प्रसंग पंधरावा - वासना भूते मारा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


तों तों अज्ञानें धरिती भावो । म्‍हणती तूंच गा आमचा देवो । शीघ्र आपत्‍काळीं पावों । आम्‍हां दुर्बळालागीं ॥३१॥
निमाल्‍यास जर घडे जन्मा येणें । तरी ब्रह्मीं काय असें उणें । कैसी बरळती अज्ञानें । मतिमंदें ॥३२॥
आतां हे लिंगदेहाचे विकार । स्‍वप्नीं दावी अनेक अनाचार । जागृति जाल्‍या समाचार । मिथ्‍या भासे ॥३३॥
तदन्यायें जिणें मरणें । सद्‌गुरुकृपें मरोनि उरणें । मग चुकेल पैं भ्रमणें । लक्ष चौर्‍यांशीची ॥३४॥
जों नाहीं मोडिली भुतांची मान । तोंवरी योग विटंबना जाण । स्‍मरणाभजनाविण बरवेंपण । भूत निरासे ॥३५॥
जें पुढें सांगिजेल भांडण । तें जोंवरी नाहीं केलें जाण । तों वाउगी दांभिक भूषण । चौर्‍यांशीच्या नांवें ॥३६॥
मन आपल्‍यावर करूनी स्‍वार । दारोदार फिरवी गव्हार । ते न उतरती पार । अविद्येच्या संगें ॥३७॥
जेव्हां राजा देईल मान्यता । तैसें अपमानीं असावें गुणवंता । तरीच लाभ घडेल आत्‍महिता । हें तुम्‍ही सत्‍य जाणा ॥३८॥
जेव्हां घडती दुःखें अपमान । तेव्हां तर्कों न द्यावें अंतःकरण । तरीच मन भेटेल येऊन । संचितालागीं ॥३९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP