कहाणी मंगळागौरीची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लक म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आण. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाहीं, म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस, निळीं वस्त्रं परिधान कर, रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बोवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत, आंत देवीची मूर्त आहे. मनोभावं पूजा केली, त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घर-दारं आहेत, गुरं-ढोरं आहेत, धन-द्रव्य आहे, पोटी पुत्र नाहीं म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झालें आहे तर तें तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलिस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे ! त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपति आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरीं जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.

देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खालीं उतरून पाहूं लागला तों आपला मोटेंत आंबा एकच आहे. असं चारपांच वेळा झालें. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणें नाहीं असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. कांही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठविले. मामाभाचे काशीस जाऊ लागले. जातां जातां काय झालं ? वाटेत एक नगर लागलं. तिथं कांहीं मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीच भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी म्हणू लागली - काय रांड द्वाड आहे, काय रांड द्वाड आहे ! तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करिते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हें भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं ? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आई-बापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू; म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामा-भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरजं लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजविलं. दोघं झोपी गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्‍यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे ! तिनें सर्व तयारी केली. दृष्टान्ताप्रमाणे घडून आलं. कांहीं वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली आंगठी दिली. पहांटेस उठून ताट घेऊन बिर्‍हाडीं गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.

दुसरे दिवशी काय झालें ? हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली. तों आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली हा माझा नवरा नाहीं, मी याजबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सांपडतो ? नंतर त्यांनीं अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावांनीं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक जेवू लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. यमदूत प्रान न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा ! ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्यानं घरी पाय धुताना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव‍र्‍यानं आंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे ? त्यानं लाडवांचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा ! सासरमाहेरची, घरची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ! ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP