मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|प्रल्हाद केशव अत्रे|झेंडूची फुले|
जेव्हा काव्य लिहावयास जगत...

प्र.के.अत्रे - जेव्हा काव्य लिहावयास जगत...

प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.


जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,

जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,

तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,

तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे!

झाले काव्य लिहून-यास कुठल्या धाडू परी मासिका?

याते छापिल कोण? लावु वशिला कोठे? कसा नेमका?

रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येइल?

सारे लेखन तेधवा करितसे मी 'पश्चचिन्हा' कुल!

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,

अर्धे काम खलास होईल अशी साक्षी मनी वाटली!

कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये!

केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये!

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,

केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी!

माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन!

त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन!

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएंझा जरी

ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी

सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,

देवा, 'पूर्णविराम' त्या कविस या देशी न का आजला?'

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP