मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य|

श्री शंकराचार्य वंदना - अध्याय बाविसावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
मातेस घडविले विष्णुदर्शन । शंकरस्मृति झाली निर्माण । शास्त्र थोर रुढीहून । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
शंकरस्मृतीचे होता वचन । खवळले रुढीप्रिय ब्राह्मण । आनंदले सर्व विद्वज्जन । सुरु झाल्या वादसभा ॥३॥
आचार्यांचे शांत सौम्य वर्तन । विरोधी क्रुद्ध उद्विग्न । सामान्यास घडे जे दर्शन । तेणेच होई प्रथम निर्णय ॥४॥
मुखी शास्त्र धर्म सारे । परी आचरणांत कांही नुरे । अशांना कैसे मानावे बरे । इतरांनी मार्तंड धर्मज्ञ ॥५॥
आचार्यांचे सारेच न्यारे । बोलणे तैसेच वागणे । ब्रह्म सर्वत्र सदा पाहणे । तेणे सर्वत्र आनंद ॥६॥
एकेक शास्त्री झाले पराभूत । शंकरस्मृतीस सम्मती देत । आचार्यांचे बनती भक्त । यात्रा चाले पुढे पुढे ॥७॥
केरळ प्रांताची यात्रा संपवून । शृंगेरीस करावे कार्य जाऊन । आचार्यांचा हेतू मनोमन । परी राजशेखराचे वेगळे मत ॥८॥
आचार्यांस पुन्हां पुन्हां विनवून । बोलाविले सर्वास शृगेरीहून । म्हणे विजययात्रा यावी यावी घडून । अनेक शिष्य - भक्तांसह ॥९॥
दिग्विजय यात्रेचे साधन । धर्मनिष्ठा आणि आत्मबल । अद्वैत तत्वज्ञानाचे बोल । वेदमंत्रांचा उद्घोष ॥१०॥
धीर गंभीर वृत्तीनें आचार्य । विरोधकांनी जरी केले कापट्य । अथवा पांडित्याचे खोटे नाट्य । सर्वांसी करिती पराभूत ॥११॥
सोपी नव्हती पुढील वाट । कित्येकदा ओढवे प्राणसंकट । संन्यासधर्माचा लावुनि नेट । यात्रा चाले पुढे थेट ॥१२॥
आचार्यांचे स्पष्ट विचार । मधुर वाणी सहजोद्गार । अद्वैतमताचा सर्वत्र प्रसार । धर्मयात्रेतून घडत राही ॥१३॥
धर्म, सत्य, शांती, मैत्र । सर्वांचे मूळ तत्व अद्वैत । अविद्येने उपजे द्वैत । जे सोडूनि धरावे अद्वैत ॥१४॥
जाणा तुम्हीच आहा भगवंत । तुमचे रुप सच्चिदानंद । आत्मस्वरुपाचा घेऊनि शोध । करावे सार्थक जन्माचे ॥१५॥
ते परब्रह्म तूं आहेस । गुरुपदेशाचा घेऊनि ध्यास । मी ब्रह्म आहे तत्वास । अनुभवावे जीवनांत ॥१६॥
मग राहील कसली खंत । आत्मविश्वास प्रगटेल धगधगीत । कार्य घडेल फलाशारहित । त्यासी जीवन्मुक्ति प्राप्त ॥१७॥
या आत्मविद्येचा अधिकार । लिंग जात वर्ण भेदातीत । जो जो मनी मुक्ति इच्छित । त्या प्रत्येकासी आहे प्राप्त ॥१८॥
ऐसे विचार कानी येतां । धर्मयात्रेचे दृश्य बघतां । दूर होई दुर्बलता । ऐक्य समाजी निर्मिले ॥१९॥
दुःखाचा करुनि अंत । आपापल्या कार्यात होऊनि रत । आत्मतेजा करी जागृत । धर्मध्वजा उचली उंच ॥२०॥
आचार्यांना कुठली विश्रांती । करण्या सर्वांची इच्छापूर्ती । कुठे स्थापिती देवता मूर्ती । कुठे मंदिराची उभारणी ॥२१॥
जैसा समाज उभा पुढती । त्याच्या हिताचे कार्य करिती । आशीर्वाद कोणा देती । स्तोत्रे सुंदर कोणास्तव ॥२२॥
केरळ, कर्नाटक, रामेश्वर । प्रवासामध्ये श्रीरंग, कांचीपूर । कलिंग गाठति आंध्रानंतर । चार्वाक जैन बौद्धांची हार ॥२३॥
जगन्नाथपुरी, मगध, प्रयाग । वाराणसी, उज्जयिनी, गिरीनार । सोमनाथ, प्रभास, द्वारकानगर । सिंधू, काश्मीर, पेशावर ॥२४॥
काश्मीर क्षेत्री होते प्रसिद्ध । सरस्वतीचे शारदा पीठ । मंदीरात उज्ज्वल सर्वज्ञ पीठ । अजिंक्य अनेकांसी तोवरी ॥२५॥
ज्ञानसंपन्न व्यक्तिचा अधिकार । आरोहण सर्वज्ञ पीठावर । सर्व पंथांचे विद्वत्वर । जेव्हां देतील होकार ॥२६॥
सर्व शास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास । तत्वज्ञानाची धरुनी कास । समन्वयपूर्वक विवेचन खास । मान्य व्हावे सर्वांस ॥२७॥
यासाठी चारी द्वारावर । बसती अनेक विद्वत्वर । गूढ प्रश्न पुसती सत्वर । जो चढू पाहे पीठावर ॥२८॥
सर्व शास्त्री पंडित । जरी होतील पराभूत । खुद्द शारदेने द्यावे मत । तेव्हांच घडेल आरोहण ॥२९॥
शिष्य विनविती आचार्या । विजययात्रेची संपन्नता । शारदा पीठाची मान्यता । घेऊनि करावी सार्थकता ॥३०॥
नव्हता ज्ञानाचा अहंकार । नव्हती सन्मानाची हाव । गाजवावे आपुले नांव । हे ही नको आचार्यांस ॥३१॥
परी हट्ट शिष्यांचा । वेदान्ताची वाढावी प्रतिष्ठा । शारदा चरणी सर्वांसि निष्ठा । आरोहणातून व्यक्त व्हावी ॥३२॥
विचारपूर्वक उठती शंकर । उभे राहती पीठासमोर । पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर । प्रदक्षिणेचा धरती मार्ग ॥३३॥
मार्गी बैसलेले तत्वज्ञ । कणाद, गौतम, नैयायिक । बौद्ध, जैन, मीमांसक । करिती नाना तर्‍हेचे प्रश्न ॥३४॥
कोणी पाहती तपासून । खरेच कां हे सर्वज्ञ । माझ्या पंथाचेही तज्ज्ञ । तत्वाधिष्ठित वादविवाद ॥३५॥
पदार्थतत्व नेमके काय । अस्तिकाय म्हणजे काय । आमच्या पंथाचे मर्म काय । वेदान्ताहून कसे भिन्न ॥३६॥
सौम्य शांत मधुर स्वरे । आचार्य देती उत्तरे । ऐकूनि प्रसन्न होती सारे । सर्वशास्त्रविशारद खरेच हे ॥३७॥
विनविती चलावे मंदीरात । शारदेचे काय मनोगत । दैवीवाणीचा अपूर्व स्रोत । येईल कां कानावर ॥३८॥
आचार्य जोडुनि दोन्ही हात । उभे राहून मंदीरात । शारदेची विनवणी आर्त । करिती अत्यंत आदरे ॥३९॥
शारदा होऊनि प्रसन्न । गंभीर दैवी वाणीनें बोलत । “ वत्सा, संतोषले माझे चित्त । खरोखर तूं सर्वज्ञ ॥४०॥
करी पीठावर आरोहण । तूंच सर्वथा अससी योग्य । सर्वज्ञ म्हणूनि सर्वा मान्य । राहशील चिरंतन ” ॥४१॥
नम्रपणे आदिशंकर । चढले सर्वज्ञ पीठावर । लोक करिती जयजयकार । वार्ता पसरे सर्वत्र ॥४२॥
चारी दिशांच्या तीर्थयात्रा । संपन्न होई धर्मयात्रा । वैभव, आदर, वेदमंत्रा । लाभे आसेतूहिमाचल ॥४३॥
आचार्यांचे अखंड भ्रमण । पंथोपपंथांचे मार्तंड शरण । वाद संपता धरिती चरण । प्रचारक होती वैदिकधर्माचे ॥४४॥
जगन्नाथपुरीस गोवर्धन मठ । द्वारकेस कालिका पीठ । चार दिशांस चार मठ । चिदंबरक्षेत्री नटराज मंदीर ॥४५॥
चालाए कार्य शतकानुशतके । म्हणोन व्यवस्था विचारपूर्वक । ग्रंथरचना जाणीवपूर्वक । ‘ मठाम्नायसेतू ’ नामक ॥४६॥
जाणीव होती अल्पायुषाची । शिदोरी संपत आली बत्तीस वर्षांची । आता तयारी महासमाधीची । हवी कराया सत्वर ॥४७॥
आचार्य राहू लागले मौन । कुणासही पडेना तेणे चैन । राजेश्वर सांगे विनवून । कांचीस चलावे आता आपण ॥४८॥
आचार्यांचा मिळता होकार । राजशेखराच्या मनी विचार । आचार्यांनी चढावे सर्वज्ञ पीठावर । महोत्सव व्हावा कांचीस ॥४९॥
शंकराचार्यांचे सर्वज्ञत्व । सिद्ध झाले जे काश्मीरांत । नोंदले राहावे इतिहासात । म्हणून स्थापावे कांचीत ॥५०॥
सर्व भक्त आणि शिष्य । राजशेखरासी पूर्ण सहमत । आपापले सांगती मनोगत । कैसे असावे सर्वज्ञपीठ ॥५१॥
ज्येष्ठ शिष्य सुरेश्वराचार्य । त्यांचा सल्ला मागे राजशेखर । जाणतां आचार्यांचे विचार । मिळेल कां त्यांचा होकार ॥५२॥
सांगती सुरेश्वर मनापासून । “ आचार्यांस साजेसे सिंहासन । घ्यावेस तूं बनवून । होकार मिळविणे आमचे काम ॥५३॥
काश्मीरांतील शारदा पीठ । सर्वांना करुन पराभूत । आचार्यांनी केले पादाक्रांत । त्याचीच करु पुनरावृत्ति ॥५४॥
चढण्या सर्वज्ञ पीठावर । बनवल्या पायर्‍या चौर्‍याण्णव । त्यांचे सांगतो विवरण । सर्वांनी घ्यावे समजावून ॥५५॥
चौसष्ट कलांच्या चौसष्ट । चौदा विद्यांस्तव चौदा पायर्‍या । षड्शास्त्राच्या सहा पायर्‍या । षडंग वेदांच्या आणि दहा ॥५६॥
त्यावरी राजा हवे तैसे । सिंहासन रत्नजडित सोन्याचे । ठरेल वैभव तुच्छ साचे । श्रीमत् शंकराचार्यांपुढे ॥५७॥
आचार्यांसह शास्त्रार्थ वाद । अजून करणे असेल कोणास । पंथोपपंथींच्या पंडितांस । आमंत्रित करावे कांचीस ॥५८॥
वादसभेच्या अखेरीस । जो कोणी सर्वज्ञ ठरेल । तोच कांची पीठावर चढेल । सर्वांच्या सम्मती साक्षीने ॥५९॥
आचार्य हे करतील मान्य । सत्तावैभवाचा जरी ना लोभ । वेदान्तप्रतिष्ठेचा परी लोभ । सांग कैसा सोडवेल ॥६०॥
तेच त्यांच्या जीवनाचे ध्येय । त्यासाठी होते कष्ट अनिवार्य । तैसे पीठारुढत्वही अपरिहार्य । सांगू आम्ही आग्रहानें ॥६१॥
चार दिशांत चार मठ । शिष्यांसाठी केले प्रतिष्ठित । आम्हां वाटते सदा खंत । नाही स्थापिले गुरुपीठ ” ॥६२॥
सुरेश्वराचार्य झाले सद्गदित । अश्रू उभे नयनांत । शब्द अडकले कंठात । मौनेच संपले मनोगत ॥६३॥
काय घडले भविष्यात । योजनेस मिळे कां होकार । झाले कां आरुढ पीठावर । जाणावे पुढील अध्यायी ॥६४॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । बावीसावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । पूर्ण होवो ग्रंथ सार्थ ॥६५॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP