मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र चौदावी

श्यामची आई - रात्र चौदावी


’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत . आईचा पाक कधी बिघडत नसे . वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या . त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने जात असे . दुसर्‍याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद .
पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती . पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती . वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी . एके दिवशी आई मला रागे भरली होती . त्या वेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते . वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे .
त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या , " श्यामची आई ! वेणू परवा सासरी जाणार . तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणत्ये . तुम्ही याल का उद्या तिसर्‍या प्रहरी ? तुम्ही कशा छान करता ! तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत , तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले ."
माझी आई म्हणाली , " येईन हो . वेणू परवाच का जाणार ? मला वाटले होते की , राहील संक्रातीपर्यंत . मलासुध्दा तिची करमणूक होती . यायची , गाणी म्हणून दाखवायची ."
पार्वतीबाई म्हणाल्या , " तिच्या सासरचे पत्र आले आहे , पाठवून द्या म्हणून . मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे ! आली चार दिवस , पुष्कळ झाले . त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्षे झाली , तरी माहेरी पाठ्वीत नाहीत . तिची आई त्या दिवशी रडली हो . त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना ? मग या हं उद्या . वेणूला तुम्हांला बोलवायला पाठ्वीन . जात्ये मी . "
आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या . दुसर्‍या दिवशी दुपारची जेवणे झाली , परंतु आईला बरे वाटत नव्हते . उष्टी - खरकटी कशी तरी करून आई अंथरूणावर पडली . मी आईला विचारले , " आई , निजलीसशी ?"
" श्याम ! अंग दुखते आहे . जरा चेपतोस का ? " आई म्हणाली . मी आईचे अंग चेपू लागलो . आईचे अंग कढत झाले होते . तिचे कपाळ मनस्वी दुखत होते .
मी मग बाहेर खेळावयास गेलो . इकडे वेणू आईलो बोलवायला आली . आई निजली होती . " येता ना श्यामची आई , आई तुमची वाट पाहते आहे . " वेणू गोड वाणीने म्हणाली .
आई उठली . आई तिला म्हणाली , " जरा पडले , तो डोळा लागला . मी विसरल्ये नव्हत्ये . आता येणारच होत्ये . चल ."
आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली . निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या . मी खेळून घरी आलो तो आई नाही . मी आईला पाहावयास आलास वाटाते ? ये , तुझी आई माझ्यासाठी वड्या करिते आहे . मी उद्या सासरी जाणार आहे , श्याम . " वेणू मला बोलली .
मी म्हटले , " जाणार ? मग माझे डोळे कोण पुसणार ? आई रागावली , तर माझी बाजू कोण घेणार ?" मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले . " ये श्याम ! आपण केशराची पूड करू . तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ ." वेणूच्या कामात मी मदत करू लागलो . वेणूने केशर खलले व मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली .
" श्याम ! कशाला रे आलीस ? " आईने मला विचारले . आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले , " मी काही वड्यांसाठी नाही आलो . वेणूताई ! मी हावरा आहे का ग ? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास . मी मागितला होता का ?"
वेणू म्हणाली , " श्याम ! तू चांगला आहेस , श्यामची आई ! श्यामला रागे भरत जाऊ नका ."
आई म्हणाली , " वेण्ये ! अंग , मला का माया नाही ? एखादे वेळेस रागावते . पण त्याच्या बर्‍यासाठीच . श्यामला जगाने नावे ठेवू नयेत , म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला . तो चांगला आहे . परंतु आणखी चांगला व्हावा , असे मला वाटते . पार्वतीबाई , पाक झाला हो . पाहा , गोळी झाली . "
ताटात वड्या थापण्यात आल्या . आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती . पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली , " पार्वतीबाई , थोड्या वेळाने वड्या काढून घ्या , मी आता जाते ."
वेणू म्हणाली ," थांबा ना थोडा वेळ . तुमच्या हाताने सारे करून जा . " आईला नाही म्हणवेना . थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या . कशा सुंदर झाल्या होत्या ! पार्वतीकाकूंनी त्या ड्ब्यात भरल्या . वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली . वेणूची आई म्हणाली , " श्याम , हे ताट खरवडून खा . घे ." मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले . पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेविल्या व आई कुंकू लावून घरी गेली .
मी वेणूकडेच बसलो होतो . " श्याम ! तुझे सदर्‍याचे बटण तुटले आहे वाटते . सदरा काढून दे म्हणजे नीट लाबून देत्ये ." वेणू म्हणाली . मी वेणूताईला सदरा काढून दिला . तिने फणेरे काढले . बायका सुईदोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात , त्याला कोकणात फणेरे म्हणतात . वेणूताईने गुंडी लावली व दुसर्‍या ठिकाणी फाटले होते , तेथेही शिवले . मी सदरा अंगात घातला . वेणूताई म्हणाली , " श्याम ! चल , गुलबाक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ ."
आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो . माझ्याबरोबर वेणूही आली होती . " श्यामची आई !" वेणूने हाक मारली . परंतु आई कोठे होती ? ती विहिरीवर गेली होती , का गोठ्यात होती ? ती अंथरूणावर होती . आम्ही एकदम आईजवळ आलो .
वेणू म्हणाली , " निजल्यातशा ? बरे नाही वाटत का ? चुलीजवळ बसून त्रास झाला का ? " वेणूने आईच्या कपाळावर हात लावून पाहिले तो चटका बसला . " श्यामची आई ! बराच आला आहे हो ताप ! " ती खिन्नपणे म्हणाली .
मी म्हटले , " वेणूताई ! आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते . ते दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो . "
वेणूने विचारले , " मी तुम्हांस बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हांला बरे नव्हते वाटत का ? म्हणून का तुम्ही पडला होतात ? मला काय माहीत ? तुम्ही बोललासुध्दा नाही . श्यामची आई ! अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात ?"
आई म्हणाली , " वेणू ! अंग , त्या वेळेस काही फार ताप नव्हता हो . अंग जरा कणकण करीत होते एवढेच . श्याम ! जा , बाळ , दिवा लाव , तिन्हीसांजा झाल्या ."
मी दिवा लावला व देवातुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो . वेणूला वाईट वाटत होते . ती गहिवरून म्हणाली , " श्यामची आई ! तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला . नसत्या वड्या झाल्या तर नसल्या . आईने कशा तरी केल्या असत्या . प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत ?"
माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली , " अंग , अशा एवढ्याशा तापाने काय होते ? वेणू , आम्हां बायकांना त्याचे काही वाटत नाही . अंगात ताप फणफणात असावा , कपाळा दुखत असावे , तरी धुण्याची मोट घेऊन ती आम्ही धुऊन आणतो . दहा माणसांचा स्वयंपाक करितो . असे मनाला लावून नको घेऊ . अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन . जा आता तू घरी . आई तुझी वाट पाहत असेल ."
वेणू आईजवळ बसली . ती जाईना . मी वेणूस म्हटले , " वेणूताई ! त्या फुलांची माळ करतेस ? आईला ताप आला आहे , तूच कर ."
वेणूताईने माळ केली . वेणू आईला म्हणाली , " श्यामची आई ! माझ्यासाठी हा तुम्हांस त्रास . हा ताप . "
आई म्हणाली , " वेण्ये , वेड्यासारखे काय बोलतेस ? तू मला परकी का आहेस ? जशी माझी चंद्रा , तशीच तू . वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेविली असती , तर तुला किती वाईट वाटले असते ? माहेरच्या माणसांस नावे ठेविलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते . वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत , म्हणून मी आल्ये . पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी . त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली , म्हणून काय झाले ? तुला श्याम परका वाटत नाही , तशीच मला तू वाटत नाहीस . मला त्रास का झाला ? केवढे समाधान वाटते आहे मला ! वड्या करायला आल्ये नसते , तर मनाला सारखी रूखरूख लागली असती . जा हो आता घरी . मी सकाळी येईल . रात्री येऊन ताप निघेल . सकाळी मोकळी होईन ."
वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली , " श्याम ! चल तू आमच्याकडे . आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडघुलीभर तुझ्याजवळ देत्ये . मग तुझ्या आईने नुसता भात केला , म्हणजे झाले . नाही तर मी भात ठेवूनच जाते ."
माझी आई म्हणाली , " वेण्ये ! अग श्याम ठेवील भात , तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले " परंतु वेणूने ऐकले नाही . तिने विस्तव पेटविला , तांदूळ धुतला व आधणे येताच भात ठेवून निघाली . तिच्याबरोबर मीही गेलो . मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली . माझे डोळे भरून आले होते .. आई म्हणाली . " श्याम ! काय झाअले ?"
मी म्हटले , " वेणू म्हणाली , ‘ श्याम ! तुझी आई फार थोर आहे . तू तिचे ऐकत जा . तुझे भाग्य मोठे , म्हणून अशी आई तुला मिळाली . ‘ असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरविला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही . "
" जा , बाळ ! भात झाला असेल , तर उतरून ठेव ; नाही तर खालून ओढेल ," आईचे हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला . दुसर्‍या दिवशी वेणूताई सासरी गेली . आम्हां सर्वांना वाईट वाटले . त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात . वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या . वेणूसुध्दा जगली नाही ; परंतु ते प्रेम अजून आहे . ते प्रेम अमर आहे . माणसे मरतात ; परंतु त्यांचे सदगुण सदैव चमकत राहतात .

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP