मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय १

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


मंगलाचरण

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यैनमः ॥ श्रीगुरुभ्योनमः ॥ श्रीकुलदेवतायैनमः ॥ श्रीमातापितृभ्यांनमः ॥

जय जय पांडुरंग रुक्मिणीवरा । अचळ अढळ निर्विकारा ।

लीलाविग्रही करुणाकरा । सर्वेश्वरा आदिपुरुषा ॥१॥

जयजयाजी करुणामूर्ती । अनंत अपार तुझी कीर्ती ।

अनंतलीला नाना रीतीं । वर्णितां श्रुती कुंठित ॥२॥

तुवां निज भक्तांच्या कैवारें । घेतले दहा अवतार ।

दुष्टदैत्त्य मारुनि दुर्धर । रक्षिलें साचार निज दासां ॥३॥

आतां कलियुगामाजी साचार । वसविलें पुंडलीकाचें द्वार ।

जघनीं ठेवूनि दोन्ही कर । उभा इटेवर अससी ॥४॥

नासाग्रीं ठेवूनियां दृष्टी । भक्तांसि पाहसी कृपादृष्टीं ।

भाविक जनांसि देऊनि भेटी । भवसंकटीं रक्षिसी ॥५॥

तूंचि झालासि लंबोदर । चौदा विद्यांचा गुणसागर ।

तूंचि चतुर्भुज परशुधर । सर्वांगीं सिंदूर चर्चिला ॥६॥

स्वानंद रसाचे मोदक । निज भक्तांसि देशी भातुकें ।

त्या महाप्रसादाचेनि हरिखें । सप्रेम सुखें डुल्लती ॥७॥

तुझें नृत्य पाहूनि गणपती । आनंदें डोले कैलासपती ।

चौसष्ट कळा उभ्या राहती । घेऊनि हातीं टाळ-विणे ॥८॥

तूं कीर्तनीं उभा जये वेळ । विबुध एकाग्र बैसती सकळ ।

मान तुकावी आखंडळ । घागर्‍या मंजुळ ऐकुनी ॥९॥

ऐसा तूं गौरीकुमार । सकळ विद्यांचा गुणसागर ।

आतां मज देऊनि अभयवर । संतचरित्रें वदवावीं ॥१०॥

आतां नमूं हंसवाहिनी । जे कां सरस्वती ब्रह्मनंदिनी ।

सकळ चातुर्य जियेपासुनी । होय स्वामिनी नांवरुपां ॥११॥

शुभ्रवस्त्र नेसली सोज्ज्वळ । आरक्त कुंकुमें शोभे निढंळ ।

मस्तकीं केश असती कुरळ । कंचुकीवर पुष्पमाळ शोभती ॥१२॥

हातीं घेउनि ब्रह्मविणा । सदा वर्णीत भगवद्गुणां ।

जिच्या कृपेनें कवि नाना । काव्य रचना बोलती ॥१३॥

आतां सद्गुरु तुकाराम समर्थ । तयासि माझा प्रणिपात ।

ज्याणें अवतार घेऊनि मृत्युलोकांत । दाविला भक्तिपंथ साधका ॥१४॥

योगयाग आणि व्रत । कलियुगीं नव्हेचि यथास्थित ।

नाम संकीर्तनीं तरतील बहुत । वचन व्यासोक्तं भागवती ॥१५॥

त्याचा अर्थ सखोल परम । जड मूढांसि नकळेचि वर्म ।

यास्तव अवतार तुकाराम । साधकांसि नेम लावावया ॥१६॥

ज्याणें नामसंकीर्तन करुनियां । निरसिली सकळ प्रपंचमाया ।

सद्भावें आळवूनि पंढरीराया । केली काया ब्रह्मरुप ॥१७॥

मग प्रसन्न होऊनि रुक्मिणीकांत । चुकविला काळाचा आघात ।

वैकुंठभुवनीं देहासहित । नेलें तुकयातें कलियुगीं ॥१८॥

ज्यांचे अभंग निषेधूनि समस्त । द्विजांनी बुडविले उदंकांत ।

परी तेरा दिवस पंढरीनाथें । कोरडे ग्रंथ रक्षिले ॥१९॥

जो भक्तिज्ञान-वैराग्य पुतळा । ज्यांचे अंगीं अनंत कळा ।

तो सद्गुरु आम्हांसि जोडला । स्वप्नीं दीधला उपदेश ॥२०॥

मी तरी सर्वांविषयीं हीन । ऐसें साक्ष देतसें मन ।

परी कृपा केली कवण्यागुणें । त्याचें कारण तो जाणे ॥२१॥

आंधारानें कोंदलें अंबर । त्यासि प्रकाशमान करी दिनकर ।

कां परीस लोहासि लागतां सत्वर । काळिमा अणुमात्र न राहे ॥२२॥

कां अमंगळ पाणी एकवट । त्यावरी आला गंगेचा लोट ।

तें पवित्रपणें होय गोमटें । मग महामुनि श्रेष्ठ वंदिती ॥२३॥

तेवीं सद्गुरुकृपेचेनि वैभव । ज्ञान अज्ञान गेलें सर्व ।

मग जाणपणाचा अहंभाव । त्याचाही ठाव पूसिला ॥२४॥

जैसें समुद्रासि मिळतां गंगेचें आप । तत्काळ निरसे नांवरुप ।

कां अग्नि इंधन जाळीतसे कोपें । मग आपुल्या स्वरुपें विझे जैसा ॥२५॥

तैसेंचि केलें सद्गुरुनाथें । अज्ञान ज्ञान निरसिलें समस्त ।

सर्वदा राहोनि हृदयस्थ । स्वयें वदवीत भक्तकथा ॥२६॥

आतां महा कवि पुरातन । ग्रंथारंभीं तयासि नमन ।

ज्यांची काव्यरचना गीर्वाण । संस्कृत पुराणें निर्मिलीं ॥२७॥

भवाब्धि हा दुस्तरं सहज । त्यांत श्रीरामकथा निर्मिलें जाहाज ।

तो वाल्मीकि मुनिमहाराजे । साधिलें काज बहुतांचें ॥२८॥

नसतां श्रीराम अवतार पूर्ण । आधींच भविष्य कथिलें तेणें ।

शतकोटि ग्रंथ केला जेणें । त्याचे चरण वंदिले ॥२९॥

वेदशास्त्राचें करोनि मंथन । महाभारत निर्मिलें जाण ।

तो सत्यवतीहृदयरत्‍न । द्वैपायन नमस्कारुं ॥३०॥

उपजलों जयाचे गोत्रीं जाण । तया वसिष्ठासि साष्टांग नमन ।

तिहीं आपुले कृपें करुन । ग्रंथ संपूर्ण सिद्धि न्यावा ॥३१॥

आतां प्राकृत कवि महासंत । जे ईश्वरी अवतार साक्षात ।

जग विख्यात ज्यांचे ग्रंथ । तयांसि प्रणिपात करितसें ॥३२॥

साक्षात विष्णूचा अवतार । ज्ञानदेव योगेश्वरा ।

गीतेचा अर्थ सखोल थोर । प्राकृत साचार तो केला ॥३३॥

प्रतिष्ठानीं ब्राह्मणीं छळितां निश्चिती । वेद बोलविले रेडया हातीं ।

आणि चांगदेव व्याघ्रावरी बैसोनि येती । मग चालविली भिंती प्रतापें ॥३४॥

निवृत्ति ज्ञानदेव सोपानेश्वर । जीवनमुक्त मुक्‍ताबाई सुंदर ।

ग्रंथारंभीं नमस्कार । वारंवार तयांसी ॥३५॥

जो उद्धवाचा अवतार साक्षात । नामदेव कलियुगांत ।

शतकोटि अभंग वदला प्राकृत । तयांसि दंडवत सद्भावें ॥३६॥

एकनाथ पूर्णज्ञानी । अवतार जाहला प्रतिष्ठानीं ।

ज्याणें विष्णुअर्चन ब्राह्मणपूजनीं । सेवा करुनि ऋणी देव केला ॥३७॥

ज्याची भक्ति देखोनि चोखडी । श्रीकृष्णें खांदा घेतली कावडी ।

पाणी वाहत लवडसवडी । सप्रेम गोडी भक्तीची ॥३८॥

विवेकसिंधु अध्यात्मग्रंथ । श्रीमुकुंदराज विरचित ।

दत्त अनुग्रही दासोपंत । सद्भावें प्रणिपात तयासी ॥३९॥

जो मारुति अवतार साक्षात । रामदास मूर्तिमंत ।

ज्यांनीं दासबोध रचोनि ग्रंथ । संप्रदाय बहुत वाढविला ॥४०॥

जो सकळ चातुर्यांची खाणी । मुक्तेश्वर कवि प्रसिद्ध जनीं ।

भारतीं टीका केली त्यांणीं । ऐकतां श्रवणीं सुख वाटे ॥४१॥

वामनस्वामी चतुर पंडित । ज्याची श्लोकरचना अनुपम दिसत ।

त्यांणीं दशमस्कंध भागवत । केले प्राकृत निजप्रीतीं ॥४२॥

हरिविजय रामविजय अद्भुत । पांडवप्रताप केले ग्रंथ ।

ते नाझरेकर श्रीधरसमर्थ । राहिले पंढरींत निजप्रीतीं ॥४३॥

ऐसे संत प्रसिद्ध जनीं । वरदी ग्रंथ स्थापिले ज्यांणीं ।

वारंवार लोटांगनी । तयांचे चरणीं मी असें ॥४४॥

इहीं साह्य होऊनि मातें । सिद्धीसि न्यावा संपूर्ण ग्रंथ ।

जैसे दुर्बळा गृहीं मांडिलें कृत्य । साहित्य श्रीमंत पुरविती ॥४५॥

तैसाचि मी मतिहीन । नेणें कवित्वकळालक्षण ।

ग्रंथ प्रारंभ केला जाण । भरंवसा धरुन संतांचा ॥४६॥

एक एक अक्षराची भीक । कृपा करुनि द्याल सकळिक ।

तरीच वाढेल माझा लौकिक । सप्रेम सुख श्रोतयां ॥४७॥

जैसी पाकसिद्धीची खटपटी । अज्ञान बाळक न पाहे दृष्टीं ।

परी माता लोभ धरोनि पोटीं । कवळ होंटीं लावी त्याच्या ॥४८॥

तैशाचि परी केलें संतीं । आयतीच ओवी आठवूनि देती ।

मज मूढाहातीं लिहविती । माझी प्रचीती मी जाणें ॥४९॥

आतां नमूं श्रोते सज्जन । जे कां श्रवणार्थी बहुत निपुण ।

तिहीं एकाग्र करुनि मन । अनुसंधान परिसिजे ॥५०॥

जरी श्रोतयांचें चित्त चंचळ । श्रवणार्थीं न बैसे निश्चळ ।

तरी कवीचें लाघव सकळ । सप्रेम वितळते ठायीं ॥५१॥

षंढापासी सुंदर कामिन । कां ज्वरितासि वाढविलें मिष्टान्न ।

बधिरापुढें करितां गायन । सुखसंपन्न नव्हे वक्ता ॥५२॥

आंधळ्यास आरसा दाखविला कोडें । तरी तो न पाहेचि तयाकडे ।

ज्यासि श्रवणाची नाहीं चाड । पाषाणहृदय तैसा तो ॥५३॥

तैसे न व्हां तुम्ही सज्जन । जाणा वक्‍त्याचें अंतःकरण ।

अर्थान्वयीं असोनि निपुण । नेणतपण धरीतसां ॥५४॥

माझी योग्यता पाहाल जरी । तरी मूढमति सर्वप्रकारीं ।

अक्षरवटिका बरोबरी । नेणें साचार मेळवूं ॥५५॥

सद्भावें महाकवीचे चरण । धुवोनि केलें तीर्थप्राशन ।

तयांचिया कृपागुणें । प्रसादवचन बोलतों ॥५६॥

जैसी भवति भिक्षा करोनि नगरीं । विद्यार्थी मागत माधूकरी ।

त्याची क्षुधां हरण होय परी । चूल घरीं न पेटे ॥५७॥

तैसें माझें वक्‍तृत्व बरें । पदरींचें नाहीं एक अक्षर ।

हिंडूनि संतांच्या दारोदार । पोटभर जेवीतसें ॥५८॥

परी भिक्षेचें अन्न परमपवित्र । शास्त्रीं निर्णय केला थोर ।

साधक जनीं सेविलें जर । तरी बुद्धि विस्तारे तयाची ॥५९॥

ज्यांसि श्रीहरीची प्राप्ति व्हावी । ऐसी आस्था असेल कांहीं ।

तिहीं होऊनि जीवीं । चरित्रें ऐकावी संतांचीं ॥६०॥

ज्यांसि श्रीहरीची गीत । एकादशांत वदले श्रीकृष्णनाथ ।

तया लक्षणाचें पुरत । अवतरले संत कलियुगीं ॥६१॥

कीं गीतेमाजी द्वादशांत निश्चितीं । श्रीभक्तांचीं लक्षणें सांगें श्रीपती ।

तैसीच करोनि दावावया स्थिती । अवतार संतीं घेतला ॥६२॥

जनांमध्येंचि असती संत । विश्वमात्रासही दिसत ।

परी विकल्पें करुनि नाडि बहुत । अवगुण लक्षिती दृष्टीसीं ॥६३॥

संतांपासीं अवगुण । दिसावया काय कारण ।

येविषयीं आशंकित मन । तरीं तेंही कारण अवधारा ॥६४॥

मातेसि आवडी बाळकांची मोठी । वस्त्रें भूषणें लेववी गोमटीं ।

परी झणी कोणाची होईल दृष्टी । मग मैस बोटीं लावीत मुखा ॥६५॥

तेवीं भक्ति ज्ञान वैराग्य निश्चित । भक्‍तां श्रृंगारी वैकुंठनाथ ।

परी लोकनिंदा व्हावया निश्चित । अवगुण ठेवीत एक तयां ॥६६॥

बाळकाच्या मुखास दिसतें काळें । परी माता म्हणे म्यांच लाविलें ।

तेवीं आपुल्या दासांचे दीनदयाळें । गुणदोष सर्वकाळ न पाहे ॥६७॥

येचिविषयीं तुम्हीं समस्त । पुराणप्रसिद्ध ऐका भक्त ।

नारदमुनि वैष्णवसंत । परी कळिलावा म्हणत तयालागीं ॥६८॥

श्रीरामभक्‍त परम मारुती । त्यासि क्षणभरी न विसंबे रघुपती ।

परी वानरचेष्टा त्या असती । त्या न जातीच सर्वथा ॥६९॥

गरुड विष्णूंचे वाहन । सर्वदा सन्निध असे जाण ।

परी सर्प भक्षितो म्हणवून । त्यासि जगज्जीवन नुपेक्षी ॥७०॥

निंदक सद्‌गुण नाठवूनि कांहीं । स्वाभाविक अवगुण धरिती जीवीं ।

जैसी चाळणी पीठ गाळूनि सर्वही । फुलकट ठेवी आपणांत ॥७१॥

असो आतां हें भाषण । वाग्देवीस होईल शीण ।

जनांत अवतरले संतसज्जन । ते इतरांसमान न म्हणावे ॥७२॥

सरिता नव्हे भागीरथी । श्रीविष्णुचरणीं तिची वस्ती ।

दर्शनें पापताप नासती । तैशाचि मूर्ती संतांच्या ॥७३॥

पाषाणं म्हणों नये परिसा । विष्णु अवतार नव्हे मासा ।

वराह इतर डुकरा ऐसा । लेखों सहसा नयेची ॥७४॥

स्तंभांत प्रगटला हरी । तयासि म्हणों नये केसरी ।

जरी तो ब्राह्मणाचा वेषधारी । परी वामन भिकारी न म्हणावा ॥७५॥

इतर ब्राह्मण रागीट बहुत । तैसा नव्हे रेणुकासुत ।

भूपति म्हणों नये रघुनाथ । नामेंचि तारित विश्वातें ॥७६॥

श्रीकृष्ण परब्रह्म अवतार लीला । तयासि म्हणों नये गोवळा ।

तैसे संत दिसती डोळां । परी मनुष्य त्यांजला म्हणों नये ॥७७॥

धनवरी गावे श्रीहरीचे गुण । आणि जगदुद्धार करावा पूर्ण ।

यास्तव अवतरले संतसज्जन । आणिक कारण नसे कीं ॥७८॥

त्यांचीं चरित्रें व्हावया प्रख्यात । युक्‍ति केली पंढरीनाथें ।

मज पुढें करुनि निमित्त । श्रीभक्तविजय ग्रंथ वदविला ॥७९॥

दुसरा संतलीलामृतसार । त्यांतही चरित्रें वर्णिलीं फार ।

परी आणिक कथा राहिल्या अपार । मग रुक्मिणीवरें आज्ञापिलें ॥८०॥

म्हणोनि भक्तलीलामृत जाण । ग्रंथ आरंभिला दुसर्‍यानें ।

तंव श्रोते आशंकित होऊनि मनें । करिती प्रश्न वक्‍तया ॥८१॥

संतचरित्रें तीं ठायीं । वर्णावयासि कारण कायी ।

हाचि संशय आमुच्या जीवीं । एकचि ग्रंथ का न केला ॥८२॥

तरी येचिविषयीं ऐका सादर । देवभक्तांचीं चरित्रें फार ।

जैसा का अफाट समीर । नायके उत्तर कोणाचें ॥८३॥

ऐसा जो का प्रभंजन । कैसा होय आपुल्या स्वाधीन ।

मग विंझणा करोनि निर्माण । हालवि त्या आधीन होय वारा ॥८४॥

तैसीं श्रीहरीचीं चरित्रें बहुत । बहुतां ऋषीचें बहुमत ।

मग श्रीव्यासें करुनि युक्त । पुराणें निर्मित अठरा ॥८५॥

तरी धन नपुरेचि जाण । नाकळती अनंताचे गुण ।

मग आणिकही उपपुराणें । द्वैपायन करीतसे ॥८६॥

एकचि वेद असता थोर । तरी ब्राह्मण पढते कोठवर ।

म्हणोनि शाखापरत्वें सार । केले भाग चार तयाचे ॥८७॥

कां एकचि असतें रामायण । तरी संपूर्ण ग्रंथ न होता श्रवण ।

म्हणोनि सप्त कांडें पूर्ण । वाल्मीकि मुनिनें विभागिलीं ॥८८॥

कां अवघ्या भारतीं तत्वता । वर्णिल्या कौरव पांडवांच्या कथा ।

इतुका ग्रंथ एकचि असता । तरी तो नाकळता कोणाहि ॥८९॥

मग व्यास नारायणें निजांगें । त्याचे केले अठरा भाग ।

एकचि पर्व ऐकतां चांग । तरी सकळ जग उद्धरे ॥९०॥

कलियुगीं भक्त शिरोमणी । बहुत झाले सत्वगुणी ।

ज्यांनीं सत्त्वासि न करोनि हानी । चक्रपाणी वश्य केला ॥९१॥

त्यांची चरित्रें संपूर्ण । एकदाचि बुद्धी नाकळती जाण ।

जेव्हां जी झाली आठवण । तीं चरित्रें लिहून ठेविलीं ॥९२॥

यास्तव संतचरित्रें पाहीं । विभागिली तिहीं ठायीं ।

ऐसा दृष्टांत देतांचि कवि । श्रोते सर्वही संतोषलें ॥९३॥

म्हणती मागील महाकवीचें मत । आम्हांसि निवेदिलें समस्त ।

तेणेंचि निःसंशय जाहलें चित्त । प्रेमभरित जाहलों ॥९४॥

आतां सोडूनि सकळ स्तवन । अनुसंधानीं लाविजे मन ।

ऐसी आज्ञा करितां सज्जन । महीपति चरण वंदितसे ॥९५॥

म्हणे ऐकावें देवोनि चित्त । कलियुगीं घर्म लोपले समस्त ।

तरणोपाय नसे किंचित । मग आज्ञा करीत जगदात्मा ॥९६॥

निजभक्तांसि वैकुंठपती । म्हणे तुम्हीं अवतार घ्यावें क्षितीं ।

गावोनि माझी सद्गुणकीर्ति । सगुणभक्ति स्थापिजे ॥९७॥

नामस्मरणाविण कांहीं । कलियुगीं तरणोपाय नाहीं ।

ऐसें सांगतांचि शेषशायी । निजभक्त पायीं लागले ॥९८॥

म्हणती तुवां जगज्जीवनें । मागें दश अवतार घेऊनि ।

दुष्ट दैत्यांसि मारोनी । धर्मस्थापन पैं केलें ॥९९॥

आतां आम्हां आधीन हेंचि कृत्य । षड्‌वैरी जिंकोनि समस्त ।

जनासि दाखवूनि भक्‍तिपंथ । सेवूं नामामृत धरणीवरी ॥१००॥

ऐसें बोलोनियां उत्तर । मग नमस्कारिला इंदिरावर ।

संतीं घेतले अवतार । विश्वोद्धार करावया ॥१॥

त्यांची चरित्रें श्रीव्यासमुनी । बोलिले भविष्योत्तरपुराणीं ।

परी तो ग्रंथ पिनाकपाणी । कैलास भुवनीं ठेवितसे ॥२॥

जैसें श्रीरामचरित्र वाल्मीकीनें । आधींच भविष्य कथिलें जाण ।

शतकोटि ग्रंथ ठेविला लिहून । पुढें आलें घडोन तैशाच रीतीं ॥३॥

तैसें भविष्योत्तर पुराणांत । कलियुगींचे वर्णिले भक्त ।

परी तो कैलासीं राहिला ग्रंथ । नाहीं समस्त या लोकीं ॥४॥

तरी संतचरित्रें अति गहन । प्रख्यात जाहलीं कोठून ।

ऐसी आशंका धराल मनें । तेही कारण अवधारा ॥५॥

तो हिंदुस्थान देशांत पूर्ण । नाभाजी नामें वैष्णव जन ।

संतचरित्रे वर्णिलीं त्यानें । ग्वाल्हेर भाषेनें निश्चित ॥६॥

तयाच्या आधारें निश्चित । वदतसें भक्तलीलामृत ।

तंव श्रोते होऊनि आशंकित । प्रश्न करीत वक्‍तया ॥७॥

म्हणती नाभाजी यातील कोण । काय आचरला अनुष्ठान ।

संतलीला वर्णिली तेणें । कोणाच्या कृपेनें सांग पां ॥८॥

तरी त्याची गुरुपरंपरा ऐसी । रामानंदस्वामी संन्यासी ॥

त्यांचें वास्तव्य वाराणसीं । महासमर्थ तापसी जे ॥९॥

भक्तिज्ञान वैराग्य निश्चित । हें त्याचे देही मूर्तिमंत ।

आनंदानंदस्वामी निश्चित । शरण येत त्या लागीं ॥११०॥

तया आनंदानंदाचा शिष्य जाण । पोहरीदास नामाभिधान ।

अग्रजी किलजी दोघेजण । शिष्य निपुण तयाचे ॥११॥

वडील अग्रजी ज्याची स्थित । सदा सर्वदा असे विरक्त ।

श्रीविष्णु भजनीं सावचित्त । सप्रेम गात गुणनामां ॥१२॥

जो शांतिक्षभेचें निजबीज । अध्यात्मज्ञानीं तेजःपुंज ।

ज्याणें भक्‍तिभावें करुनि सहज । गरुडध्वज आराधिला ॥१३॥

ज्याच्या वक्‍तृत्वाची मती । उपमेसि जैसा बृहस्पति ।

लीनता तरी सर्वाभूतीं । अंगीं महंति असेना ॥१४॥

आत्मत्वें सर्वत्र जाणें जीव । चित्तीं नसेचि द्वैतभाव ।

मान्यत्वें तरी थोरथोर राव । चरण सद्भावें वंदिती ॥१५॥

शिष्य प्रबोधिनी पद्महस्ती । बहुतां जनांसि लाविलें भक्‍तीं ।

स्नानसंध्या शुचिर्भूत चित्तीं । सबाह्य स्थितीं सारखा ॥१६॥

श्रवण कीर्तन आणि स्मरण । पादसेवन अर्चन वंदन ।

दास्य सख्य आत्मनिवेदन । हें नवविध भजन हरीचें ॥१७॥

एक एक भक्‍ती केली बहुती । परी सर्वत्र कोणासि न घडतीं ।

ते मागील ग्रंथीं बोलिजेती । पुराणी गर्जती पवाडे ॥१८॥

परी स्मरणेंकरुनि कलियुगांत । जडजीव तरले असंख्यात ।

यास्तव अग्रजी भजन करीत । अहोरात्र निजप्रेमें ॥१९॥

त्याचा प्रेमा देखोनि थोर । देवें दीधला साक्षात्कार ।

मग सगुणरुपें रुक्मिणीवर । निरंतर भेटती ॥१२०॥

अग्रदास जेव्हां गमन करिती । मागें येतसे कृष्णमूर्ती ।

भावाचा भुकेला वैकुंठपती । आणिक चित्तीं नावडेचि त्यां ॥२१॥

जप तप व्रतें अनुष्ठान । येथें भावचि मुख्य कारण ।

भावावांचूनि केलें अर्चन । तें दांभिक जाण व्यर्थची ॥२२॥

भक्‍ती वांचूनि योगसाधन । करीतां सिद्धि न पावे जाण ।

तयासि इंद्रादिक गण । सिद्धीची विघ्ने पाठविती ॥२३॥

वेदशास्त्रें पुराणें सकळ । भक्‍तीवांचूनि अवघें निष्फळ ।

तो तीर्थें हिंडला जरी सकळ । तरी भक्‍तिविण फळ नयेचि ॥२४॥

भक्‍तीवांचूनि केलें कीर्तन । तें जैसें गोरियाचें गायन ।

कवित्वकळा भक्‍तीवीण । तरी प्रख्यात होणे अघटित ॥२५॥

जरी निपुण झाला सिद्धांतग्रंथीं । अध्यात्मज्ञान उदंड कथी ।

चित्तीं नसे प्रेमळ भक्‍ती । तरी व्यर्थ व्युत्पत्ती ते गेली ॥२६॥

असोत हीं भाषणें सकळ । अग्रदास वैष्णव प्रेमळ ।

ज्याणें भक्‍तीभावें करुनि सकळ । वैकुंठपाळ वश केला ॥२७॥

भक्‍तीज्ञानवैराग्य लक्षण । हें त्याचें अंगीं झालें भूषण ।

म्हणोनि साक्षात दर्शन । जगज्जीवन दे तया ॥२८॥

तंव कोणे एके अवसरीं । तद्देशीं दुष्काळ पडिला भारी ।

अन्न न मिळेचि पोटभरी । माता अव्हेरी बाळकातें ॥२९॥

भाकर मागतें म्हणवून । गंगातीरासि आली त्वरेनें ।

खेळावयासि गुंतलें तान्हें । मग चुकावून ते गेली ॥१३०॥

हरिणी गेली टाकूनि पाडसा । मग तें विलोकित दाही दिशा ।

तैसीच तया पातली दशा । क्षुघेनें वळसा मांडिला ॥३१॥

मातेच्या नांवें नानापरी । रुदनं करीत ते अवसरीं ।

तों अग्रदास स्नानासि सत्त्वरी । गंगातीरीं पातले ॥३२॥

तों तेथें क्षुधित अन्नावीण । बालक रडतसे किलवाणें ।

वैष्णवदास कळवळिला मनें । तयासि वर्तमान पुसतसे ॥३३॥

तया समीप जाऊनि निश्चित । म्हणे कशास्तव रडसी येथें ।

हें मज सांगावें त्वरित । ऐसें पुसत तयासी ॥३४॥

तो म्हणे मी अन्न मागतां । मज चुकावूनि गेली माता ।

ऐसी देखोनि त्याची अवस्था । कृपा चित्ता उपजली ॥३५॥

म्हणे सर्वथा भय न घरीं मनें । म्हणोनि दीधलें आश्वासन ।

यास्तव नाभाजी नामाभिधान । वैष्णवजन ठेविती ॥३६॥

मग स्नान करोनि गंगातीरीं । नित्य नेम सारिला सत्वरी ।

मुलासि घेऊनि बरोबरी । मठाभीतरीं प्रवेशले ॥३७॥

अग्रजी वैष्णव महंत थोर । अन्नशांति करितसे फार ।

कोणी प्राणी क्षुधातुर । येऊनि पोटभर जेवितसे ॥३८॥

वैष्णव वैरागी महापुरुष । नित्य जेविती पंक्तीस ।

त्यांचें उच्छिष्टं उरतसे । तें अग्रजी मुलास देववीतसे ॥३९॥

म्हणती दुष्काळी मरतां उपवासी । माता टाकूनि गेली यासी ।

तें आम्हीं आणिलें मठासीं । संरक्षण जीवासी व्हावया ॥१४०॥

रांडकीचा मूल म्हणवितो जाण । नेणो यातीचा आहे कोण ।

मठांत आणिता त्याजकारण । संकोच मन होतसे ॥४१॥

यास्तव कोपट अंगणांत । बांधूनि दीधलें असे त्यातें ।

संतांचे उछिष्ट प्रसाद उरत । तो नेऊनि देत त्यालागीं ॥४२॥

श्रीविष्णुमूर्तीचें अर्चन । षोडशोपचारें होतसे जाण ।

नाभाजी बाहेर उभा राहून । रुपगुण पाहतसे ॥४३॥

घरासि येतां वैष्णवजन । तयांसि करी साष्टांग नमन ।

उच्छिष्ट प्रसाद सेवितसे जाण । याविण साधन श्रेष्ठ नसे ॥४४॥

सत्समागमाचेनि गुणें । नित्य होतसें भागवतश्रवण ।

तेणे महादुरितांचें जाहलें दहन । अद्भुत ज्ञान प्रगटलें ॥४५॥

जीवमात्राचें मनोगत । तें न सांगतां सर्व कळत ।

जाणे भूतभविष्य वृत्तांत । परी सर्वथा मात न बोले ॥४६॥

समुद्रापलीकडे होतें काय । तेंही नाभाजीसि श्रुत होय ।

स्वर्गीचा शब्द ऐकत आहे । परी कोणासि नये प्रत्ययां ॥४७॥

तंव कोणे एके दिवसीं जाण । अग्रजी करुनि गंगास्नान ।

करीत बैसले देवतार्चन । एकाग्रमन होऊनी ॥४८॥

विष्णु अर्चन झालिया निश्चित । मग वोंवाळिला लक्ष्मीकांत ।

साष्टांग घालोनि दंडवत । केला प्रणिपात सद्भावें ॥४९॥

मग धाबळीचा घुंगुट घेऊनि वोजा । अग्रजी करीत मानस पूजा ।

ध्यानासि आणितां गरुडध्वजा । एकाग्र वोजा बैसले ॥१५०॥

कवाड आडकोनि ते अवसरीं । नाभाजीस बैसविलें द्वारीं ।

म्हणे कोणासि येऊं न द्यावें भीतरीं । आज्ञां करी त्याजला ॥५१॥

ऐसें सांगतां सद्‌गुरुनाथ । नाभाजी द्वारीं बैसे त्वरित ।

अग्रजी एकाग्र करोनि चित्त । श्रीकृष्णनाथ आठवित ॥५२॥

परी ध्यानासि नये जगज्जीवन । म्हणे कोठें गुंतला रुक्मिणीरमण ।

कैसें करावें मानूसपूजन । विचार मनीं करीतसें ॥५३॥

नाभाजी होता बाहेर द्वारीं । तो अग्रजीस म्हणे ते अवसरीं ।

एक जाहाज बुडताहे समुद्रीं । सौदागर अंतरीं चिंतावला ॥५४॥

त्याणें नवसिला द्वारकापती । जरी मज पावसी सत्वर गती ।

तरी पांचवा वांटा अग्रजीप्रती । देईन निश्चिती जाणपां ॥५५॥

त्याचे जाहाज काढावया निश्चित । समुद्रीं गुंतले वैकुंठनाथ ।

त्यास्तव नयेचि ध्यानांत । क्षण एक निवांत बैसावें ॥५६॥

जाहाज काढिलें तत्काळ । आतां येतील दीनदयाळ ।

तुम्ही मागुतीं होऊनि निश्चळ । रुप सांवळे विलोका ॥५७॥

ऐकोनि नाभाजीचें उत्तर । अग्रजीस आश्चर्य वाटलें थोर ।

घ्यानीं पाहतां सारंगधर । तों उदकें पीतांबर भिजलासे ॥५८॥

सर्वोपचारें पूजोनि तेव्हां । अग्रजी म्हणे रे माधवा ।

कोठे गुंतला होतासि देवा । वृत्तांत सांगावा मजपासीं ॥५९॥

ऐसे पुसतां भक्‍त प्रेमळ । हांसोनि बोले दीनदयाळ ।

जाहाजा बुडवितां समुद्र जळ । आम्हीं तत्काळ काढिले ॥१६०॥

सावकारे नवस केला सहज । कीं पांचवा विभाग देईन तुज ।

मग मी जाऊनि गरुडध्वज । साधिलें काज तयाचें ॥६१॥

तुझे पदरीं खर्च बहुत । अखंड जेविता साधुसंत ।

सावकार हुंडी पाठवील येथ । ऐसें बोलत जगदात्मा ॥६२॥

मानसपूजा होतां निश्चित । मग नाभाजीस बोलाविलें आंत ।

म्हणे तुज देवाजीचें मनोगत । कैसा वृत्तांत श्रुत झाला ॥६३॥

त्याणें चित्तीं धरुनि प्रेमा । म्हणे हा संतांचा प्रसाद महिमा ।

तुम्हीं सद्‌गुरु जोडलेती आम्हां । सोडवा भवभ्रमा पासूनी ॥६४॥

सच्छिष्य सांगतां ऐशारीतीं । अग्रजी तयासि आज्ञा करिती ।

भव तरावया उपाव निश्चिती । वर्णावी कीर्ती श्रीहरीची ॥६५॥

भगवद्‌गुण तों वर्णिलें बहुतीं । महाऋषीं आणि सभाग्य संतीं ।

तरी आतां वर्णावी संतांची कीर्तीं । तरणोपाय निश्चिती अन्य नसे ॥६६॥

दोहरा ॥ गुरु अगर देव आगे कोनही ।

भवतरनेकूं नहि उपाव । नाभा हरि भक्‍तनके जस गावे मनभाव ॥१॥

तेचि आज्ञा वंदोनि निश्चित । नाभाजी ग्रंथासि प्रारंभ करिती ।

चहूं युगांत झाले भक्‍त । ते वर्णिले निश्चित तयानें ॥६७॥

ग्वालेर देश भाषा जाण । छपया केल्या असती त्यानें ।

तयाच्या आधारें करुन । प्राकृत भाषण वदतसें ॥६८॥

आणिक स्वदेशामाजी निश्चित । प्रख्यात जाहले महासंत ।

त्यांच्या वंशी सज्ञान महंत । त्यांचे वचनार्थ पाहिले ॥६९॥

आपुल्याची मतें वदलों जर । तरी सर्वज्ञ न मानिती उत्तर ।

यासी साक्ष रुक्मिणीवर । जाणें अंतर सकळांचें ॥१७०॥

ज्यांणीं संतांसि वर्णिलें तत्त्वतां । प्रथम लागली त्याची कथा ।

ऐसी आशंका धराल चित्ता । तरी पुरातन वार्ता ऐकावी ॥७१॥

आधीं वाल्मीकीची उत्पत्ति जाण । त्यावरी जाहले रामायण ।

द्वैपायना वांचूनि पूर्ण । भारत निर्माण कोण करी ॥७२॥

म्हणोनि संतांच्या दासाचें । आधींच वर्णिलें साचें ।

ऐसें मत ऐकूनि कवीचें । प्रेम श्रोतयाचें दुणावलें ॥७३॥

म्हणती तुझीं दृष्टांत उत्तरें । ऐकोनि तोषलों साचार ।

आतां पाल्हाळ टाकोनि सत्वर । संत चरित्रें वदावीं ॥७४॥

देखोनि श्रोतयांचें आर्ती । चरण नमस्कारी महीपती ।

म्हणे ग्रंथ वदविता रुक्मिणीपती । मी तों मंदमती अज्ञान ॥७५॥

तो दीनदयाळ कैवल्यदानी । जैसी वदवील प्राकृत वाणी ।

ते सादर होऊनि संतसज्जनीं । ऐकिजे कर्णी निजप्रेमें ॥७६॥

अन्नापरिस क्षुधाचि गोड । म्हणवोनि आर्ताचें पुरे कोड ।

आणि आकर्णनीं नसली जरी चाड । तरी न लगती गोड भक्‍तकथा ॥७७॥

एक प्रेमाचें आर्त्त असतां मनीं । आणि उदंड कथा ऐकिल्या श्रवणीं ।

परी एकही स्मरण न धरे मनीं । ते संसार कर्दमीं गुंतलें ॥७८॥

तैसे नव्हां तुम्ही सज्जन । ग्रंथशोधक अति निपुण ।

न्यून तें पूर्ण करोनि घेणें । सात्विक लक्षण हें अंगीं ॥७९॥

पुढिले अध्यायीं रस अद्भुत । वदविता श्रीरुक्मिणीकांत ।

महीपति त्याचा मुद्रांकित । बोल बोलत शिकविले ॥१८०॥

स्वस्ति श्रीभक्‍तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्‍त । प्रथम अध्याय रसाळ हा ॥

अध्याय॥१॥ओव्या॥१८१॥दोहरा॥१॥एवंसंख्या॥१८२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP