अध्याय १ ला - श्लोक ६१ ते ६९

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


प्रतियातु कुमारोऽसौ न ह्यस्मादस्ति मे भयम् । अष्टमाद्युवयोर्गर्भान्मृत्युमें विहितः किल ॥६१॥

हा मागुता ना हो तनय । यापासूनि मजला भय । नाहीं नाहीं हा निश्चय । प्रमाण काय तें ऐका ॥१७॥
तुमचा गर्भ देवकीउदरीं । अष्टम होईल तो मज मारी । ऐशी वाचा अशरीरी । गगनोदरीं बोलिली ॥१८॥
अष्टम गर्भापासूनि मृत्यु । ऐसा भविष्यवृत्तांतु । मज कळतां मी याचा घातु । करूनि दुष्कृत नाचरें ॥१९॥

तथेति सुतमादाय ययावानकदुंदुभिः । नाभ्यनन्दत तद्वाक्यमसतोऽविजितात्मनः ॥६२॥

अंगीकारूनि कंसवाणी । बाळक धरूनि दोन्ही पाणी । संशयापन्न अंतःकरणीं ॥ दुष्टापासूनि परतला ॥९२०॥
नेदितां कंसवाक्यासि गौरव । नाहीं तोषला मनोभाव । ऐकोनि तयाचा अभिप्राव । तेथूनि वसुदेव निघाला ॥२१॥
नाशिवंताचा अभिमान । तें चिदात्म्य पावोनि पूर्ण । ज्यांचें परिणमलें अंतर्ज्ञान । असज्जन तो प्राणी ॥२२॥
वास्तवज्ञान नुमजे कदा । मानस अनावर सर्वदा । आयुष्य त्याचिया अनुवादा । शास्त्रकोविदां न वाटे ॥२३॥
इंद्रियद्वारा धांवे मन । भरे विषयाचें आडरान । होऊनि ठेला मनाधीन । तोचि पूर्ण अजितात्मा ॥२४॥
तरळ तरुणीचा कटाक्ष । चंचळ चक्रवाताचा वृक्ष । नटामाजील वक्ता दक्ष । कोण पक्ष दृढावी ॥९२५॥
विद्युल्लता करवे स्थिर । जळीं निश्चळ राहे शफर । पुंश्चली होय नियमपर । परि अजितांतर अतिचपळ ॥२६॥
खळाळीं बिंबचंद्रिका । ते जरी स्थिरावे धरूनि टेका । तरी नैश्चल्य अजितात्मका । विषयी लोकां मानिजे ॥२७॥
अजितात्मे जे मनाधीन । त्यांचीं इंद्रियें वावधान । सत्यशौचमितभाषण । हें कोठोन ते ठायीं ॥२८॥
गंधर्वनगर क्षणभंगुर । कां जळावरील अक्षर । तैसें अजितात्मयाचें उत्तर । सत्य साचार न मानावें ॥२९॥
असंत आणि अविजितात्मा । कंस केवळ दुरात्मा । वसुदेव सर्वज्ञ साचार न मानावें ॥९३०॥
जो अव्यवस्थितांतर । त्याचा प्रसादही भयंकर । म्हणोनि कंसवाक्याचा निर्धार । न मानी साचार वसुदेव ॥३१॥
कंसें केलें समाधान । वसुदेव पावला स्वसदन । पुत्र देवकीतें देऊन । सर्व वर्त्तमान निवेदी ॥३२॥

अथ कंसमुपावृत्तं नारदो ब्रह्मदर्शनः । एकांतमुपसंगम्य वाक्यमेतदुवाच ह ॥६३॥

इतुकी सांगूनियां कथा । शुक म्हणे गा मात्स्यीसुता । हरिमायेची क्षोभकता । त्या वृत्तांता अवधारीं ॥३३॥
कंसें अवलंबिली जे क्षमा । बालकरक्षणीं धरिला प्रेमा । अवतारकार्याच्या उपक्रमा । योग्य महिमा हा नव्हे ॥३४॥
कंसे अवलंबिली शांति । तेणें देवकार्य पावे उपहति । यालागीं क्षोभोनि वैष्णवी शक्ति । पिशाच्या हातीं उल्का दे ॥९३५॥
यानंतरें तेचि कथा । जिच्या श्रवणें हरती व्यथा । कैवल्यपदाचिये माथां । जे सर्वथा सुखदात्री ॥३६॥
जो परमब्रह्म मूर्तिमंतु । ब्रह्मविद्येचा अहेवतंतु । ब्रह्मर्षीमाजीं विख्यातु । तो ब्रह्मसुतु नारद ॥३७॥
कंस पावतां उंपरम । वसुदेव पावतां निजाश्रम । कंसाप्रति मुनिसत्तम । सांगे वर्म एकांतीं ॥३८॥

नारद उवाच - नंदाद्या ये व्रजे गोपा याश्चामीषां च योषितः । वृष्णयो वसुदेवाच्या देवक्याद्या यदुस्त्रियः ॥६४॥
सर्वे वै देवताप्राया उभयोरपि भारत । ज्ञायतो बंधुसुहृदो ये च कंसमनुव्रताः ॥६५॥

नारद म्हणे कंसराया । फिरतफिरतां लोकत्रया । अपूर्व वृत्तांत सांगावया । तुझिया ठाया पातलों ॥३९॥
मज समान शत्रुमित्र । सुरासुर मनुष्य पितर । कोठें विषमतेचा पदर । माझें अंतर स्पर्शेना ॥९४०॥
असुरभारें दाटली धरा । कष्ट सांगतां भारतीवरा । तेणें घेऊनि सुरवरां पयोब्धितीरा पातला ॥४१॥
तेथ स्तवितां वृषावापि । ब्रह्मादिदेवां वर ओपी । म्हणे अवतरोनि निजप्रतापीं । महापापी मारीन ॥४२॥
तुम्ही सकळ देवतागण । भूमंडळीं अवतरोन । मथुरा गोकुळ वृंदावन । क्रीडास्थान वसवावें ॥४३॥
तरी हे वृंदादि व्रजनिवासी । वसुदेवादि मथुरावासी । देवतावतार हे तुजपाशीं । निश्चयेशीं सांगतों ॥४४॥
यांचिया स्त्रिया समस्त जनीं । यशोदाप्रमुख ज्या गौळणी । तैशाच देवकी रोहिणी । आदिकरूनि यदुवनिता ॥९४५॥
मर्दावया राक्षस क्रूर । पूर्वीं अवतरला रघुवीर । तेव्हां सुरवर वानर । होऊनि असुर संहरिले ॥४६॥
तैसेंचि आरंभिलें आतां । त्या तुज निवेदिलें वृत्तांता । तुझा उग्रसेन जो पिता । तोही देवतामय जाण ॥४७॥
तुझे सुहृद आणि स्वगोत्र । बंधुवर्ग जे अनुचर । अवघे देवतावतार । दुष्टसंहार करूं आले ॥४८॥

मथुरायां स्थिताश्चैव अक्रूराद्या विशांपते । भूमेर्भारायमाणानां दैत्यानां च वधोद्यमम् ॥६६॥
कर्तुं विद्धि महाराज इत्युक्त्वान्तरधीयत । एतत्कंसाय भगवान् शशंसाभ्येत्य नारदः ॥६७॥

अक्रूर उद्धव शतधन्वान । ऐसे अनेक यादवगण । तुज सेविती बंदीजन । प्रायः लपवून निजवर्म ॥४९॥
गोवळ आणि यादवकुळ । दोहींमाजीं देवता सकळ । दैत्यपादपाचें मूळ । खननशीळ सर्वदा ॥९५०॥
इहीं अवतरोनि करणें काय । ऐसा झणीं धरिसी विस्मय । भूमिभारणहरणकार्य । लक्षूनि स्वयें अवतरले ॥५१॥
प्रजांसि तुझेनि विश्रांति । म्हणोनि म्हणिजे विशांपति । महाराज तूं भूपति । विख्यात कीर्ति त्रिलोकीं ॥५२॥
भूमिभार जे दुष्कृत । वेदबाह्य विषयासक्त । त्यांचा करावया निःपात । देव समस्त अवतरले ॥५३॥
तुज कळावी हे मात । म्हणोनि सांगितला वृत्तांत । इतुकें बोलोनि ब्रह्मसुत । झाला गुप्त तत्काळीं ॥५४॥
शुक म्हणे गा परीक्षिति । नारदें येऊनि कंसाप्रति । गुप्त कथिलें जें एकांतीं । तें भूपते बोलिलों ॥९५५॥
षड्गुणैश्वर्याचे मुकुटीं । हरिहर वर्णिती ज्याची रहाटी । त्याचे मुखींची ऐकतां गोठी । कंस पोटीं दचकला ॥५६॥

ऋषेर्विनिर्गमे कंसो यदून्मत्वा सुरानिति । देवक्या गर्भसंभूतं विष्णुं च स्ववधं प्रति ॥६८॥

जैशीं सूर्याचिये ज्योती । रत्नें सुरंगें विराजती । काम अग्निद्रव्यें पावती विकृति । चंद्रज्योति आणि नळे ॥५७॥
तैसा सत्संगें संसारीं । सज्जन सद्बुद्धि स्वीकारी । दुर्जन दुर्मति अंगीकारी । महा आसुरी कुविद्या ॥५८॥
करितां सद्ग्रंथश्रवण । सज्जन सांडी दृष्ट गुण । पराचे पाहूनि दुर्गुण । पापी पूर्ण दुरात्मा ॥५९॥
महाकवींहीं महाग्रंथीं । त्यागार्थ बोलिल्या कुयुक्ती । त्याचि धरूनिया चित्तीं । करी व्यत्पत्ति दुर्जन ॥९६०॥
तैसा असुरस्वभाव कंस । ऐकोनि नारदोक्तीचा लेश । खवळे जैसा कां त्रिदोष । होतां विशेष पांचवा ॥६१॥
नारदाचेनि दर्शनें । कांहीं अलभ्य लाभ होणें । तों तो ठेला या दुर्जनें । काय निजमनें विवरिलें ॥६२॥
ऋषि जातेक्षणीं तेथ । कंस म्हणे हें यथार्थ । हाचि गगनवाणीचा अर्थ । सुरकार्यार्थ मम मृत्यु ॥६३॥
बल्लव आणि हे यादव । मनें मानूनि सर्वही देव । देवकीगर्भीं वासुदेव । निजवधार्थ मानिला ॥६४॥

देवकीं वसुदेवं च निगृह्य निगडैर्गृहे । जातं जातमहन्पुत्रं तयोरजनशंकया ॥६९॥

मग क्षोभला अंतःकरणीं । देवकीवसुदेव धरूनि दोन्ही । कारागारीं निगडबंधनीं । निग्रहूनि रक्षिलीं ॥९६५॥
वसुदेवदेवकीच्या पोटीं । पुत्र जन्मतांचि कंस निवटी । हरिजन्माचा धाक पोटीं । गगनगोठी विसरेना ॥६६॥
जें जें उपजे पुत्ररत्न । तें तें मारी करूनि यत्न । ऐसेचि बहुतेक दुर्जन । स्नेहबंधन न धरिती ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP