पंचक - अभिभानपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
संसाराचें दु:ख आलें ।
गाणें अवघेंचि बुडालें ॥१॥
आतां आठवेना कांहीं ।
पडिलों चिंतेच्या प्रवाहीं ॥२॥
गाणें नाचणें सुखा़चें ।
जिणें जहालें दु:खाचें ॥३॥
म्हणे रामीं रामदास ।
कोण करितो सायास ॥४॥
॥२॥
नाना प्रकारींचें गाणें ।
मीच बाळपणीं जाणें ॥१॥
काय जाहले कळेना ।
एतेंही आठवेना ॥२॥
मज पाठांतर होतें ।
तितुकें कोणासी नव्हतें ॥३॥
रामदास म्हणे आतां ।
जीव जहाले दुश्चिता ॥४॥
॥३॥
वोढवलें पूर्वपाप ।
नानाप्रकारें संताप ॥१॥
तेणें शुद्धीच उडाली ।
नीति अवघीच बुडाली ॥२॥
केली क्तिया ते कळेना ।
मन विवेकें वळेना ॥३॥
भरीं भरलेंसे मन ।
अवघे तेंचि तें कारण ॥४॥
झोंबें विकल्पाचें श्वान ।
देहबुद्धि घेत रान ॥५॥
रामीं राम-दास म्हणे ।
अवघीं झालीं कुलक्षणें ॥६॥
॥४॥
सांत पांच गांववाट ।
अवघा एकचि चौहाट ॥१॥
तेथें कोणेकडे जावें ।
अवघी वाटचि स्वभाव ॥२॥
कोण दिसेना वेळेसी ।
वाट पुसावी कोणासी ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
तैसें संशय बोलणें ॥४॥

॥अभंगसंख्या ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP