मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
कांहीं गोड फुलें सदा विहर...

राम गणेश गडकरी - कांहीं गोड फुलें सदा विहर...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


कांहीं गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,

कांहीं ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;

कांहीं जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,

एकादें फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,

कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;

कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,

एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,

स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;

सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,

एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,

एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी

पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,

देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP