पोवाडा - धर्मादाय वर्णनपर

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.


दामाजी पंतांनि जगविले ब्राह्मण काही दुकळात । गायकवाड तर रक्षिति ब्राह्मण लाखो असल्या काळात ॥ध्रु०॥

तीनशे तिसांवर वर्षे लोटली दुर्गादेविच्या काळाला । फार दिवस पर्जन्यच गेला आन्न मिळेना बाळाला ॥

दामाजीपंताच्या लागले ब्राह्मण द्वारी लोळाला । रक्ष रक्ष महाराज समर्थ सर्वास आला निर्दाळा ॥

त्या समई कथोर फोडुनी पंती जगविले सकळाला । बेदरास कळताच धुतोड शिपाई आले आवळाला ॥

चल बे बम्मन म्हणुन ओढिता अश्रु लागले गाळाला । कैद करून नेताक्षणी पडले संकट त्रिभुवनपाळाला ॥चा०॥

महाराचे सोंग विठोबांनी स्वता घेउनी ॥ धान्याचे द्रव्य त्या बाच्छायास देउनी ॥ पंतांच्या पोथिमधे ती रसिद ठेउनी ॥

राहिले विठोबा पंढरीस येउनी ॥चा०

दामाजीपंताच्या धावण्या असा धावला विपळात । तसा म्हाळसाकांत रक्षितो गायकवाड ह्या भूतळात ॥१॥

सत्राशे चोवोसात दंगा होळकरांनी अति केला । पंचविसामधे दरोबस्त अगदिच पहारे पाउस गेला ।

दीड शेराचा दुकाळ पडला कहर वाटला दुनियेला । दिसंदिवस बेबरकत जहाली सुखोत्पत्ति नाही रयतेला ॥

ब्राह्मण गेले उठुन मजलोमजली खुब ठेला । बडोद्यात पोचला तो जगला न पोचल्या वाटेस मेला ॥

धर्मपुरुष गायकवाड प्रेमळ क्षमा शांतिने भरलेला । तेव्हापसुन प्रारंभ सिध्याला हजारो ब्राह्मण जपलेला ॥चा०॥

चाळीस वर्षे वाटितात खिचडी सदा ॥ म्हणून न जाती ब्राह्मण देशी कदा ॥ दिवसात प्रहरभर पडे मेहनत एकदा ॥

मग सार्वकाळ आनंद हसती गदगदा ॥चा० कुटुंब सुद्धा प्रपंच करती गर्भिणी होति बाळात ।

तिही महिन्याच्या मुलास खिचडी मिळत्ये असे आले आढळात ॥२॥

वेदशास्त्रसंपन्न पुराणिक योग्य ज्योतिषी हर्दास । टाळ विने करताळ मृदंगी त्यात एखादी सुरदास ॥

सार्वकाळ भजनात घालती कदा न शिवती नर्दास । घुंगुर बांधुन पायी नाचती ध्याति पुंडलिकवर्दास ।

चित्रे मूर्ती करण्यात कुशळ जे वैद्य जिंकिती दर्दास । तर्‍हे तर्‍हेच्या करून नकला नकली रिझविती मर्दास ॥

ब्रह्मचारि मांत्रीक तपस्वी घेउन सवे शार्गिदास । मोहरा पुतळ्या रुपये तयांना देति शालजोड्याफर्दास ॥चा०॥

ह्यापरी ब्राह्मण समुदाय फार जगविला ॥ पुरुषार्थ करुन संकटकाळी दाविला ॥ वैकुंठी अचळ हा धर्मध्वज लाविला ॥

वंशास वश मार्तंड करुन ठेविला ॥चा०॥

येवढेच विश्रांतिला राहिले स्थळ पश्चमच्या राहाळात । कीर्तवान खावंद असले नाही मराठे मंडळात ॥३॥

विश्वकुटुंबी श्रीमंत ते तर तूर्त प्रजेला अंतरले । गायकवाड आहेत म्हणुन हे समस्त ब्राह्मण सावरले ॥

तानसेन पंथाचे गवय्ये तेहि प्रभूनि आवरले । कडी तोडे हातात दुपेटे लाल जरीचे पांघरले ॥

पहिलवान पंजाबी ज्यांचे दंड सदा मुंढे फिरले । हरहमेश कुस्त्याच विलोकुन इतर मल्ल जागीच विरले ॥

नायकिणी आणि कसबिणी शाहिर नेहमी बडोद्यामधे ठरले । पावे पगाराशिवाय बक्षिस कसबी लोक ह्याने तरले ॥चा०॥

कल्याण ईश्वरा असेच यांचे असो ॥ आनंदभरित चिरकाळ गादीवर बसो ॥ कधी अलोभ गंगुहैबतीवर नसो ॥

महादेव गुणीचे कवन मनामधे ठसो ॥ चा० प्रभाकर कवी भ्रमर गुंतला पहा कर्जाच्या कमळात ।

द्रव्यकृपेचा प्रकाश पडल्या सुटून जाइल स्वकुळात ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP