मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीभक्तविजय|
अध्याय ५२

अध्याय ५२

संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीजगदीश्वराय नमः ॥    
जय जय भक्तकरुणाकरा ॥ अक्षय अभंगा जगदुद्धारा ॥ आदिस्तंभा सायुज्यउदारा ॥ रुक्मिणीवरा श्रीविठ्ठला ॥१॥
तूं जया पाहसी कृपादृष्टी ॥ त्याची तुटे भवबधफांसोटी ॥ करूनि प्रपंचाची तुटी ॥ देसी शेवटीं अक्षयपद ॥२॥
तुझें उदारत्व वर्णितां पाहें ॥ सहस्रमुखातेंही लेखा नोहे ॥ महाकवीची मति कुंठित होये ॥ तेथें मी काये मशक ॥३॥
परी आवडीची ऐसी जाती ॥ बाळकें मातेसी भलतें बोलती ॥ परी जननीस त्याची न वाटे खंती ॥ ऐकूनि तुष्टे ती निजलोभें ॥४॥
तेवीं कृपा करूनि जगज्जीवनें ॥ अंगीकारावीं आर्ष वचनें ॥ हेंचि मागतों तुजकारणें ॥ परी तुझेचि सत्तेनें दयाळा ॥५॥
सागरींचें जीवन मेघ आणिती ॥ ते सरित घेऊन समुद्रासी जाती ॥ तरी उपकार कोण तयांप्रती ॥ ज्याचें त्यास अर्पितां ॥६॥
भास्कराचें जावें भेटीसी ॥ तरी त्याचेच प्रकाशें पाहावें त्यासी ॥ तेवीं तुज प्रार्थावया हृषीकेशी ॥ सत्ता आम्हांसी असेना ॥७॥
कीं पृथ्वीस केला नमस्कार ॥ आणि तिजवर पडेच शरीरभार ॥ तेवीं तुज वर्णावया साचार ॥ आणिक आधार असेना ॥८॥
नातरी विनवावें प्रभंजनास ॥ तरी त्याच्याच योगें निघती श्वास ॥ तेवीं तुझीं चरित्रें यावया वाचेस ॥ कारण तूंचि अससी पैं ॥९॥
कीं अग्नीस धूप दाखविला जर ॥ तरी त्याचेच योगें निघे धूर ॥ तेवीं तुझ्याच योगें चित्त होतें स्थिर ॥ निघती उद्गार कथेचे ॥१०॥
गंगेसी केला अभिषेक ॥ परी तिजचिपासाव घेतलें उदक ॥ तेवीं तुझिया प्रसादें देख ॥ कवि अनेक वर्णिती ॥११॥
नातरी चंद्र आला उदयास ॥ त्याच्याच प्रकाशें पाहावें त्यास ॥ कां मातेची सेवा केली विशेष ॥ तरी शरीर असे जननीचें ॥१२॥
सुरतरूखालीं बैसोन ॥ कल्पनेकरूनि त्यासी घातलें जीवन ॥ मग आपण उपकार दाखवितां जाण ॥ लज्जित सज्ञान होतसे ॥१३॥
तेवीं तुझिया सामर्थ्यें रुक्मिणीपती ॥ वेदीं वर्णिली अपार स्तुती ॥ मग विवेक करूनि आपुले मती ॥ नेति नेति वदले कीं ॥१४॥
ऐसा स्वसामर्थ्यें तूं अधोक्षज ॥ जाणसी दासांचें अंतरगुज ॥ आतां अभय वर देऊन मज ॥ वदवीं निजभक्तविजयकथा ॥१५॥
मागील अध्यायाचे  अंतीं ॥ देहूस आले रुक्मिणीपती ॥ सगुण रूप धरूनी निश्चितीं ॥ तुकयासी प्रीतीं भेटले ॥१६॥
मग प्रसन्न होऊनि जगज्जीवन ॥ म्हणती कांहीं माग वरदान ॥ जें विरिंचीस न लाभे करितां प्रयत्न ॥ तें मी देईन तुजलागीं ॥१७॥
यवरी तुका देत उत्तर ॥ म्हणे चित्तीं न पडावा तुझा विसर ॥ गुण गाईन वारंवार ॥ सप्रेम अंतरीं होउनी ॥१८॥
आणि तुझे निजभक्त अंतरंग ॥ अखंड असावा त्यांचा संग ॥ हेंच मागतों आला प्रसंग ॥ न करीं मनोभंग दयाळा ॥१९॥
तुझें भजनीं असावी प्रीती ॥ न लगे कांहीं धनसंपत्ती ॥ पुढें करिसील चारी मुक्ती ॥ तरी त्या नावडती मजलागीं ॥२०॥
अखंड संतसमागम ॥ वाचेसी असावें तुझें नाम ॥ मग गर्भवास असतां संभ्रम ॥ होय सुगम सर्वदा ॥२१॥
हेंचि मागणें रुक्मिणीपती ॥ म्हणोनि नमन केलें पुढती ॥ ऐसें ऐकोनि वैकुंठपती ॥ आश्चर्य चित्तीं करीतसे ॥२२॥
मग गरुडासी म्हणे भक्तसखा ॥ उदास विरक्त प्रेमळ तुका ॥ येणें सर्वं त्याग करूनि देखा ॥ मजचि एका आराधिलें ॥२३॥
माझिया वियोगदःखेंकरून ॥ अन्न उदक वर्जिले जाण ॥ म्हणोनि देह कृश होऊन ॥ गेला वाळून पाहें तुका ॥२४॥
यावरी बोले विनतासुत ॥ तुम्हीं आशीर्वाद लिहिला पत्रांत ॥ कीं जोंवरी वैकुंठ कैलास दिसत ॥ तोंवरी चिरंजीव असावें ॥२५॥
तें आपुलें वचन वैकुंठपती ॥ असत्य नव्हेचि कल्पांतीं ॥ तरी शरीर वाळलें म्हणोनि प्रीतीं ॥ उद्विग्न चित्तीं कां होतां ॥२६॥
भजनीं रतलें याचें चित्त ॥ तेव्हांचि कळिकाळ जाहला अंकित ॥ नामयाचा अवतार साक्षात ॥ जाणती संत निजखूण ॥२७॥
अनंत जन्मीं करूनि भजन ॥ एकाग्र निश्चळ करूनि मन ॥ तुम्हांसी केलें आपुलें स्वाधीन ॥ वर्णितो गुण निजप्रीतीं ॥२८॥
यावरी तुकयासी म्हणे जगजेठी ॥ मी क्षुधित जाहलों बहु पोटीं ॥ उपवासी निघूनि उठाउठीं ॥ तुझिय भेटी पातलों ॥२९॥
तरी गृहांत निपजलें असेल अन्न ॥ तें पात्रीं आणावें विस्तारूनि ॥ ओलें कोरडें म्हणोन ॥ संकोच मनीं न धरावा ॥३०॥
म्हणाल सन्निध असतां रुक्मिणी ॥ क्षुधित कां झाले चक्रपाणी ॥ तुकयाचा हेत होता मनीं ॥ कीं देवा भोजनीं बैसवावें ॥३१॥
तें मनोगत जाणोनि त्वरित ॥ तैसेंचि वदले पंढरीनाथ ॥ जेणें प्रेमळाचा पुरे हेत ॥ तेंचि दीननाथ करीतसे ॥३२॥
मग तुकयानें आणोनि जळ ॥ धुतलें देवाचें चरणकमळ ॥ कोमल तुलसीदलांची माळ ॥ कंठीं तत्काळ घातली ॥३३॥
अत्यंत प्रीतीं करूनि नमन ॥ मग पात्रीं वाढूनि आणिलें अन्न ॥ शुष्क भाकरी भाजीपान ॥ शाकेसी लवण दुसरें असे ॥३४॥
तें आवडीनें खात जगज्जीवन ॥ ऐकोनि आशंका धरितील सज्जन ॥ म्हणतील क्षीराब्धिवासी नारायण ॥ कोरडें कदन्न खातसे ॥३५॥
तरी एक सद्भाव असतां अंतरीं ॥ तेथेंचि क्षुधित होय श्रीहरी ॥ मग याति कुळ न विचारी ॥ निजप्रीतीं बरी देखोनियां ॥३६॥
पक्वान्नें करूनि नाना रीतीं ॥ वाट पाहे दुर्योधन कुमती ॥ परी तेथें न जेवितां श्रीपती ॥ कण्याचि खाती विदुराच्या ॥३७॥
कीं द्रौपदेनें सद्भावें पाहतां वाट ॥ जेवितां लोटूनि दिधलें ताट ॥ मग धांवत येऊनि बैसले निकट ॥ मागत देंठ भाजीचा ॥३८॥
जो यज्ञपुरुष अति निर्मळ ॥ तो उच्छिष्ट गवळियांचें खातो बळें ॥ भिल्लिणीचीं उच्छिष्ट फळें ॥ भक्षी घननीळ निजप्रीतीं ॥३९॥
तो तुकयाचें घरीं कदन्न भक्षितां ॥ येथें आश्चर्य कोणतें चित्ता ॥ म्हणोनि साशंक न व्हावें श्रोतां ॥ पुरातन कथा ऐकोनी ॥४०॥
असो रुक्मिणीसहित जगज्जीवन ॥ आवडीं बैसोनि केलें भोजन ॥ करशुद्धी देऊनि तुकयान ॥ उच्छिष्ट आपण भक्षिलें ॥४१॥
देवासी मुखशुद्धीसी ते वेळ ॥ आणूनि दिधलें तुळसीदळ ॥ आवडी देखोनि दीनदयाळ ॥ अति आदरें भक्षिती ॥४२॥
यापरी होऊनि संतुष्टी ॥ मग तुकयासी बोले जगजेठी ॥ आतां मज ठेवूनि हृदयसंपुटीं ॥ वियोगहिंपुटी न व्हावें ॥४३॥
तूं बोलाविसील जैं मज ॥ तैं सगुण स्वरूपें भेटेन तुज ॥ ऐसें म्हणोनि अधोक्षज ॥ जाते जाह्ले तेधवां ॥४४॥
तुकयानें धांवूनि ते वेळीं ॥ मस्तक ठेविला चरणकमळीं ॥ मग रुक्मिणीसहित वनमाळी ॥ पंढरपुरासी पातला ॥४५॥
तंव एक ब्राह्मण कामना धरूनी ॥ आळंदीस अनुष्ठानी बैसला ॥ म्हणे पुराणव्युत्पत्ति व्हावी मजलागुनी ॥ मनीं अखंड चिंतित ॥४६॥
मग दृष्टांत दाविला ज्ञानेश्वरें ॥ कीं तुकयापासीं जाय तूं त्वरें ॥ तो तुज भेटोनि एकांतीं ॥ कामना चित्तीं सांगितली ॥४८॥
म्हणे म्यां अनुष्ठान केलें अलकावतीसीं ॥ ज्ञानदेवें पाठविलें तुम्हांपासी ॥ वचनें ऐकोनियां ऐसीं ॥ तुका मानसीं विस्मित ॥४९॥
कांहीं पुण्य नाहीं गांठीं ॥ जरी तें वेंचूं यासाठीं ॥ ज्ञानदेवें हें शेवटीं ॥ पाठी लाविली उपाधी ॥५०॥
मग विचार करीत आपुलें मनीं ॥ म्हणे विद्या नाहीं याचें प्राक्तनीं ॥ म्हणोनि ज्ञानदेवें कंटाळोनी ॥ धरणें पाठवून दिधलें ॥५१॥
म्हणे मी नेणता अज्ञान ॥ नेणेंचि जप तप अनुष्ठान ॥ ज्ञानदेवें मजलागून ॥ कासया थोरपण दिधलें ॥५२॥
मग अकरा अभंग आणि नारळ ॥ ब्राह्मणासी दिधले ते वेळ ॥ म्हणे हें भक्षिशी जे वेळ ॥ ज्ञान तत्काळ तुज होईल ॥५३॥
ब्राह्मणाचें विकल्पी मन ॥ म्हणे नारळ भक्षितां नव्हे ज्ञान ॥ प्राकृत अभंग मजकारण ॥ पाहिजेत पैं कासया ॥५४॥
ऐसा विकल्प चित्तीं धरून ॥ टाकूनि गेला प्राक्तनहीन ॥ जैसा चिंतामणि हातीं लागतां जाण ॥ गोफणी घेऊन दवडिला ॥५५॥
कां निधान सांपडतां अभाग्याला ॥ तें कोळशाऐसें दिसे त्याला ॥ नातरी पक्वान्न रोगियाला ॥ कडवट जिव्हेसी लागत ॥५६॥
कां भागिरथीची कुपी जाण ॥ उन्मत्तासी भासे मद्यपान ॥ नातरी कल्पतरूचें वन ॥ जाय डावलून दरिद्री ॥५७॥
तेवीं तुकयानें प्रसाद दिधला ॥ तो विप्रें तेथेंचि टाकिला ॥ मग अलकावतीस ज्ञानराजाला ॥ पत्र लिहून पाठविलें ॥५८॥
मज पामरासी देऊनि थोरी ॥ येथें पाठविला धरणेकरी ॥ तुमची आज्ञा वंदोनि शिरीं ॥ उचित झडकरी दिधलें ॥५९॥
तेणें विकल्प धरूनि मग ॥ टाकिले एकादश अभंग ॥ महाफळाच करूनि त्याग ॥ गेला सवेग तेथूनी ॥६०॥
ऐसें कल्पोनि मानसीं ॥ निरोप पाठविला आळंदीसी ॥ मग ध्यानांत आणूनि हृषीकेशी ॥ नामस्मरण करीतसे ॥६१॥
तंव शिवाजीराजापासीं देख ॥ शास्त्रज्ञ होता पुराणिक ॥ त्याचा ब्राह्मणजन एक ॥ होता अति मूर्ख अज्ञानी ॥६२॥
तो तुकोबापासीं सत्वर ॥ करावयासी आला नमस्कार ॥ तोचि नारळ उचलोनि वैष्णववीरें ॥ त्याचे हातीं दिधला ॥६३॥
आणि एकादश अभंग ठेविले लिहून ॥ तेही दिधले त्याकारण ॥ तेणें तो नारळ फोडून ॥ तेथेंच भक्षिला निजप्रीतीं ॥६४॥
बिर्‍हाडासी गेला तो ब्राह्मण ॥ तों तेथें मांडिलें होतें पुराण ॥ श्रवणासी बैसले पंडितजन ॥ अति निपुण वेदशास्त्रीं ॥६५॥
आणिक श्रोते सज्ञान चतुर ॥ ऐकावया बैसले सादर ॥ तेथें तो ब्राह्मणजन येऊनि सत्वर ॥ करीत प्रश्न पुराणिका ॥६६॥
तुम्हीं श्लोक वाचिला आतां ॥ त्याचे पदाचा अर्थ राहिला सांगतां ॥ पंडित मागुती विचारितां ॥ तों यथार्थ समस्तां वाटलें ॥६७॥
म्हणती हें आश्चर्य बहुत ॥ यासी ओनामातों नव्हता येत ॥ एकाएकीं पुराणव्युत्पत्ति ॥ कैसी जाहली कळेना ॥६८॥
वृत्तांत पुसतां त्याकारण ॥ साकल्यें सांगितलें वर्तमान ॥ म्हणे एकादश अभंग तुकयानें ॥ आणि नारळ एक दीधला ॥६९॥
तो फोडोनि खातांचि ते वेळीं ॥ गीर्वाण भाषा कळों लागली ॥ ऐसी ऐकोनियां बोली ॥ तटस्थ जाहली सकळ सभा ॥७०॥
पुराणिकें समेप बोलावूनि प्रीतीं ॥ पत्र दिधलें त्याचे हातीं ॥ म्हणे हें वाचूनि दावीं आम्हांप्रती ॥ तरी सत्य प्रतीती वाटेल ॥७१॥
मग तुकयाचे पाय आठवूनि चित्तीं ॥ सांगूं लागला पुराणव्युत्पत्ती ॥ ऐकोनि पंडित तटस्थ होती ॥ आश्चर्य त्यांप्रती वाटलें ॥७२॥
म्हणती विष्णुभक्तांची अघटित करणी ॥ नव्हे तेंचि करूनि दाविती जनीं ॥ एक सद्भाव चित्तीं धरूनी ॥ चक्रपाणी वश्य केला ॥७३॥
जो लीलानाटकी भगवंत ॥ राईचा करी पर्वत ॥ त्याचे आवडते जे निजभक्त ॥ अघटित चरित्र तयांचें ॥७४॥
मूर्खासी ज्ञान जाहलें अद्भुत ॥ ही चिंचवडीं देवासी कळली मात ॥ मग ब्राह्मण मिळोनि समस्त ॥ स्वभावें बोलती एकमेकां ॥७५॥
आपण मताभिमान करून ॥ तुकयाचें करितों हेळण ॥ परी मनुष्य न म्हणावें त्यालागून ॥  यथार्थ वचन जाणिजे ॥७६॥
एक म्हणती पाचारूनि त्यासी ॥ प्रीतीनें पुसावें एके दिवसीं ॥ तूं कोण आहेसी हें सांग आम्हांसी ॥ ऐसें तुकयासी पुसावें ॥७७॥
तो ब्राह्मणभक्त अति प्रेमळ ॥ आपणासी सांगेल तत्काळ ॥ ऐसा चिंचवडीं ते वेळ ॥ विचार केला द्विजवरीं ॥७८॥
मग मनुष्य करूनि मोलकरी ॥ त्यासी सांगितलें ते अवसरीं ॥ तुवां जाऊनि तेथवरी ॥ तुकयासी लवकरी पाचारिंजे ॥७९॥
इतुकेंचि जाऊनि सांग वहिलें ॥ कीं चिंचवडीं देवांनीं पाचारिलें ॥ ऐसें ऐकूनि ते वेळे ॥ मनुष्य उठिला सत्वरी ॥८०॥
मग देहूसी येऊनि तयानें ॥ तुकयासी केलें साष्टांग नमन ॥ तंव तेथें होतसे हरिकीर्तन ॥ बैसले सज्जन श्रवणासी ॥८१॥
सप्रेमभावें अति सादर ॥ श्रवण करिती नारी नर ॥ नामघोषें कोंदलें अंबर ॥ पडला विसर देहाचा ॥८२॥
नाठवे कोणासी प्रंपंचभ्रांती ॥ लवों विसरलों नेत्रपातीं ॥ नामरूपीं जडलीं वृत्ती ॥ जाहली विश्रांती सकळिकां ॥८३॥
टाळकरी आणि मृदंग्यांसी ॥ आम्ही कोण हें नाठवें त्यांसी ॥ आपपर नाठवेचि कोणासी ॥ प्रेम मानसीं प्रगटलें ॥८४॥
हिलाल धरिला होता ज्यानें ॥ तयासी नाहीं देहभान ॥ नामरूपीं जडलें मन ॥ मी कोण हें स्फुरेना ॥८५॥
तेणें हिलाल करितां वरी ॥ तों मंडपासी लागला ते अवसरीं ॥ तों आणिक कथा लागली दुसरी ॥ ते सादर चतुरीं परिसावी ॥८६॥
चांभारगोंदियांत प्रसिद्ध ॥ ज्ञानसागर शेखमहंमद ॥ तो कीर्तन करीत सानंद ॥ प्रेमछंदें नामाच्या ॥८७॥
श्रवणासी बैसले बहुत जन ॥ अठरा वर्णांचे थोर लहान ॥ आणिक चतुर श्रीमंत जन ॥ सज्ञान ब्राह्मण पंडित जे ॥८८॥
एकाग्र ऐकती कीर्तन सांग ॥ कथेसी आला अद्भुत रंग ॥ पाखंडियांसी वचन न सुचे मग ॥ आरोगिले मूग ते समयीं ॥८९॥
तों वक्त्यानें ते वेळां ॥ उडी मारूनि मंडप चोळिला ॥ हे कौतुक देखोनि डोळां ॥ आश्चर्य सकळां वाटलें ॥९०॥
मग पुढें बैसले होते श्रवणीं ॥ ते पुसते जाहले तये क्षणीं ॥ कशाकरितां मंडप स्वामींनीं ॥ दाखविला चोळूनि आम्हांतें ॥९१॥
हें कौतुक दृष्टीं देखोन ॥ आशंकित जाहलें त्याचें मन ॥ शेखमहंमद देखोन ॥ काय बोलिला ते समयीं ॥९२॥
वैष्णव तुका देहुगांवांत ॥ प्रेमभावें कीर्तन करित ॥ तों मंडपासी हिलाल अकस्मात ॥ लागला अवचित न कळतां ॥९३॥
तो जळतां दृष्टीं देखिला तेथ ॥ म्यां निजकरें विझविला येथ ॥ ऐसी ऐकोनियां मात ॥ श्रोते आशंकित जाहले कीं ॥९४॥
हें कोणासी न वाटे खरें ॥ म्हणती देहूगांव बहुत दूर ॥ तुम्हांस तेथील समाचार ॥ कैशापरी श्रुत जाहला ॥९५॥
तेथेंही श्रोतयांचा असेल मेळा ॥ त्यांच्या काय न दिसे डोळां ॥ म्हणूनि मंडप तुम्हीं विझविला ॥ हें यथार्थ आम्हांला न वाटे ॥९६॥
मग शेखमहंमद बोले वचन ॥ तुकयाचें कीर्तनीं बैसलें जन ॥ तयांसी नाहीं देहभान ॥ करितां श्रवण हरिलीला ॥९७॥
नामरूपीं जडलें चित्त ॥ सकळ जाहले देहातीत ॥ हिलाल लागोनि मंडप जळत ॥ तो म्यां त्वरित विझविला ॥९८॥
यावरी श्रोते पुसती मात ॥ कीर्तनीं असे पंढरीनाथ ॥ त्याणें कां न चुकविला आघात ॥ मंडप जळतां देखोनी ॥९९॥
मग शेखमहंमद बोलती त्यांसी ॥ प्रेमें भुलला हृषीकेशी ॥ देवपण नाठवेच तयासी ॥ नाठवे भक्तांसी भक्तपण ॥१००॥
ते दोघे एक जाहले असती ॥ कोणीं रक्षावें कोणाप्रती ॥ जेवीं दोनी दीपक जळत असती ॥ भिन्न न दिसती सर्वथा ॥१॥
ते एके ठायीं करितां वस्ती ॥ समरसपणें मिळोनि जातीं ॥ ऐसी तयांची विदेहस्थिती ॥ माझें चित्तीं श्रुत जाहली ॥२॥
कीं सरितेमाजी विशाळ बेटें ॥ तेथें उदकाचे होती दोन वांटे ॥ मग पुढें होऊनि एकवटें ॥ भिन्नत्व न दाविती सर्वथा ॥३॥
कां प्रतिमा आणि उपकरण ॥ एकेचि पितळेचीं असती जाण ॥ मुशींत आटतां त्यांकारण ॥ न दिसती भिन्न सर्वथा ॥४॥
नातरी घृत नवनीत पाहीं ॥ दोन्ही कढविलीं एकेचि ठायीं ॥ त्यांसी वेगळेपण पाहतां कांहीं ॥ भिन्नत्व नाहीं सर्वथा ॥५॥
तेवीं देव भक्त जाहले असतां एक ॥ कोण कोणाचें जाणेल दुःख ॥ समरसे अविनाश जाहलें सुख ॥ भेदाभेद मावळले ॥६॥
देवपणा विसरले रुक्मिणीकांत ॥ तुकया न स्मरे मी भक्त ॥ तैसेच श्रोते जाहले समस्त ॥ हा मज वृत्तांत समजला ॥७॥
हें जरी तुम्हांस न वाटलें खरें ॥ तरी तेथूनि आणा समाचार ॥ ऐसें ऐकूनि उत्तर ॥ श्रोते चतुर संतोषले ॥८॥
मग देहूचे पाटिलासी पत्र लिहूनी ॥ एक सांडणी पाठविली त्यांणीं ॥ कीं रात्रीं कौतुक देखिलें नयनीं ॥ तें यथार्थ लिहूनि पाठवावें ॥९॥
अस्तमाना जातां दिनकर ॥ आलें त्याचें प्रत्युत्तर ॥ रात्रीं होतां कीर्तनगजर ॥ मंडपासी हिलाल लागला ॥११०॥
दीडहात छीद्र पडलें जाणा ॥ परी रात्रीं कळलें नाहीं कोणा ॥ सकाळीं उठोनि देखिलें नयना ॥ मग आश्चर्य मना वाटलें ॥११॥
ऐसें पत्र ऐकतां श्रवणीं ॥ यथार्थ वाटलें त्यांलागोनी ॥ मग शेखमहंमदापासीं येऊनी ॥ नमस्कार घातली ॥१२॥
म्हणती तेथील वृत्तांत ॥ तुम्हांसी कैसा जाहला श्रुत ॥ हा चमत्कार देखोनि अद्भुत ॥ साश्चर्य चित्त सकळांचें ॥१३॥
ऐसी ऐकूनि वचनोक्ती ॥ म्हणे काय सांगावें तुम्हांप्रती ॥ मीन नीटचि धार चढती ॥ ते आणिकां गती अवघड ॥१४॥
आणिका जळचरें बहुत जाण ॥ परी पत्स्याऐसें त्यां न लोटे जीवन ॥ तेवीं भक्तांचे मनींची खूण ॥ भाविकांवांचून कळेना ॥१५॥
कीं पिपीलिकांचे मार्गानें ॥ पिपीलिकाचि चालूं जाणे ॥ तेवीं वैष्णवांचे मनींची खूण ॥ भाविकांवांचून कळेना ॥१६॥
कीं अंतरिक्षीं विहंगम उडतां ॥ तेथें मार्ग पहावा कोणता ॥ परी पक्षीचि चालती त्या पंथा ॥ आणिकां सर्वथा कळेना ॥१७॥
जे कूपामध्यें बेडूक राहत ॥ ते काय जाणती पयोब्धीची मात ॥ तेवीं गुरुभक्तांची खूण निश्चित ॥ मायालोभियांसी कळेना ॥१८॥
ऐसी वचनोक्ति बोलोनि त्वरित ॥ शेखमहंमद राहिले निवांत ॥ आश्चर्य मानूनि श्रोते समस्त ॥ घातले दंडवत सकळांनीं ॥१९॥
असो सिंहावलोकनें आतां ॥ श्रोतीं परिसावी मागील कथा ॥ जो चिंचवडीहूनि मनुष्य येतां ॥ त्यानें अकिली कथा तुकयाची ॥१२०॥
तेथेंचि जडला त्याचा भाव ॥ निरोप सांगावयाचा नाहीं आठव ॥ प्रपंचउद्वेग राहिला सर्व ॥ ऐसा जीव सुख पावला ॥२१॥
घरासी जावें परतोन ॥ हेंही सर्वथा नाठवे भान ॥ तुकयाचें होतांचि दर्शन ॥ जाहला तल्लीन निजप्रीतीं ॥२२॥
इकडे चिंचवडीं देव वाट पाहात ॥ म्हणती तुकयासी दिवस लागले बहुत ॥ मनुष्यही परतोनि नाहीं येत ॥ काय जाहलें कळेना ॥२३॥
मग विचार करूनि सकळांनीं ॥ दुसरा मनुष्य पाठविला त्यांनीं ॥ तोही तुकयाचें कीर्तन ऐकूनी ॥ विदेह होऊन बैसला ॥२४॥
विलंब लागतांचि त्याप्रती ॥ तिसरा पाठविला मागुती ॥ त्याचीहि उडाली देहभ्रांती ॥ सप्रेम चित्तीं होऊन ॥२५॥
मग गजवदनाचे उपासक ॥ आश्चर्य करिती सकळिक ॥ तिघे मनुष्य गेले देख ॥ न ये एकही परतोनी ॥२६॥
जेवीं गंगेसी वोहळ गेले ॥ ते आपलेपणासी समूळ मुकले ॥ कां नानापुष्पांचे मकरंद भले ॥ वायूसी मिळाले समरसें ॥२७॥
तरंग मिळाला जळांत ॥ कीं अभ्रचि लपलें आकाशांत ॥ कीं सुवागी पडे मुशींत ॥ ते नाहीं येत परतोनी ॥२८॥
तैसेंचि जाहलें त्यांकारण ॥ निरोपही न सांगती येऊन ॥ तुकयाचें ऐकतां सप्रेम गायन ॥ राहिले तल्लीन होऊनी ॥२९॥
तुकयासी सांगितलें असतें तयांनीं ॥ तरी यावया अनुमान न करितां मनीं ॥ त्याऐसा ब्राह्मणभक्त जनीं ॥ वैष्णव ज्ञानी असेना ॥१३०॥
तरी आपणचि सांडोनि वर्णाभिमान ॥ जाऊनि घ्यावें त्याचें दर्शन ॥ संशय वाटतसे मनीं जाण ॥ ते जीवींचि खूण पुसावी ॥३१॥
ऐसा विचार करूनि जाण ॥ ब्राह्मण निघाले तेथून ॥ हे अंतरीं तुकयालागून ॥ न सांगतां खूण कळलीं कीं ॥३२॥
म्हणे मनुष्यें पाठविलीं विप्रांनीं ॥ परी तो सांगितला नाहीं निरोप कोणीं ॥ आतां तेचि कृपावलोकनीं ॥ येताति चालोनि भेटावया ॥३३॥
तरी आपण न जातां येथून ॥ ब्राह्मणांचा होईल अपमान ॥ लक्ष्मीकांत ज्यांचे चरण ॥ हृदयीं भूषण वागवितो ॥३४॥
ते आले नाहींत येथवरीं ॥ तों आपण पुढें जावें सत्वरी ॥ ऐसें विचारून अंतरीं ॥ निघे सत्वरी तेधवा ॥३५॥
जैसी चातका तृषा लागत ॥ तों मेघ सत्वर धांवूनि येत ॥ कीं उदया येतां रोहिणीकांत ॥ सरितानाथ उचंबळे ॥३६॥
नातरी हिरकणी देखोनि सुंदरा ॥ ऐरणींतूनि निघे हिरा ॥ येरयेरांच्या अंतरा ॥ साक्ष जैसी प्रतीती ॥३७॥
कां चुंबकाची देखोनि प्रीती ॥ लोहरज येती तयाप्रती ॥ तेवीं द्विजवरांची अत्यंत प्रीती ॥ तुकया चित्तीं जाणवलें ॥३८॥
म्हणूनियां लवडसवडी ॥ विष्णुभक्त जातसे तांतडी ॥ श्रीहरीचे गुण कडोविकडी ॥ अति आवडीं गातसे ॥३९॥
अर्ध पंथ लोटतां त्वरित ॥ तों द्विजवर देखिले अकस्मात ॥ तुकयानें मग दंडवत ॥ अति प्रीतीनें घातलें ॥१४०॥
यावरी धरामर बोलत ॥ तूं साक्षात विष्णुभक्त ॥ म्हणोनि दर्शनाचा धरूनि हेत ॥ येत होतों तुजपासीं ॥४१॥
तंव येथेंच मनोरथ पूर्ण जाहले ॥ मग सप्रेम आलिंगन दिधलें ॥ आसनावरी द्विजवर बैसले ॥ तुकयासी बोलिले ते ऐका ॥४२॥
कलीमाजी अवतार घेउनी ॥ त्वां अघटित चरित्र दाखविलें जनीं ॥ हें देखिलें आपुलें नयनीं ॥ विस्मित मनीं होतसों ॥४३॥
मग अवसर पाहूनि एकांतीं ॥ पुसावयासी आलों तुम्हांप्रती ॥ तरी कोण आहां तें सत्वरगती ॥ आम्हांसी निश्चितीं सांगावें ॥४४॥
ऐकूनि द्विजवरांचें वचन ॥ विचार करी मनांतून ॥ म्हणे यांसी प्रचीत दाखविल्याविण ॥ संशयखंडन नव्हेचि ॥४५॥
मग आपुलें मांडींचें चर्म धरूनी ॥ ओढून चिरिलें तये क्षणीं ॥ तंव निखळ कापूस पिंजरोनी ॥ भरिला असे त्यामाजी ॥४६॥
हें द्विजवरांहीं द्केहोनि दृष्टीं ॥ आश्चर्य करिती आपुलें पोटीं ॥ म्हणती तुकयाची मनुषरहाटी ॥ कैची चालती कळेना ॥४७॥
रुधिर मांस नसतां कांहीं ॥ कैसें चैतन्य राहिलें देहीं ॥ एक म्हणती मायालाघवी ॥ ईश्वरकरणी अघटित ॥४८॥
पंच भूतांचें ओडंबर कोडें ॥ माया ममतेच्या लावूनि तोंडें ॥ जीवासी लाविलें विषयवेडें ॥ प्रपंचकाबाडें वाढविलें ॥४९॥
याविरहित तुका वैष्णवभक्त ॥ अनुभवें कळों आली प्रचीत ॥ यासी म्हणों नये मनुष्य प्राकृत ॥ जगद्गुरु निश्चित अवतरला ॥१५०॥
जैसें गंगेसी न म्हणावें जीवन ॥ कीं परिसासी न म्हणावें पाषाण ॥ कनकासी अन्य धातूंसमान ॥ लेखो नये सर्वथा ॥५१॥
वृक्ष नव्हेचि कल्पतरू ॥ कीं समुद्र न म्हणावा सरोवरू ॥ कीं इतर पर्वतांसमान मेरू ॥ लेखों नयेचि सर्वथा ॥५२॥
अंडाजयातीमाजी जाण ॥ निजभक्त जन्मला सुपर्ण ॥ तेवीं शूद्रयातींत हा वैष्णवजन ॥ उपमा गौण दिसताहे ॥५३॥
गरुडें विष्णूचें होऊनि वहन ॥ आपुलें शरीर केलें पावन ॥ तुकयानें करूनि हरिकीर्तन ॥ जड जीव संपूर्ण उद्धरिले ॥५४॥
पुढेंही याची ऐकोनि कवितां ॥ वैराग्य उपजेल खळांचें चित्ता ॥ भाविक सज्ञान वैराग्यभक्तां ॥ मार्ग प्रांजळ दाविला ॥५५॥
ऐसें बोलोनि द्विजवर ॥ तुकयासी करिती नमस्कार ॥ येरू वरवरी धरूनि शिर ॥ चरणीं सादर लागला ॥५६॥
विप्रांसी म्हणे ऐका मात ॥ हें तुम्हीं करितसां अनुचित ॥ आमुचा स्वामी भृगूची लात ॥ हृदयीं वागवीत अद्यापि ॥५७॥
जो देवाधिदेव जगज्जीवन ॥ त्यासही तुम्ही पूज्यमान ॥ आणि मी हीनयाति अनाथ दीन ॥ देतसां थोरपण निजकृपें ॥५८॥
यावरी द्विजवर उत्तर देती ॥ ज्यासी विष्णुभजनीं लागली प्रीती ॥ त्याची म्हणावया नीच जाती ॥ कुंठित श्रुति जाहल्या कीं ॥५९॥
वानर विनटले श्रीरामभजनीं ॥ तें वाल्मीकें वर्णिलें रामायणीं ॥ गोवळ्यांची कीर्ति पुराणीं ॥ ठेविली लिहूनि श्रीव्यासें ॥१६०॥
म्हणोनि तुझी करावया स्तुती ॥ अधिकार आहे आम्हांप्रती ॥ जे विष्णुभक्तांची अद्भुत कीर्ती ॥ भरूनि त्रिजगती उरली असे ॥६१॥
बहुत दिवस होता हेत ॥ तो आजि पुरला मनोरथ ॥ जे मांडी चिरूनि निजहस्तें त्वरित ॥ दाविली प्रचित आम्हांसी ॥६२॥
पुढती आलिंगन देउनि प्रीतीं ॥ ब्राह्मण तुकयासी काय बोलती ॥ चिंचवडीं चलोनि एक रातीं ॥ कीर्तन निगुती करावें ॥६३॥
त्यांचें राखावया मनोगत ॥ नगरांत गेले एक रात ॥ तों लोहोगांवींचे मिळोनि गृहस्थ ॥ विचार करीत एकमेकां ॥६४॥
म्हणती तुकयासी आणोनि आपुलें नगरीं ॥ कीर्तन ऐकावें धणीवरी ॥ ते सेवितां प्रेमामृतलहरी ॥ सार्थक संसारीं होईल ॥६५॥
मग तुकायासी विनीत होऊनी ॥ लोहोगांवासी नेलें तयांनीं ॥ नित्य नित्य आवडीकरूनी ॥ ऐकती श्रवणीं हरिकथा ॥६६॥
भाविक लोक जे सज्जन ॥ करिती ब्राह्मणसंतर्पण ॥ नानापरींचीं पक्वानें करून ॥ घालिती भोजन विप्रांसी ॥६७॥
दिव्य मंडप उभारून ॥ पुष्पाहार सुगंध चंदन ॥ कीर्तनासी प्रारंभ होतां जाण ॥ करिती पूजन वैष्णवांचें ॥६८॥
लोहोगांवांत एक मास ॥ नित्य नित्य सोहळा विशेष ॥ तंव पंढरपुरचे हरिदास ॥ देशावरास चालिले ॥६९॥
तंव व्यवसायी बैसोनि अश्वावरी ॥ सत्वर चालिला बाजारीं ॥ देखोनि हरिदास ते अवसरीं ॥ काय बोलती तयासी ॥१७०॥
अश्वारूढ होऊनि मार्ग क्रमिसी ॥ येथें तुज निद्रा लागली कैसी ॥ हें नवल देखोनि दृष्टीसी ॥ आश्चर्य आम्हांसी वाटलें ॥७१॥
तंव व्यवसायी बोले त्यांकारण ॥ चार्‍ही प्रहर रात्रीं जागरण ॥ ऐसें एक मासपर्यंत जाण ॥ होतसे कीर्तन तुकयाचें ॥७२॥
ऐसी ऐकोनियां मात ॥ हरिदास जाहले चिंताक्रांत ॥ म्हणती आपण लोहोगांवांत ॥ आतां न जावें सर्वथा ॥७३॥
जेथें प्रेमळाचें कीर्तन होत ॥ तरी आपुलें कसब न रुचे तेथ ॥ जेवीं रोगियासी लाधलें दिव्यामृत ॥ तो न घे औषध कल्पांतीं ॥७४॥
अमूल्य हिरियांसी दीप्ती ॥ कांचमणी लोपोनि जाती ॥ नातरी उदयासी येतां गभस्ती ॥ दीपक हरपती त्यापुढें ॥७५॥
समीप गंगा वाहतां जाण ॥ तेथें मग वापीकूपांसी पुसे कोण ॥ तेवीं प्रासादिकांचें ऐकतां कीर्तन ॥ धीटपाठ गायन रुचेना ॥७६॥
तरी लोहोगांव डावलोनियां पुढारा ॥ आतां चलावें आणिका नगरा ॥ ऐसें बोलोनियां येरयेरां ॥ हरिदास सत्वरां परतले ॥७७॥
गांवींचे लोक होत तेथ ॥ ते सत्वर येऊनि नगरांत ॥ तुकयासी सांगती वृत्तांत ॥ जो देखिला दृष्टीसी ॥७८॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ तेथोनि उठिला न लागतां क्षण ॥ म्हणे आपण सामोरा जाऊन ॥ आणावें प्रार्थून हरिदासां ॥७९॥
आपण सवेग चालत ॥ अंतरीं उल्हास वाटे बहुत ॥ ग्रामवासी लोक समस्त ॥ तेही चालती सामोरे ॥१८०॥
म्हणती पंढरीक्षेत्रीं हरिदास ॥ चालिले होऊनि उदास ॥ त्री आपण प्रार्थूनियां तयांस ॥ आणावें नगरास आपुल्या ॥८१॥
मग पुढें धांवणार पाठवूनी ॥ परतविलें तयांलागोनी ॥ म्हणती वष्णव तुका आवडीकरूनी ॥ भेटावयासी येतसे ॥८२॥
इतुका निरोप सांगतां जाण ॥ तंव तेही पावले न लागतां क्षण ॥ मग हरिदासांसी करूनि नमन ॥ देऊनि आलिंगन भेटले ॥८३॥
तुकयास म्हणती क्षेत्रवासी ॥ आम्हीं पातलों देशावरासी ॥ कीं घरीं लग्न वैशाखमासीं ॥ करणें असे पुत्राचें ॥८४॥
अवश्य म्हणोनि ते वेळे ॥ गांवांत हरिदासांसी आणिलें ॥ राहावयासी देऊनि स्थळ चांगलें ॥ शिधासाहित्य पाठविलें ॥८५॥
मग करूनियां भोजन ॥ रात्रीं करिती हरिकीर्तन ॥ एकमासपर्यंत जाण ॥ होतसे आनंद या रीतीं ॥८६॥
मग ग्रामवासियां भाविक लोकां ॥ आज्ञा करी वैष्णव तुका ॥ आतां देशावर करूनि देखा ॥ हरिदासां वाटे लावावें ॥८७॥
ब्राह्मणांचे कष्ट घेऊन ॥ मग त्यांसी द्यावें द्रव्यदान ॥ हें तुम्हांसी वाटतें भूषण ॥ परी पदरीं पुण्य पडेना ॥८८॥
तरी नगरांत आहेत वस्तिकर ॥ नांदताति  लहान थोर ॥ त्यांची शक्ति पाहूनि साचार ॥ मागा देशावर सकळांसी ॥८९॥
ऐकोनि तुकयाची वाणी ॥ अवश्य म्हणती तये क्षणीं ॥ मग दऊत लेखणी पत्र आणोनी ॥ आसाम्या मांडोन दिधल्या ॥१९०॥
उत्तम मध्यम कनिष्ठ जाण ॥ नगरांत नांदत असती जन ॥ ते म्हणती तुकयालागोज्न ॥ पत्रीं अंक घालावा ॥९१॥
मग उत्तमावरी घालूनि तुळ ॥ टाळी लिहिली मध्यमावर ॥ कनिष्ठावरी पकार ॥ लिहिला सत्वर ते समयीं ॥९२॥
तें देखोनि ग्रामवासी ॥ म्हणती हें नये आमुचें चित्तासी ॥ मग तुका उत्तर देत तयांसी ॥ जें येईल चित्तासी तें करा ॥९३॥
त्यांनीं उल्हास धरून अंतरीं ॥ मूळु लिहिलें उत्तमावरी ॥ उदाणुकें आंख झडकरी ॥ मध्यमावरी टाकिला ॥९४॥
पकार होता कनिष्ठावरी ॥ एक आंख घातला त्यावरी ॥ तुकयास दाऊनि सत्वरी ॥ गांवकरी ऊठले ॥९५॥
गांवांत जाऊनि सत्वर ॥ उकलोनि आणिलें देशावर ॥ मुख्य जे म्हणवीत होते थोर ॥ ते तुकयासी उत्तरबोलती ॥९६॥
पुढें ठेवूनि द्रव्यराशी ॥ म्हणती आम्हीं युक्त केली कैसी ॥ आतां देशावर हरिदासांसी ॥ आपुले हातीं समर्पा ॥९७॥
ऐसें बोलतां ते अवसरीं ॥ तुकयासी कळों आलें अंतरीं ॥ कीं दातियांच्या चित्तांतरीं ॥ अहंकारवैरी प्रकटला ॥९८॥
जैसी पक्वान्नांत पडिली मक्षिका ॥ कीं दुग्धामाजी लवणकणिका ॥ कीं प्रेमळांमाजी लटिका ॥ कुटिळ येऊन बैसला ॥९९॥
कीं तारुण्यदशेंत क्षयरोग ॥ कीं विप्रसभेंत प्रकटला मांग ॥ नातरी विरक्तासी स्त्रीसंग ॥ कर्मयोगें जोडला ॥२००॥
कीं क्षेत्र पिकासी आलें बहुत ॥ तों टोळधाड पडली अकस्मात ॥ कीं पश्चिमधान्यांवरी मार्गेश्वरांत ॥ तांबारा अवचित पडियेला ॥१॥
नातरी गगनीं ओळल्या पर्जन्याधारा ॥ तों अकस्मात सुटला दक्षिणवारा ॥ कीं पौर्णिमेचा चंद्र उगवतां बरा ॥ तंव राहु प्रगटला त्याआड ॥२॥
तेवीं दान देते अवसरीं ॥ यासी अभिमान पातला वैरी ॥ जेणें होय याची बोहरी ॥ तैसीच परी करावी ॥३॥
मग लोकांसी म्हणे वैष्णवभक्त ॥ देशावर आणिलें तुम्हीं समस्त ॥ तरी चुकलें वांकलें गांवांत ॥ राहूं सर्वथा न द्यावें ॥४॥
लोक म्हणती ते वेळ ॥ गांवांत साळी एक दुर्बळ ॥ तो निंदक नष्ट महाखळ ॥ नाहीं प्रेमळ अंतरीं ॥५॥
तो एक राहिला असे जाण ॥ इतरीं दिधलें शक्तिप्रमाण ॥ ऐसें ऐकोनि वचन ॥ भक्त प्रेमळ बोलत ॥६॥
तुम्ही जाऊनि त्याचें मंदिरीं ॥ माझा निरोप सांगा सत्वरीं ॥ रुका अधेला कांहीं तरी ॥ आणा धर्मार्थ मागुनी ॥७॥
ऐकोनि तुकयाचें वचन ॥ आश्चर्य करिती सकळ जन ॥ मग साळियाचें घरासी जाऊन ॥ अंगणीं उभे राहिले ॥८॥
परी तो कांहींचि न बोले वचनासी ॥ पांजणी करी वेगेंसीं ॥ तुम्ही कोण आलेत कासयासी ॥ उत्तर कोणासीं करीना ॥९॥
गांवकरी विस्मित होऊन ॥ एकमेकांसी सांगती खूण ॥ म्हणती तुकयाचे भिडेकरून ॥ मूर्खापासीं पातलों ॥२१०॥
परी हा कांहीं न बोले वचन ॥ मग बोलते जाहले सकळ जन ॥ पंढरीचे हरिदास आले जाण ॥ एक मास कीर्तन होतसें ॥११॥
कांहीं देशावर मागावयासी ॥ तुकयानें पाठविलें तुजपासीं ॥ वचनें ऐकोनि ऐसीं ॥ मूर्ख मानसीं संतापला ॥१२॥
म्हणे तुकयानें मांडिली बडबड ॥ तैंपासोनि तुम्हां लागलें वेड ॥ सांडोनियां लौकिकचाड ॥ नाचतां उघड कीर्तनीं ॥१३॥
आपुल्या संसारा पाडूनि तुटी ॥ आतां कां घेतसां माझी पाठी ॥ घरीं नाहीं थाळा वाटी ॥ मी तुम्हांसी शेवटीं काय देऊं ॥१४॥
ऐकूनि मूर्खाचें वचन ॥ कांता बोले त्यालागून ॥ थोर थोर लोक तुकयाचें वचनें ॥ अंगणीं येऊन उभे कीं ॥१५॥
तुम्ही निंदक परम खळ ॥ मुखें न बोला शब्द रसाळ ॥ बैसावयासी निर्मळ स्थळ ॥ तेंही न मिळे सर्वथा ॥१६॥
आतां विवेक करूनि चित्तीं ॥ कांहीं तरी द्यावें यांप्रती ॥ ऐकोनि कांतेची वचनोक्ती ॥ मूर्ख चित्तीं संतापला ॥१७॥
सक्रोध होऊनि बोले काय ॥ एक तांब्या घरांत आहे ॥ तो यांसी देऊनि लवलाहें ॥ वाटे लावीं सत्वर ॥१८॥
ऐकूनि भ्रताराचें वचन ॥ कांता पावली समाधान ॥ मग उदकपात्र आणून ॥ त्याचे करीं दीधलें ॥१९॥
त्यानें दिधलें डाव्या करीं ॥ यांनीं लभ अनुभविला अंतरीं ॥ त्यांब्या घेवोनियां करीं ॥ निघाले झडकरी तेथूनी ॥२२०॥
आश्चर्य करिताती सकळ ॥ म्हणती प्रसन्न जाहला खळ ॥ दावाग्नि होय शीतळ ॥ कीं शेरासी फळ जैसें आलें ॥२१॥
आजि शुष्क काष्ठासी अंकुर फुटला ॥ कीं पाषाणासी घर्म दाटला ॥ कीं राहु सोज्ज्वळ होऊनि भला ॥ प्रकाश पाडिला जगावरी ॥२२॥
तैसेंचि घडोनि आलें स्पष्ट ॥ जें उदारत्व धरी हा परम नष्ट ॥ एक म्हणती आपुलें अदृष्ट ॥ सानुकूल होतें कीं ॥२३॥
ऐसें बोलोनि परस्पर ॥ तुकयापासीं आले सत्वर ॥ पुढें ठेवोनि उदकपात्र ॥ करिती नमस्कार तेधवां ॥२४॥
तें देखोनि वैष्णव वीर ॥ लोकांसी बोले प्रतिउत्तर ॥ तो साळी आहे मोठा उदार ॥ दिधलें देशावर बहुतचि ॥२५॥
आपुले करें घेऊनि त्वरित ॥ म्हणती हें आहे सुवर्णपात्र ॥ तुम्हांसी न कळलें अणुमात्र ॥ परीक्षा स्वतंत्र कळेना ॥२६॥
लोक म्हणती तये वेळ ॥ हें पितळेचें पात्र सोज्ज्वळ ॥ उजोळोनि केलें अति निर्मळ ॥ कांचनाऐसें दिसतें कीं ॥२७॥
अग्नींत तावूनि पाहता जाण ॥ तंव ते आहे शुद्ध सुवर्ण ॥ ऐसें कौतुक देखोन ॥ विस्मित मन सकळांचें ॥२८॥
म्हणती अघटित संतांचा महिमा ॥ पितळेचि दवडिली काळीमा ॥ अद्भुत तुकयाचा भजनप्रेमा ॥ द्यावया उपमा नसे कीं ॥२९॥
मग हरिदासांसी बोलावून ॥ केलें तयांचें चरणक्षालन ॥ पुष्पाहार गळां घालून ॥ दिधलीं वस्त्रें सकळांसी ॥२३०॥
गांवकरी म्हणती देशावर ॥ आणिला करा अंगिकार ॥ सकळ करिती नमस्कार ॥ अति आदरेंकरूनी ॥३१॥
मग वैष्णव तुका काय बोलत ॥ ग्रामवासी हे उदार बहुत ॥ यांणीं द्रव्य उकळोनि त्वरित ॥ दिधलें निश्चित तुम्हांसी ॥३२॥
एक दुर्बळ साळी ग्रामवासी ॥ परम शठ म्हणती त्यासी ॥ त्यानें सुवर्णपात्र तुम्हांसी ॥ मनोभावेंसीं अर्पिलें ॥३३॥
हें तुळसीदळ अंगीकारून ॥ करावें आपुलें पुत्राचें लग्न ॥ ऐसें बोलूनियां वचन ॥ वंदिलें चरण सद्भावें ॥३४॥
आम्ही एक उदार दाते जनीं ॥ हा अभिमान होतां ज्यांचें मनीं ॥ ते हें कौतुक देखोनि नयनीं ॥ तल्लीन होऊनि राहिले ॥३५॥
हरिदास संतोष मानूनि बहुत ॥ पंढरपुरासी गेले त्वरित ॥ प्रेमळ तुका अति विरक्त ॥ देहूग्रामासी पातला ॥३६॥
सांडोनियां सन्मानपूजा ॥ हृदयीं चिंती अधोक्षजा ॥ दीन अनाथ आणि राजा ॥ सारिखेचि मानी दृष्टीसी ॥३७॥
तंव एके दिवसीं प्रेमळ भक्त ॥ किंचित होतां निद्रित ॥ तों दृष्टांत देखिला साक्षात ॥ तो परिसा श्रोते भाविक हो ॥३८॥
इंद्रायणीचे स्नानास जात ॥ तंव काय करीत पंढरीनाथ ॥ विप्राचा वेष धरूनि त्वरित ॥ तुकयासी अवचित भेटले ॥३९॥
ब्राह्मण देखूनि दृष्टीसी ॥ साष्टांग नमस्कार घातला तयासी ॥ मग तुकयाचें मस्तकीं हृषीकेशी ॥ हस्त ठेवीत निजकृपें ॥२४०॥
उपदेश देतांचि त्या अवसरा ॥ नमस्कार केला द्विजवरा ॥ म्हणे स्वामी येऊनि माझिया घरा ॥ भोजन करा निजप्रीतीं ॥४१॥
त्यावरी ब्राह्मण उत्तर देत ॥ आम्हांस पावशेर पाहिजे घृत ॥ तें देशील तरी निश्चित ॥ येतों त्वरित घरासी ॥४२॥
अवश्य म्हणूनि ते अवसरीं ॥ विप्रासी धरिला आपुले करीं ॥ सत्वर येऊनि स्वमंदिरीं ॥ कांतेप्रति बोलत ॥४३॥
ब्राह्मण क्षुधित उपवासी ॥ तरी शिधा साहित्य द्यावें त्यासी ॥ पावशेर घृत नित्य भोजनासी ॥ मनोभावें अर्पावें ॥४४॥
ऐसें बोलतांचि वचन ॥ कांता जाहली क्रोधायमान ॥ म्हणे कोठोनि आणिला ब्राह्मण ॥ घृत कोठून म्यां द्यावें ॥४५॥
ऐसें ऐकोनि कठिणोत्तर ॥ अदृश्य झाले शारंगधर ॥ जो लीलानाटकी सर्वेश्वर ॥ कौतुक दाखवी निजभक्तांसी ॥४६॥
ऐसा देखोनि स्वप्नसंभ्रम ॥ जागृतीस आले तुकाराम ॥ हृदयीं अद्भुत दाटलें प्रेम ॥ कौतुक निरुपम देखोनी ॥४७॥
म्हणती कृपा केली सद्गुरुनाथें ॥ परी सेवा घडली नाहीं मातें ॥ मार्गी जातां गंगास्नानातें ॥ सांपडविलें मजलागीं ॥४८॥
मस्तकीं ठेवोनियां कर ॥ घृत मागोनि पावशेर ॥ घरीं कलह मांडिला थोर ॥ गेले सत्वर म्हणूनी ॥४९॥
केशवचैतन्य राघवचैतन्य ॥ सांगितली माळिकेची खूण ॥ बाबाजी आपुलें नामाभिधान ॥ बोलिले वचन सद्गुरु ॥२५०॥
आवडीचा मंत्र झडकरी ॥ सांगितला रामकृष्णहरी ॥ जो प्रीतीकरूनि त्रिपुरारी ॥ निरंतरी जपतसे ॥५१॥
माघ शुद्ध दशमी साचार ॥ पाहोनियां गुरुवार ॥ माझा करूनि अंगीकार ॥ गेले सत्वर सद्गुरु ॥५२॥
ऐसा विश्वास धरून प्रेमें करी हरिभजन ॥ रात्रीं आनंदेंकरून ॥ करीत कीर्तन निजनिष्ठें ॥५३॥
नानापरींचें दृष्टांत अनेक ॥ रसाळ प्रासादिक ॥ श्रवणीं ऐकतां सभाग्य लोक ॥ होती तल्लीन मानसीं ॥५४॥
म्हणती हा नव्हे मानववीर ॥ केवळ ईश्वरी अवतार ॥ याचेनि मुखें रुक्मिणीवर ॥ करी उद्धार जनांचा ॥५५॥
ऐसी प्रतिष्ठा वाढतां जनीं ॥ दुरात्मे संतप्त जाहले मनीं ॥ म्हणती शास्त्रमार्ग टाकोनी ॥ पाखंडवाणी बोलतसे ॥५६॥
कर्ममार्ग सकळ बुडवून ॥ भजनीं लाविले भाविक जन ॥ एक भक्तिमार्गावांचून ॥ न बोले आन सर्वथा ॥५७॥
तुकयानें केलें जें कवित ॥ त्या वह्या बांधोनि वस्त्रांत ॥ उदकांत बुडवाव्या त्वरित ॥ विचार निश्चित दृढ केला ॥५८॥
जैसी गंडिकामूर्ति देखोनि ॥ यवन उगेचि जळती मनीं ॥ मग अंतरीं कुमती धरूनि ॥ टाकूं फोडूनि म्हणताती ॥५९॥
कां पिंजर्‍यांत शुक बैसोन ॥ स्वच्छंदें करी रामभजन ॥ तो शब्द कानीं ऐकून ॥ ससाणा मनीं संतापे ॥२६०॥
नातरी व्रत करितां एकादशी ॥ मान्यत्व पावला अंबऋषी ॥ मग दुर्वास संतप्त होऊनि मानसीं ॥ पातला छळणासी सक्रोध ॥६१॥
तैशापरी ते दुर्जन ॥ प्रवेशले तुकयाचें सदन ॥ म्हणती तुवां पाखंड रचून ॥ लाविले जन भक्तीसी ॥६२॥
हे तुझी प्राकृत अशुद्ध वाणी ॥ सर्वथा ऐकू नये श्रवणीं ॥ ऐसें म्हणूनि त्या दुर्जनीं ॥ पुस्तकें हिरोनि घेतलीं ॥६३॥
मोटा बांधोनि सत्वरी ॥ पाषाण घातले त्यांभीतरी ॥ नेऊनि इंद्रायणी तीरीं ॥ उदकामाझारी बुडविल्या ॥६४॥
ब्राह्मण म्हणती तुकयालागून ॥ तेरा दिवसांचा घातला पण ॥ जरी कोरडे काढील जगज्जीवन ॥ तरी मानूं प्रमाण यथार्थ ॥६५॥
ऐसें बोलूनि ते अवसरीं ॥ गेले सत्वर आपुलें घरीं ॥ तुकयाचिया चित्तातरीं ॥ विक्षेप फार वाढला ॥६६॥
जैसी कांचेची कुपी ओतिली ॥ ते अवचित फोडूनि टाकिली ॥ कां पट्टदुकूलाची घडी केली ॥ ते पावकें जाळिली अकस्मात ॥६७॥
नातरी बकुळाचा वृक्ष लागला ॥ तो अजापाळकें तोडोनि टाकिला ॥ विक्षेप वाटे वनकरा ॥ तैसें तुकयाला जाहलें कीं ॥६८॥
कीं निर्जळ वनींच्या विहिरी बुजवितां ॥ तळमळ करी कनवाळू दाता ॥ नातरी तुळसीवन बोकडें खंडितां ॥ वैष्णवभक्तां विक्षेप ॥६९॥
कां षड्रस रांधिलें पक्वान्न ॥ त्यासी अकस्मात शिवे श्वान ॥ मग स्वयंपाकीण विक्षेप पावोन ॥ उद्विग्न मनीं होतसे ॥२७०॥
कीं गार म्हणोनि अकस्मात ॥ मुक्ताफळ टाकिलें अग्नींत ॥ मग जोहारी आपुलें चित्तांत ॥ हळहळ करीत मानसीं ॥७१॥
तेवीं वह्या बुडवितां दुर्जन ॥ तुकयाचें विक्षेप पावलें मन ॥ जाहलें प्रेमाचें खंडन ॥ अरिष्ट दारुण देखोनी ॥७२॥
मग देउळांत येऊनि ते अवसरीं ॥ धरणें घेतलें महाद्वारीं ॥ जैसी द्वारांतली पायरी ॥ उठों नेणेचिस सर्वथा ॥७३॥
म्हणे अनाथनाथा पंढरीराया ॥ मजहातीं कष्ट करविले वायां ॥ शेवटीं अरिष्ट उठवोनियां ॥ बुडविल्या वह्या उदकांत ॥७४॥
तुवां स्वप्नीं येऊनि वनमाळी ॥ मज मतिमूढासी आज्ञा केली ॥ जे नामदेवाची बाकी राहिली ॥ ते बोलविली प्रासादिक ॥७५॥
ऐसें असतां रुक्मिणीकांता ॥ तरी हें अरिष्ट ओढावले कां आतां ॥ बरें जें येईल तुझिया चित्ता ॥ तें पंढरीनाथा करावें ॥७६॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ रूप आठविलें निजअंतरीं ॥ मुखीं मंत्र रामकृष्णहरी ॥ सप्रेमभरीं जपतसे ॥७७॥
न घे फल मूल अथवा अन्न ॥ न बोले कोणासी प्रतिवचन ॥ सांडोनि देहभान आशा जाण ॥ उदकपान करीना ॥७८॥
हें निर्वाण देखोनि जगज्जीवनें ॥ बाळरूप सांवळें धरिलें सगुण ॥ तुकयाचें करावया समाधान ॥ रुक्मिणीरमण पातला ॥७९॥
मस्तकीं ठेवूनि अभयकर ॥ म्हणे तुझें स्वस्थ असों दे अंतर ॥ अरिष्ट जाहलें जें दुर्धर ॥ तें मी शारंगधर निवारितों ॥२८०॥
ऐसें बोलोनि ते वेळ ॥ अदृश्य जाहला तमालनीळ ॥ कीं तुकयाचें हृदयकमळ ॥ देखिलें निर्मळ बैसावया ॥८१॥
तेथेंचि अदृश्य होउनी ॥ सुरवाडले चक्रपाणी ॥ पदसंधीचे निरूपणीं ॥ मजलागोनी भासतें ॥८२॥
ऐसे तेरा दिवस लोटतां जाण ॥ पुस्तकें पाहती विचक्षण ॥ तों अक्षरांलागीं जीवन ॥ आतळलें नाहीं सर्वथा ॥८३॥
म्हणती अन्याय घडला नेणतपणें ॥ विष्णुभक्ताचें केलें छळण ॥ परी तयाचा साह्य जगज्जीवन ॥ अरिष्ट दारुण निजसिलें ॥८४॥
ऐसा अनुताप धरूनि अंतरीं ॥ सत्वर आले महाद्वारीं ॥ तुकयासी म्हणती ते अवसरीं ॥ पावले श्रीहरी तुजलागीं ॥८५॥
कोरडे कागद निघाले जाण ॥ आतां पाहें दृष्टि उघडून ॥ ऐसें म्हणोनि सकळ जन ॥ करिती नमन साष्टांगीं ॥८६॥
म्हणती जयासी साह्य रुक्मिणीपती ॥ तेथें आमुचा अपाय तो किती ॥ अमृतकुपींत रोग शिरती ॥ हें कल्पांतीं घडेना ॥८७॥
नातरी भास्कराचिया घरा ॥ प्रवेश नव्हेचि अंधकारा ॥ कीं चंद्रमंडळांत उबारा ॥ रिघों न शके जया रीतीं ॥८८॥
तेवीं विष्णुभक्तावरी प्रयत्न ॥ करितां अरिष्ट न चले जाण ॥ ऐसें परस्परें बोलोनि वचन ॥ नामस्मरण करिताती ॥८९॥
तुकयानें नेत्र उघडोनी ॥ पुढें पाहे विलोकूनी ॥ तों कोरड्याचि वह्या ब्राह्मणांनीं ॥ देउळीं आणूनी ठेविल्या ॥२९०॥
हें कौतुक दृष्टीसी देखोन ॥ चित्तीं वाटलें समाधान ॥ जैसें अंधासी नेत्र येतां जाण ॥ उल्हासे मन तयाचें ॥९१॥
कीं मुखीं घालितां सुधारस ॥ मृत प्रेत उठोन सोडी श्वास ॥ तैसा तुकयाचें मनीं उल्हास ॥ म्हणे पंढरीनिवास पावला ॥९२॥
बद्धांजली जोडूनि मग ॥ स्वमुखें बोलिला सात अभंग ॥ तो अनुपम बहुत प्रेमरंग ॥ वर्णितां नये सर्वथा ॥९३॥
परी किंचित अन्वय यथानिगुतीं ॥ परिसा श्रवणीं निजप्रीतीं ॥ तुकयानें लाविलीं नेत्रपातीं ॥ सद्गद चित्तीं होउनीं ॥९४॥
म्हणे जयजयाजी श्रीविठ्ठला ॥ बहुत अन्याय मज घडला ॥ लागूनि लोकांचिया बोला ॥ भार घातला तुजवरी ॥९५॥
तुज केला बहुत शीण ॥ मी तंव अधम यातिहीन ॥ तेरा दिवस झांकोनि नयन ॥ तुझ्या द्वारीं बैसलों ॥९६॥
ताहानभुकेचें कोडें श्रीहरी ॥ तोही भार घातला तुजवरी ॥ माझिया बैसोनि हृदयमंदिरीं ॥ योगक्षेम मुरारी त्वां केला ॥९७॥
उदकीं कोरडे राखिले कागद ॥ चुकविला लौकिक अपवाद ॥ त्वां अनाथनाथें आपुलें बिरुद ॥ साच केलें दयाळा ॥९८॥
बाळवेष धरूनि निगुतीं ॥ मज भेटलासी रुक्मिणीपती ॥ समाधान करूनि प्रीतीं ॥ अभय निजहस्तें दिधलें ॥९९॥
आतां कापोत माझी मान ॥ सुखें पीडा करोत दुर्जन ॥ परी कदापि संकट तुजकारण ॥ न घालीं जाण सर्वथा ॥३००॥
मी तंव चांडाळ दुष्ट पतित ॥ एकदां चुकी घडली यथार्थ ॥ उभें करूनि उदकांत ॥ वह्या राखविल्या तुजहातीं ॥१॥
समर्थासी घालावया भार ॥ आपुल्यासी नाहीं अधिकार ॥ हें सर्वथा नेणेंचि मी पामर ॥ विवेकविचार कळेना ॥२॥
होऊनि गेली जे श्रीपती ॥ ते गोष्टी परतोनि न ये पुढती ॥ पुढें तरी रक्मिणीपती ॥ संकट तुजवरी घालींना ॥३॥
मानेवरी ठेविली नसतां सुरी ॥ घाय न हाणितां पाठीवरी ॥ तों म्यां उतावीळ होऊनि श्रीहरी ॥ आकांत तुजवरी हा केला ॥४॥
मजपासीं आणि डोहा आंत ॥ दों ठायीं वाटलें तुझें चित्त ॥ दोन्ही चुकवूनियां आघात ॥ वाढविली कीर्ति लौकिकीं ॥५॥
तुज म्हणों मायबापासमान ॥ परी तीं स्वल्पासाठीं घेऊं पाहाती प्राण ॥ म्यां अघटित केलें जाण ॥ परी साह्य जगज्जीवन तूं एक ॥६॥
तूं कृपासागर चक्रपाणी ॥ तुजसमान न देखों त्रिभुवनीं ॥ स्तुति करावी प्रीतीकरूनी ॥ तरी कुंठित वाणी जाहली कीं ॥७॥
तूं दीनबंधु दयाळ ॥ शशीपरीस अति शीतळ ॥ माउलीपरीस स्नेहाळ ॥ येती कल्लोळ प्रेमाचे ॥८॥
तूं अर्निवाच्य देवाधिदेव ॥ उपमा द्यावयासी नाहीं ठाव ॥ सकळ जीवांचाही जीव ॥ निवाला शिव नाम जपतां ॥९॥
महद्भूतें पांच निर्माण ॥ तींही तुजपासोनि जाण ॥ गोड म्हणूं अमृतासमान ॥ तरी तूं जगज्जीवन त्यांपरता ॥३१०॥
आतां न बोलतां कांहीं ॥ उगाचि माथा ठेवितों पायीं ॥ अनंत अपराध विठोबाई ॥ क्षमा करी तूं स्नेहाळे ॥११॥
मी अवगुणी अन्यायी फार ॥ कीती सांगों वारंवार ॥ पुरे पुरे हा संसार ॥ चित्त स्थिर होऊं नेदी ॥१२॥
अनंत बुद्धीचे विकल्प जाण ॥ तरंग पालटती क्षणक्षण ॥ संसर्ग करितां जाण ॥ तैं बद्ध मन होतसें ॥१३॥
देवाधिदेवा पंढरीनाथा ॥ सकळ निरसीं माझी चिंता ॥ कर्मजाळ निरसोनि अनंता ॥ हृदयमंदिरीं असावें ॥१४॥
ऐशिया रीती तुकयानें प्रेमें आळविला श्रीरुक्मिणीरमण ॥ मग अंतरगाभारां रिघोन ॥ दिधलें आलिंगन देवासी ॥१५॥
सगुण स्वरूपीं गुंतले लोचन ॥ मुखें करीत नामस्मरण ॥ पुढें देहासहित तुकाराम जाण ॥ वैकुंठभुवन पातला ॥१६॥
ते कथा सविस्तर ल्याहावीं ग्रंथीं ॥ तों हृदयस्थ सांगे रुक्मिणीपती ॥ कीं तुकाराम अद्यापि स्थितीं ॥ आहे निश्चतीं इहलोकीं ॥१७॥
निजनिष्ठ जे कां प्रेमळ भक्त ॥ तयांसी स्वप्नीं दर्शन देत ॥ जैसा दत्तात्रेय अनसूयासुत ॥ स्वेच्छा विचरत भूमंडळीं ॥१८॥
याचा संशय वाटेल मनीं ॥ तरी साक्ष ऐकिजे संतसज्जनीं ॥ निळोबाचें स्वप्नीं येऊनी ॥ उपदेश केला निजकृपें ॥१९॥
जरी चित्तीं शुद्ध असेल प्रेम ॥ त्यासी उपदेश देती तुकाराम ॥ तो जगद्गुरु निरुपम ॥ अद्यापि असे चिरंजीव ॥३२०॥
त्यानें कृपा करूनि एकांतीं ॥ ग्रंठ लिहविला माझे हातीं ॥ परी येविषयीं विचक्षण श्रोतीं ॥ संशय चित्तीं न धरावा ॥२१॥
तो विश्वव्यापक चैतन्यघन ॥ सद्गुरु तुकाराम आम्हांलागून ॥ महीपति तया अनन्य शरण ॥ देहाभिमान टाकोनी ॥२२॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ द्विपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥३२३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्री रस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP