अभंग - ४१ ते ५०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


४१

स्नेह सरतां जैसा दीन । सूक्ष्म होतचि हारप । तयापरी बाईंचे स्वरुप । तेणें शोषूनि घेतलें ॥१॥

नाहीं उरविलें शरीर । अवघेंचि केलें निराकार । ऐसें देखोनियां सत्वर । आम्हीही निघालों तेथुनी ॥२॥

राया त्याची भेटी गोष्टी । न व्हावी तुम्हाही शेवटी । अकस्मात् झालिया राहाटी । करील पूतनाबाई सारिखी ॥३॥

ऐसें ऐकताचि श्रवणीं । राजा पडे मूच्छित धरणी । म्हणे गेली गेली रे मायबहिणीं । माझी पूतनेसारखी ॥४॥

महाबळें अति उत्कंठ मंत्रियांमाजी परमश्रेष्ठ । आता कायसी पाहों वाट । गेली नये त्या निजपंथें ॥५॥

मग रायातें संबोधून । प्रधान आणि नागरीक जन । म्हणती नव्हे भलें हे महा विघ्न । उदेलें देखत देखत ॥६॥

निळा म्हणे याहीवारी । श्रीहरिचरित्राची थोरी । अधिकें अधिक् ते कुसरी । परिसावी सज्जनीं सादर ॥७॥

४२

घरोघरी हेचि कथा । येरेयेरां सांगती वार्ता म्हणती रायासी पडिली‍ थोंर चिंता । पूतनाबाई निमालिया ॥१॥

नवलचि तें ऐकता परी कैसी शोशिली निमिशावरी । सांगती दासी त्या परिचारी । ऐका अपूर्व हे कथा ॥२॥

म्हणती स्तना लावितांची वदन । शोषियलें जीव प्राण । पूतना रडे आक्रंदोन । म्हणे धांव धांव ओढीं यशोदे ॥३॥

ओढितां न सुटचि शोषिली । मुकतपंथचि ते लाविली । अवघी देखानियां तेथ भ्यालीं । सेवकें आली पळोनियां ॥४॥

येउनी रायतें जाणवलें । पूतनाबाईतें बोळविलें । बाळे शोषूनियां घेतलें । परम आश्रचर्य हें वाटे ॥५॥

राया घरी दु­:ख थोर । वाढलें  झाला चिंतातूर । पुढे काय करील विचार । तें पाहावें नारीनर बोलती ॥६॥

निळा म्हणे यावरी आंता । अपूर्व आहे पुढील कथा । माभळभटासी गोकुळा जातां । होर्दल पूजा पिढीयांची ॥७॥

४३

न कळेचि अदृष्टाची गती । न कळे कर्माकर्माची संभूती । न कळे मृत्यूचीही रीती । कैशी घडवील कोण वेळ ॥१॥

न कळे कर्माकमाची संभूती । न कळे होणार तें बळीवंत । भोगणें भोगवील अकस्मात् । न कळे विधीचेंही लिखित । जें कां रेखियलें निढळी ॥२॥

कंसराव चिंताग्रस्त । उठुनी बैसला सभेआंत । प्रधान सेनाधिप समस्त । ग्लान वदनें भासती ॥३॥

पुढील विचार सुचितां । न सुचे कांहीची त्या तत्वतां । कृष्ण धाकेंचि त्याचिया चित्ता । धरचि कोठें न सांपडे ॥४॥

मग बोले कंसासुर । सेना सिध्द करा भार । जाऊनियां अति सत्वर । वधा हो कुमर नंदाचा ॥५॥

तंव ते म्हणती रायाप्रती । बळाची तेथें न चलें युकती । पहा ते पूतनेची शक्‍ती । इंद्रादिकांसी अलोट ॥६॥

निमिषमात्रें तिची शांती । ठेला करुनियां श्रीपती । तंव त्या माभळभट बोलती । नव्हे हें कार्य स्त्रियांचे ॥७॥

आम्हां ब्राम्हणांचे हे कृत्य । जाणे सकळांचेही घटित । दयाल आज्ञा तरी मी तेथें । जाऊनियां साधीन कार्यार्थ ॥८॥

निळा म्हणे बोलतां ऐसें । अवघे उल्हासले मानसें । म्हणती यथार्थ हे ऐसें । ऋषी बोलिले माभळ ॥९॥

४४

मग वस्त्रें देउनी गौरविला । रायें बहूत सन्मानिला । चालतां मार्गी विचार सुचला । म्हणे टाकवीन तान्हुला निर्जनी ॥१॥

टिळे माळा टोपी शिरीं । श्रीमुद्रांची वोळी पंचांग करी । धोकटी घेउुनीयां खादियावरी । शुध्द मुहूतें चालिला ॥२॥

आला गोकुळासन्निधीं । शुध्दाचमन केलें विधी । मनी कापटयाची बुध्दी । साक्षी तियेचा परमात्मा ॥३॥

नंदगृही प्रवेशला । येतां यशोदेनें देखिला । पाट बसावया दिधला । पाट बसावया दिधला । नमूनि पूजिला उपचारी ॥४॥

स्वस्थ स्वस्थानीं बैसले । पंचाग काढूनियां उकलिलें । वाचुनी चंद्रबळ दाविलें । आणि दिधले आशिर्वादा ॥५॥

मग पुसे यशोदेप्रती । प्रसूतिकाळ कोणती तिथी । तंव ते आणूनियां श्रीपती । व्दिजातें दाखवी उल्हासे ॥६॥

देखतांचि तो मदनमूर्तीं । ठकल्या ठेल्या इंद्रियवृत्ती । निळा म्हणे समाधिस्थिती । पावली प्रतीति ब्राम्हणां ॥७॥

४५

परी तें कर्म बळोत्तर । नेदी राहों वृत्ति स्थिर । झोंबोनियां विखार । आणिला ओढोनि लोभावरी ॥१॥

मग म्हणे  वो सुंदर बाळ । यशोदे नागर हें वेल्हाळ । परि याचा जन्मकाळ । कैसा असेल पाहों तों ॥२॥

कृष्णपक्ष श्रावण मास । रोहिणी नक्षत्र अष्टमी दिवस । मध्यरात्रीचा जन्म यास । दशा तों क्रूर दिसताहें ॥३॥

जन्मकाळीं सर बारावा गुरु । शनी भोग हानिस्थानी स्थिरु । राहो केतु आणि दिनकरु । देशत्यागातें सुचिती ॥४॥

याचेन सकल वंश हानि । करील कुळाची बुडवणी । नये अवलोकु यातें नयनीं । टाकावा नेऊनि अरण्यात ॥५॥

यशोदे न लावी यासी उशीर । बाळ नव्हे हा मायावी खेचर । कालचि पाहेपां केला संहार । पेतनेचा क्षणही न लागतां ॥६॥

निळा म्हणे ऐकोनि ऐंसे । मोडलें विंदान परमपुरुषे । जयाचें कर्म देखिलें जैसे । दिल्हे तया तैसे दानफळ ॥७॥

४६

बैसला होता पाटावरी । तोचि थरारिला ते अवसरीं । निसटोनियां पृष्ठीवरी बैसला । अवचिता निघातें ॥१॥

वढिला येऊनियां चौपाशीं । घरोघरींच्या पिढियांनी ॥२॥

मग म्हणे धावां धावां । याचिये हातींचे मज सोडवा । नडलों आपुल्या कापटयभावा । नाही स्मरलों चांडाळा ॥३॥

अचेतन हे धांवती काष्ठे । लक्षानुलक्ष कोटयानुकोटें । आतां कैंचे जिणें येथें अदृष्टें । मारावया आणिलें ॥४॥

लोक हांसताती भोंवताले । म्हणती कैसें हें नवल झालें । आमुचेही पाट येथें आले । मारुंचि बैसले माभळभटा ॥५॥

येथें न चले कोणाचेंचि कांहिं । ईश्वरइच्छेची हे नवाई । ब्राम्हण म्हणोनी सोडिला पाहिं । नागवा उघडा माभळभट ॥६॥

निळा म्हणे लवडसवडी । पळतां भूई त्या झाली थोडी । येऊनियां कंसाचिये देवडीं । शंखस्फूरणे उभा ठेला ॥७॥

४७

ऐकोनी गजबजिली दैत्यसभा । धाकेंचि कंसही ठाकला उभा । तंव बीभत्सा माळभळभटाची शोभा । देखते झाले सकळही ॥१॥

नागवा उघडा आणि बोडका । जीवत्वपांगे बुडाली शंका । भोंवते देखताही विषयलोकां । म्हणे धांवा धांवा सोडवा ॥२॥

पाटेचि पुरविली माझी पाटी । लक्षनुलक्ष आले कोटी । उठा उठा पळारे शेवटी । मारिले जाल व्यथेंची ॥३॥

दैत्य पाहाती चहूंकडे । शस्त्रपाणी वेधले हुडे । दुर्गा सांभाळिती चहूंकडे । म्हणती न दिसे विघ्न डोळियां ॥४॥

राजा म्हणे झांका त्यांसी । पुसा काय ते वार्तेसी । मग नसऊनियां वस्त्रासी । आणिला सभेवी पुसती ॥५॥

तो म्हणे राया बळिया बाळ । उपजला तो आमुचा काळ । विचित्र पाहतां त्याचा खेळ । लाविलीं पिढींची मज पाठीं ॥६॥

निळा म्हणे रुपाकृती । सुंदरपणाची ओतली मूर्ती । कोटी मदनाची अंगी दीप्ती । न ढळती पातीं अवलोकितां ॥७॥

४८

ऐसें सांगतां माभळभटा । राया दचक बैसला मोठा । मग पाचारुनियां सुभटा । दैत्याप्रती काय बोले ॥१॥

म्हणे वाढविलेंती बहुता मानें । अपार संपदा देऊनियां धनें । आजि माझिया उपेगा येणे । बाळ कृष्ण्‍ वधणें भलत्यापरी ॥२॥

नाना विदया तुमच्या अंगी । रुपे पालटुनी विचरतां जगी । मायारुपी म्हणऊनियां स्वर्गी । देवही भिती तुम्हांसी ॥३॥

ऐसें असोनि माझिये गांठी । कायसी बाळका जळुची गोठी । तुमचेनी बळें हे सकळही सुष्टी । आर्चित झाली मजलागीं ॥४॥

पूतना गेलीते तंव नारी । दुसरा भट तोहि भिकारी । काय जाणों कैशापरी । देखोनी कळली तयासी ॥५॥

तो तंव अंत्यंत सकुमार । सांगती अवघे लहान थोर । सुंदरपणाचीही बहार । रुपा आली कृष्णाकृती ॥६॥

तरी तुम्ही जाऊनियां तेथें । प्रेतरुपचि आणवा येथें । निळा म्हणे पाहोनियां त्यातें । करऊं अक्षवाणें अपणा ॥७॥

४९

ऐसा चिंतावोनियां मनीं । म्हणे निमाली पूतना भगिनी । माझिया राज्या आली हानी । म्हणोनि माभळभट पाठविला ॥१॥

तंव पिढेदान त्या प्राप्त झालें । नवलचि हें अपूर्व ऐकिलें । येऊनि आम्हातें जाणविले । नव्हें बाळ हें तान्हुलें श्रीहरी ॥२॥

मग म्हणे वो रिठासुरा । जाऊनि तुम्ही बाळकासी मारा । देईन अर्धराज्य भारा । कार्यसिध्दि झालिया ॥३॥

मग रिठासुर तो मायावी । गुंफिली रिठेमाळ अति बरवी । करी घेऊनियां सादावी । नंदचौबारा जाऊनि ॥४॥

म्हणे हे बाळका लेववितां । सर्वकाळ कंठी असतां । कोण्याहि भयाची तया वार्ता । स्पशोंचे नेणे सामर्थ्यगुणें ॥५॥

कदापिही नव्हे भूतबाध । दिठीचें भय नाहीं त्या कदा । ऐसें ऐकोनियां यशोदा । आवडी घाली हरिकंठी ॥६॥

निळा म्हणे पालखीं बाळ । निजऊनियां यशोदा वेल्हाळ । मेळऊनियां स्त्रिया सकळ । हास्यविनोदें बैसली ॥७॥

५०

तंव त्या रिठीयासी निघालीं वदनें । अति विक्राळ दाढां दशनें । श्रीकृष्ण्‍ा कंठीचे रुधिरपान । करावया उदितें ॥१॥

कृत्रिमें जाणेनियां ते श्रीहरी । कवळूनि धरिलीं दोहीं करी । आणि घालूनियां मुखाभीतरीं । चावुनी धरणिये टाकिलीं ॥२॥

त्याचें स्विष्टकृत केलियावरी । आक्रोशें पाळणियांत रुदन करी । तें ऐकानि यशोदा सुंदरी । धंवली झाडकरी काय झालें ॥३॥

तंव देखे शोणिताचे पूर । मांस मदाचे संभार । मग म्हणे गे मरमर । बाळ मासर्पे खादलें ॥४॥

धांविल्या नरनारी बाळ । घात केला म्हणती सकळ । ऐसी कैशी गे तू वेल्हाळ । यशोदे मारविलें बाळका ॥५॥

वाहाती शोणिताचे पुर । इतुकें कैंचे गे त्या रुधिर । काढूनियां पहा गे सत्वर । आहे प्राण कीं गेलास ॥६॥

निळा म्हणे जाउनी जवळी । काढूनि आणिला जों वनमाळी । तंव हास्यवदन नित्य काळीं नाही कोमाइला ना दचकला ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 21, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP