नामस्मरण - सप्टेंबर २२

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरु झाले की बाकीची सर्व चक्रे आपापल्यापरी हळू किंवा जलद फिरु लागतात . त्याचप्रमाणे आपल्या मनाचे आहे . मनाची एक शक्ती काम करु लागली की तिच्याबरोबर इतर सर्व शक्तीदेखील हालचाल करु लागतात . मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे . ते थोर माणसालाच जमण्यासारखे आहे . पारा समोर टाकला तर तो दिसतो , पण काठीने मारला तर तो मारला जात नाही . त्याचप्रमाणे , मन आहे हे समजते , पण ते आवरता येत नाही . म्हणूनच भगवंताला शरण जावे . आरशावर घाण पडली म्हणून साफ करण्याचा प्रसंग आला . अंतःकरणाची घाण पुसण्याचे काम साधनाने होते . मिरच्या , मिरे , मीठ , इत्यादी पदार्थ एकत्र करुन जसा सुंदर मसाला तयार करतात , त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे . शुद्ध आचरण , शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे नामस्मरण , या त्या तीन गोष्टी आहेत . शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा , धार्मिक आचार आणि नीतीचे वर्तन . शुद्ध अंतःकरण म्हणजे अभिमान नसणे , द्वेषमत्सर नसणे , आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे . भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणे . नवर्‍याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही . तिने नाम घेतले तर पत्नीधर्म सोडला असे होत नाही .

मनात येणारे भलतेसलते विचार हे नामाच्या प्रेमाला आडकाठी करतात . त्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय म्हणजे , या विचारांना थाराच देऊ नये म्हणजे झाले . एक मोठा पोलीस अंमलदार चोर पकडण्यात हुशार होता . तो असे करी की , चोर ज्या बाईच्या नादी असेल तिला फितुर करुन घ्यायचा , म्हणजे चोर आपोआप नेमका सापडे . त्याचप्रमाणे आपले मन जिथे गुंतते तिथे भगवंताला ठेवला , की मन आपल्या ताब्यात आलेच म्हणून समजा . मनाचे संयमन करायला दोन उपाय आहेत ; एक म्हणजे पातंजल योग , आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती . पातंजल योग म्हणजे युक्ताहारविहार , नियमित राहणे , आणि इंद्रियांचा निरोध करणे . भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम . या प्रेमाची साधने कोणती तर भगवंताचे नामस्मरण , त्याचे कथाकीर्तन , साधुसमागम , आणि त्यातल्या त्यात सदगुरुची कृपा , ही होत . भगवंताच्या स्मरणाशिवाय जी कर्मे होतात ती वाईट कर्मे होत . कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही , असा नेम ठेवला तर आपोआप येते . कोणत्याही परिस्थितीत आपण नामस्मरणापासून ढळूच नये . जो नामात प्रपंच करील , त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुखासमाधानाचा लाभ झाल्यावाचून राहणार नाही .

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP