मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र सहावी

श्यामची आई - रात्र सहावी

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


" लहानपणापासून दोन्ही वेळा स्त्तान करण्याची मला सवय लागली आहे . " श्यामने सुरूवात केली .

" संध्याकाळी मी खेळावयास जात असे . छाप्पोपाणी , लंगडी , धावणे , लंपडाव , लक्षुंबाई ताक दे , डेरा फुटला मडके दे , असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू . खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे . आई मला पाणी तापवून ठेवीत असे . आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंगे चोळून वगैरे देई . दोन्ही वेळा स्त्रान करण्याची पध्दत फार चांगली . रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ , निर्म्ळ व हलके वाटते . निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो , हे मनाचे स्त्रान . शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते .

एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो . सदरा काढला , शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो . आंघोळीची एक मोठी धोंड होती . आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते . संध्याकाळची आंघोळ ; तिला फारसे पाणी लागत नसे . आईने खसखसा अंग चोळून दिले . उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो . पाणी संपले व मी हाका मारू लागलो .

आई ! अंग पूस माझे ; पाणी सारे संपले . थंडी लागते मला . लवकर अंग पूस . " मी ओरडू लागलो . माझ्या लहानपणी टॉवेल , पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते . वडील पुरूषमंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत . एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे . संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुरशी .

आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली , " देवाची फुले काढ ."

मी म्हटले , " माझे तळवे ओले आहेत ; त्यांना माती लागेल . माझे तळवे पूस . "

" तळवे रे असले म्हणून काय झाले ? कशाने पुसू ते ? " आई म्हणाली .

" तुझ ओचे धोडींवर पसर , त्यावर मी पाय ठेवीन . पाय टिपून घेईन व मग उडी मारीन . मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली . पसर तुझा ओचा ." मी हट्ट धरून म्हटले .

" हट्टी आहेस हो श्याम अगदी . एकेक खूळ कुठून शिकून येतोय कोणास ठाऊक ! हं ठेवा पाय " आईने आपले ओचे धोंडीवर पसरले . मी माझे पाय त्यावर ठेविले , नीट टिपून घेतले व उडी मारली . आईचे लगडे ओले झाले , त्याची मला पर्वा नव्हती . तिला थोडेच ते त्या वेळेस बदलता येणार होते ? परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये , त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले . ती मुलासाठी काय करणार नाही , काय सोसणार नाही , कय देणार नाही ?

मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो . आई निरांजन घेऊन आली व म्हणाली , " श्याम ! पायाला घाण लागू नये जपतोस ! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो . देवाला सांग शुध्द बुध्दी दे म्हणून . "

गड्यांनो ! किती गोड शब्द ! आपली शरीर व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण

थोर अश्रू

किती धडपडतो , किती काळजी घेतो . कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत . बूट स्वच्छ रहावे म्हणून बूटपुश्ये आहेत . अंगाला लावायला चंदनी साबण आहेत . शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून सार्‍यांचे प्रयत्न आहेत ; परंतु मनाला स्वच्छ राखण्यबद्दल आपण किती जपतो ? देवळाला रंग देतो : परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही . मन मळले तर रडतो का कधी ? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा , ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत . कपडा नाही , अन्न नाही , परीक्षा नापास झाली , कोणी मेले , तर येऊन सारे रडतात . या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत ; परंतु मी अजून शुध्द , निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का ? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे , असे मनात येऊन कितीकांस वाईट वाटते ? मीरावाईने म्हटले आहे .

‘ असुवन जल सींच प्रेमवेलि बोई । ’

अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची , ईश्र्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे . हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो . अश्रूंनी तुडुंब भरलेल्या ह्यदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो !"

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP