कहाणी पिठोरीची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याच्या घरीं श्रावणांतल्या अंवसेच्या दिवशीं बापांचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशीं श्राद्ध त्या दिवशीं सकाळपासून त्याच्या सुनेचें पोट दुखूं लागें व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं. म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं सहा वर्षं झालं. सातव्या वर्षीहि तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. तें मेललं पोर तिच्या ओटींत घातलं. तिला रानांत हांकून लावलं. पुढं जातां जातां ती एका मोठ्या अरण्यांत गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तूं कोणाची कोण ? इथं येण्याचं कारण काय ? आलीस तशी लौकर जा. नाहीं तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील ! तेव्हां ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करतांच मी इथं आल्यें आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तूं इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अंवसेच्या दिवशीं बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशीं आमच्या घरीं माझ्या आजेसासर्‍याचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणं माझीं झालीं. सातव्या खेपेलाहि असंच झालं. तेव्हा मामंजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं सात वर्षे उपाशी राहिला, तर तूं घरांतून चालती हो ! असं म्हणून हें मेलेलं मूल माझ्या ओटींत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आले. आता जगून तरी काय करायचं आहे ? असं म्हणून रडूं लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तूं भिऊं नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून रहा. रात्री नागकन्या, देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथि कोण आहे म्हणून विचारतील. असं झाल्यावर मीं आहे म्हणून म्हण. त्या तुला पहातील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हां तूं सगळी हकीकत त्यांना सांग !

ब्राह्मणाच्या सुनेनं बर म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तों एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहूं लागली. तों जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यांत रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आसर्‍यांच्या स्वार्‍यासुद्धां आल्या. त्यांनीं शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथि कोण आहे ? म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खालीं उतरली मीं आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनीं मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्यांनीं तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हां आसरांनीं ती दाखवली. पुढं त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हें व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकीं हें व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिनं विचारलं, ह्यानं काय होतं ? आसरांनी सांगितलं. हें व्रत केलं म्हणजे मुलबाळं दगावत नाहीत, सुखासमाधानांत राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गांवांत आली. लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितलं. भटजी भटजी, तुमची सून घरीं येते आहे. त्याला तें खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला, तों मुलबाळं दृष्टीस पडूं लागली. पाठीमागून सूनेला पाहिलं. तसा उठला, घरांत गेला, मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलांबाळांसुद्धां सुखानं ती नांदू लागली. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP