मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
उन्हाळ्यासाठीं पाणी न ठेव...

राम गणेश गडकरी - उन्हाळ्यासाठीं पाणी न ठेव...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


उन्हाळ्यासाठीं पाणी न ठेवून । नदी वेगें जातां पळून ।

भक्कम दगडांचें धरण बांधून । तिला अडवितां येतसे. ॥१॥

अगदीं आपला नेम धरुन । तोफ सुटतां धडधडून ।

हळुच बाजूला सरुन । मारा चुकवितां येतसे. ॥२॥

अंतराळीं कडकडून । वीज घरावरि पडतां तुटून ।

उंच खांबांत बांधून । पाताळीं सोडितां येतसे. ॥३॥

सावकारांनीं वैर धरुन । जप्‍ती आणितां दावा करुन ।

मागील बाकी देऊन । तिला उठवितां येतसे. ॥४॥

अगदीं नीट रोंख धरुन । म्हैस मार्गीं येतां धांवून ।

एकदम छत्री उघडून । तिला पळवितां येतसे. ॥५॥

जुन्यानव्याची चोरी करुन । भिकार कवि येतां कविता घेऊन ।

कशी तरी एकदां वाचून । त्रास चुकवितां येतसे. ॥६॥

सर्वांस उपाय येत दिसून । परि एका गोष्टीस आहे न्यून ।

तोंडाळ बायको कडकडून । येतां, काय करावें ? ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP