महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक १०१ ते १०६

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


अवज्ञातं सदद्वैतं नि:शंकैरन्यवादिभि: ॥
एवं का क्षतिरस्माकं तद्द्वैतमवजानताम् ॥१०१॥

वेद युक्ति विचार प्रमाणें ॥ जें सिद्ध जाहलें तें न मानणें ॥
तया मूर्खाशीं वाद करणें ॥ नको आतां ॥४५७॥
तयांच्या त्या द्वैतपर मती ॥ उपेक्षण्या काय आहे आम्हां क्षिती ॥
ते जैसे कां आम्हा, मानिती ॥ तैसेची आम्हीं तयां ॥४५८॥
तयांचें तें द्वैत ॥ असो चिरायु स्थापित ॥
तेणें कांहींच बाध न येत ॥ अद्वैत सिद्धांती ॥४५९॥

द्वैतावज्ञा सुस्थिता चेदद्वैते धी: स्थीरा भवेत् ॥
स्थैर्ये तस्या: पुमानेष जीवन्मुक्त इतीर्यते ॥१०२॥

वादी द्वैतवादी अद्वैत अनादरती ॥ अद्वैत वादी द्वैता उपेक्षती ॥
येणें काय फल प्राप्ती ॥ उभयतां असे ॥४६०॥
सि० - अद्वैत सिद्धांत उपेक्षितां ॥ जन्ममरणाच्या भोगाव्या व्यथा ॥
देहीं कधीं ही सुखाची वार्ता ॥ नायकावी ॥४६१॥
तैसें नाहीं द्वैत उपेक्षितां ॥ अद्वैतीं मती होय स्थिरता ॥
यांच देहीं लाभें जीवन्मुक्तता ॥ जन्ममृत्यु चुके ॥४६२॥
हें आमुचेंचि नोहे मत ॥ ऐसा बोलिला भगवंत ॥
द्वितीयाध्यायीं अर्जुनाप्रत ॥ गीते माजीं ॥४६३॥

एषा ब्राम्ही स्थिति: पार्थ नैनां प्राप्य विमुहयति ॥
स्थित्वाऽस्यामंतकालेऽपि ब्रम्हा निर्वाणमृच्छति ॥१०३॥

अर्जुना ऐशा हया ब्रम्हास्थिती ॥ जयाची बुद्धि होय स्थिर निश्चिती ॥
तया व्यामोहादि न बाधिती ॥ कवणे ही काळीं ॥४६४॥
तो देहीं असतां जिवन्मुक्ति ॥ अंतीं ब्रम्हापदाची होय प्राप्ति ॥
जन्ममरणाचें पुनरावृत्ति ॥ कधीं ही नये ॥४६५॥
ऐसें बोलियले भगवान ॥ हें काय फळ होय सान ॥
म्हणोनि द्वैत बुद्धि उपेक्षून ॥ अद्वैतीं स्थिरावी ॥४६६॥

सदद्वैतेऽनृतद्वैते यदन्योन्यैक्यवीक्षणम् ॥
तस्यांतकालस्तद्भेदबुद्धिरेव न चेतर: ॥१०४॥

यद्वांऽतकाल: प्राणस्य वियोगोऽस्तु प्रसिद्धित: ॥
तस्मिन् कालेऽपि न भ्रांतैर्गताया: पुनरागम: ॥१०५॥

नीरोग उपविष्टो वा रुग्णोवा विलुठन् भुवि ॥
मूर्च्छितो वा त्यजत्वेष प्राणान् भ्रांतिर्न सर्वथा ॥१०६॥

सत् अद्वैत असत् द्वैत ॥ हया दोहींचें मिश्रण झालें जगांत ॥
तेणें प्राणी झालें भ्रांत ॥ सतासतीं ॥४६७॥
वास्तवीक मिश्रण नाहीं झालें ॥ परि तें बुद्धिमोहें घेतलें ॥
तें या विवेकें दूर जाहलें ॥ भूतपंचकाच्या ॥४६८॥
मोहबुद्धिचा अंत झाला ॥ तोचि अंतकाल म्हणियला ॥
तईंच ब्रम्हाप्राप्ति जिवाला ॥ होत असे ॥४६९॥
अथवा अंतकाळ शब्दानें ॥ प्राण वियोग जरी समजणें ॥
तरी ही उठलें भ्रमाचें ठाणें ॥ नये परतोनी ॥४७०॥
जया अद्वैत सिद्धांत ठसला ॥ तो प्राणी तेव्हांचि मुक्त झाला ॥
तया या मायामोहाचा घोंटाळा ॥ कधींही न बावे ॥४७१॥
तो रोगी असो का निरोगी ॥ भोगी असो का अत्यंत त्यागी ॥
तयासी कोण्याही प्रसंगीं ॥ भ्रम न शिवे ॥४७२॥
तो बसला असो कां निजला ॥ नाना व्यथें लोळत पडला ॥
कां प्राणोत्क्रमणीं मूर्छित झाला ॥ तरी ही मुक्त ॥४७३॥
हा ! हा ! धन्य तयाचें निधन ॥ विस्मृतींत ही ब्रम्हापरिपूर्ण ॥
तया अंतकाळींची व्यथा दारुण ॥ कैची बाधे ॥४७४॥
अरे जयाची नामें स्मरतां ॥ न बाधे भवभय व्यथा ॥
तया मुक्ताची अवस्था ॥ कोण वर्णी ॥४७५॥
जयाचें निखळ ज्ञान ॥ सदां अखंड समाधान ॥
देखोनी भयें घेतलें रान ॥ मोहादिकीं ॥४७६॥
तीं परतोनी कधीच न येती ॥ काय तम करी सूर्यागृहीं वस्ती ॥
नाना पूर्ण प्रबोधीं स्वप्न भ्रांति ॥ माळ घाली ? ॥४७७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP