शतश्लोकी - श्लोक ३४
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
स्वप्नावस्थानुभूतं शुभमथ विषमं तन्मृषा जागरे
स्याज्जाग्रत्यां स्थूलदेहव्यवहृतिविषयं तनमृषा स्वप्नकाले ।
इत्थं मिथ्यात्वसिद्धावनिशमुभयथा सज्जते तत्र मूढः
सत्येतद्भासकेऽस्मिन्निह हि कुत इदं तन्न विद्मो वयंहि ॥३४॥
अन्वयार्थ-‘स्वप्नावस्थानुभूतं यत् शुभं अथ विषमं तत् जागर मृषा स्यात-’ स्वप्नावस्थेमध्यें अनुभविलेलें शुभ किंवा अशुभ विषय जाग्रदवस्थेंत खोटे ठरतात. ‘जाग्रत्यां यत् स्थूलदेहव्यवहृतिविषयं तत् स्वप्नकाले मृषा स्यात’ तसेंच, जाग्रतीमध्यें जे स्थूल देहाच्या व्यवहारांतील विषय ते स्वप्नामध्यें खोटे ठरतात. ‘इत्थं उभयथा मिथ्यात्वासिद्धौ इह हि अस्मिन् एतत्भासके सति अनिशं तत्र मूढः सज्जते-’ ह्याप्रमाणें दोन्ही प्रकारांनीं विषय मिथ्या आहेत असें सिद्ध होऊन, त्या दोन्ही अवस्थांचा भासक हा अंतरात्मा येथें प्रत्यक्षसिद्ध असतांही मूढ पुरुष सतत विषयांच्या ठिकाणीं आसक्त होतो.‘तदिदं कुतः इति वयं न विद्मं हि-’ पण हें असें कां होतें हें आम्हांला कळत नाहीं. आतां ह्या चवतिसाव्या श्लोकामध्यें जाग्रत् व स्वप्नं ह्या दोन्ही अवस्था भ्रममूलक आहेत, असें आचार्य प्रतिपादन करितात. स्वाप्निक राज्यप्राप्ति इत्यादि इष्ट भोग व व्याघ्रानें भक्षण करणें, सर्पदंश होणें इत्यादि अनिष्ट भोग त्या अवस्थेमध्यें जरी सुखदुःख देत असले तरी जाग्रतींत ते खोटे आहेत असा मनाचा निश्चय होतो. तसेंच जाग्रतींत स्थूलदेद्वारा प्राप्त होणारे मिष्टान्नभोजन, स्त्री-पुत्र धनादिप्राप्ति इत्यादि इष्ट, व शरीरपीडा, मानसिकव्यथा इत्यादि अनिष्ट भोग स्वप्नावस्थेंत खोटे ठरतात. याप्रमाणें ह्या अवस्था खोट्या आहेत, असें सिद्ध झालें असतां, व त्या दोन्ही अवस्थांचा प्रकाशक (म्हणजे ज्ञान किंवा स्मरण करून देणारा) आत्मा प्रत्यक्ष प्रत्ययाला येत असतां मूर्ख पुरुष विषयांमध्यें कां आसक्त होतात हें आम्हांला मुळींच समजत नाहीं ]३४.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP