नामस्मरण - सप्टेंबर १७

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का ? आणि तो कशासाठी ? बाकी , एवढे कष्ट करुन तुम्ही इथे येता , तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल ? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे ; पण कशासाठी ? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून ! असे जरी असले तरी त्यात वाईट नाही , त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल . परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय . मोठमोठ्या साधुसंतांना खरोखरच तशी नड भासली ; त्यांनी मग परमेश्वर आपलासा करुन घेतला . तुकाराम , रामदास , यांना एका परेमेश्वरावाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही . भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते . रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली . त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनविले , परंतु भाऊ म्हणाला , ‘ बाळ , तू अजून लहान आहेस . ’ रामदासांची तळमळ शमली नाही . त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला . देवाच्या ध्यासात बारा वर्षे घालविल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला , तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली . परमेश्वराची प्राप्ती ही वयावर , श्रीमंतीवर , जातिधर्मावर अवलंबून नाही ; ती एका तळमळीवर अवलंबून असते . ही तळमळ असणे अत्यंत जरुरीचे आहे . ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय . रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले की , " रामा ! तुला मी देह अर्पण केला आहे . आता याची मला गरज नाही . तुझ्यावाचून जगणे मला अशक्य आहे . " एवढे प्रेम , एवढे आपलेपण , एवढी तळमळ असल्यावर परेमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार !

परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे . आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल . परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही . आपले विकार , आपला अहंपणा , आपली देहबुद्धी , आपल्याला मागे खेचते . या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुनः मागे फिरत नाही . परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे . कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही ? परंतु मध्येच हे विकार आड येतात . खरोखर , भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते , आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते , परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते , आणि सरळ आपल्या हाताला धरुन थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते . हे नाम तुम्ही आपल्या ह्रदयात सतत जागृत ठेवा .

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP