समाधि प्रकरण - अध्याय पहिला

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


श्रीशामसुंदर इटेवरि तिष्टताहे
चिन्मात्र वस्तु घडली निजमूर्ति ते हे ।
भीमातटीं कटितटीं कर त्यासि पाहे
भेटावया निजजनाप्रती वाट पाहे ॥१॥
समचरण तयाचें देखतां या मनाला
सुख अमुप उदेलें काय सांगूं जनांला ? ।
भवभय बहु होतें आजि सारें पळालें
जड मनपण माझें नेणवे कैं गळालें ! ॥२॥
अहंकृति विलास हा सकळ तूटला त्याक्षणीं
इटेवरि निरीक्षिला सगुण सांद्र या लोचनीं ।
अविद्यक समस्तही गलित भाव झाले कसे
गुणत्रयविलास त्या त्यजुनि चित्त हें उल्लसे ॥३॥
मना प्रबळ वासना नवल ऊठिली हे असी
अखंड तरि चिंतिजे हरिपदांबुजें मानसीं ।
वदेल जरि वैखरी हरिकथाचि बोलो सुखें
कदां कृपण दुष्कृतीजनकथा न यो या मुखें ॥४॥
जसा हरि तसेचि ते परम भक्त त्याचे पहा
अभिन्नपण पावले समरसोनि गेले महा
स्वयें हरिच जाहले हरिहि तोच झाला तसा
जगासि तरि दाखवी तनु धरोनियां भिन्नसा ॥५॥
म्हणोनि भगवज्जना हरि असेंचि पैं मानिजे
उदार गुण आवडी धरुनि फारसी वानिजे ।
असीच मज बोधिते घनकृपा तयाची मना
करील हरि सावळा सफळ हे असी कामना ॥६॥
तो नामदेव अतिभक्त अभिन्न देवीं
जो सामरस्यपद पाउनि वासुदेवी
रंगोनि स्वल्प उरला दिसतो जनाला
तारावया सगुण साधक सज्जनांला ॥७॥
तेणें समाधिसुख पाहुनि ज्ञानियाचें
जें वर्णिलें परम कारण या जगाचें ।
तें जे जगी पढति ते तरती भवाब्धी
भेटे तया सगुण विठ्ठल चित्सुखाब्धी ॥८॥
वाटे मनासि धिंवसा हरिभक्तिनावें
म्यांही भवांबुधिंत आजि सुखें तरावें ।
या वर्णिले गुरुसमाधिस नामदेवें
म्यां श्लोकरुप यश वर्णुनि सौख्य घ्यावें ॥९॥
लोकांत निंद्य म्हणवी करितां पराचा ।
हेवा नसोनि गुण आपणियांत त्याचा ।
हेही यथार्थपरि प्रेरित अंतरात्मा
या कारणार्थ न गणीं जन बोलते मा ॥१०॥
आणीक एक जन जेंवि भरे उपाधी
तैसा दुजा नर भरे तरि निंद्य आधीं ।
जे भक्त आचरति धर्म तयाच वाटे
जातां तयासि भय दुर्यश हें न भेटे ॥११॥
हेंही अम्हीं परिसिलें सुजनामुखानें
या कारणें परम लाभ अम्हासि तेणें ।
गाऊं सुखें अमल बुद्धि असो नसो कीं
मातें बरें म्हणतु वा न म्हणोत लोकीं ॥१२॥
निरंजनकवी करी सकळ सज्जना प्रार्थना
तुम्ही सदय जी असा करित दीनसंरक्षणा ।
म्हणोनि परिसा बरी विनवणी कृपासागरीं
अयोग्य अति धीट मी करितसें तुम्हांसी सरी ॥१३॥
जगांत तरि माउली गति जशी खळा बाळका
न लक्षुनि गुणासि ते घडत सिद्ध त्या पालका ।
तसेंचि करुणाघनीं मज नुपेक्षितां रक्षिजे
धरोनि हित मानसी प्रबळ चूकतां शिक्षिजे ॥१४॥
जयासि घडली बरी सुजनवंद्य शिक्षा जगीं
तयासिच मिळे महाफळ कथा नव्हे वाउगी
म्हणोनि तुमच्या पदा नियत अमी भजें हो गुरु
सहोनि करिजे मला कवि उडूंत सर्वां ध्रुरु ॥१५॥
नमूं योगपीठा निवृत्ती वरिष्ठा । नमो ज्ञानदेवा परब्रह्मनिष्ठा ।
नमो बोधदीपासि सोपानरुपा । नमो दिव्य मुक्ताभिधा मुक्तिरुपा ॥१६॥
चतुर्धा हरी तो घडे चित्कळेशीं । स्वमायावश पूर्णकामी विलासी ।
कलीमाजि उत्पन्न झाल्या जनांते । स्वयें उद्धरावेंचि आलें मनातें ॥१७॥
अनेका जगीं दाखवी लोकलीला । करी बोध गीतार्थ सोपा जनांला ।
असा ज्ञानरुपी हरी तोचि साजे । जयाची महत्कीर्ती लोकीं विराजे ॥१८॥
झाले कीं अवतारकृत्य अपुलें ज्या कारणें भूवरी
केला कीं अवतार या कलिजना तारावया सत्वरी ।
हातीं नाव दिल्ही रचोनि सुजना श्रीकृष्णसद्भक्तिची
गीतार्था विवरोनि दिव्य रचिली छाया सुधासी तिची ॥१९॥
अमृतबोध करी अमृतापगा । त्वरित जींत निवे भवताप गा ।
सुमति तो अवगाहन जैं करी । हरिपदाप्रति पावत लौकरी ॥२०॥
अभंगही फार अभंग केले । अभंग सौख्यामृतसार गोळे ।
जे सेविती तेचि अभंग होती । अभंग चिन्मात्र पदासि जाती ॥२१॥
श्रीगीता कल्पवल्ली उपजत बरवी कृष्णवक्त्रालवालीं
व्यासें सिंचोनि तीतें टवटवित तसी विरतरा पाववीली ।
पार्थाख्या मंटपीं जे बहुत पसरली संजया साधली ते
सेवावी ज्ञानदेवी परम फळ जना मुक्ति कैवल्य देते ॥२२॥
या ज्ञानदेवासि समाधि घ्यावी । वाटे स्वलीला पुरती करावी ।
श्रीविठ्ठलीं ऐक्यपदा भजावें । पृथक्पणा टाकुनि वस्तु व्हावें ॥२३॥
आभास हा भिन्नपणें विराजे । अभिन्न तद्रूप तयासि कीजे ।
घटामठाकाश महानभीं तें । मिळावया काय उशीर त्यातें ॥२४॥
व्युत्थनकाळीं मन जेथ राते । समाधि घेतां अपुल्या पदांतें ।
येईल विश्रांति कयावयातें । अपूर्वता ते तरि कोण येथें ॥२५॥
जें ज्ञानांजन या जगीं प्रकटलें श्रीज्ञानदेवाकृती
विश्वासें धरिलें तयासि मिनलें चिद्वस्तुतें निश्चिती ।
पाहा ज्ञानधनासि प्राप्त करितें लोकत्रयीं शोभतें
श्रीज्ञानेश्वर नाम नित्य जपतां मूढाजडा तारितें ॥२६॥
जें ईटेवरि ब्रह्म तेंचि विलसे भीमातटी सावळें
ज्याच्या सर्व संमतता विलसती भोळीं खुळीं गोवळें  !
तेही भक्त तसेच भाविक पहा । भोळे जनाच्या मना
मानेनात असे अकिंचन तसे नाही जयां कामना ॥२७॥
तेव्हां ज्ञानमणी हरीस विनवी "माझी असे प्रार्थना
अंगीकार कराल तैं विनवितों मी आदिनारायणा ।
देवी भीमकनंदिनी विलसते अंकस्थिता सुंदरी
नीलांभोदसमीप शोभित दिसे विद्युल्लता ज्यापरी ॥२८॥
हे माया ह्नणवी त्रिलोकजननी विद्या घडे ज्ञानियां
योग्याची तरि सिद्धि हें फळ घडे साक्षात्तपस्वी तयां ।
संसारींरत यांसि हेंच भुलवी देवी अविद्यापणें
ब्रह्मी चिन्मय रुपिणी जडमयी झाली जगा कारणें ॥२९॥
यांचे सर्व विलास हें जग दिसे स्त्रक्सर्पभासापरी
तूं आत्मा तुजलागि झांकुनि कसी सानंद लीला करी ।
तूं देवा तरि ऊघडाचि दिससी खेळां तयीच्या तरीं ।
ऐसें कौतुक हें तुह्मी उभयतां जाणा करुं श्रीहरी ॥३०॥
दोघांचाचि विलास मिश्रित जगीं म्या पाहिला लोचनीं
आतां इच्छितसे मनीं सुखघना हा लंघिजे त्रैगुणी ।
जें कां निश्चळ रुप निष्कळ तुझें मीतूंपणावेगळें
घ्यावें तेंचि अखंड चिन्मयणें हे द्वैत जेथें गळे ॥३१॥
ऐशी ज्ञानसमाधि हे मज तुह्मी द्याई जगन्नायका !
नेच्छी भुक्ति तसीच मुक्तिपदवी सायुज्य तेही नका ।
मायातीत विशुद्ध बुद्ध बरवें एकत्वहीं नाढळे
शून्याशून्यविहीन तें मज करा चिन्मात्र सर्वागळें ” ॥३२॥
ज्ञानेश्वराची विनती हरीनें । हे ऐकिली सादर दिव्यकानें ।
संतोष झाला स्वमनीं विठोला । माझ्या कसा येइल अल्प बोला ॥३३॥
ह्मणे भला ज्ञानदेवा । तूं भक्त तूं प्रेमळ शुद्ध भावा ।
मिळोनि मातें मिळणें पुन्हा तूं । मिळावया इच्छिसि जाण बा ! तूं ॥३४॥
मीतूंपणी आणिक काय आहे । एकत्व तें मी ह्मणणें न साहे ।
तुझ्यामुखें ग्रंथ जनांत झाले । माझ्याकृपें सर्वहि म्यांच केले ॥३५॥
जे जे तुह्मी लौकिक भव्य लीला । मी सर्व झालों मग कैं निराळा ।
मीतूंपणा ठाव असेल सांगें । तत्रापि तूझें करणेंचि लागे ॥३६॥
हें ऐकतां पादसरोरुहातें । घाली मिठी ज्ञाननिदान हातें ।
पुन: पुन्हा वंदन तेंचि सारी । या गौरवें प्रेम भरे शरीरीं ॥३७॥
तें विठ्ठलें पाहुनि ज्ञानदेवा । कृपार्द्रनेत्रें बरवें सदेवा ।
संतुष्ट केलें कमळासि जैसा । प्रकाशवी भास्कर नित्य तैसा ॥३८॥
हें नामदेवें निरखोनि डोळां । प्रेमास्पदें पारचि खेद केला ।
हें व्यक्त ज्ञानेश्वर रुप आतां । अव्यक्त होईल ह्मणोनि चिंता ॥३९॥
बद्धांजुळी लक्षुनि ज्ञानदेवा । पुढें उभा नम्र शुचि स्वभावा ।
सप्रेम बोले मग केशिराजा । प्रस्थान  कीजे अति शीघ्र वोजा ॥४०॥
माझी ध्यान समाधि नित्य तुझिया चित्तीं असे वेधली
सर्वत्रीं ममरुप हे गुणमयी मुद्रा मना बोधली ।
आतां जाउनियां समाधि करिसी अव्यक्त ध्यासी मला
तेव्हां हें सुगुणी मदीय रुपडें कैं आठवे बा तुला ॥४१॥
माझें हें गुणरुप नित्य तुझिया चित्तांत राहो प्रिया !
ऐशी भेटि मला निरंतर तुझी तूं देत जासी सया !
ऐशी ऐकुनि देवभाषित गिरा तैं साधु संतां जनां
झाला खेद मना वियोग घडतो हा आजि ज्ञानांजना ॥४२॥
तेव्हां ते सति रुक्मिणी भगवती सप्रेम ज्ञानेश्वरा
अर्पी भोजन षड्रसाक्त हृदयीं विश्लेषचिंतातुरा ।
ऐशी कार्तिक मास शुक्ल दशमी प्रेमामृतें वर्तली
केली जागरणा समेत बरवी एकादशी चांगली ॥४३॥
क्षीराब्धि उत्सव यथाविध सांग केला
श्रीद्वादसीस हरिजागर पुण्य़वेळा ।
जो कां निजोनि उठिला हरि मास चारी ॥४४॥
प्रस्थान तैं करुनि पूजुनि विठ्ठलातें
वंदोनियां मग निघे संति रुक्मिणीतें ।
येतों ह्मणोनि पुसतां अति कंठ दाटे
बाष्पांबुपूर नयनीं बहुसाल लोटे ॥४५॥
तेव्हां हरी ह्मणत ज्ञानशिखामणीतें
मी पाठिसीं त्वरित येइन सत्य तेथें ।
जेथें असे परम पावन ते अळंदी
सिद्धेश आदिशिव दे सकळार्थ सिद्धि ॥४६॥
इंद्रायणी सरस दक्षिण संस्थ वाहे
जीला समस्त सरिता उपमा न साहे ।
तेथें समाधि तुज देइन मीच हांत
एकादशी बहुळपक्ष महोत्सवातें ॥४७॥
एकादशी कार्तिक शुक्ल माझी । एकादशी कार्तिक कृष्ण तूझी
दोन्ही महोत्साव सुभक्त माझे । लक्षोनियां पावति तोष वोजे ॥४८॥
हे ऐकतां देवमुखोक्त वाणी । सानंदता पाउनि भाविकांनी ।
टाया पिटोनी जयकार घोषें । ब्रह्मांड सन्नादविलें अशेषें ॥४९॥
अळंदीस येवोनिया ज्ञानदेवें । समाधिस्थळा सिद्ध केलें सदेवें ।
बरें आदि सिद्धेश्वरा पूर्वभागी । गुहा सिद्ध केली यथा उक्त योगीं ॥५०॥
समाधीस इच्छी बसो ज्ञानराजा । तदां ते स्थळीं पातला केशिराजा ।
खगेंद्रावरी आरुढे तो स्वलीला । सवें रुक्मिणी सत्यभामा सुशीला ॥५१॥
महाभक्त ते नामदेवादि सारे । मिळाले तदां मानवी एक मोरे ।
जुनें द्वापरीचे तसे उद्धवादि । कृतत्रेतिचे पातलें रम्यबुद्धी ॥५२॥
तदां देखतां म्लानवृक्षा अजाना ! झरे नामदेवासि चित्तासि पान्हा ।
ह्मणे पांडुरंगासि या पुष्टि द्यावी । सदां आर्द्रता वृक्षराजा असावी ॥५३॥
असी ऐकतां नामयाची सुवाणी । तदां तोषलें बोलले चक्रपाणी ।
अह्मी दीधली ज्ञानराजादि गंगा । जितें स्पर्शितां जाय संताप भंगा ॥५४॥
दिल्ही ययातें मणिकर्णिका ती । दोघी सदां तिष्ठति याच ठायी ।
मिळोनि इंद्रायणिच्या जळासी । लोकत्रया उद्धरिति सुखेंशी ॥५५॥
येवोनि येथें ममभक्त कोणी । करील जो मज्जन या त्रिवेणीं ।
गायील भावें मम नामकणी । वैकुंठिची भोगिल मुक्तिराणी ॥५६॥
ऐसा दिल्हा वर तया परमेश्वरानें
तैं नाचती परम भक्त महा सुखानें ।
वैकुंठ तें कलिजनांप्रति फार सोपें
केलें त्रिलोकजनकें सुमहत्प्रतापें ॥५७॥
॥ इतिश्री ज्ञानेश्वरविजये समाधिप्रारंभवर्णन नाम प्रथमो‍ध्याय: ॥
॥ श्रीरुक्मिणीशार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP