गीतापद्यमुक्ताहार - अध्याय बारावा

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


अर्जुन --

ऐशा तुझ्या सगुण मूर्तिस नित्ययुक्त

जे पूज्य मानुनि तुला भजतात भक्त ।

की जे जगी असति निर्गुणसौख्यभोगी

योग्यांत त्या उभय उत्तम कोण योगी ॥१॥

भगवान --

माझ्याच ठाई धरूनी मनाते

जे भक्तिभावे भजतात माते ।

श्रद्धा ज्यांची असते अनन्य

आहेत पार्था ! मज तेच मान्य ॥२॥

की जाणुनी अक्षर मी अचिंत्य

सर्वत्रगामी ध्रुव आणि सत्य ।

अव्यक्त कूटस्थ अनादि साजे

ऐशा मला भक्त उपासिती जे ॥३॥

जे इंद्रियांस सगळ्या अवरून घेती

सर्वत्र बुद्धि सम ठेवुनि राहताती ।

जे सर्वदा सकल भूतहितांत दंग

होती मिळूनि मज ते मम अंतरंग ॥४॥

जे निर्गुण चित्त धरू पाहती

त्यांच्या जिवाला बहु कष्ट होती ।

होणे दुरापास्त गती विदेही

तेणेच दुःखी पडतात देही ॥५॥

अर्पूनि कर्मे मज होति पार

माझ्यावरी टाकुनि सर्व भार ।

ध्यातातजे नित्य अनन्य भावे

सेवाहि माझी करिती स्वभावे ॥६॥

जे जीवभावे धरतात कास

मी शीघ्र उद्धारक होय त्यांस ।

हा मृत्युसंसार समुद्र घोर

त्यांतून त्यांना करि मीच पार ॥७॥

ह्याकारणे तू मन बुद्धि योजी

माझ्या स्वरूपांत बळेच आजी ।

होईल तेणे पुढतीही खास

माझ्या स्वरूपात तुझाहि वास ॥८॥

माझ्यांतही चित्त तुझे न राहे

सुस्थीर ऐसे क्षणही नरा हे ।

मत्प्राप्तिचा नित्य धरून हेतू

अभ्यास पार्था ! तरि चालवी तू ॥९॥

हेही जरी होत नसेल तूते

अर्पी स्वकर्मे तरि सर्व माते ।

मदर्थ कर्मे करि तू सुबुद्धी !

तेणेही बा शीघ्र मिळेल सिद्धि ॥१०॥

हेही जरी होत नसेल तूते

राहून माझ्या तरि आश्रयाते ।

नानापरी यत्न करूनि ठीक

त्यागावया कर्मफलांसि शीक ॥११॥

अभ्यासाहुनिही विशेष समजे की ज्ञान श्रेयस्कर

ज्ञानाहून खरोखरीच असते बा ध्यान अग्रेसर ।

ध्यानाहूनिहि जाण कर्मफल जे तत्त्यग मोठा असे

होता नीट सुसाध्य तो मग खरी चित्तांत शांती वसे ॥१२॥

दयामैत्री भूती सकल कधिहि द्वेष न करी

जया मी की माझे तिळभरि नसे गर्व न धरी ।

धरी दुःखे किंवा सकलहि सुखे जो सम मनी

क्षमा शांती चित्ती हृदयि धरितो जो नर जनी ॥१३॥

जो संयमी मद्व्रत एकनिष्ठ

योगांत ज्याचे मन नित्य तुष्ट ।

अर्पी मनोबुद्धि मलाच फक्त

आहे खरा मत्प्रिय तोच भक्त ॥१४॥

भीती न ज्याची जनही धरिती

ज्याला जनाची तिळही न भीती ।

जो क्रोधचिंतासुखदुःखमुक्त

आहे खरा मत्प्रिय तोच भक्त ॥१५॥

जो शुद्ध जो दक्ष सदा उदास

इच्छा नसे दुःख नसे जयास ।

आरंभ टाकूनि सदा विरक्त

आहे खरा मत्प्रिय तोच भक्त ॥१६॥

आनंद की द्वेष नसे जयास

इच्छा नसे शोक नसे मनास ।

शुभाशुभापासुनि होय मुक्त

आहे खरा मत्प्रिय तोच भक्त ॥१७॥

हो शत्रु की मित्र समान भावो

सन्मान किंवा अपमान होवो ।

शीतोष्ण मानी सुखदुःख उक्त

आसक्ति सोडूनि सदैव मुक्त ॥१८॥

कीं ज्यास निंदा स्तुतिही समान

दे प्राप्त होईल तयास मान ।

निःसंग मौनी स्थिरचित्तयुक्त

आहे खरा मत्प्रिय तोच भक्त ॥१९॥

पूर्वोक्त धर्मामृत ह्याच रीती

जे सर्वदा सेवन हे करीती ।

मी थोर ज्या जे बहु भक्तियुक्त

होती मला ते प्रिय फार भक्त ॥२०॥

बारावा अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP