मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥४३॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४३॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमत्वांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जया जी श्रीगुरुराया । काय स्वरूप तुझें हें सदया । कल्पनाचि न करवे बुद्धीसी या । ऐसें प्रेमळ रूप तुझें ॥१॥
इतुकें प्रेम लागाया भक्तां । काय कारण श्रीगुरुनाथा । तूंचि सांगें मजला ताता । भक्तवत्सला कृपाघना ॥२॥
सगुण स्वरूप बघतां प्रेम । उपजे तरी जगीं परम । सुंदर गौरवर्ण उत्तम । अमनी अनेक जन बापा ॥३॥
सद्गुण बघोनि म्हणतां जरी । ते न दिसती बाहेरी । परी मूर्ति बघतांतचि अंतरीं । भरे प्रेम अनिवार ॥४॥
बरें स्वरूप बघतांचि साजिरें । कवण्या ठायीं म्हणावें ‘बरें’ । नासिका कर्ण कीं नयन हें सारें । यामाजीं सुरेख काय असे ॥५॥
सकळ मिळोनि एक वदन । कवणा सुंदर म्हणावें आपण । हेंचि न कळे मजलागोन । यास्तव साकार हें लटकेंचि ॥६॥
गुण बघतां नानाविध । तेही सत्य नव्हती हें प्रसिद्ध । परी देवा होय आनंद । तुझी मृर्ति आठवितां ॥७॥
साधु-संत बोलती वचन । सद्गुरूसी भजावें आपण । तेचि चुकविती जन्म-मरण । पोहोंचविती मोक्षासी ॥८॥
परी देवा विचार करितां । तुझें प्रेमचि मोक्ष तत्त्वतां । तुजवांचोनि श्रेष्ठ तें ताता । नसे कांहीं अणुमात्र ॥९॥
रूप गुण विद्या सर्वही । तव चरणींच असती पाहीं । नाना कुतर्क घेतले तरीही । तूं श्रेष्ठ हें सिद्ध होय ॥१०॥
श्रेष्ठ कनिष्ठ कांहीं एक । म्हणाया तुजला वाव ना देख । पहा कैसें तें निश्चयात्मक । सांगतों परी हंसूं नको ॥११॥
श्रेष्ठ जरी म्हणूं तुजसी । भक्तांपुढें तूं कनिष्ठ होसी । कारण त्यांच्या कार्यांसी । झटसी लाज सोडूनियां ॥१२॥
जरी कनिष्ठ म्हणूं तुजसी । तरी सर्वांचा मालक अससी । वरिष्ठही भजती बहुवसी । डौल सारूनि एकीकडे ॥१३॥
बांकविती मान आपुली तुजपुढें । प्रार्थना करिती येतां सांकडें । तुजला पाहतां होती वेडे । कांहीं नावडे तुजवीण ॥१४॥
तेव्हां कनिष्ठ म्हणतां तूंतें । कैसें शोभेल सांगा मातें । एकचि दिसे मजला खरें तें । बोलतों देवा प्रेमभरें ॥१५॥
कवणही नसे बोलाया वाट । तुझी इच्छाच ही एक श्रेष्ठ । इच्छेसरिसें होय तें उत्कृष्ट । जें जें करिसी तें देवा ॥१६॥
म्हणोनि तुझी भक्ति करितां । कवणही न उरे चिंता । मग कैंचें भय त्या भक्ता । तव कृपें हो दयाळा ॥१७॥
असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । मंगेशभट्ट - राधेचें लग्न । आशीर्वादें झालें पैं ॥१८॥
आणि मंगळूर - ग्रामींचा गृहस्थ । यासी दाविलें स्वामींनीं त्वरित । आपण होऊनि साक्षात् दत्त । ऐशी कथा वर्णियेली ॥१९॥
आणिक बोलूं त्यांचें महिमान । तुम्ही श्रोते सावधान । परिसा मूर्ति मानसीं धरोन । तेव्हां येईल दुडदुडां ती ॥२०॥
- पांडुरंगाश्रम । यांनीं चालविलें साम्राज्य परम । बावन्न वर्षें वरी उत्तम । अधिकचि होय यांचें पैं ॥२१॥
परमतीव्र वैराग्य यांचें । धर्मरक्षण करिती साचें । जनां सांगती स्वधर्माचें । आचरण कदापि सोडूं नका ॥२२॥
धर्मकार्यीं झिजविला देह । परम कडक वृत्ति निःस्पृह । नाहीं अंगीं ममता मोह । सांगती निक्षुनी धर्म जनां ॥२३॥
शिखेवीण कोणी येतां नर । चोपुनी सांगती त्यासी विचार । न धरिती भीड अणुमात्र । जनांमाजीं पहा हो ॥२४॥
निंदो अथवा वंदो कुणी । न धरिती अणुमात्रही मनीं । जगाचें कल्याण एकचि झणीं । व्हावें हें अंतरीं सर्वदा ॥२५॥
जो हें समजे मानसीं भक्त । त्याचें कल्याण होय निश्चित । अज्ञपणें निंदित त्यांप्रत । नशीबचि त्याचें म्हणावें पैं ॥२६॥
खरे जे असती साधु-संत । सदा जनांचे कल्याण इच्छित । नाहीं कवणाचें भय त्यांप्रत । मायबापचि जाणा ते ॥२७॥
मायबापांसी आपुल्या मुलांचें । चोपुनी सांगाया भय तें कैंचें । उद्धट वर्तन करितां साचें । करिती शिक्षा ताकाळ ॥२८॥
तद्वत् आमुचे मठाधीश । स्वामी मायबापचि आम्हांस । स्वधर्मरक्षक म्हणोनि तयांस । अधर्म नावडे अणुमात्र ॥२९॥
जरी करिती अधर्म स्वजन । कळवळे सद्गुरुस्वामींचे मन । झिजविती देह रात्रंदिन । स्वधर्म रक्षणास्तव जाणा ॥३०॥
जनाचें हित व्हावें ऐसा । एकचि हेतु त्यांचा परियेसा । म्हणोनि कोपही दाविती खासा । जनांलागीं ते पाहीं ॥३१॥
यावरी येईल सहज प्रश्न । स्वधर्में वागतां हित तें कवण । तरी परिसावें सावधान । श्रोते सज्जन हो तुम्ही ॥३२॥
हें जग सारें नश्वर । सर्वही जाणती श्रेष्ठ नर । कीं व्यवहारी आपण बोलतों चतुर । काय भरंवसा देहाचा ॥३३॥
परी वरिवरी बोलती ते शब्द । नाहीं अंतरी अणुमात्र खेद । कीं मी घ्यावा निज - आनंद । ऐसा अनुताप ना पोटीं ॥३४॥
ऐसें व्हावया काय कारण । जग सारें भासे खरें म्हणोन । घडे हातुनी यथेष्ट आचरण । विषयलालसा असल्यामुळें ॥३५॥
जरी ना घातले स्वामींनीं नियम । वाढे बहुतचि आमुचा काम । न ये क्षणभरी मुखांतुनी 'राम' । रमोनि जाय मन विषयीं ॥३६॥
विषयीं गर्क होतां निश्चयें । इहपरासी मुकतो तो स्वयें । मग कैंचें समाधान मनासी ये । फिरे नाना योनी तो ॥३७॥
एकदां गेला मनुष्यदेह । पुनरपि न मिळे तो लवलाहें । यांत नाहीं अणुमात्र संदेह । म्हणोनि नच तो दवडावा ॥३८॥
तेवीं येचि जन्मीं आपण । चुकवावें आपुलें जन्म-मरण । विषयीं न जावें बुडोन । तरीच लाभे मोक्ष तया ॥३९॥
जीवा सहजचि विषयीं ममता । त्याचा त्याग न करवे चित्ता । सारा जन्म त्यांतचि तत्त्वतां । घालितों आपण दिनरजनीं ॥४०॥
म्हणोनि सद्गुरुस्वामी आम्हांसी । स्वधर्माचे नियम ते बहुवसी । घालुनी देती प्रेमासरशीं । आपणही वर्तती तैसेचि ॥४१॥
नियमें विषयलालसा जात । हें विदितचि असे सकलांप्रत । तरीही विवरूं आतां किंचित । लक्ष देऊनि अवधारा ॥४२॥
जरी असे लहान बाळ । तेंही नियमें विषय सकळ । त्यागाया सिद्ध होय ते वेळ । परम प्रीतीनें हो जाणा ॥४३॥
सणावारीं करिती पक्वान्न । नानाविध सारे जन । देवासि नैवेद्य केल्यावीण । न खाती अनेक जन पाहीं ॥४४॥
बाळ मागतां सांगे माता । देवाचा नैवेद्य न होतां । तुज द्यावया न होय सर्वथा । म्हणोनि नाहीं देत कधीं ॥४५॥
ऐसें करितां पुढें त्या बाळा । आवरूनि घ्यावया मन ते वेळां । सहजचि होय नियमें त्याला । क्षणभरी तरी निश्र्चयें ॥४६॥
तें म्हणे ‘‘आई नैवेद्य करोनि । मग देईल मजलागोनि ।" तोंवरी मन आवरोनि । धरी तें अज्ञ बालक ॥४७॥
इतुके तरी तीन तास । विषयलालसा सोडी खास । अज्ञ बालक जरी तें बहुवस । नियमेंचि सोडी विषयमुखा ॥४८॥
तेव्हां आम्हां कैसें न होय । नियम पाळितां सोडाया विषय । म्हणुनीच सांगती स्वामिराय । स्वधर्मनियम पाळाया ॥ ४९ ॥
स्नानसंध्या केल्यावीण । ब्राह्मणें जेवूं नये आपण । ऐसें वेदशास्त्रवचन । सांगती समजा गुरुराय ॥५०॥
पाळितांचि तितुके नियम । मन आवराया मार्ग सुगम । तैसेच आणिक नाना धर्म । करावे लागती आपुल्यासी ॥५१॥
तेणेंकरोनि मनासी बंधन । बंधनें विषयीं न जाय मन । मग सहजचि पाप - क्षालन । होय निश्चयें जनांचें ॥५२॥
पापनाश होतां सत्वरी । चित्त शुद्ध होय निर्धारीं । चित्त शुद्ध झालियावरी । आत्मज्ञान होय झणीं ॥५३॥
याचिकारणें स्वामिराय । करिती जनांसी बोध सदय । स्वधर्में राहाटतां नाहीं भय । ऐसें गर्जती प्रेमभरें ॥५४॥
त्यांचा अवतार याचिकारणें । जगाचें कल्याण होईल जेणें । तेंचि करिती परमप्रीतीनें । आम्हां अज्ञांस्तव ते जाणा ॥५५॥
त्यांनीं जरी स्वधर्मबंधन । नाहीं घातलें तरी हें मन । विषयीं बुडोनि रात्रंदिन । जातील अधःपाता जन सारे ॥५६॥
म्हणोनि स्वामी श्रीगुरूंसी । लागली चिंता काय करूं ऐसी । पार घालूं कैसें अज्ञांसी । भक्तां अभक्तां सकळां हो ॥५७॥
म्हणोनि घडिघडी करिती बोध । जनांसि आपुल्या नानाविध । म्हणती नका होऊं मोहांध । नका जाऊं आडमार्गे ॥५८॥
सोडूं नका स्वधर्म सारा । जितुका होय तितुकाचि करा । कष्ट न लागती कदापि हो नरा । स्वधर्मरक्षण करण्यातें ॥५९॥
परधर्मभयदायक । स्वधर्म तो सर्वां रक्षक । सोडूं नये आपुला सुरेख । कधींकाळीं निश्चयेंसीं ॥६०॥
जरी वाटे परधर्में सुख । तरी नव्हे, दुःखचि देख । ऐसा चित्तीं करावा विवेक । रात्रंदिन मानवांनीं ॥६१॥
स्वधर्में वर्ततां जें होय सुख । अन्यधर्में तें न होय देख । परधर्म हा क्लेशकारक । कैसें तें पहा सांगूं पैं ॥६२॥
पहा कैसें स्वधर्में वर्ततां । नाहीं भय कवणाचे तत्त्वतां । अधर्म कराया प्रवर्ततां । पलपवुनी करावा लागे तो ॥६३॥
समजा एकानें अधर्म करितां । त्याचा मित्र येई अवचिता । तेव्हां आला ऐसें ऐकतां । दचकुनी उठे लगबगें तो ॥६४॥
त्यासी कळली कीं माझी करणी । ऐसी भीति वाटे त्याच्या मनीं । एवं भीति अधर्मालागुनी । कवणही असो तें कार्य ॥६५॥
धर्मापरी वर्ततां आपण । नाहीं कोणतेही भय त्यालागुन । परधर्म आणि अधर्म गहन । बहुतचि भय कीं त्यामाजीं ॥६६॥
तैसें तें भय, हेंचि अतिशय । ओझं डोईं आपुल्या होय । तें उतरावया श्रीगुरुमाय । येत आपुली प्रेमानें ॥६७॥
एकदां सारें उतरलें तेव्हां । आणिक पुनरपि भार न घ्यावा । करूं नये तो आपण कां करावा । अधर्म जाणा हो तुम्ही ॥६८॥
जो असे आपुला धर्म । तोच श्रेष्ठ आम्हांसी परम । म्हणोनि सद्गुरु ते गुणग्राम । बोधिती उत्तम सकलांसी ॥६९॥
कष्ट सोसुनी आपण सकल । कंठशोष करिती वेल्हाळ । परी ना आम्हां जनांसी तळमळ । घालितों गोंधळ अधिकचि ॥७०॥
असो आपुला स्वधर्म थोर । पाळितां आपुलें मन हें सत्वर । त्यागुनी विषयसुखासी निर्धार । पावें निजसुखासी तात्काळ ॥७१॥
वरी कथिल्यापरी मन हें । स्वधर्मनियमें बांधिलें पाहें । विषयांपासुनी दूर राहे । क्षणभरी तरी निश्र्चयेंसीं ॥७२॥
कीं ब्राह्मणें अमुक न करावें । करावें अमुक ऐसेंचि बरवें । स्त्री-पुरुषें-गृहस्थै-विधवें । चातुर्वर्णां स्वधर्म श्रेष्ठ असे ॥७३॥
स्वधर्माचें बंधन । वेदशास्त्रीं केलें कथन । तेंचि मांगती कृपा करोन । लटिकें न सांगती अणुमात्र ॥७४॥
ऐसें बंधन जरी न केलें । भलतेंचि आचरण घडेल ये वेळे । मानवांकडोनि म्हणोनि नेमिलें । वेदशास्त्रें बंधन पैं ॥७५॥
तेंचि सांगती सद्गुरु सघन । परी नायकतों आम्ही त्यांचे वचन । म्हणोनि खेद झाला उत्पन्न । श्रीपांडुरंगाश्रमस्वामींसी ॥७६॥
कीं नायकती आपुलें वचन । तरी पुढती यां गति कवण । कैसी बुद्धि यांची म्हणोन । त्रासती अंतरीं बहुतचि ॥७७॥
दाविली वाट ती सोडोनी । अन्यचि धरिली असे जनांनीं । तेव्हां वाटे अंतःकरणीं । कैसे तरुनी जातील हे ॥७८॥
स्वधर्माची होतां हानी । उरली नाहीं आणिक करणी । तोचि भवनदीसी सेतू असुनी । तेणेंचि होय ज्ञान पैं ॥७९॥
स्वधर्म हाचि सेतू तोडितां । कैसें जावें पार तत्त्वतां । म्हणोनि जनांची लागली चिंता । श्रीस्वामींसी अनिवार ॥८०॥
कीं आतां आमुच्या वृद्धापकाळीं । परधर्म शिकले जन ये वेळीं । कैसें साहूं देखतां डोळीं । म्हणोनि हळहळती मानसीं ॥८१॥
असो ऐसें असतां पाहीं । एकेकाळीं प्रार्थिती सर्वही । अहो देवा श्रीगुरुमाई । भक्तवत्सले करुणाळे ॥८२॥
आतां करावा शिष्य - स्वीकार । ऐशी कृपा करावी आम्हांवर । यावरी स्वामी नेदिती उत्तम । संमतीचे लोकांसी ॥८३॥
तेव्हां भक्त करतील काय । मानसीं परम खेद होय । कधीं करतील शिष्य गुरुवर्य । ऐसा ध्यास धरिला जनीं ॥८४॥
मग गेले कांहीं दिवस । शके अठराशें छत्तीस । यावेळीं श्रीस्वामींस । अवचित आजार झाला पैं ॥८५॥
ज्वर येई सदा त्यांसी । क्षीण झाले तेव्हां बहुवसी । वार्ता पसरली देशोदेशीं । आमुच्या जनामाझारीं ॥८६॥
तेव्हां रावबहादुर येन्नमिडी । व्यंकटराव आला तांतडीं । आणि बैंदूर नारायण आवडीं । आला धांवत शिरालीसी ॥८७॥
तेवीं चिक्रमने भवानीशंकर । आणिक प्रमुख बहुत नर । आले धांवत चित्रापुर - । स्थानीं बहुत चिंतेनें ॥८८॥
जाऊनि स्वामीसंनिधीं । प्रार्थना केली परमावधी । काय ती सांगतों ऐका आधीं । सद्गुरुचरणां स्मरोनि ॥८९॥
म्हणती देवा सद्गुरुराया । आतां शिष्य - स्वीकार सदया । करावा कृपा करोनियां । आमुच्यास्तव तुम्ही हो ॥९०॥
सद्गुरु नसतां जगीं आम्ही । राहावें कैसें सांगा स्वामी । कोण दावील मार्ग हा नेहमीं । गुरुवीण नाहीं गति अन्य ॥९१॥
सद्गुरु नसतां मठामाजीं । काय शोभा येईल गुरुजी । म्हणोनि आमुची विनंती आजि । करावी मान्य हो देवा ॥९२॥
देउळासि नसतां कळस । कवणही न म्हणे देऊळ त्यास । तैसें मठामाजीं बघतां खास । सद्गुरु नसतां मठ नव्हे ॥९३॥
जरी मठीं असती अनेक जन । तरी स्वामीविण दिसे शून्य । म्हणोनि कवणही न धरितां अनुमान । शिष्य - स्वीकार करावा ॥९४॥
आधींच धर्मग्लानि होय । सद्गुरु नसतां गति काय । आहां अज्ञांसी कोण सदय । शिकवील गहन स्वधर्म खरा ॥९५॥
कोण सांगेल सद्विचार । पुढें कोण गति होय साचार । आणिक नाहीं आधार । गुरुवीण जगतीं अन्य पहा ॥९६॥
जगीं नाना संकटें येती । तेव्हां धांवुनी येतों मठाप्रति । निवारील कवण सांगाती । गुरुवांचोनि दयाघना ॥९७॥
सारें तुजला असे विदित । प्रार्थावें नलगे देवा तुजप्रत । आमुचा सारा हेतु तूं खचित । जाणसी तेव्हां काय वदों ॥९८॥
ऐशियापरी करोनि प्रार्थना । साष्टांग प्रणिपात घातला चरणा । तेव्हां बोले श्रीगुरुराणा । काय म्हणोनि तें परिसा ॥९९॥
गृहस्थ जनांचे बघतां वर्तन । आमुचें मन होय अति उद्विग्न । तेव्हां शिष्य स्वीकार न करूं पूर्ण । निश्चय आमुचा झाला असे ॥१००॥
ऐसें ऐकतां सद्गुरुवचन । जनांचें होय म्लान वदन । खिन्न जाहलें अंतःकरण । परी बोलाया धैर्य नसे ॥१०१॥
मग सारे मिळोनि जन । सर्व समाधींसंनिध जाऊन । तेवींच भवानीशंकर देवासी भेटोन । प्रार्थना करिती त्यासमयीं ॥१०२॥
सेवाही करविली त्यांनीं बहुत । कीं शिष्यस्वीकार करावा त्वरित । ऐसी प्रेरणा होवो स्वामींप्रत । यापरी जनांनीं प्रार्थिले ॥१०३॥
इतुकें जरी प्रार्थिले जनांनीं । तरी उदासीनचि ते अंतःकरणीं । ऐसे निष्ठुर कां झाले म्हणोनि । कुणीही पुसतील तरी ऐका ॥१०४॥
सद्गुरु खचितचि असती दयाळ । कठोर नव्हती, असती कोमळ । परी पाहिली परीक्षा सकळ । भक्तजनांची तेधवां ॥१०५॥
वरूनि दाखविला कोप बहुत । बघाया जनांचा भावार्थ । न करूं म्हणती शिष्य निश्र्चित । ऐसा हट्ट धरियेला ॥१०६॥
जरी असती मुलें चतुर । माता बोले चुकतां अणुमात्र । म्हणे तूं अससी खचितचि खर । काय कारणें तें ऐका ॥१०७॥
असे जरी परम चतुर । किंचित चुकतां वारंवार । जरी न कथिलें तरी पुढें तो कुमार । चूकचि करील निर्धारें ॥१०८॥
म्हणोनि बोलती मातापिता । शहाणा अधिकचि व्हावें तत्त्वतां । ऐसी धरोनियां ममता । प्रेमेंच बोलती त्यालागीं ॥१०९॥
तद्वत् आमुचे स्वामी कृपाघन । बोलिले की जनांचे वर्तन । बघुनी न होत समाधान । म्हणोनि शिष्य न करूं ॥११०॥
परी अनेक जनांचे प्रेम बघोन । आनंदें उचंबळें त्यांचे मन । अधिकार वाढवावयालागुन । दाविला कोप वरकरणी ॥१११॥
ज्याच्या अंगीं खरी भक्ति । तो न ढळे कदापि अंतीं । जरी स्वामी अत्यंत क्षोभती । तरी प्रेमचि वाढे अनिवार ॥११२॥
म्हणोनि भक्तांचें प्रेम अधिक । वाढवावें निश्चयात्मक । इतुकाच त्यांचा हेतु देख । म्हणुनीच ओळले नाहीं ते ॥११३॥
म्हणती मानसीं लागो ध्यास । सद्गुरु असावा ऐसा विश्वास । दृढ होतां शिष्य करितां खास । न ढळे प्रेम कदापिही ॥११४॥
आमुच्या कोंकणीमाजीं एक । म्हण असे परम सुरेख । 'घ' म्हणतांक्षणींच देख । 'घप्प' करूं नये कधीं ॥११५॥
ऐशा म्हणीपरी करितां कार्य । तें बरवें कदापि न होय । म्हणोनि कोणतेंही असो कार्य । सावकाश विचारें करावें ॥११६॥
बालका चांगली क्षुधा न लागतां । वाढी अन्न पणं त्यासी माता । भुकेल्यावीण मुखीं घालतां । थुंकोनि टाकी तो ग्रास ॥११७॥
ज्यासी खरी लागली भूक । अन्न दे म्हणोनि मातेसन्मुख । लगबगें धांवे जेवी तात्काळिक । अन्न सारें तें बाळ ॥११८॥
म्हणोनि माता काय करी । मुलाची भूक समजुनी निर्धारीं । ताट वाढी नानापरी । मग तें धांवे जेवावया ॥११९॥
तद्वत् सद्गुरु - श्रीस्वामींनीं । जनांचे प्रेम वाढावें अजुनी । ऐशा उद्देशें आग्रह धरुनी । नको शिष्य ऐसें सांगितलें ॥१२०॥
गुरुप्रेमाची लागतां भूक । शिष्य करतां होय सुख । कीं प्रेमासरशीं धांवती सकळिक । श्रीसद्गुरूच्या संनिधीं ॥१२१॥
जेवीं हातींचा खेळ सोडुनी बाळ । भूक लागतां माते जवळ । धांवे दुडदुडां ते वेळ । जेवूं घाल म्हणोनियां ॥१२२॥
यास्तव माता काय करी । भुकेल्यावीण न देई निर्धारीं । जरी मागाया आलें तरी । नेदी सर्वथा ती पाहीं ॥१२३॥
म्हणे वृथाचि देऊं कासया । भूक ना तुज टाकिशील वायां । भूक लागतां आपण होऊनियां । देई ती जेवाया प्रेमानें ॥१२४॥
तैसें स्वामिरायें येथ केलें । कीं प्रेमाची भूक लागतां ते वेळे । शिष्य करितां स्वीकारिती निजबळें । आनंदानें गृहस्थ पैं ॥१२५॥
भुकेला अन्न कोण दवडी । तैमी गुरुप्रेमाची ज्यासी गोडी । तो कदापि चरण न सोडी । श्रीसद्गुरूंचे पहा हो ॥१२६॥
यावरी करितील श्रोते प्रश्न । अन्नाची उपमा सद्गुरूलागून । कैसी शोभे सांगा वचन । तरी अवधारा उत्तर तें ॥१२७॥
सद्गुरु म्हणिजे मुख्य जीवित । तेणेंच होय समाधान प्राप्त । अन्नानें कैसी भूक शमत । तेणेंचि वांचत देह खरा ॥१२८॥
श्री तैसें येथें सद्गुरुराज । तेंचि आमुचें जीवन आज । त्यादीग न होय समाधान सहज । अन्य मार्ग न दूसरा ॥१२९॥
पहा देहासी नाना उपचार । वस्त्रं भूषणें लेववी सुंदर । परी अन्नाविण न जगे साचार । कोणीही प्राणी या जगीं ॥१३०॥
ज्या ज्या प्राण्यासी जो जो आहार । तो तो त्यासी अन्नचि साचार । मनुष्यांमाजींही नाना प्रकार । असती अन्नाचे पहा हो ॥१३१॥
गहूं ज्वारी तांदुळादि अनेक । संवयीपरी खाती देख । परी त्यांचें तेंचि सुरेख । अन्न जाणा हो निर्धारें ॥१३२॥
असो एवं अन्नावांचुनी। न जगे कदापि कोणी प्राणी । तैसें श्रीसद्गुरुवांचोनि । न पावे कोणी निजात्मज्ञान ॥१३३॥
म्हणोनि सद्गुरु हेंचि जीवन । व्हावया पूर्ण निजात्मज्ञान ।  तेचि नेती हळूहळू करोन । अनेक मार्गीं भक्तांसी ॥१३४॥
म्हणोनि सद्गुरु नसतां जगांत । भक्त भुकेनें व्याकुळ होत । तेवींच जगीं साधुसंत । अवतरती जगाच्या कल्याणा ॥१३५॥
एक जातां निजधामासी । दुजा तयार ठेविती त्या जागेसी । तेवींच कळवळती निजमानसीं । स्वामी पांडुरंगाश्रम आपुले ॥१३६॥
परी बघावया भाव भक्तांचा । शिष्य न करूं म्हणती साचा । वावरील उपमेपरी व्हावा प्रेमाचा । सुकाळ अनिवार सकाळ जनीं ॥१३७॥
अर्थात् प्रेमाची लागावी बहुत । क्षुधा निश्चयें निजभक्तांप्रत । म्हणोनि करोनि स्वस्थ चित्त । राहिले जाणा गुरुराय ॥१३८॥
प्रेम वाढो बलवत्तर । करूं तेव्हां शिष्य - स्वीकार । कैसी गति होय जगामाझार । ऐसें हळहळोत भक्त मनीं ॥१३९॥
त्यांचा अवतार म्हणजे जगाचें कल्याण । अंगीं असोनि त्रिकाळ - ज्ञान । शिष्य - स्वीकार न करिती आपण । ऐसें सहज न घडेचि ॥१४०॥
एवं सद्गुरु दयाघन । साक्षात् परमात्मस्वरूपचि पूर्ण । जगाच्या कल्याणा अवतरोन । करी उद्धार जनांचा ॥१४१॥
देह रक्षाया निर्मिलें धान्य । तेवींच व्हावया स्वरूपज्ञान । अवतरोनि स्वयें आपण । समाधान करी भक्तांचें ॥१४२॥
धन धान्य सारी संपत्ति । चराचर देव मानव जगतीं । आपणचि नटला जगत्पति । सार्‍या ब्रह्मांडीं हो जाणा ॥१४३॥
म्हणोनि वरील उपमेमाजीं । अन्न माता सारें गुरुजी । यांसी घेतलें बोलतां सहजीं । चूक न माना श्रोते हो ॥१४४॥
इतुकें मात्र नव्हे ऐका । श्रीगुरूसि उपमाचि न देखा । कवणही दिल्या उपमेसारिखा । दिसे योग्य गुरुराय ॥१४५॥
ऐसा आमुचा सद्गुरुनाथ । काय सांगूं त्याची मात । केवळ परब्रह्मचि असे निश्चित । नाहीं संशय यामाजीं ॥१४६॥
सद्गुरु हाचि निश्र्चयें मोक्ष । त्यावीण नाहीं आणिक विशेष । आनंद कवणही त्रिभुवनीं खास । सत्य सत्य त्रिवाचा ॥१४७॥
असो इकडे भक्तजन । गेले आपुल्या ग्रामालागुन । तळमळती मानसीं रात्रंदिन । स्वामी पाहिजे म्हणोनियां ॥१४८॥
पुढील अध्यायीं बोलूं सारें । शिष्य - स्वीकार करितील त्वरें । हेंचि कथन करूं विस्तारें । सद्गुरुकृपाप्रसादेंचि ॥१४९॥
आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें त्रिचत्वारिंश - । अध्याय गुरुदासें संपविला ॥१५०॥
स्वस्ति श्रीषित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें जळती समग्र । त्रिचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१५१॥
अध्याय ४३॥
ओंव्या १५१॥
ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथ चरणारविंदार्पणमस्तु ॥    
॥ इति त्रिचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP