मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र आठवी

श्यामची आई - रात्र आठवी

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


बाहेर पिठू र चांदणे पडले होते . मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती . दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता . नदीला विश्रांती माहीत नाही . सारखे वाहणे तिला माहीत . तिची प्रार्थना , कर्ममय प्रार्थना , सारखी चोवीस तास सुरू असते . कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते , कधी हसते , खेळते , कधी गंभीर होते कधी रागाने लाल होते . नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे . श्याम त्या नदीकडे पाहातच उभा होता . सृष्टिसौंदर्य श्यामला वेडे करीत असे . कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत :-

" राहूनि गुप्त करितोसि जादुगारी । रचितोसि रंगलीला प्रभु तू महान चितारी ।

किती पाहू पाहू तृप्ती न रे बघून । शत भावनांनि ह्यदय येई उचंबळून । । "

या वेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का ? राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला , " श्याम ! सारी मंडळी आली ; प्रार्थनेला चल . सर्वजण वाट पहात आहेत ."

" हो . मी आपला पाहातच राहिलो . " असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला . प्रार्थना झाली व गोष्टीस सुरूवात झाली .

" मित्रांनो ! प्रत्येक गोष्टीच संस्कृती भरली आहे . प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते . सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते . प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे . तो ओळखला पाहिजे . आपल्या सार्‍या चालीरीतील आपण लक्ष घातले पाहिजे . काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत ; परंतु संस्कृतीचे संवर्धन करणार्‍या चाली मरू देता कामा नये . आपल्या देशातील , आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे .

आमच्या घरी एक अशी पध्दत होती की , रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा . जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत . वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत . मोरोपंत , वामनापंडित यांचे श्लोक व कविता ते शिकवीत असत . तशीच इतर स्तेत्रे , भूपाळ्या वगैरे शिकवीत . पहाट झाली की वडील येत , आम्हास उठ्वीत . आमच्या अंथरूणावर बसत आणि आम्हाला भूपळ्या व श्लोक वगैरे शिकवू लागत , आम्ही अंथरूणातच गोधड्या पांघरून बसत असू . माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकिट नव्हते . गोधडी , पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरूण व अंथरूण असावयाचे . गणपतीची , गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवीत . ‘ कानी कुंडलाची प्रभा । चंद्रसूर्य जैसे नभा ’ हे चरण आजही मला मधुर वाटतात . वक्रतुंड महाकाय , शांताकारं , वसुदेवसुतं देवं , कृष्णाय वासुदेवाय , वगैरे संस्कृत श्लोक , तसेच गंगे गोदे यमुने , कृष्णानुजा सुभद्रा , कुंकुममंडित जनके , देवी म्हणे अनार्या , ये रथावरि झणी यदुराया , असा येता देखे , मारावे मजला , अंग वक्र अधरी धरि पावा , वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत . हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत . रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे . वडील नुसते तोंडपाठ नसत घेत करून , तर अर्थही सांगावयाचे . ‘ सौमित्र म्हणजे कोण ?’ असे ते विचारीत . आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत . " लक्ष्मणाची आई कोण ?" आम्ही सांगावे ‘ सौमित्रा ’ ‘ मग सौमित्रा म्हणजे कोण ?’ आम्ही सांगावे अंदाजाने ‘ लक्ष्मण ’ भले शाबास ! अशी मग ते शाबासकी देत . सौमित्रा याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण , सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारीत . जणू शिक्षणशास्त्राप्रेमाणे ते शिकवीत . वडिलांच्या या पध्दतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता .

वडिल पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी . " दिव्या दिव्या दीपोत्कार । कानी कुंडल मोतीहार । दिवा देखून नमस्कार । " किंवा " तिळाचे कापसाची वात । दिवा तेवे मध्यानरात । दिवा देवापाशी । माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी । । " वगैरे आई शिकवीत असे . आम्हालाही पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत . त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे . गावात कोठे लग्नमुंजीची पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत . जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत . अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे . जेवताना सुंदर काव्य , सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत . जणू ते ऋषितर्पणच होत असे .

गावात कोठे जेवणाजवळ असली तर आमच्याकडे बोलावणे असावयाचेच . आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर ते श्लोक म्हणावयास आम्हास मानेने , डोळ्यांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू . घरी गेल्यावर रागावतील ही भीती असे . मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे . माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीटपणाही नव्हती . लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे . मी लाजाळू पक्षी आहे . अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाही . मी लगेच कावराबावरा होतो . श्लोक म्हणत असता कोणी हसला , कोणी टीका केली तर मला वाईट वाटे ; परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावयास लागे . तेथे गत्यंतर नसे .

त्या दिवशी गंगूआप्पा ओकांकडे समाराधना होती . त्यांचा आमचा फार घरोबा . आमच्याकडे आमंत्रण होते . माझे वडील बाहेरगावी गेलेले होते . दुसर्‍याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे ; परंतु कोणी तरी गेलेच पाहिजे होते . हजेरी लागलीच पाहिजे ; नाही तर तो उर्मटपणा , माजोरेपणा दिसला असता . त्यांचे मन दुखविले , असे झाले असते . वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली .

दुपारी स्त्रान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो . कणेरांगोळ्या घातल्या होत्या . केळीची सुंदर पाने होती . मी आगोतलीवर जाऊन बसलो . उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता . उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता . घरोघरचे कोणी आले की नाही , का आले नाही , याची चवकाशी झाली . जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळीपंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठविण्यात येई . सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व ‘ हरहर महादेव ’ होऊन मंडळी जेवावयास बसली .

मी मुकाट्यांने जेवत होतो . श्लोक म्हणावयास सुरूवात झाली . मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला . कोणाकोणाला शाबासकी मिळत होती . बायका वाढीत होत्या . एखाद्या बाईचा मुलगा पंक्तित जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी , " बंड्या ! श्लोक म्हटलास का ? म्हण आधी ." श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई . " श्याम ! श्लोक म्हण ना रे ! तुला तर किती तरी चांगले येतात . तो ‘ चैतन्य सुमनं ’ नाही तर ‘ डिडिम डिम्मिन - म्हण . " मला आग्रह होऊ लागला . मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना . " बायक्या आहेस अगदी !" शेजारचे गोविंदभट म्हणाले . सारे मी ऐकून घेतले . दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लख्ख करीत होतो . इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही . एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला , त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले . आधी उठ्णे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येई .

जेवणे झाली . सर्व मंडळी उठली . मी सुपारी वगैरे खातच नसे . वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर , विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये , अशी चाल होती . मी घरी आलो . शनिवार असल्यामुळे दोन प्रहरी शाळेला सुट्टी होती . आईने विचारले , " श्लोक म्हटलास की नाही ?"

आता काय उत्तर देणार ? एका खोट्याला दुसरे खोटे . एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते . पाप पापास वाढ्वीत असते . दृढमूल करीत असते . आईला मी खोटेच सांगितले , " श्लोक म्हटला "

आईने पुन्हा विचारले , " कोणता म्हटलास ? तो म्हटलेला लोकांना आवडत का ?"

पुन्हा मी खोटे सांगितले की , " नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे " हा श्लोक म्हटला . माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड . मी सारा म्हणून दाखवू का ?

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।

माथां सेंदुर पाझरे वरि बरे दूर्वांकुरांचे तुरे ॥

माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे ।

गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥

मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो . तोच शेजारची मुले आली . एकमेकाम्च्या खोड्या करावयाच्या , एकमेकांची उणी पाहावयाची , एकमेकास मार बसवावयाचा , हा मुलांचा स्वभाव असतो . शेजारचे बंड्या , बन्या , वासू सारे आले व आईला म्हणाले , " यशोदाकाकू ! तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला . सारे त्याला म्हण म्हण असे सांगत होते ; परंतु याने म्हटलाच नाही ."

" श्यामनेच मला शिकविलेला ‘ भरूनि गगन - ताटी शुध्द नक्षत्रात्ने ’ तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली ." असे वासू म्हणाला .

गोविंदा म्हणाला , " असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी " हा मी म्हटला व नरसूअण्णांनी मला शाबासकी दिली ."

आई मला म्हणाली , " श्याम ? मला फसविलेस ! खोटे बोललास ! श्लोक म्हटला म्हणून मला सांगिलेस ?"

वासू म्हणाला , " श्याम ! केव्हा रे म्हटलास ?

बन्या म्हणाला , " अरे त्याने मनात म्हटला असेल ; तो आपल्याला कसा ऐकू येईल ?"

बंड्या म्हणाला , " पण देवाने तर ऐकला असेल !" मुले माझी थट्टा करीत निघून गेली . मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात . कोणाचे काही लपू देणार नाहीत . गावातील सर्वांची बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती !

मला आई म्हणाली , " श्याम ! तू श्लोक म्हटला नाहीस . ही एक चूक व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक ! देवाच्या पाया पड व म्हण मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही . " मी मुखस्तंभ तेथे उभा होतो . आई पुन्हा म्हणाली , " जा , देवाच्या पाया पड . नाही तर घरी येऊ देत , त्यांना सांगेन ; मग मार बसेल ; बोलणी खावी लागतील ." मी जागचा हललो नाही . मला वाटले , आई वडिलांस सांगणार नाही . ती विसरून जाईल . आजचा तिचा राग कमी होईल . आई पुन्हा म्हणाली , " नाही ना ऐकत ? बरं ! मी आता बोलत नाही ."

वडील रात्रीसच परगावाहून आले होते . रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठवावयास आले . त्यांनी भूपाळ्या सांगितल्या , आम्ही म्हटल्या . वडिलांनी मला विचारले , " श्याम ! काल कोणता श्लोक म्हटलास ?"

आई ताक करीत होती . तिची सावली भिंतीवर नाचत होती . उभे राहून ताक करावे लागे . मोठा डेरा होता . माथ्यासुध्दा मोठा होता . आईने एकदम ताक करावयाचे थांबविले व ती म्हणाली , " श्यामने काल श्लोक म्हटला नाही ; मला मात्र खोटेच येऊन सांगितले की , म्हटला परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली . मी त्याला सांगत होत्ये की , देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही , असे म्हण ; परंतु किती सांगितले तरी ऐकेनाच ."

वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले , " होय का रे ? ऊठ , उठतोस की नाही ? त्या भिंतीजवळ उभा रहा . श्लोक म्हटलास का काल ?"

वडिलांचा राग पाहून मी घाबरलो . मी रडत रडत म्हटले , " नाही म्हटला . " मग खोटं का सांगितलेस ? शंभरदा तुला सांगितले आहे की , खोटे बोलू नये म्हणून ." वडिलांचा राग व आवाज वाढत होता . मी कापत कापत म्हटले , " आता नाही पुन्हा खोटे बोलणार ."

" आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस . आईबापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते ? माजलास होय तू ? " वडील आता उठून मारणार , असे वाटू लागले . मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायांवर डोके ठेवले . माझे कढत कढत अश्रू तिच्या पायांवर पडले . " आई ! मी चुकलो , मला क्षमा कर , " असे मी म्हटले . आईच्याने बोलवेना . ती वात्सल्यमूर्ती होती . विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले ; परंतु स्वत : च्या भावना आवरून ती म्हणाली ," देवाच्या पाया पड . पुन्हा खोटे बोलण्याची बुध्दी देऊ नकोस , असे त्याला प्रार्थून सांग ."

मी देवाजवळ उभा राहिलो . स्फुंदत स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले . नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो .

वडिलांचा राग मावळला होता . ‘ ये इकडे ,’ असे ते मला म्हणाले . मी त्यांच्याजवळ गेलो . त्यांनी मला जवळ घेतले . पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले , " जा आता , शाळा आहे ना ?"

मी म्हटले , " आज रविवार , आज सुट्टी आहे ."

वडील म्हणाले , " मग जरा नीज हवा तर . का शेतावर येतोस माझ्याबरोबर ? पत्रावळींनी पाने पण आणू . " मी होय म्हटले .

वडिलांचा स्वभाव मोठा हुषार होता . त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले . रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला . जसे काही झालेच नाही . आम्ही बापलेक शेतावर गेलो . माझी आई मूर्तिमंत प्रेम होती तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे . तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते . खरी माया होती . कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला , आम्हा सर्वांना वागवीत होती . कधी ती प्रेमाने थोपटी ; तर कधी रागाने धोपटी . दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती . ह्या बेढब व ऐदी गोळ्याला रूप देत होती . थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो . दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते . सारखाच प्रकाश असेल तर नाश . म्हणून एका कवितत म्हटले आहे :-

करूनि माता अनुराग राग । विकासवी बाळ - मना - विभाग

फुले तरू सेवुनि उष्ण शीत । जगी असे हीच विकास - रीत ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP