मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥४९॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४९॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥४९॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमदानंदाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय देवा सद्गुरुनाथा । तूं सर्वजनांसी आश्रयदाता । म्हणोनि धांवलों चरणीं ताता । हरपली सर्व चिंता पैं ॥१॥ तुझे चरण धरितां दृढतर । नाहीं भय त्या कवणही थोर । अगाध महिमा तुझा अपार । बोलतां वाचा शिणली बहू ॥२॥ मी असें अज्ञ पामर । महिमा वर्णन करवेना सत्वर । तूंचि हृदयीं बैसोनि विचार । देईं दयाळा बा देवा ॥३॥ तुझी कृपा नसतां निश्चयें । कवणही कार्य ना होय पाहें । म्हणोनि देवा धांवूनि तूं ये । उशीर न करीं ये समयीं ॥४॥'तूं मी एक' ऐसा भाव । झालियाविण कृपेसी ठाव । न मिळे निश्चयें सर्वथैव । म्हणोनि चरणीं लागतों मी ॥५॥ ऐशी माझी प्रार्थना ऐकुनी । संशय येईल श्रोत्यांच्या मनीं । कीं गुरुकृपा झालियावांचुनी । एकरूपभाव ये कैसा ॥६॥ तुम्ही म्हणतां गुरु - शिष्य एक । ऐसा निश्चय न होतां देख । गुरुकृपा न होय निश्चयात्मक । ऐसें श्रोते पुसतील ॥७॥ तरी ऐका सावधान । स्थिर करोनि आपुलें मन । कीं सद्गुरुकृपेची खूण । अनिर्वाच्य म्हणोनियां ॥८॥ जेथें उगवला वासरमणि । तेथें अंधार न राहे धरणीं । तैसी गुरुकृपा होतांक्षणीं । अज्ञान जाय सारें हें ॥९॥ज्याचें अज्ञान जाय सर्व । त्यासी गुरु - शिष्य - एकरूपभाव । सहजचि आंगीं बाणे अपूर्व । क्षणमात्रें जाण निश्चयेंसीं ॥१०॥ परी गुरुभक्ती असावी दृढतर । कीं 'सद्गुरु आणि मी एकरूप निर्धार' । ऐसी भावना वाढवावी निरंतर । विचारेंकरोनी हृदयींच हो ॥११॥ विचार करितां वारंवार । दृढता होय चित्तीं सत्वर । मग कृपेसी काय उशीर । होईल सांगा हो तुम्ही ॥१२॥ म्हणोनि आधीं सद्गुरुमूर्ति । धरावी सदा आपुल्या चित्तीं । तेव्हां येईल विचारस्फूर्ति । एकरूप भावनेची ॥१३॥मग भावना होतां दृढतर । सहजचि कृपा करी गुरुवर । मागावें नलगे, कष्ट ना थोर । सत्य सत्य त्रिवाचा ॥१४॥ गुरुकृपा झालियावांचुनी । अपरोक्षज्ञान न पावे कोणी । परी आधीं घ्यावें समजोनी । परोक्षज्ञानें घडीघडी तें ॥१५॥ गुरुचरणीं धरितां विश्वास । परोक्षज्ञान ये हातास । परोक्षज्ञान म्हणिजे तुम्हांस । सांगूं आतां गुरुकृपेंचि ॥१६॥ सद्गुरुमुखें करितां श्रवण । 'मी ब्रह्म' ऐसें बाणे पूर्ण । तेव्हां कळे मी हा कोण । कोटूनि आलों हें सारें ॥१७॥ तोंवरी मी हा देहचि सुंदर । समजुनी सजवी प्रेमपुरःसर । विषय सत्य मानुनी परिकर । होय रममाण त्यामाजीं ॥१८॥ जेव्हां सद्गुरु-उपदेश होय । वेदांतरहस्य कळों येय । तेंचि परोक्षज्ञान चिन्मय । ठसे पूर्ण हृदयांतरीं ॥१९॥ परी न होय अपरोक्षज्ञान । सद्गुरुकृपा झालियाविण । म्हणोनि सद्गुरु, मी एकचि समजोन । झिजवावें मन त्यामाजीं ॥२०॥ तेव्हां होईल सहजची कृपा । चुकवी जन्ममरणखेपा । यावरी नका धरूं कोपा । श्रोते सज्जन तुम्ही हो ॥२१॥ कीं श्रीसद्गुरूंसी जो न भजे । त्यावरी कृपा न करिती जे । तैसियां, सद्गुरु म्हणतां न साजे । भेद दिसे त्यांठायीं ॥२२॥ ऐशी शंका श्रोत्यांस येतां । उत्तर ऐका त्याचें आतां । भेद नाहीं त्यांच्या चित्ता । अणुभरीही निश्र्चयेंसीं ॥२३॥ मातेसी जैशीं आपुलीं बालकें । सर्वां समान ती त्यां देखे । तैसे श्रीगुरूंसी सर्व सारिखे । राजा रंक सारे पैं ॥२४॥ अणुभरी अभिमान नाहीं मनीं । मी - तूंपणाचे भेद दोन्ही । गेले त्यांचे हरपोनी । केवळ ब्रह्मचि ते बघती ॥२५॥ असो, मग गुरुकृपा होतां । अपरोक्षज्ञान होय तत्त्वतां । अपरोक्ष म्हणिजे काय हें आतां । परिसा भाविक श्रोते हो ॥२६॥ अपरोक्ष म्हणिजे निजस्वरूपाचा । अनुभव यावा प्रत्यक्ष त्याचा । कीं मी असें परिपूर्ण साचा । भरलों व्यापक सर्वांतरीं ॥२७॥आणिक ऐका दृष्टांतासहित । साखर गोड रुचिकर बहुत । ऐसें कुणीतरी सांगतां आपुल्याप्रत । विश्वास उपजे निजमनीं ॥२८॥ ऐकुनि साखरेचें वर्णन । ध्यास लागे हृदयीं जाण । तीचि आठवे रात्रंदिन । जेणें ऐकिलें त्यासी पैं ॥२९॥ ऐशा वर्णनाच्या ध्यासें । अनुमानें मानसीं साखर दिसे । परी प्रत्यक्ष ऐशीच असे । याचा अनुभव ना येत ॥३०॥ आणि तियेची रुची कैसी । तीही न कळे आपुल्या जिव्हेसी । अनुमानेंचि माने मानसीं । अमुक रुचि म्हणोनियां ॥३१॥अपरोक्ष म्हणिजे त्याचा स्वाद । चाखोनि बघतां अनुभव प्रसिद्ध । तद्वत् प्रत्यक्ष अनुभवासी वेद । म्हणती अपरोक्षज्ञान पहा ॥३२॥ तें व्हावया गुरुकृपेविण । सारीं साधनें निष्फळ जाण । देह झिजविला रात्रंदिन । तरीही न होय ज्ञान पहा ॥३३॥ त्यांच्या कृपेसी व्हावया पात्र । उपासना करावी अहोरात्र । तेव्हांचि होय परम पवित्र । अपरोक्षज्ञान तत्काळ ॥३४॥म्हणोनि आधीं उपासना । करावी गुरुभक्ति हेचि जाणा । झिजवावें त्यांतचि आपुल्या मना । न विसंबतां क्षण एक ॥३५॥ एवं गुरुभक्ति हेंचि एक । साधन मुख्य निश्चयात्मक । तया पोटीं साधनें सकळिक । असती निश्र्चयें जाणा हो ॥३६॥ म्हणोनि गुरुप्रेम हेंचि एक । अपरोक्षज्ञाना पाववी देख । पुढें बोलूं विवरण सुरेख । श्रीगुरुकृपेंचि अणुमात्र ॥३७॥ मागील अध्यायीं केलें निरूपण । श्रीस्वामी आनंदाश्रम सघन । होतां पहा गुरुस्थानापन्न । संन्यासधर्म पाळिती ॥३८॥अंगीं आलीं साधनें चारी । परी सद्गुरुसंग नसतां अंतरीं । कवणा विचारूं सन्मार्ग ये अवसरीं । म्हणोनि आळविती गुरुनाथा ॥३९॥ ऐसें मागील अध्यायीं कथिलें । आतां ऐका पुढती ये वेळे । कैसें वैराग्य तें कडक भलें । काय करिती तें ऐका ॥४०॥ लागला सद्गुरुचरणीं ध्यास । आळविती तयासी रात्रंदिवस । म्हणे देवा उद्धरीं दास । भक्तवत्सला करुणाकरा ॥४१॥जय जय देवा सद्गुरुनाथा । तुजवांचोनि नाहीं त्राता । तूंचि देईं या मम चित्ता । स्थिरता शीघ्र दयाळा ॥४२॥ कुठें जाऊं कवणा विचारूं । कैसा होऊं यांतूनि पारु । कोण सांगेल मजला विचारु । आतां आत्मज्ञानाचा ॥४३॥ हें मठाचें बंधन मजला । परमार्थ करूं नेदी आपुला । कासया मीं संन्यास घेतला । आयुष्य व्यर्थचि जात असे ॥४४॥ तुझा संग नाहीं घडला । आत्मविचार कराया मजला । उपदेशमात्र अवचित जाहला । पूर्वपुण्येंकरोनी ॥४५॥ हे गुरुनाथा तुझी सेवा । नाहीं घडली अणुमात्र या जीवा । आतां काय करूं देवा । प्रभो सद्गुरो दयाळा ॥४६॥धांव धांव श्रीसद्गुरुमाये । काय उपाय सांगा झणीं ये । नको बंधन मजलागीं हें । मठाचें निश्चयें ये समयीं ॥४७॥ प्रपंचबंधन नको म्हणोनि । साधक घेती संन्यास या जनीं । परी आम्हां मठस्थ - स्वामींलागोनि । अधिकचि बंधन हें सारें ॥४८॥ गृहस्थासी आपुलाचि एक । प्रपंच सांवरितां कष्ट अनेक । विश्रांती मनासी न मिळे देख । कंटाळे बहुत तो बापा ॥४९॥ आमुच्या शिरीं सर्व जनांचा । भार असे सर्वही साचा । यांतचि जन्म जाय आमुचा । न घडे परमार्थ अणुमात्र ॥५०॥ नको नको सर्वथा पसारा । चित्तासी न मिळे अणुमात्र थारा । तेव्हां काय करावें गुरुवरा । दावीं मार्ग परमार्थाचा ॥५१॥ ऐसें आळविती नानापरी । अश्रु वाहती घळघळ नेत्रीं । श्रीसद्गुरूंसी हृदयांतरीं । ध्याती घडीघडी प्रेमानें ॥५२॥ आणि म्हणती सद्गुरुराया । हृदयीं प्रगटूनि तूंचि माझिया । विचार सांगें मजला सदया । कृपा करोनि बाळावरी ॥५३॥ वारंवार करिती नमन । पुनरपि म्हणती सोडवीं बंधन । देईं आतां आत्मज्ञान । त्याविण जिणें व्यर्थचि हें ॥५४॥ यावरी श्रोत्यांसी येईल प्रश्न । कासया होय मठाचें बंधन । इतुकें कां कंटाळे मन । ऐका उत्तर त्याचें पैं ॥५५॥ परमार्था पाहिजे एकाग्र मन । त्यावीण न होय आत्मज्ञान । मठस्थस्वामी त्यांलागोन । भार थोर मठाचा ॥५६॥ सार्या आपुल्या भक्तजनांसी । सांभाळावें लागे त्यांसी । सकळांचे समाधान दिननिशीं । करितां सारा जन्म जाय ॥५७॥ दहा जनांचीं दहा मतें । तेव्हां बुचकळती यांचीं चित्तें । कवणाचें मत घ्यावें, यांतें । कठिण प्रसंग ऐसा हा ॥५८॥ स्वधर्मासी धरोनि निर्णय । करावा लागे त्यांसी उपाय । आणि न दुखवितां कवणाचें हृदय । समाधान करावें सर्वांचें ॥५९॥ एकाचें मत घेतां दुसर्यासी । खिन्नता येई त्यांच्या मानसीं । म्हणोनि युक्तीनें सकल जनांसी । समाधान करावें पैं ॥६०॥ तेव्हां करावा लागे विचार । सूक्ष्माहूनि सूक्ष्म अतितर । मग करावा निर्णय थोर । न दुखवितां कवणासी ॥६१॥तेव्हां त्यांतचि घालावें मन । सूक्ष्म विचारीं रात्रंदिन । मग कैंचें परमार्थसाधन । विश्रांति न मिळे क्षणभरी ॥६२॥ याचि कारणें मठाचें बंधन । कठिण होय परमार्थालागुन । यावरी आणिक येईल प्रश्न । तुम्हांलागीं श्रोते हो ॥६३॥ कीं स्वामींसी इतुकें कासया । दुःख होय आपुल्या हृदया । जाहलें काय उणें हो तयां । अवतारी पुरुष असतां ते ॥६४॥ त्याचें ऐकावें उत्तर श्रोतीं । जरी ते उपजत ज्ञानी असती । देह घेतां त्यापरी वर्तती । प्रारब्धापरी तेही पैं ॥६५॥ तेवीं मनाचा धर्मही साचा । न चुके कदापि सर्वथा त्यांचा । कैसें तें ऐकाया मोर्चा । फिरवा येथें तुम्ही हो ॥६६॥ षड्विकार हे सर्वांलागीं । अज्ञां - ज्ञानियां समान जगीं । नाना व्याधी सुखदुःख भोगी । प्रारब्धापरी सकलही ॥६७॥ पहा अवतारी पुरुष म्हणोनी । चालणें बोलणें उपजल्याक्षणीं । न करी तो कदापि या जनीं । सर्वांपरीच वर्ते तो ॥६८॥ कीं मी एक ज्ञानी म्हणोनि । गर्व नसे अणुमात्र स्वमनीं । अन्यांपरी आपणही राहुनी । जोडिती परमार्थ प्रेमभरें ॥९॥ हळुहळू जन्मा आलियावरी । क्रमेंकरोनि क्रिया सारी । पालथें होणें, रांगणें त्याउपरी । चालूं लागे मग तो पैं ॥७०॥ तेणेंपरीच हाहू करोनी । पुढें क्रमानें बोले तो क्षणीं । बुद्धिचातुर्य हेंही वाढुनी । जगाचें ज्ञान त्यास कळे ॥७१॥ तैसें परमार्थींही अज्ञ होउनी । वर्ते जनांमाजीं धरणीं । हळुहळू पायरी एकेक चढोनि । मग तो पावे ज्ञानासी ॥७२॥ एवं जनांमाजीं देव । अवतरोनि दावी सर्व । लीला जनांसी निश्चयें अपूर्व । प्रपंचपारमार्थिक दोन्ही ॥७३॥ म्हणोनि सद्गुरुस्वामीरायें । आळविलें आपुल्या सद्गुरुमाये । हें ऐकूनि समजूं नये । स्वामीही अज्ञ आमुच्यापरी ॥७४॥ असो आतां ऐका पुढें । श्रीस्वामींसी पडलें सांकडें । कैसें करावें जाऊं कुणीकडे । ऐसा विचार चालविला ॥७५॥ एकांतवास केलियावीण । न होय कदापि आत्मज्ञान । म्हणोनि आतां जावें येथुन । तरीच सार्थक जन्माचें ॥७६॥ तेव्हां स्वामी पांडुरंगाश्रम । विचार सुचविती परम उत्तम । कीं सोडावा हा चित्रापुरग्राम । सार्थक होईल निश्चयेंसीं ॥७७॥ जगामाजीं हिंडतां निश्चित । कवणही मिळेल साधुसंत । तयापाशीं जावूनि त्वरित । कार्य आपुलें साधावें ॥७८॥ येथेंचि बैसतां न मिळे कवण । ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष म्हणोन । जावें धुंडीत सोडूनि हें स्थान । तीर्थयात्रा करावया ॥७९॥ परी येथील भक्तजन । जाऊं नेदी मजलागोन । यासी काय उपाय आन । न दिसे निश्चयें मजलागीं ॥८०॥ ऐसा विचार करोनि मानसीं । प्रार्थना करिती सद्गुरुपाशीं । देवा आतां तूंचि मजसी । पार घालीं दयाघना ॥८१॥ यापरी प्रार्थना करितां दिननिशीं । कांहीं दिन लोटले परियेसीं । सुचला विचार निजमानसीं । गुरुकृपेंचि ते समयीं ॥८२॥ तेव्हां आपुला भक्त उत्तम । विठ्ठल सुत्रायभटजी त्याचें नाम । तो असे भक्त भाविक परम । जिवलग साचा स्वामींचा ॥८३॥ तयालागीं एके दिनीं । पाचारिला एकांतीं बैसुनी । जो विचार आला स्वमनीं । बोलती काय तो ऐका ॥८४॥ बोलती सुब्राया आम्हां आतां । करावें स्वहित हीचि चिंता । रात्रंदिन लागली चित्ता । नाहीं अणुमात्र चैन पाहीं ॥८५॥ म्हणोनि आतां जावें येथुनी । मिळतील साधु ऐशिया स्थानीं । त्यांच्या मुखें वेदांत श्रवण करोनि । करावें हित आमुचें पैं ॥८६॥ आणि करावा एकांतवास । तरीच होईल सार्थक खास । नातरी मन हें आमुचें उदास । नलगे लक्ष कवणीकडे ॥८७॥ परी जाऊं न देती भक्त । म्हणोनि न कळवितां कवणाप्रत । जावें हेंचि दिसे उचित । ऐसें वाटे आम्हांसी ॥८८॥ येचि दिनीं अर्धनिशीं । येथूनि जावें निश्चयेंसीं । तरीच कार्य होईल परियेसीं । जाई पुढें तूं आधीं ॥८९॥ आम्हीं येऊं अर्धनिशीं सुखरूप । कवणाही न कळवितां झपझप । तुज भेटू जैनांच्या बस्तीसमीप । हाडवळी ग्रामींच्या ॥९०॥ ऐसें ऐकतां स्वामींचें वचन । सुब्रायभटजी बंदी चरण । आणि बोले 'प्रभो स्वामिन् । आज्ञा वंद्य आपुली ही ' ॥९१॥ सुत्रायभटजी श्रीस्वामींचा । निःसीम भक्त असे साचा । हृदयीं धरिली सद्गुरुवाचा । नाहीं कळविलें कवणाही ॥९२॥ जो असे खरा भक्त । तो नुलंबी आज्ञेप्रत । त्यांचें वचन असे जें गुप्त । तें न सांगे कदापि कवणाही ॥९३॥ हेंचि गुरुभक्तीचें लक्षण । आज्ञेपरी करी वर्तन । असो आतां सावधान । पुढें परिसा श्रोते हो ॥९४॥ मग गुरु शिष्य दोघे मिळुनी । विचार करिते जाहले ते क्षणीं । ठरविल्यापरी गेला निघोनि । सुत्रायभटजी आधींच ॥९५॥ गुरुवार रात्रीं अर्धनिशीं । स्वामी आले खिडकीपाशीं । तेथें बांधोनि सुंदर रशी । त्याच्या आश्रयें उतरले ॥९६॥माडीवरोनि उतराया । खाशी युक्ती सुचली गुरुरायां । श्रीविठ्ठलअवतार मग तयां । युक्तीसी काय उणीव ॥९७॥ श्रीकृष्ण खचित सात्त्विक भोळा । परम शुद्ध प्रेमाचा पुतळा । परी नाना युक्ति ऐशी ही कला । कवणाही नाहीं त्यासमान ॥९८॥ असो मग उत्तरले वेगें । निजले हो भटजी अवघे । ऐशा समयीं चालूं लागे । कोंवळी मूर्ति पवनगतीं ॥९९॥ न घेतांचि वसनें बळकटी । त्वरित धांवली उठाउठीं । लागली मार्ग क्रमाया गोमटी । मूर्ति करणाही न दिसतां ॥१००॥पहा कैसी सद्गुरुभक्ती । किती सांगूं आंगीं विरक्ती । तेणेंचि पार पडले निश्चितीं । नाहीं अनुमान यामाजीं ॥१०१॥ असो मग ते पवनगतीं । मार्गक्रमण करूं लागती । क्षण एक न घेतां विश्रांति । गेले सद्गुरुस्मरण करीत ॥१०२॥ चालिले एकटे निर्जन वनीं । देवचि दिसे सार्या त्रिभुवनीं । तेचि साक्षात् देव म्हणोनि । नाहीं भय त्यां कवणाचें ॥१०३॥ असो मग ते पोंचले स्थानीं । ठरविल्यापरी हाडवळीच्या वनीं । जैनाच्या वस्तीजवळी जाउनी । बघती चहुंकडे भटजीस ॥१०४॥नाहीं भेटला सुब्राय । तेव्हां स्वामी सद्गुरुराय । म्हणती मानसीं करूं काय । कुठें शोधू रात्रीं या ॥१०५॥ सागर - गांवा जातां वाटेंत । हाडवळ्ळी हें खेडे वसत । हाडवळ्ळीच्या वनीं तेथ । जैन बस्ती असती पैं ॥१०६॥ हाडवळ्ळीमाजीं दोन बस्ती । एक पूर्वेस, पश्चिमेस दुसरी ती । एका ठायीं भटजी बैसती । स्वामींसी तिष्ठती ते समयीं ॥१०७॥ परी स्वामींस हें नाहीं विदित । भटजी कैंच्या बस्तीशीं बैसत । तेव्हां गेले स्वामी त्वरित । दुसर्या दिशेस हो पाहीं ॥१०८॥भटजी गेले अन्य दिशेसी । चुकले उभयतां एकमेकांसी । भटजी वाट बघोनि ते दिवसीं । गेले आपुल्या ग्रामासी ॥१०९॥ असो इकडे स्वामीराय । सुब्रायभटजीस शोधिती लवलाह्य । फिरतां फिरतां शिणले पाय । न मिळे भटजी तरी पैं ॥११०॥ धुंडितां धुंडितां जाहली पहांट । श्रमले परी ना सोडिती हट्ट । वनींच वृक्षासी लावूनि पाट । बैसले एकांती ध्यानासी ॥१११॥ तहान भूक विसरूनि सारें । तेथेंच ठाण मांडिलें बरें । आज तरी येईल त्वरें । सुब्रायभटजी या स्थानीं ॥११२॥ म्हणोनि अंधार होई तोंवरी । तेथेंच वास केला निर्धारीं । जरी रात्र जाहली बरी । तरीही नाहीं भटजी पैं ॥११३॥ मग उठले तेथूनि झडकरी । हाडवळ्ळी - ग्रामांतरीं । तेथील जैन पाटिलाच्या घरीं । गेले हळुहळू लपोनियां ॥११४॥ आणि बोलती पाटिलापाशीं । मी एक नवाईत व्यापारी परियेसीं । आतां जाऊं कुठें ये निशीं । म्हणोनि झोंपाया आलों पैं ॥११५॥ तुमच्या पडवीवरी थोडी । जागा देतां कां पांचघडी । पहांडे उठोनि जाईन तांतडी । माझिया ग्रामी तत्काळ ॥११६॥ तेव्हां पाटील म्हणे अवश्य । झोंपूनि उठा सावकाश । इतुकें बोलूनि अंथरावयास । दिधली चटई प्रेमानें ॥११७॥ अंधारी स्वामींचें न देखिलें मुख । परी मनुष्यधर्म म्हणोनि देख । जागा चटई दिधली सुरेख । जैन पाटील येणें पें ॥११८॥ तेथुनी मग अरुणोदय । होतांचि उठले सद्गुरु सदय । लगबगेंसीं पुढती जाय । सद्गुरुस्मरण करीत मनीं ॥११९॥असो, इकडे शिराली - ग्रामीं । मठांत नाहीं सद्गुरुस्वामी । ऐसी पसरतां जईंथईं बातमी । दुःखित झाले जन सारे ॥१२०॥ मठांतील भटजींसी । अधिकचि दुःख जाहलें मानसीं । हुडकाया लागले लगबगेंसीं । भटजी सारे हो तेवीं ॥१२१॥ जिकडेतिकडे करिती तार । शोधार्थ धांवती जन समग्र । भटजी, नोकर, गृहस्थ सर्वत्र । शोधिती स्वामींलागीं पैं ॥१२२॥ परी नाहीं लागला पत्ता । म्हणोनि लागली सकलांसी चिंता । म्हणती काय करूं आतां । प्रार्थिती भवानीशंकरासी ॥१२३॥ म्हणती देवा दयासागरा । तूंचि स्वामींसी पाठवीं माघारां । गुरूविण नाहीं भक्तां आसरा । हें नलगे सांगावें तुजलाग॥१२४॥ तूंचि स्फुरवुनी त्यांच्या मानसीं । माघारां आणीं झडकरी त्यांसी । ऐसी प्रार्थना चरणांपाशीं । भवानीशंकरा गुरुदेवा ॥१२५॥ ऐसी करुणा भाकुनी भक्तजन । लागले तात्काळ कार्यालागून । आतां काय करावें आपण । कवण उपाय योजावा ॥१२६॥ मठाचे मणेगार शुक्ल मंगेश भट्ट । यांनीं केला विचार उत्कृष्ट । ज्योतिषादि बघोनि झटपट । करिती शोध सत्य पहा ॥१२७॥ मग मठाचे अनंत भट्ट । उपनाम त्यांचें बड्डुकुळी श्रेष्ठ । त्यांचा पुत्र आत्माराम ज्येष्ठ । यासी केला प्रश्न पहा ॥१२८॥ आत्माराम भटजीस एक । अंजन ही विद्या सुरेख । अवगत होती त्यासी देख । तें बघावें ऐसें योजिलें पैं ॥१२९॥ आत्माराम भटजीचा पुत्र । दहा वरुषांचे बाळ पवित्र । त्याचें नाम नागेश तो पात्र । त्यासी अंजन लागतसे ॥१३०॥ अंजन लावोनि नागपत्रीं आरसा या तळहातांत । दीपापाशीं धरितां जोत होय प्रतिबिंबित । तेथ नेटानें बघतां मारुती आदि उपास्य दैवत । दिसती, दाविती प्रश्नदृश्यें ॥१३१॥ विचारितां कवणही प्रश्न । लिहून दावी मारुती आपण । दावी दृश्यें प्रश्नास धरोन । संशय नाहीं यामाजीं ॥१३२॥ परी तें नाहीं सकलांसी दिसत । कुणी एकासी असे लागत । आत्मारामभटजीचा सुत । त्यासी लागत त्या समयीं ॥१३३॥ असो विचारितां अंजनामाजीं । आनंदाश्रमस्वामी गुरुजी । हाडवळ्ळीच्या वनांत आजी । असती ऐसें सांगे तो ॥१३४॥ इतुकें सांगतां नागेश येणें । गाडी जुंपविली मंगेशभटजीनें । सागरग्रामा जावया त्वरेनें । कांहीं जनांसी घेऊनियां ॥१३५॥ मंगेशभट्ट अनंतभट्ट । आदिकरोनि गेले थेट । सागरग्रामा चालिले झटपट । जईंतईं - बघत स्वामींतें ॥१३६॥ ज्या दिवशीं पाटील - सदनीं । स्वामी निजले होते त्या दिनीं । मंगेशभटजी आदिकरोनि । जावया निवाले सागरासी ॥१३७॥ येतां वाटेंत पाटील - सदनीं । मनुष्य पाठविला मंगेशभटजींनीं । तो गडी विचारी ओरडुनी । कीं स्वामींस पाहिलें का तुम्हीं ॥१३८॥ पाटील म्हणे मीं ना पाहिलें । परी स्वामीराय तये वेळे । तेथेंच पडवीवरी निजले । नाहीं विदित पाटिलासी ॥१३९॥ तया बापुड्यासी काय विदित । जो व्यापारी नवाइत । तोचि स्वामीं सद्गुरुनाथ । कपटनाटकी कृष्ण असे ॥१४०॥ मठाचा गडी आणि पाटील । दोघेही जें बोलिले सकल । स्वामींनीं ऐकिलें होतें समूळ । परी ना बोलिले अणुमात्र ॥१४१॥ पहा कैसी आंगीं विरक्ती । तेवींच मठ सोडूनि जाती । वाटेंत जईंतईं कष्ट सोशिती । वर्णन कराया अशक्य ॥१४२॥ असो मग ते सारे जन । गेले सागरासी निघोन । तपास करिती पूर्ण । ना मिळती कवण्याही स्थानीं ते ॥१४३॥ इकडे शिरालीहूनि आणिक । भटजी आत्माराम म्हणे देख । मीही शोधार्थ निश्चयात्मक । जावें हेंचि उचित असे ॥१४४॥आणि तार केली सागरा । कीं मीही शोधार्थ जातों त्वरा । हाडवळ्ळीग्रामों पाटिलांच्या घरा । जाउनी चहुंकडे बघतों मी ॥१४५॥ सागराहूनि गाडीवाला । शिरालीस यावया निघाला । वाटेंत स्वामी भेटले त्याला । आनंदला मानसीं अनिवार ॥१४६॥ आत्मारामभटजी हाडवळ्ळीस । आले म्हणोनि विदित असे त्यास । म्हणोनि धांवला लगबगें खास । पाटिलाच्या त्या स्थानीं ॥१४७॥ मोटारीपरी बैलगाडी । हांकिली तेणें परम तांतडीं । पाटिलाच्या घरीं सोडी । बैल आपुले क्षणमात्र ॥१४८॥ करितां चौकशी पाटिलापाशीं । भटजी गेले अन्य स्थळासी । तेथें धांवत सुटला परियेसीं । गाडी घेउनी तत्काळ ॥१४९॥ आत्मारामभटजींस गांठुनी । अमुक ठायीं स्वामी मिळाले म्हणोनी । सांगतां भटजी आनंदूनि मनीं । सांगती आपुल्या रयतासी ॥१५०॥ म्हणती धांवत जाई येथुनी । भेट घेईं स्वामींची झणीं । मी येईं तोंवरी पडूनी । राहीं त्यांच्या पदकमळीं ॥१५१॥ असो त्यासी धाडिला पुढती । मागें गेला नागेश पवनगती । आपण गाडीवरी बैसोनि जाती । भटजी लगबगें ते समयीं ॥१५२॥ कीं त्यांच्या पायासी होती सूज । चालाया नच होय म्हणूनि सहज । गाडीवरी बैसुनी काज । कराया निघाले प्रेमभरें ॥१५३॥ असो तिकडे गेला रयत । स्वामींस गांठाया लगबगें धांवत । अंतर्ज्ञानी स्वामी फिरत । कळवळोनी माघारां ॥१५४॥ भेटला रयत स्वामींलागीं । साष्टांग नमन केलें मार्गीं । मूर्ति बघतांचि त्यांच्या अंगीं । प्रेम भरलें अनिवार ॥१५५॥ कंठ जाहला सद्गदित । रोमांच अंगीं उभे राहत । घळघळ अश्नु नेत्रीं वाहत । रयताच्या त्या तेव्हां हो ॥१५६॥ आणि म्हणे स्वामी सदया । थांबा जाऊं नका येथूनियां । स्फुंदस्फुंदोनी रडत हें पाहुनियां । सद्गुरुस्वामी कळवळले ॥१५७॥ आणि म्हणती कां बा रडसी । कोण कुठिल तूं सांग आम्हांसी । येरू बोले रयत मी त्यांसी । वड्डुकुळी आत्मारामांचा ॥१५८॥ ते येती गाडीवरी मागें । नागेश येत धांवत वेगें । मज पाठविला त्याचिया संगें । आलों पुढती धांवुनियां ॥१५९॥ ऐकिल्याक्षणीं रयताचे शब्द । क्षणभरी स्वामी राहिले स्तब्ध । तें बघुनी रयता झाला आनंद । पाहे टकमकां मुखकमळ ॥१६०॥ तोंवरी नागेश धांवत येत । पितृवाक्यें थेट स्वामिषायां झोंबत । तयामागें भटजी गाडींत । पातला सन्निध स्वामींच्या ॥१६१॥आणि स्वामींचे चरण घट्ट । धरिता जाहला आत्मारामभट्ट । आणि म्हणे गुरुराया झटपट । यावें आपुल्या स्थानासी ॥१६२॥ केला साष्टांग प्रणिपात । म्हणे सद्गुरो आपण कृपावंत । नका जाऊं अन्य स्थळांत । आम्हां अज्ञांसी टाकुनियां ॥१६३॥ आपण जातां शिराली सोडुन । मठ कासया आम्हांलागुन । शोभा कैंची आपुल्यावीण । मठासी बा गुरुराया ॥१६४॥ तुजवीण अन्य आसरा । नाहीं आम्हां अज्ञ पामरां । दावील कोण मार्ग खरा । आपणचि सांगा गुरुराया ॥१६५॥ बहुत कासया बोलूं आतां । हे चरण न सोडीं मी सर्वथा । येऊं ऐसें अभयवचन देतां । तेव्हांच सोडीन चरण हे ॥१६६॥ ऐसी प्रार्थना करितां तेणें । द्रवलें चित्त श्रीगुरूंचें दयेनें । अवश्य म्हणोनि हास्यवदनें । ऊठ येतों म्हणती ते ॥१६७॥ पहा कैसे सद्गुरुराय । केवल प्रेम बघती सदय । भक्तप्रेमानें बांधले जाय । तेवींच अवश्य म्हणती पहा ॥१६८॥ लहान बाळ आपुल्या पित्यासी । म्हणे मी जाऊं ना दें तुजसी । मीं धरिलें असतां कैसा जासी । सोडीना हात तव बाबा ॥१६९॥ तेव्हां बाप राहे तेथ । पुत्रप्रेमासाठीं हांसत । सोड रे बाळा म्हणोनि विनवित । प्रेमानें तो अडला हो ॥१७०॥ मुलाचा हात सोडवुनी घ्यावया । काय कष्ट होतील तया । परी तो न जातांचि, परतुनियां । येतो संगें बाळाच्या ॥१७१॥ तैसी आमुची सद्गुरुमाय । जावया त्यांसी कवणाचें भय । केवळ भक्तांच्या प्रेममय । वृत्तीसी भुलोनी अडले हो ॥१७२॥ साक्षात् श्रीविष्णूचा अवतार । दया - क्षमा - शांतीचे सागर । तेवींच उठले करोनी निर्धार । जावया मठासी माघारां ॥१७३॥ हाडवळ्ळीच्या पाटिला - घरीं । आधींच कळविलें असे निर्धारीं । मी स्वामींसी घेउनि येईं तोंवरी । दूध शहाळीं आणा पैं ॥१७४॥ते दिवशीं होता रविवार । नारळ काढू नये हा आचार । पूर्वजांचा असे थोर । हें विदित जरी पाटिलासी ॥१७५॥ तरी स्वामींसाठीं शहाळीं काढितां । दोष नाहीं कदापि सर्वथा । ऐसें म्हणोनी पाटिलें तत्त्वतां । काढिलीं शहाळीं प्रेमभरें ॥१७६॥ सद्गुरुसंनिधीं कांहीं एक । विधिनिषेध कवण ना देख । सद्गुरु गुणदोषातीत निश्चयात्मक । तेवींच भय ना कवणही ॥१७७॥असो मग स्वामी सद्गुरुराय । आणि बापलेंक भटजीद्वय । रयत आदिकरोनी ते समय । आले परतुनी हाडवळ्ळीस ॥१७८॥ येतां गाडी हाडवळ्ळीग्रामांत । थांबविली ठरविल्यापरी तेथ । आला पाटील प्रेमानें धांवत । सद्गुरुनाथां भेटाया ॥१७९॥ आणि करोनी साष्टांग नमन । म्हणे स्वामिन् कृपा करोन । आमुच्या सदनीं करावें आगमन । पावन होईल गृह माझें ॥१८०॥तेव्हां बदले सद्गुरुनाथ । आलों होतों तुमच्या गृहांत । शुक्रवारी रात्रीं येथ । पहुडलों आम्ही निश्चयेंसीं ॥१८१॥ तेव्हां त्यास आठवलें त्वरित । आला होता एक नवाईत । तेचि हे सद्गुरुनाथ । समजला मानसीं तत्काळ ॥१८२॥ आणि तेणें केला आक्रोश । स्फुंदस्फुंदोनी रडे बहुवस । आणि म्हणे अपराध विशेष । घडला देवा मजकडूनी ॥१८३॥ काय मीं मूर्खें केला अविचार । मुख न बघतांचि निजविलें बाहेर । चटई दिधली फाटकी शीघ्र । मी निजलों सुखानें गादीवरी ॥१८४॥ मी जेविलों पोटफुटे तोंवर । उपवासी राहिलां आपण रात्रभर । ऐसा मी अज्ञ पामर । धिक्कार असो मजलागीं ॥१८५॥ आतां देवा मज पामरा । क्षमा करावी आपण कृपासागरा । आपणचि अज्ञजनांचा आसरा । करावा स्वीकार सेवेचा ॥१८६॥ करावें प्राशन पाणी नारळ । दूध केळीं घ्यावें ये वेळ । तेव्हां गहिंवरोनी प्रेमळ । नाहीं अपराध तव म्हणती ॥१८७॥आणि त्याच्या समाधानार्थ । एक शहाळे घेतलें तेथ । प्रेमानें आशीर्वाद देत । सद्गुरुराज पाटिलासी ॥१८८॥इतुक्यामाजीं जाहली रात्र । अंधार पसरला सर्वत्र । तरीही कित्येक जन आले शीघ्र । दर्शनालागीं स्वामींच्या ॥१८९॥ एकचि गाडी सोबतीवीण । जावया वाघांचे भय म्हणोन । नाहीं हांकीत कोणीही जाण । परी हांकिली गाडी तैं ॥१९०॥ पोहोंचले शिरालीस सुरक्षित । सद्गुरुकृपेंचि निश्चित । रात्रीं तीन प्रहर होतां मठांत । आले दयाळ पहा हो ॥१९१॥ गडबडोनि उठले मठीं जन । वाजविला नगारा, घंटा घण घण । आनंद थोर जाहला जाण । सार्या जनांलागीं हो ॥११२॥ ऐकुनी नगारा - घंटारव । उठला सारा शिराली गांव । घेतली सकळीं मठासी धांव । प्रेमासरसी तत्काळ ॥१९३॥ मग सूर्य उगवल्याक्षणीं । तारा पाठविल्या गृहस्थांलागुनी । जिकडे तिकडे अन्य स्थानीं । आले गुरुराज म्हणोनि ॥१९४॥ पहा कैसे सद्गुरुनाथ । प्रार्थितांचि द्रवलें त्यांचे चित्त । तेवींच आले धांवत । मठामाजीं माघारां ॥१९५॥ खचितचि मठाच्या भटजींचे । उपकार बहुतचि झाले साचे । नातरी सद्गुरुस्वामी यांचे । चरण ना लाभते आम्हांसी ॥१९६॥ असो आतां पुढील अध्यायीं । स्वामींचे हृदय कोमल पाहीं । शांत उदार सद्गुण सर्वही । हेंचि वर्णूं गुरुकृपें ॥१९७॥परमहंस आनंदाश्रम । शिवानंदतीर्थस्वामी उत्तम । त्यांच्या कृपाप्रसादें एकोनपंचाशत्तम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१९८॥ स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां लाभती साधनें चार । एकोनपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥१९९॥ अध्याय ॥४९॥ओव्या ॥१९९॥ ॐ तत्सत्- श्री सद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 20, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP