मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र सातवी

श्यामची आई - रात्र सातवी

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


" कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे . साधेपणात किती तरी सुंदरता व स्वच्छता असते . ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी . माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे . बायकांनासुध्दा त्रास कमी . ताटे घासावयास नकोत . वडील सकाळी शेतावर जावयाचे . इकडे तिकडे फिरून , कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत . येताना फुले , पत्रावळीसाठी पाने , कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे . वडील मग स्त्रात करून संध्या , पूजा वगैरे करावयास बसत . आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू . ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण .

मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे . द्रोण तर अगदी साधत नसे . आमच्या कोकणात एक म्हण आहे :" पत्रावळी आधी द्रोणा । तो जावई शहाणा । " पत्रावळ लावण्यापर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे !

घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत . कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या , असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई . नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात . वडाची पाने , पळसाची पाने , कुड्याची पाने , धामणीची पाने , भोकरीची वाटोळी पाने , पांढर्‍या चाफ्याची पाने , सर्वांच्या पत्रावळी लावतात . श्राध्दाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात . चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात . कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे . झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी

" श्याम ! तू पत्रावळ लावावयास शीक . नाही तर आज जेवावयास मिळणार नाही ." असे आईने मला बजावले .

" मला लावायला येत नाही , मी काही लावणार नाही , " मीही रागानेच म्हटले .

माझी बहीण माहेरी आलेली होती , ती मला म्हणाली , " श्याम ! ये तुला मी शिकविते . कठिण का आहे त्यात काही ? "

" मला नको तू शिकवायला जा . " मी उर्मटपणे त्या बहिणीस उत्तर दिले . माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावीत असे . माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिध्द होते , आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते . त्यांची तर आख्यायिकाच झाली होती . जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावयाचे . चांगलेच पान पाहिजे , हे येथे नीट बसणार नाही , वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत . कसेही पान असो , रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच . कोणाकडे लग्नमुंज असली , प्रेयोजन वगैरे असले की , गावातील मंडळी त्याच्याकडे जमावायाची व पत्रावळी लावीत बसावयाची परंपरा मला शिकणे भाग पडले ; परंतु मी पडलो हट्टी . मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही .

मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही . ‘ ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे ,’ असे ठरले होते . माझी पत्रावळ नाही . सारीजण हसू लागली . माझ्यासाठी माझी अक्क रदबदली करू लागली . " उद्या लावशील ना श्याम पत्रावळ ? उद्या शीक हो माझ्याजवळ . आई , उद्या तो लावील हो . वाढ आज त्याला , " असे अक्का म्हणू लागली ; परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो . " मी नाहीच लावणार जा . नका वाढू मला जेवायला . माझे अडले आहे खेटर . मी तस्सा उपाशी राहीन . " असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो . पोटात तर भूक लागली होती . कोणी आणखी समजूत घालावयाला येते का , याची वाट मी पाहात होतो .

शेवटी माझी थोर निरभिमानी अक्का , तीच पुन्हा मजजवळ आली . ती म्हणाली , " श्याम ! चल रे जेवावयास . मी उद्या सासरी गेल्ये म्हणजे थोडीच येणार आहे समजवावयास ! ऊठ , चल , लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास , " तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकाळे म्हणतात . चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात . पळासाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू एकच पान पुरे होत असे . वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात . माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे . चांगली मोठी गोलदार आवडत असे रानात भरपूर पाने असतात , त्यात काटकसर कशाला ? " विस्तीर्णपात्र भोजनम "’ " जेवावयास मोठे पान घ्यावे " , असे ते म्हणत .

अक्कच्या शब्दांनी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच रूसणार्‍या भावाजवळ आली असतो ! दोन दिवस ती आली होती , तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही . मला वाईट वाटले व डोळ्यांत पाणी आले . अक्काने माझ्या हातात पान दिले . " हे खाली आधाराला लाव ,’ असे ती म्हणाली . मी हातात एक चोय घेतली व टाका लावला ; परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटेना . " श्याम ! ही दुसरी घे चोय . ही चांगली आहे , " असे म्हणून अक्कने दुसरी चोय जुडीतून काढून दिली . कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले .

" ही माझी पत्रावळ वाढ मला . " मी आईला म्हटले .

" हातपाय धुऊन आलास का पण ?" आईने विचारले .

" हो केव्हाच हातपाय धुतले . मी काही घाणरेडा नाही , " मी म्हटले .

" घाणरेडा नाहीसे ; परंतु सू सू तर करतो आहेस . नाक नीट शिंकरून ये , तो मी इकडे वाढते ."

आई म्हणाली .

मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो .

" पोटभर जेव चांगला . उगीच हट्ट करतोस . तो शेजारचा वासू एवढासा आहे ; पण कशी छान लावतो पत्रावळ . " आई बोलत होती .

मी रागाने भराभर जेवत होतो . पत्रावळ कशीतरी लावलेली होती . तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडवला . मी घाबरलो . शेवटी निघाला एकदाचा . टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव . मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव . " मी रागाने म्हटले .

" आमच्या घशात नाही जात ते ? तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्र्चित . जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल ." आई म्हणाली .

मी दुसर्‍या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्र्चय केला . अक्का पत्रावळ कशी लावते , दुमड कशी घालते , ते पाहू लागलो . काही पानांना दुमड घालावयाची असते . ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे . त्यात गर्व कशाला ? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे . जे जे करीन ते उत्कृष्ट करीन . असे माणसाचे ध्येय असावे . पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो , शेण लावणे असो , व शेला विणणे असो . माझ्या वडिलांचा हा गुण होता . ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत ; टोकाला टोक मिळालेले . आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते . ते गोंधळकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत . ते इतकी छान धुणी वाळत घालीत की , पाहात बसावे . माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत त्या वेळेस किती बारीक धारेने शिंपीत , हाताने धार धरून शिंपीत ; परंतु ते काळजी घेत . प्रत्येक गोष्टीत नीटनेटपणा असला पाहिजे . सौंदर्य असले पाहिजे .

माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकविले . प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले . आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील . जर ती नीट नसेल तर जेवणाराच्या घशात टाका जावयाचा ! पत्रावळ लावताना मनात म्हट्ले पाहिजे , " कोणीही हिच्यावर जेवो त्याला नीट जेवता येईल . घशात जाणार नाही . फटीतून अन्न खाली जाणार नाही . " मी चांगला पत्रावळ लावण्यास शिकलो .

एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली . वडिलांनी विचारले , " चंद्रये ! तुझी का ग पत्रावळ ? "

अक्का म्हणाली , " नाही . ती श्यामने लावलेली आहे ." वडिल म्हणाले , " इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली ?"

आई म्हणाली , " त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल , असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला ."

मी आईला म्हटले , " आता मागेच कशाला सांगतेस ? भाऊ ! आता चांगली येते की नाही मला ?"

" आता काय सुंदरच लावता येते ; पण द्रोण कुठे लावता येतो ?" वडील म्हणाले . " द्रोणही मी लावून ठेवला आहे . विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो . शेवटी साधला . मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन ." मी सांगितले .

माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो . जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलास दाखविला . " चांगला आहे , परंतु येथे चुकला . समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत . " असे म्हणून त्यांनी सुधारून दिला . मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखविला .

" आता कोण रागे भरेल ? उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस . देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते . मनात मात्र हवे चंद्रये , याला एक जर्दाळू दे . शिकल्याबद्दल खाऊ . " आईने सांगितल्याप्रेमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला . तो किती गोड लागला ! समुद्रमंथानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसले . गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे , कर्मातच आनंद आहे ."

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP