मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|प्रल्हाद केशव अत्रे|झेंडूची फुले|
अहा , उगवली आनंदाची शुभमं...

प्र.के.अत्रे - अहा , उगवली आनंदाची शुभमं...

प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.


अहा, उगवली आनंदाची शुभमंगल वेला,

आज तुम्हा अस्मान ठेंगणे वाटे ना? बोला?

रोमांचातुनि हर्षाच्या ना उसळतात लाटा

गांभीर्याचा मुग्धपणा मग का वदनी खोटा!

उत्सुकतेने तुम्ही पाहिली आजवरी वाट

प्रसंग आला तोच! शांत का मग मिटवुनि ओठ?

लग्नाचे काढिता तुम्ही कुणि आजवरी नाव

'छे-भलते!' दाविलात लटका असाच ना भाव?

'नव्हते कारण लग्नच!' तर मग का बसला आता

सस्मित वदने 'अन्याया'चा प्रतिकार न करता?

तरुण मंडळी 'नको' बोलती अर्थ परी त्याचा

काय असे तो नीट उमगतो थोरांते साचा!

असो' कसे पण वाँरंटाविण आज तुम्ही झाला,

खरे चतुर्भुज! ('जन्मठेप' कुणि म्हणति बरे याला!)

अरे, कुणी हे लांबलचक विधि लग्नाचे केले?

हाच चालला विचार मनि ना! (ते मजला कळले!)

वाङ्‌निश्चय, श्रीमंतपूजने आणि रुखवते ती,

आनंदाच्या समयि कशाला ही भारुडभरती!

पक्वान्ने रुचिमधुर कशाला भोजनास भरती

'त्या घासा'विण विचार असतो का दुसरा चित्ती!

मुंडावळि या डोळ्यांवरती पुन्हा पुन्हा येती

नीट न दिसते 'मुख ते' ! अगदी कटकट ही नसती!

किती यातना वधुवरांच्या ह्रदयाला होती!

वृद्धांना कळणार तरि कधी या नाजुक गोष्टी?

लग्नकालिचा अनुभव अपुला विसरतात सारे

म्हणुनि वधुवरा निष्कारण ते छळती म्हातारे

घास घालणे, विड्या तोडणे नाव आणि घेणे

हाताला अन हात लावणे! पदरगाठ देणे!

एवढेच विधि विवाहात जरि ठेवतील मोठे

उरेल तर मग पृथ्वीला या स्वर्ग दोन बोटे!

निष्कारण भटभिक्षुक म्हणती लग्नाचे मंत्र

तरुणांच्या ह्रदयातिल त्यांना नच कळणे तंत्र

किती मंगलाष्टके लांब ही अजुनि न का सरती?

घसा खरडुनी कानाजवळी किंकाळ्या देती!

लाल अक्षता मारित सुटती डोक्यावर सारे

खराब होतिल केस! तेवढे नच कळते का रे?

चला संपले दिव्य! 'वाजवा' असा ध्वनी उठला

अरे, अजुनि हा अंतःपट तरि कुणी उंच धरिला!

मंडपात का लोक रिकामे रेंगाळत बसती,

हस्तांदोलन वा अभिनंदन का करण्या येती?

उगाच घ्यावा किती कुणाचा मौल्यवान वेळ!

लोकांना आमुच्या कधी हे रहस्य उमगेल!

स्पष्ट बोललो वधुवरांनो, क्षमा करा मात्र!

असेच तुमच्या ह्रदयाचे ना असे खरे चित्र?

चला बैसला जिवाजिवाचा आज खरा मेळ!

संसाराचा सुरू जाहला सुखद आज खेळ!

तुम्हा सांगतिल कुणी 'भवार्णव दुस्तर हा फार!

जीवन नुसति माया! नसते संसारी सार!'

नका घाबरू! अशा ऐकुनी भूलथापा खोट्या,

अजीर्ण ज्याते श्रीखंडाची रुचि येइल का त्या?

आनंदाची सर्व सुखाची जीवित ही खाण

हसेल आणि जगेल त्याते नच कसली वाण!

नका त्रासुनी बघू! समजले! आवरतो सारे!

म्हणाल ना तरि 'बोलुनि चालुनि कवि बेटे न्यारे!'

आनंदाचा मधुर मनोहर वसंतकाल सदा,

तुम्हास लाभो! हीच शेवटी विनंति ईशपदा!

आणि सांगतो अखेर एकच की भांडणतंटा

जरि झाला कधि तरि तो घ्यावा प्रेमाने मिटता!

आरंभी येतील अडथळे! जोवरी न हलला-

सदनि पाळणा-क्षमा करा, हा चुकुनि शब्द गेला!

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP