मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
दत्तमहाराज अष्टेकर

दत्तभक्त - दत्तमहाराज अष्टेकर

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १८९४-१९२५)

जन्म: आश्विन शुद्ध १, शके १८१६ रविवार रात्री १ वा. २१ मि. चित्रा नक्षत्र, कर्क लग्न, तूल राशी. पूर्व आश्रमातील नाव नरहरी; वडिलांचे नाव वासुदेवराव दिवाण, आईचे नाव सौ. मुक्ताबाई. रा. बुवाचे वठार, ता. हातकणंगले, जि, कोल्हापूर. या नरहरीस पुढे दत्तमहाराज म्हणू लागले. यांची समाधी अष्टे येथे असल्याने श्रीदत्तमहाराज अष्टेकर या सत्पुरुषाची पावनकथा ऐका.

दिवाण घराणे ऋग्वेदी देशस्थ गौतम गोत्र. बुवाचे वठार येथे श्रीएकनाथ महाराजांचे नातू उद्धवस्वामी यांची समाधी आहे. त्या एकनाथांचे वंशातील सौ. मुक्ताबाई ‘शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ।’ अशा पुण्यावंत मातेच्या पोटी नरहरीचा (श्रीदत्तमहाराजांचा) जन्म झाला. मुक्ताबाईचे हे तिसरे अपत्य.

महाराज ११ वर्षांचे असता त्यांचे वडील वासुदेवराव दिवाण मृत्यू पावले. महाराजांचे शिक्षण पुढे शिरोळे येथे मराठी ५ इयत्तेपर्यंत झाले. शके १८२९ साली वयाचे १३ वे वर्षी नोकरीचे निमित्ताने ‘सांगलीस जातो’ म्हणून शिराळ्याहून बाहेर पडले, ते थेट श्रीक्षेत्र नृसिंहवाडीस जाऊन श्रीवासुदेवानंदसरस्वती, टेंबे स्वामींचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांचे अंत:करण्यात काही स्फुरत आहे असे वाटले.

टेंबे  स्वामींचे दर्शनसुख थोडे दिवस घेल्यावर महाराजांस श्रीक्षेत्र गाणगापुरास जाण्याची प्रेरणा झाली. त्याप्रमाणे ते गाणगापुरास गेले व तेथे गावामध्ये माधुकरी मागून सेवा करीत राहिले. तो त्यांना तेथे कॉलरा झाला व पंचप्राण व्याकुळ होऊन मृत्यूचे दारात पडले. तशा स्थितीत त्यांना श्रीदत्तप्रभूंचा दर्शनलाभ घडला. श्री म्हणाले. ‘भिऊ नकोस, हे तीर्थ घे’ असे म्हणून श्रींनी स्वहस्ते महाराजांस तीर्थ पाजले आणि म्हटले, ‘तू बरा झाल्यावर घरी जा’ असे सांगून श्रीदत्तमहाराज अंतर्धान पावले.

भगवान्‌ दत्तात्रेयांनी केलेला हा अनुग्रह शरीररक्षणापुरता नसून त्यांनी पूर्ण कृपाच केली व अंत:करणवृत्ती अंतर्मुख केली. दत्तप्रभूंचे आदेशाप्रमाणे महाराज बुवाचे वठार येथे परत येऊन तेथे उद्धवस्वामींच्या समाधीची सेवा करीत राहिले व पुढे ते पंढरपुरास गेले; त्या ठिकाणी श्रीहरिहर महाराज या थोर विभूतीची भेट झाली.

श्रीहरिहर महाराज फार तेज:पुंज, ब्रह्मचारी व धिप्पाड होते. त्यांनी दत्तमहाराजांस मंत्रोपदेश दिला. पुढे ही गुरुशिष्य जोडी परळी-वैजनाथ, दौलताबाद, वेरुळ, उज्जयिनी, ॐ कारममलेश्वर वगैरे ज्योर्तिइलंगांच्या यात्रेस जाऊन गिरनारास गेली व तेथे त्या दोघांस श्रीदत्तप्रभूंचे दर्शन झाले. पुढे श्रीहरिहरमहाराजांनी दत्तमहाराजांस श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामींकडे प्राणायामादी अष्टांग शिकण्यास पाठविले. तेथेही योगविद्या शिकत असता ते एकनाथी भागवत वाचीत असत. तेथे महाराजांस शास्त्रोक्त व आत्मप्रचीतीची माहिती मिळाली व त्यामुळे परब्रह्म आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला व ब्रह्मनिष्ठता मिळविली.

शके १८४० साली श्रीदत्तमहाराजांना कृष्णा नदीची पायी प्रदक्षिणा करण्याचा आदेश मिळाला. कृष्णानदी सह्याद्री पर्वतावरील महाबळेश्वरावर उगम पावून मच्छलीपट्टणाजवळ बंगालचे उपसागरास मिळते. नित्य कृष्णास्नान करावयाचे व नदीच्या काठापासून फार तर पाच मैलांच्या बाहेर जावयाचे नाही असा निर्बंध आहे. श्रीशैल्यापर्यंत कृष्णाकाठी गावे असून वाट तरी आहे; पण पुढे कित्येक मैल घनदाट अरण्य व भिल्ल व हिंस्र पशूंची वस्ती. दर्‍याखोर्‍यांमधून जावे लागते; प्राणसंकटच ते. या प्रवासात मित्र म्हणजे सर्वव्यापी ईश्वर व त्याच्याशी समरस होण्याचा अभ्यास, या प्रवासात महाराजांस अनेक प्रकारे ईश्वरी सहाय्य झाले उगमापासून निघून परत उगमापर्यंत जावयाचे अशी ही कृष्णा प्रदक्षिणा १६०० मैलांची आहे. ती महाराजांनी केली. ती पुरी झाल्यावर त्यांना कृतार्थता वाटली व ईश्वरी इच्छेचे कौतुक वाटले. पुढे ते पुन्हा गाणगापुरी गेले व तेथे त्यांना श्रीदत्तात्रेयाचे सगुण दर्शन झाले. पुढे ते सात दिवस समाधिसुखात होते.
                                                                                                                                                                                                                                                                               पुढे  श्रीमहाराजांनी दक्षिणेतील यात्रा केल्या. मांधारगुडी (दक्षिण द्वारका), कन्याकुमारी, रामेश्वर, धनुष्यकोटी, जंबुकेश्वर, चिदंबर गिरी, उडुप्पी कार्तिकस्वामी, गोकर्ण वगैरे करून महाराज कावेरी तटी तंजावरास आले. (शके १८४२) व तेथे संध्या मठात वास्तव्य केले. तेथे त्यांना एक जुनी पोथी वाचताना आत्मानुभवाची प्रचीती येऊ लागली. दशोपनिषदे व तंत्रशास्त्र वाचले. ‘आत्मज्ञान झाले म्हणजे सर्व जाणले’ याची प्रचीती आली. तंजावरास लोक जमू लागले; त्यांना उपासना सांगितली व सन्मार्गास लागले; व त्यांच्या शंका निवारण केल्या. पुढे त्यांची एका विदेही सत्पुरुषाशी भेट झाली. त्यांच्या समागमात महाराजांना वाटले की, आपण आनंदसुखसागरात पोहत आहो. त्यांच्या चित्ताची एकाग्रता इतकी वाढली की, बाह्यवस्तू व कालाचे ज्ञान त्यांना मुळीच राहिले नाही.

शके १८४५ मध्ये महाराज आपली जन्मभूमी बुवाचे वठार येथे परत आले. देहयष्टी कृश झाली होती. ब्रह्मचर्यानुसार दाढी व जटाकलाप शोभत असे. डोळे व प्रेमदृष्टी, कमरेस लंगोटी व त्यावर एक वस्त्र व पांघरण्यास एक वस्त्र आणि कमंडलू. ते माध्यान्हकालास आश्रमधर्मानुसार मधुकरी मागत. प्रात:स्नान व संध्या आटोपल्यावर ते तीन तास समाधित रहात आणि त्या आसनावर मधून मधून दीड वीतभर अंतराळी होत होते. ते नित्य श्रीदत्तमाहात्म्य वाचीत. पुढे ते अष्टे येथे गेले. तेथे त्यांनी अनेक साधकांना उपदेश केला. अष्टे येथे असताना औदुंबरास वारंवार जाऊन श्रीदत्त महाराजांचे दर्शन घेत. दक्षिणकाशी करवीरास गेलेवेळी त्यांना षडभुज दत्तदर्शन झाले.

महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक चमत्कार आहेत. ते किती म्हणून वर्णन करावेत? मन थक्क होते. महाराजांनी कोणास शिष्य केले नाही. त्यांच्या सहवासात एरवाद्याचा संबंध आला म्हणजे तो अधिकारी जीव आहे अगर नाही हे अंतर्ज्ञानाने जाणत व आपण होऊन त्यावर कृपा करीत. महाराजांनी त्यांचेवर एक वेळ प्रेमळ कटाक्ष टाकिला की, त्यांचे अंत:करण ओढ घेत असे.

अष्टे मुक्कामी असताना शके १८४७ फाल्गुन शु. ६ गुरुवारी संध्याकाळी श्रीदत्ताची आरती व मंत्रपुष्प आटोपल्यावर महाराज सर्व मंडळींस दूर करून समाधीचे आसन घालून बसले. आचमन करून प्राणायाम केला व लगेच समाधी लावली. लोकांना ही नित्य समाधी अगर महासमाधी आहे हे कळेना. तीन तासपर्यंत ते त्या अवस्थेमध्ये होते. नंतर मान कलली व ब्रह्मरंध्रभेदन करून विदेह मुक्ती घेतली. टाळुस्थानामधून केसासारखी रक्ताची धार निघाली होती. (समाधीकाल रात्री ११ ॥) समाधीस सरकारी परवानगी मिळण्यास १७ तास लागले. तोपर्यंत महाराजांचे सर्वांग मऊ होते. स्नानानंतर कफनी, रुद्राक्षमाला व हार घालण्यात आले. तीर्थासाठी कोण धडपड ! मंगल स्नानाचे पाट वाहू लागले व शेवटी तेथील माती चिखल लोकांनी अंगास लावून घेतला. समाधीचे जागी कमंडलू व दत्तमाहात्म्य पोथी ठेवली. सर्वांनी जड अंत:करणाने समाधीचे द्वार बंद केले. त्यावेळी सर्व जातीचे लोक जमले होते. सर्व आटोपण्यास ११ वाजले; तोपर्यंत अष्टे गावातील चूल बंद होती. या निर्वाणामुळे अनेक लोक कष्टी झाले.

--- भा. का. चंदूरकर

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP