१
फूल झडे तंव फळ सोसे । तया
पाठी तेही नासे ।
एक मागे एक पुढे । मरण विसरले
बापुडे ।
मरण ऐकता परता पळे । पळे
तोही मसणी जळे । एका जनार्दनी शरण । काळ वेळ तेथे न रिघे मन ।
भावार्थ:
झाडावर फूल उमलते. कालांतराने
ते कोमेजून जाते. फूल झडून गेल्यावर झाडावर फळ लागते. यथावकाश
फळ पिकून मधुर बनते आणि हळूहळू नासून जाते. हा निसर्गनियम
असून विकास आणि विनाश एकापाठोपाठ येतात. तरीही मरणाची
कल्पना माणसाला भेडसावते. तो मरणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी काळामुखी
पडतो. जीवनातील हे सत्य सांगून एका जनार्दनी म्हणतात, काळ वेळ
आल्याशिवाय मरण येत नाही.
२
जे जे दिसे ते ते नासे ।
अवघे ओस जायाचे ।
पदार्थ-मात्र जात असे । काही
नसे आन दुजे ।
एका जनार्दनी सर्व वाव ।
धरा भाव विठ्ठली ।
भावार्थ:
जे जे डोळ्यांना दिसते, ते ते सर्व
नाशवंत आहे. उत्पत्तीनंतर विकास व शेवटी विनाश ठरलेला आहे. या तत्वाशिवाय
दुसरे काहीही सत्य नाही. या अविनाशी विठ्ठलचरणी भक्तिभाव ठेवावा, असे एका
जनार्दनी या भजनांत सांगतात.
३
अशाश्वतासाठी । का रे देवासवे
तुटी ।
अंतकाळीचे बंधन । कोण निवारी
पतन ।
तु म्हणसी हे माझे । खरा
ऐसे वाहसी ओझे ।
याचा न धरी विश्वास । एका
जनार्दनाचा दास ।
भावार्थ:
माणुस जन्माला येतो आणि देहबुध्दीने
ममत्व निर्माण होते. आपला देह, इंद्रियसुखाची साधने, आप्तपरिवार
आपली वाटू लागतात. सर्व माझे-माझे म्हणुन गाढवाप्रमाणे ओझे वाहतो. हेच अंतकाळीचे
बंधन बनते. जनार्दनस्वामींचे दास एकनाथ सांगतात की या सर्व गोष्टी अशाश्वत
आहेत , त्यावर विश्वास धरु नये. त्यामुळे
अंतकाळीचे पतन-निवारण करणार्या देवाला आपण पारखे होतो.
४
देह हा काळाचा जाणार शेवटी
। याची धरुनी मिठी गोडी काय ।
प्रपंच काबाड एरंडाचे परी
। रस-स्वाद तरी काही नाही ।
नाशवंतासाठी रडतोसी वाया
। जनार्दनी शरण रिघे तु पाया ।
एका जनार्दनी भेटी होता संतांची
। जन्म-मरणाची चिंता नाही ।
भावार्थ:
देह हा अशाश्वत असून शेवटी
तो काळामुखी जाणार आहे, त्याची लालसा धरून उपयोग नाही. प्रपंच
हा काबाडकष्ट देणारा असून एकनाथ प्रपंचाला रस-स्वाद नसलेल्या एरंडाच्या झाडाची उपमा
देतात. प्रपंच नाशवंत असून त्याचे दु:ख करण्यापेक्षा संतांना शरण जाणे
श्रेयस्कर आहे. कारण एकदा संतांची भेट झाली की जन्ममरणाची चिंता करण्याचे कारण
नाही, असे संत एकनाथ म्हणतात.
५
मागे बहुतांसी सांगितले संती
। वाया हे फजिती संसार तो ।
अंधाचे सांगाती मिळालेसे
अंध । सुख आणि बोध काय तेथे ।
एका जनार्दनी जाऊ नको वाया
। संसार माया लटकी ते ।
भावार्थ:
फार पूर्वीच संतांनी उपदेश
केला की संसार ही केवळ लटकी माया असून तिच्या बंधनात अडकणे म्हणजे व्यर्थ जीवन घालवणे. जो सत्याचे
दर्शन घेऊ शकत नाही , अशा अंधास दुसरा अंध भेटला तर कोण कुणाला योग्य मार्ग दाखवणार
आणि त्यापासून कोणते सुख प्राप्त होणार? म्हणून एकनाथमहाराज सांगतात की संसार-बंधनात
अडकून मिळालेला मनुष्यजन्म वाया घालवू नका.
६
नरदेही येऊनी करी स्वार्थ
। मुख्य साधी परमार्थ ।
नव्हता ब्रह्मज्ञान । श्वान
- सूकरांसमान ।
पशुवत् जिणे । वाया जेवी
लाजिरवाणे ।
एका जनार्दनी पामर । भोगिती
अघोर यातना ।
भावार्थ:
नरदेह मिळूनही जर ब्रह्मज्ञान
मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, तर मनुष्यजन्म मिळूनही जीवन कुत्रा
व डुकराप्रमाणे पशुवत , लाजिरवाणे होऊन वाया जाईल. एकनाथमहाराज
म्हणतात, अशा पामरांना अनंत अघोर यातना भोगाव्या लागतात. नरदेही
येऊन परमार्थ साधणे अत्यंत श्रेयस्कर आहे , कारण नरदेहाद्वारेच
देवत्व साधता येते.
७
देह सांडावा ना मांडावा ।
येणे परमार्थचि साधावा ।
जेणे देही वाढे भावो । देही
दिसतसे देवो ।
ऐसे देही भजन घडे । त्रिगुणात्मक
स्वयें उडे ।
त्रिगुणात्मक देही वावो ।
एका जनार्दनी धरा भावो ।
भावार्थ:
परमेश्वरकृपेने मिळालेल्या
नरदेहाचा त्यागही करु नये आणि त्याचा अहंकारही मानू नये. हा नरदेह
परमार्थ साधण्याचे साधन आहे , असे समजून जीवन परमेश्वराच्या भक्तिभावात
घालवावे. जसजसा भक्तिभाव वाढत जातो तसतसा देहात देव प्रकट होतो आणि असा
देह भजनांत तल्लीन होतो , तेव्हा सत्व-रज-तमोगुण लयास जाऊ लागतात. असा भक्तिभाव
धरावा की हा त्रिगुणात्मक देह नश्वर आहे असा भाव निर्माण व्हावा , असे एका
जनार्दनी म्हणतात.