केशवस्वामी - श्लोक संग्रह ९

केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.

निवृत्ति बाळा मज भेटली रे । बळेचि अंगावरि लोटली रे ॥

तेणे क्रिया सर्वही आटली रे । पदो पदी सन्मति दाटली रे ॥४०१॥

देवूनिया बोध महेश दावी । महेश दावूनि समाधि लावी ॥

समाधिचे सार करोनि ठेवी । सभाग्य त्याचे पद रेणुसेवी ॥२॥

अद्रोहता ज्यास प्रसन्न झाली । क्षमावधू माळ जयासि घाली ॥

साधू कुळीतो निजभानु पाही । त्यावेगळा जानिकि नाथनाहीं ॥३॥

हे हस्तकी हस्त जया न होती । हे पाद जे ज्यास आपाद होती ॥

हा देह ज्यालागि विदेह झाला । हा देह तो देह धरुनि आला ॥४॥

उत्थान ज्याचे स्वरुपी असेना । समाधि ज्याचे स्वरुपी असेना ॥

पाहे मना रे रुप त्यासिनाचे । जो मूळ आहे सकळा जिवाचे ॥५॥

विसावले मानस रामरंगी । की वर्तते चंचळ काम संगी ॥

की आठवी दुष्कृत द्रव्यदारा । हेतो तरी साधक होवि चारा ॥६॥

विश्वसागर तारकयोगी । स्वमुख वैभव गौरवभोगी ।

अचळ पातक नाशक जाणा । सकळ मंगळ दायक राणा ॥७॥

दुरिन दायक सोडुनि ओढी । वदन लोपुनि चिद्रस गोडी ।

अमन घेवुनि सज्जन घेतो । सुमन चंदन त्यासही देतो ॥८॥

परम मंगळ दीपक लावा । हृदय पंकज भासक दावा ॥

परम मंगळ होईल तेणें । मग कदा न घडे तनु घेणे ॥९॥

भवगिरी रचना खचवूनी । सुखनिधी हृदयीं रिचवूनि ॥

शिवपदीं गुरुने स्थिर केले । ह्मणवुनी विलयीं मग गेले ॥४१०॥

भवपुरीं करुनी शयनाते । उघडिले स्वरुपी नयनाते ॥

तव दिसे मज मी निज डोळा । प्रगटली बरवि शिव वेळा ॥४११॥

नेति नेति ह्मणती श्रुती जेथे । सर्वकाळ रमती मुनि तेथे ॥

काळ वेळ न कळे तव त्यासी । नित्य मुक्त सम चिन्मयराशी ॥१२॥

भवदया वदिजे किति बोले । भवजळी बुडता भव केले ॥

ह्मणवुनी वदतो भववाचे । मन क्रिया भव होउनि नाचे ॥१३॥

अती आदरे श्रीशुके सेविले हो । निकेते मुखा माजि म्या ठेविले हो ॥

सुखे पावलो अंतरी तप्त जेणे । सदा मुक्तपी बंदह मोक्षासि नेणे ॥१४॥

सुख घन मयी केले चित्त माझे दयेने । गुणमयि तनुते ही रक्षिली सत्क्रियेने ॥

ह्मणवुनि मती माझी दास्य झाली तयाची । अतिशय घनवर्णी कीर्ती विद्याधराची ॥१५॥

साधू मुखे भेदुनि कामपात्रा । म्या जाळिले कर्म अकर्म वस्त्रा ॥

नासूनिया सर्व विकार सूत्रा । आलो चिदानंद पवित्र क्षेत्रा ॥१६॥

साधू सदा अद्वय क्षेत्रवासी । नक्षत्र भासे जन सर्वत्यासी ॥

यालागि त्याची शिवमात्र काया । विलोकुनी देत परावराया ॥१७॥

साधू सदा अद्वय क्षेत्रवासी । यालागि नाहीं भवसर्ग त्यासी ॥

काशी गया आणि प्रयागवेणी । तूळेचि ना पादर जास कोणी ॥१८॥

साधू दयेचा निज मोकळाणा । हृप्तंकजालागी अखंड जाणा ॥

सच्चित्सुखा येवुनि बैसलासे । यालागि माते भवहान दिसे ॥१९॥

म्या साधुचा संग बराचि केला । या कारणे द्वैत विकार गेला ॥

झालो घनानंद मुकुंद वेगी । बोले कवी केशव राजयोगी ॥४२०॥

निजकरे ममता हरितो रे । भवज्वरा परता करतोरे ॥

कवळुनी हृदयी धरितो रे । अतिसखा कविचा हरि तो रे ॥४२१॥

जो चिंतिताहा भवनासि तोरे । पदोपदी हा हरि दीस तोरे ।

आता कसे मी करु जावु कोठे । हे लागले ब्रह्मा कपाट मोठे ॥२२॥

निरंजनी हरवुनी मनासी । समग्र जो ब्रह्म कटाहनासी ॥

तो भेटला सद्गुरु नाथ ज्यासी । पदोंपदी ब्रह्म समाधि त्यासी ॥२३॥

महाशोक ज्याचेनि नामे पळाला । महामोह ज्याचे नि संगे जळाला ॥

महाबोध ज्याचे निबोधे मिळाला । स्मरा त्या तुह्मी सद्गुरुचिद्‌घनाला ॥२४॥

समर्था तुते प्रार्थितो सर्वभावे । स्वाभावे निवेते शिवे सौख्य द्यावे ॥

कळे देव तो देवपाई निमाला । कळे देव तो देव मीहीच झाला ॥२५॥

निःकामता ज्यासि प्रसन्न झाली । त्याच्या घरा लागुनि शांति आली ॥

पायी सदा गाठि समाधि घाली । सायोज्यताहे चरणी निमाली ॥२६॥

विवेकचित्ती आणि शांति वृत्ती । क्षमा तितिक्षा विषई विरक्ती ॥

औदार्य निःसंग परोपकारी । ते मोक्ष पावोनि जनांसि तारी ॥२७॥

वेदांत सारांश सदा विलोकी । अगर्व तो निस्पृह सर्व लोकीं ॥

संतुष्टता सात्विक निर्विकारी । तो मोक्ष पावोनि जनांसि तारी ॥२८॥

बोले जसे अमृत गोड आहे । अभ्यासती आदर पूर्ण आहे ॥

नैराश्यमोनी परदुःखवारी । तो मोक्ष० ॥२९॥

धैर्या चळेना समता ढळेना । त्रैलोक्य भावे सहसा छळेना ॥

नव्हे कदा कृत्रिम वेषधारी । तो० ॥४३०॥

कोंदाटला राघव दाट पाहीं । चालावया लागुनि वाट नाहीं ॥

सपाट हा कलिपत घाट झाला । उद्धाट तेथें अवघा निमाला ॥३१॥

जो सर्वदा सर्व गतासि पाहे । निरंतरी आत्मसुखेंचि राहे ॥

भावें तया लागुनि सर्व द्यावे । बोले कवी केवळ राम व्हावे ॥३२॥

विज्ञान योगें ममता पसारा । जाईल तेणें ममता पसारा ॥

हे प्राथिता केवळ स्वानुतापें । हाती दिला राघव माय बापें ॥३३॥

दयानिधी केवळ संतमूर्ती । हातीच हा राम धरुनि देती ॥

या कारणे संग करी तयाचा । तूं पावसी लाभ महत्सुखाचा ॥३४॥

ज्याच्या पदीं जाय लयासि माया । त्याच्या पदीं पावन होय काया ॥

प्रसंन्न संत जयासि होती । हातीच हा राम तयासि देती ॥३५॥

अखंड जो राम पदीं विराला । साधू कुळीं मंडण तोचि झाला ॥

दया क्षमा वंदिति पाय त्याचे । तया पुढें येऊनि मोक्ष नाचे ॥३६॥

छंदार्थ झाला अतिगम्य पाहीं । यालागि अह्मां बहु छंद नाहीं ॥

आनंदकंदीं घन वास केला । येथूनि माया वनवास गेला ॥३७॥

मन दया निधिसि मिरवावे । निरवुनि अमनी मिरवावे ॥

मिरवुनि बरवे विवरावें । विवरण विरणे विसराचें ॥३८॥

चिद्भानु ज्याच्या हृदयासि आला । संसार त्यासी निजसार झाला ॥

कर्तव्यता तो मग त्यासि नाहीं । असे तसा तो निजरुप पाहीं ॥३९॥

स्वदेशीं असे तो विदेशीं असे तो । असा दत्त तो सर्व ठायीं वसे तो ॥

सदा सद्गुरु वाक्य बोधें दिसे तो । दिसे तो तहीं वेगळा तो नसे तो ॥४४०॥

जो आठविंतां निबीजे मनींहो । विरोनि जेथें रमती मनींहो ॥

जो येकला पूर्ण जनीं वनीं हो । तो राम पाहा निज लोचनी हो ॥४४१॥

विवेक चंद्रामृत सेवुनिया । निरावकाशी स्थिर होउनीया ॥

विद्वज्जनी केलि अखंड केली । स्वप्रत्ययीं केलिं गळोनि गेली ॥४२॥

मी लक्षिता देव अबद्ध पाहीं । यालागि कोणी मज बद्ध नाहीं ॥

संबंध माझा घडला जयासी । निबंध ऐसा कळला तयासी ॥४३॥

सेवी निजानंद रसासि पाहीं । त्वरा तयालागि कदापि नाहीं ॥

क्षराक्षरा पासुनि मुक्त राहे । अचिंत्य होऊनि विराज ताहे ॥४४॥

श्रोत्रंबुजा सद्गुरु वाक्य आलें । जिवाशिवाचें निजलग्न झालें ॥

तेणे सुखें संभ्रम थोर वाटे । हृत्‍तंकजीं ब्रह्मसमाधि दाटे ॥४५॥

सच्छास्त्र सार सरिता घनघोष वेगें । राहे सदा परम मंगळ आत्मयोगें ॥

संपूर्ण स्नान करुनी अघजाळ नाशी । सेवीन तो अचळ चिन्मय पुण्यराशी ॥४६॥

लक्षूनि पाय बरवे परमेश्वराचे । सिद्धांत बोध गगनी मनचंद्र नाचे ॥

तेणेंचि भेद सरला श्रम सर्व गेला । विश्रांति मूर्ति गुरुने निजलाभ केला ॥४७॥

विश्रांति हे घेवुनि बोध सद्मीं । जे डोलती सद्गुरुपादसद्मीं ॥

त्याची मला आवडि फार मोठी । ज्याकारणें लाळ समाधि घोटी ॥४८॥

साधु दया परम मंगळ ओंध वाहे । तेणें जळें हृदय पूर्ण भरुनि राहे ॥

तेथेचि हा कारण गोळबरा गळाला । सांगो किती प्रलयपंचम आजिं झाला ॥४९॥

भाग्योदयोसार विचार क्षेत्रीं । गोमेध केला गुरुवाक्य मंत्रीं ॥

लक्षार्थ हाताप्रति सर्व आला । चित्स्वर्ग झाला निजयाग्नि केला ॥४५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP