भक्तिपर पदे - भाग २

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१३४१
( राग-अहेरी; ताल-धुमाळी; चाल-देव पावला रे० )
फांवलें रे हरिसुख फांवलें रे ॥ध्रु०॥
राया दशरथा नृपासी । माते कौसल्ये जननीसी । नगरवासियां लोकांसी । हरिसुख फावलें रे ॥१॥
जें सुख फांवलें त्निंबका । जें सुख फांवलें वाल्मीका । तें रामदास रंका ॥२॥

१३४२
( राग-असावरी; ताल-धुमाळीं. )
रघुनाथ अनाथ सनाथ करितो । मुक्त सदाशिव काशी । दोष विशेष निःशेष नासती । नाम स्वर्गपदवासी ॥ध्रु०॥
नर वान्नर जळचर शरणांगत दीन अनाथ । खेचर भूचर जीव निशाचर तारिले भुवननाथें ॥१॥
रघुराज विराज विराजित ब्रीद दैत्यकाळमद राहे । वाजत गाजत साजत वांकी काय कोण महिमा हे ॥२॥
दास उदास सदा समबुद्धि विषमबुद्धि असेना । राम आराम विराम तेणेंविण वसेना ॥३॥

१३४३
( राग-मैरवी;   ताल-धुमाळी; चाल-कैवारी हनुमान० )
राम करी सांभाळ । दिनांचा ॥ध्रु०॥
सुरवर मुनिवर योगि विद्याधर । रीस हरी प्रतिपाळ ॥१॥
सुरपतिनरपति अवनिसुतापती । रामदासीं दयाळ॥२॥

१३४४
( चाल-झाली संध्या संदेह माझा० )
सगुणीं सगुण गुणीं गुंतलें रे । चित्त हें चंचळ विगुंतलें रे ॥ध्रु०॥
भक्तीचें लक्षण भक्त जाणती रे । प्रेमें अंतरीं खूण बाणती रे ॥१॥
प्रीतीचें लक्षण नये सांगतां रे । अंतर गुंतलें नये मागतां रे ॥२॥
राम हा सगुणीं गुणें आगळा रे । रामदासीं नव्हे जिवावेगळा रे ॥३॥

१३४५
( चाल-चौचरणी अमंगाप्रमाणें )
भजन दे देवराया । निरसीं सकळ माया । तुजलागीं पावावया । तुझिये द्येची छाया ॥ध्रु०॥
रघुनाथा तुजवीण । होतसे सकळ शीण । लौकिक परम हीन । मज नको रे कठीण ॥१॥
मज नाहीं रे आधार । तुजवीण निराधार । निववीं माझें अंतर । सांभाळावें निरंतर ॥२॥
सत्यवादी रघुराज । माझी नव्हे तुझी लाज । दूरिं धरूं नको मज । रामदास पदरज ॥३॥

१३४६
( राग-कफी; ताल-दीपचंदी; चाल-कशि रे तुज कृष्णा लाज नसे )
करुणाकर अंतर जाणतसे ॥ध्रु०॥
न बोलतां जनीं भाविक भजनी । संकट वारितसे ॥१॥
भक्तवेळाहतु सगुण अनंत । भाविका रक्षितसे ॥२॥
दास जनीं वनिं चिंतित चिंतनीं । अंतरिं जो विलसे ॥३॥

१३४७
( राग-कल्याण; ताल-धुमाळी )
माझी चिंता मज नाहीं रे ॥ध्रु॥
भक्तजनाचा भारचि वाहे । मज हें न कळे काई ॥१॥ पापविनाशन संकटनाशन ।
पावतसे लवलाहीं ॥२॥ दास म्हणे भवपाशा तुटाया । संशय नलगे कांहीं ॥३॥

१३४८
( राग-मैरव; ताल-धुमाळी )
रे मानवा उगीच आमुचीं जिणीं । आम्हां ध्यानीं भेटीची शिराणी ॥ध्रु०॥
नरापरिस वान्नर भले । जिहीं डोळां राम देखियेले । ज्यासी रघुराज हितगुज बोले । कोण्या भाग्यें भगवंत भेटलें ॥१॥
रामीं मिनले ते असो नीच याती । त्यांच्या चरणांची वंदीन माती । नित्य नव्हाळी गाउनि करुं किती । तेणें रघुनाथीं उपजेल प्रीती ॥२॥
रामीरामदास म्हणे ऐका करूं । या रे आम्ही तैसाचि भावा धरूं । भक्तिप्रेमाचा दाऊं निर्धारू । तेणें आम्हां भेटेल रघुवीरू ॥३॥

१३४९
( ताल-दादरा; चाल-हे दयाळुवा )
मम जननी रे मम जनकू रे । मम स्वामी हा रे मत्सखा हा रे ॥ध्रु०॥
सुखकारकु रे दुःखहारकु रे । भवतारकु रे उद्धारकु रे ॥१॥
करुणाकरु रे गुणसागरु रे । पूर्वापरु रे दासा वरू रे ॥२॥

१३५०
( चाल-अर्जुना तूं जाण० )
पूर्ण ब्रह्म होय गे । वर्णू मी आतां काय गे ॥ नंदा ज्याचा बाप त्याची । यशोदा ती माय गे ॥ध्रु०॥
क्षीरसागरावासी गे । लक्ष्मी त्याची दासी गे ॥ अर्जुनाचे घोडे धुतां । लाज नाही त्यासी गे ॥१॥
अनाथाचा नाथ गे । त्याला कैसी जात गे ॥ चोखामेळ्यासंगें जेवी । दहीं दूध भात गे ॥२॥
नंदाचा जो नंद गे । सर्व सुखाचा कंद गे ॥ रामदास प्रेमें गाय । नित्य ज्याचा छंद गे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 16, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP