१५२॥उठोनि आक्रंदे तारामती ॥ पहा कैसी कर्माची गती ॥ माझें एक बाळ निश्चिती ॥ काळें नेलें हिरोनियां ॥१५३॥माझी आंधळ्याची काठी ॥ अडकली जाऊनि कवणे बेटीं ॥ मज दरिद्याची गांठी ॥ कोणें सोडिली निर्दयें ॥१५४॥मज दुबळीचें अन्न किंचित ॥ कोणीं नेलें हातोहात ॥ माझा कल्पवृक्ष निश्चित ॥ कोण्या निर्दयें उपटिला ॥१५५॥राजहंस माझा रोहिदास ॥ काळें त्यावरी घातला पाश ॥ मग म्हणे त्या बाळकांस ॥ कोठें रोहिदास टाकिला रे ॥१५६॥त्यास स्नानासी उदक ठेविलें ॥ बाळक माझें असेल भुकेलें ॥ कोणे वनीं टाकिलें ॥ काय बोलिलें तें सांगा ॥१५७॥मी काम करितां आसमास ॥ म्हणे माते तूं भागलीस ॥ मज क्षणभरी म्हणे बैस ॥ रगडितों पाय तुझे मी ॥१५८॥उठती पोटीं उमाळे प्रबळ ॥ भळभळां नेत्रीं वाहे जळ ॥ म्हणे मज पापिणीस ऐसा बाळ ॥ जिरेल कोठूनि सांग पां ॥१५९॥म्यां पूर्वीं ईश्वर पूजिला ॥ व्रत जप तप नेम चालविला ॥ पूर्ण न करितां मध्येंचि टाकिला ॥ म्हणोनि गेला रोहिदास ॥१६०॥मीं केला पंक्तिभेद ॥ कीं केला हरिकथेचा उच्छेद ॥ किंवा साधुसंतांसी कुशब्द ॥ नेणतपणें बोलिलें मी ॥१६१॥कीं केला परद्रव्या भिलाष ॥ कीं भजलें नाहीं हरिहरांस ॥ कीं कोणाचे मुखींचा ग्रास ॥ काढूनियां म्यां नेला ॥१६२॥कीं गुरुद्रोह केला सबळ ॥ कीं हें गुरुनिंदेचें फळ ॥ कीं पात्रावरूनि ब्राह्मण तत्काळ ॥ उठवूनियां दवडिला ॥१६३॥कीं यतीश्वर आला ॥ भिक्षा ॥ न देतां दवडिला ॥ कीं म्यां विघड पाडिला ॥ कुरंगिणीपाडसांत ॥१६४॥कीं हरिहरचरित्रें उच्छेदिलीं ॥ कीं वेदशास्त्रपुराणें निंदिलीं ॥ मातापुत्रां तुटी पाडिली ॥ विघ्न केलें परांला ॥१६५॥जळत ह्रदया भीतरीं ॥ परी विप्र कोपेल घरीं ॥ म्हणोनि पुढती काम करी ॥ मध्यरात्र जाहली ॥१६६॥समस्तांचीं भोजनें जाहलीं ॥ घरींचीं अवघीं निजेलीं ॥ हांक फोडीत चालिली ॥ रोहिदासा म्हणोनियां ॥१६७॥राजसा कोठें पडलासी ॥ कां रे पाडसा ओ न देसी ॥ मज माते म्हणोनि न बोलसी ॥ गति कैसी तुज जाहली ॥१६८॥बा रे तूं भेट मजला ॥ मी येऊनि चुंबीन तुजला ॥ पक्ष्यांस वृक्षीं गहिंवर आला ॥ शोक ऐकोनि तियेचा ॥१६९॥बा रे माझिया डोळसा ॥ सख्या ओ दे रे पाडसा ॥ कोठें आहेसी राजहंसा ॥ रोहिदासा सुकुमारा ॥१७०॥बा रे तूं निष्ठावंत बालक ॥ न पिशी पोईचें उदक ॥ अंतरला अयोध्यानायक ॥ हरिश्चंद्र तुजलागीं ॥१७१॥चहूंकडे वनीं धांवत ॥ झाडें कपाळा आदळत ॥ घडिघडी अडखखळोन पडत ॥ अशुद्ध वाहत न कळे तीतें ॥१७२॥सरोवरीं जें होतें प्रेत ॥ तें विश्वामित्र पुढें टाकीत ॥ सतीचे पायां लागत ॥ येरी पाहे चांचपूनि ॥१७३॥पुत्राचें शव ओळखिलें ॥ मग निढळा निढळ मेळविलें ॥ म्हणे बार रे मज नाहीं पुसिलें ॥ केलें तुवां गमन परदेशीं ॥१७४॥सूर्यवंशमुकुटमणी ॥ बोल कांहीं मजशीं वाणी ॥ तूं अयोध्यापतीचा पुत्र वनीं ॥ परदेशी होऊनि पडिलासी ॥१७५॥मग आडवें घेतलें प्रेत ॥ पान्हा स्तनीं दरदरां फुटत ॥ मुखीं तयाचे स्तन घालीत ॥ ह्रदयीं धरीत द्दढ त्यासी ॥१७६॥मग आणिक रुप पालटोनी ॥ विश्वामित्र पुढें येऊनी ॥ म्हणे तूं कोण या वनीं ॥ रडतेसी आक्रोशें ॥१७७॥ती म्हणे ऐक द्विजा ॥ सर्पें दंशिला पुत्र माझा ॥ जो हरिश्चंद्र महाराजा ॥ त्याचा पुत्र असे हा ॥१७८॥ब्राह्मण म्हणे आतांचि रात्रीं ॥ लवकरी ॥ जाळीं याप्रती ॥ सूर्योदयीं डोंब येती ॥ जाळूं न देती तुजलागीं ॥१७९॥प्रेत उचलोनि त्या अवसरा ॥ येता जाहला जान्हवीतीरा ॥ काष्ठें अग्नि सत्वरा ॥ घेऊनि आला आपण ॥१८०॥पुत्र घातला सरणांत ॥ म्हणे तूं रोदन न करीं येथ ॥ पैल तो मसण रक्षीत ॥ आलिया जाळूं न देचि ॥१८१॥ब्राह्मण तेथें गुप्त जाहला ॥ तारामतीनें आकान्त मांडिला ॥ कोल्हाळ हरिश्चंद्रें ऐकिला ॥ जाळ देखिला मसणांत ॥१८२॥धांवोनि आला तिजपाशीं ॥ केशीं धरोनि ओढिलें तिजसी ॥ मज न पुसतां जाळिसी ॥ कां गे न देसी द्रव्य तें ॥१८३॥तीस रागें दिधली लात ॥ उदक घालूनि सरण विझवीत ॥ काष्ठें चहूंकडे टाकीत ॥ बाहेरी प्रेत काढिलें ॥१८४॥सतीपुढें प्रेत टाकिलें ॥ केश जळोनि अंग भाजलें ॥ सर्वांगासी फोड आले ॥ बीभत्स पडलें लेंकरूं ॥१८५॥मग म्हणे तारामती ॥ पहा कर्माची कैसी गती ॥ सर्पदंशें मरण अवगती ॥ अन्ययाति स्पर्शला कीं ॥१८६॥अग्निसंस्कार न होतां पुरता ॥ बाहेर ओढूनि काढिलें प्रेता ॥ या हरिश्चंद्राच्या सुता ॥ गति तत्त्वतां ऐसी हे ॥१८७॥सूर्यवंश मावळला ॥ राव हरिश्चंद्र काय जाहला ॥ माझा प्राण कां उरला ॥ काय डोळां पहावें हें ॥१८८॥हें ऐकतां उत्तर ॥ येऊनि पुसे हरिश्चंद्र ॥ सांग तूं कोणाची सुकुमार ॥ जाळिशी पुत्र कवणाचा ॥१८९॥येरी म्हणे कां पुससी व्यर्थ ॥ माझें कर्म बळिवंत ॥ अग्निसंस्कार निश्चित ॥ पुरता नाहीं बाळकासी ॥१९०॥मग तो बोले राजेंद्रा ॥ तुझा कोण गे भ्रतार ॥ सत्य सांग तुज आण साचार ॥ श्रीविश्वेश्वराची ॥१९१॥तारामती बोले ते क्षणीं ॥ मी राया हरिश्चंद्राची राणी ॥ सर्पें पुत्र दंशिला वनीं ॥ अग्नि देऊं त्यासी आलें ॥१९२॥ऐसें हरिश्चंद्रें ऐकूनी ॥ वक्षःस्थल घेत बडवूनी ॥ मूर्च्छागत पडे धरणीं ॥ मस्तक अवनीं आपटीत ॥१९३॥मग म्हणे तारामती ॥ तूं कोण सांग मजप्रती ॥ येरू म्हणे मी चक्रवर्ती ॥ अयोध्येचा हरिश्चंद्र ॥१९४॥मग म्हणे महासती ॥ त्याची सरी इंद्र चंद्र न पावती ॥ तो केवळ मदनमूर्ती ॥ तेजें गभस्ति तैसा तो ॥१९५॥त्याचें नाम घेतां प्रातःकाळीं ॥ सकळ पापां होय धुळी ॥ येरू म्हणे तोचि मी ये स्थळीं ॥ दास्य करितों डोबाचें ॥१९६॥कालकौशिकें तुज घेतलें ॥ म्यां डोबाघरीं दास्य केलें ॥ एक वर्ष लोटलें ॥ अन्न नाहीं मजलागीं ॥१९७॥ऐकतां ऐसी खूण ॥ एकमेकांचे गळां पडोन ॥ शोक केला दारूण ॥ तो सांगतां ह्रदय फुटे ॥१९८॥घेऊनि रोहिदासाचें मडें ॥ हरिश्चंद्र आक्रोशें रडे ॥ अहा बाळ माझें बापुडें ॥ होऊनि पडिलें ये स्थळीं ॥१९९॥अरे सूर्यवंशीं पडिला अंधकार ॥ गेला रोहिदासा ऐसा कुमार ॥ उचंबळला शोकसागर ॥ नसे पार तयासी ॥२००॥हरिश्चंद्र म्हणे तारामतीसी ॥ मी पुसोनि येतों आपुल्या धन्यासी ॥ आज्ञा घेऊनि यासी ॥ दहन करूं मग तेथें ॥२०१॥राजा गेला डोंबाचे घरासी ॥ विश्वामित्र आला तिजपाशीं ॥ तुजला ग्रासील विवशी ॥ जाईं वेगें येथूनि ॥२०२॥तुझा भ्रतार ये तोंवरी ॥ बैसें या देवळा भीतरी ॥ मग प्रेत घेऊनि सुंदरी ॥ देवालयांत बैसत ॥२०३॥तीस दुःअख निद्रेनें व्यापिलें ॥ विप्रें प्रेताचें पोट फोडिलें ॥ आंतडीं काढूनि ते वेळे ॥ मुखीं लावी सतीच्या ॥२०४॥देवालयांत मांस विखूरलें ॥ हात पाय चहूंकडे टाकिले ॥ रक्त तिच्या मुखासी माखिलें ॥ बाहेरी आला आपण ॥२०५॥विप्र करी शंखध्वनी ॥ लांव बाळ खाते म्हणोनी ॥ तों सरली रजनी ॥ लोक धांवोनि आले तेथें ॥२०६॥वेशींत होते महार ॥ त्यांसी हांक फोडी विश्वामित्र ॥ अरे तुम्हांसी लांव खाईल निर्धार ॥ कुळ तुमचें उरेना ॥२०७॥माझे पाठीस होती लागली ॥ म्यां भयानें हांक फोडिली ॥ पळोनि आलों तुम्हांजवळी ॥ मग ती गेली देवळांत ॥२०८॥देवालयांत ती जों आहे ॥ तों मारावी लवलाहें ॥ मग पुढें हाता न ये ॥ बाहेर गेल्या कोणासी ॥२०९॥तुम्हां देखूनि आंत गेली ॥ दिवटी नेऊनि धरा वहिली ॥ मज ग्रासिती ये काळीं ॥ परी वांचलों तुमचेनें ॥२१०॥मग महार तेथें आले ॥ बळकट ते आंत गेले ॥ तीस केशीं धरोनि ओढिलें ॥ प्रेत बांधिले तिचे गळां ॥२११॥माघारे हात बांधोनी ॥ सोटे मारिती ते क्षणीं ॥ तें दुःख सांगतां धरणी ॥ उकलूं पाहे सत्वर ॥२१२॥डोळे तियेचे बांधिले ॥ राजद्वारीं घेऊनि आले ॥ लोक बिदोबिदीं पळूं लागले ॥ लांव आली म्हणोनि ॥२१३॥लेंकुरें घेऊनि घरांत पळती ॥ कित्येक कपाटें ढांकिती ॥ धीट ते जवळी जाती ॥ पाहावया लांवेसी ॥२१४॥एक म्हणती कौशिकगृहीं ॥ ही होती कळलें नाहीं ॥ आतां खाईल सर्वही ॥ मनुष्यमात्र उरेना ॥२१५॥परवां दोघे ब्राह्नण मेले ॥ ते इणेंचि खादले ॥ ईस ठेवितां नोहे भलें ॥ जिवें मारा आतांचि ॥२१६॥मग वीरबाहु महार ॥ पाचारिला सत्वर ॥ म्हणती या लांवेचा संहार ॥ करीं बाहेर नेऊनि ॥२१७॥मग डोंबानें केशीं धरोनी ॥ बाहेर आणिली ओढूनी ॥ हरिश्चंद्रासी बोलावूनी ॥ म्हणे मारूनि टाकीं इयेतें ॥२१८॥येरू म्हणे आज्ञा प्रमाण ॥ ओळखिलें तारामतीनिधान ॥ तिचे हातीं करविलें स्नान ॥ भागीरथीचें ते वेळीं ॥२१९॥स्नान करूनि बाहेर आली ॥ ह्रदयीं चिंतिला वनमाळी ॥ मान नीट करी वहिली ॥ येते पुशिली शस्त्रधारा ॥२२०॥तारामती म्हणे तेधवां ॥ जय जय विश्वनाथा सदाशिवा ॥ हरिश्चंद्राऐसा पति व्हावा ॥ जन्मोजन्मीं मजलागीं ॥२२१॥ रोहिदासा ऐसा सुत ॥ वसिष्ठा ऐसा गुरुनाथ ॥ विश्वामित्रा ऐसा मागता ॥ सत्य ॥ असो पैं जन्मोजन्मीं ॥२२२॥जय जगन्निवास नारायण ॥ म्हणोनि नीट केली मान ॥ म्हणे आतां वेगें हाण ॥ एका घायेंकरोनी ॥२२३॥घयासी उचलिला कार ॥ तों भक्तकृपाळु सर्वेश्वर ॥ वैकुंठाहूनि श्रीधर ॥ एकाएकीं धांवला ॥२२४॥हो हो रे म्हणोनि ते वेळां ॥ जगन्निवासें करें धरिला ॥ चहूं भुजांनीं आलिंगिला ॥ हरिश्चंद्र भगवंतें ॥२२५॥चार्ही भुजा दिव्य सरळ ॥ वदन सुहास्य तमालनीळ ॥ वैजयंती आपादमाळ ॥ ह्रदयीं कौस्तुभ झळकतसें ॥२२६॥हरिश्चंद्राराजाचें कंठीं ॥ जगन्निवासें घातली मिठी ॥ रोहिदास अमृतद्दष्टीं ॥ उठविला भगवंतें ॥२२७॥तारामतीस ह्रदयीं धरीत ॥ म्हणे पतिव्रताशिरोमणि तूं सत्य ॥ विमानीं सुर समस्त ॥ पाहों आले तेधवां ॥२२८॥शिव भवानी समवेत ॥ इंद्र आला शचीसहित ॥ सत्यलोकेशा सावित्री त्वरित ॥ पाहों आले तयांसी ॥२२९॥आले सकळ ऋषीश्वर ॥ वाराणसीचे नारी नर ॥ पूर्णज्ञानाचा सागर ॥ वसिष्ठा सत्वर धांवला ॥२३०॥विश्वामित्रें रूप प्रकट केलें ॥ हरिश्चंद्रासी ह्रदयीं धरिलें ॥ तारामतीस आलिंगिलें ॥ कडे घेतलें रोहिदासा ॥२३१॥धन्य तुमचें सत्त्व पूर्ण ॥ केलें सूर्यवंशाचें उद्धरण ॥ शोधितां हें त्रिभुवन ॥ उपमा नसे तुम्हांतें ॥२३२॥विश्वामित्रें कोटिवर्षें तप केलें ॥ तें श्रेय हरिश्चंद्रा दिधलें ॥ म्हणे तुझ्या पित्यासी उद्धरिलें ॥ तुज अर्पिलें तें पुण्य ॥२३३॥जाहला एकचि जयजयकार ॥ धडकत वाद्यांचा गजर ॥ पुष्पवृष्टि सुरवर ॥ वारंवार करिताती ॥२३४॥लक्ष्मी सावित्री पार्वती ॥ तारामतीस भेटती ॥ अक्षय वरदान देती ॥ संतोषोनि तयांसी ॥२३५॥वसिष्ठासी देखोन ॥ हरिश्चंद्रें केलें साष्टांग नमन वसिष्ठ दाटला प्रेमेंकरून ॥ म्हणे धन्य राजेंद्रा ॥२३६॥आला वीरबाहु महार ॥ केला तयाचा उद्धार ॥ पावोनि दिव्य शरीर ॥ स्वर्गाप्रति तो गेला ॥२३७॥कालकौशिक ब्राह्मण ॥ धरी तारामतीचे चरण ॥ म्हणे माते तुझें दर्शन ॥ घेतां पाप नुरेचि ॥२३८॥विश्वामित्रें हरिश्चंद्रासी ॥ गजरें आणिलें अयोध्येसी ॥ लोक धांवती भेटावयासी ॥ आनंद आकाशीं न समाये ॥२३९॥दोघें स्थापूनि सिंहासनीं ॥ आपुलें हातें शेंस भरोनी ॥ रोहिदासास पुढें बैसवूनी \। अभिषोकिलें रायातें ॥२४०॥हरिश्वंद्रावरी धरिलें छत्र ॥ आज्ञा मागोनि विश्वामित्र ॥ बद्रिकाश्रमीं सत्वर ॥ गेला तेव्हां तपातें ॥२४१॥ साठसहसहस्त्र वर्षेंवरी ॥ हरिश्चंद्र अयोध्येचें राज्य करी ॥ मग रोहिदास त्यावरी ॥ सिंहासनीं स्थापिला ॥२४२॥सकळ अयोध्यानगर ॥ विमानीं बैसवी हरिश्चंद्र ॥ करूनि सकळांचा उद्धार ॥ घेऊनि गेला वैकुंठीं ॥२४३॥यापरी अयोध्या उद्धरिली ॥ क्षणें वैकुंठासी नेली ॥ हरिश्चंद्रें कीर्ति केली ॥ ऐकतां जळती सकल पापें ॥२४४॥ही कथा करितां श्रवण ॥ त्यांसी लाभे जय कल्याण ॥ अंतीं पावती वैकुंठ भुवन ॥ सत्य वचन व्यासाचें ॥२४५॥हे कथा अति सुरस ॥ धर्मासी सांगे लोमश ॥ युधिष्ठिरा तूंही विशेष ॥ सत्त्वधीर तैसाचि ॥२४६॥पुढें कथा गोड गहन ॥। घोषयात्रे जाती कौरव दुर्जन ॥ तेथें गंधर्व नेतील धरून ॥ पाकशा सनाचे आज्ञेनें ॥२४७॥पांडवप्रताप नंदनवन ॥ कल्पवृक्ष हरिश्चंद्रोपाख्यान ॥ सप्रेम भक्त पंडितजन ॥ श्रवण करोत सर्वदा ॥२४८॥संतश्रोतयांसी नमस्कार ॥ साष्टांगें घाली श्रीधर ॥ ब्रह्मानंदें होऊनि निर्भर ॥ हें चरित्र परिसावें ॥२४९॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ तिसाव्यांत कथियेला ॥२५०॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे त्रिंशत्तमाध्यायः ॥३०॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP