प्रसंग बारावा - नवससायास

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मूर्ख अज्ञान नवस करिती आवडी । हातीं खोडा पाईं घाली बेडी । आणिक पहा विष्‍टाहि चिवडी । कीटशेणी करूनियां ॥७४॥
या जन्मींच जेणें नरक चिवडिला । तो काय पुढें उद्धरील जीवाला । हें न कळेंचि पहा या अज्ञान्याला । देखोनि आंधळे जाहाले ॥७५॥
आणीक ऐका नवसांचें वेड । देवतेपुढें थावरती बगाड । जैसें श्र्वान फोडी कोरडें हाड । तदन्यायें जन भजतसे ॥७६॥
जैसे बुजवण देखोनि हरणें । मनुष्‍य आलें म्‍हणोनि पळती रानें । तैसें हें जन झकलें अज्ञानपणें । प्रतिमेसी शेंदूर लाउनी ॥७७॥
जेव्हां शेंदुर होता वाणियाचें घरीं । तेव्हां त्‍यांचे सत्‍व नेलें काय चोरीं । नेऊनि टाकितांचि पाषाणाउपरी । मूर्खाला संशय बाधी ॥७८॥
एरवीं पाषाण दिसती लक्ष कोटी । शेंदुरापाषाणा होतांचि भेटी । निगुर्‍याला सुटे चरफड मोठी । भयें अज्ञान धरूनियां ॥७९॥
मूर्ख नवस करूनी देवतांप्रती । म्‍हणे आम्‍हां द्यावी धन धान्य संपत्ती । ऐसेंच मुखें वेळोवेळां बोलती । उग्र व्रत धरूनियां ॥८०॥
या देवतांच्यानें सुख लागेल भोगिले । तरी त्‍यांनीं कां बंदिखाने सोसिले । देवतापणाचें सामर्थ्य कोठें गेलें । रावणाचे सत्तेपुढें ॥८१॥
खंडेराव असे नापिक होऊनि । तराळी जगदंबा वाहे पाणी । दरबार झाडी मेसको मायाराणी । भैरव गस्‍त करीतसे ॥८२॥
तेहतीस कोटी देवांसी कामगिरी । ऐसीच वाटोनि दिधली परोपरी । सांगता उखई होईल बहुपरी । म्‍हणवुनी सेव सांगितला ॥८३॥
दशवदनें आराधिलें श्रीपति । म्‍हणवुनि देव दास्‍यत्‍व करिती । यालागीं ईश्र्वरीं चित्तवृत्ती । वाहावी एकाग्र मनें ॥८४॥
ज्‍याचा शेंबुड त्‍यासच न फेडवे । त्‍याच्या दास्‍यत्‍वें काय प्राप्त जोडे । हें ऐकोनि निर्गुणी धडफुडें । भजा पां तुम्‍ही श्रोते ॥८५॥
एक म्‍हणती आम्‍हांस ग्रह लागले । तरी ग्रह कां रावणाचरणीं रुळले । कां ते सामर्थ्यानें सांडवले । रावणा कां न लागतीच ॥८६॥
धनाड्यापासूनि दुरी असतां । तेणें विंधिला बाण लागे तत्त्वतां । त्‍याचेंच अंगीं जडता पुरता । बाण लागों न शके ॥८७॥
तैसे भावें जडतां सद्‌गुरूच्या अंगें । बाधूं न शकती ग्रहांचीं भिंगें । माया संसाराच्या तरंगें । कवण दोष पाहे ॥८८॥
नवस करोनि सुख मागितले । तरी नवसाविण दुःख कां आलें । सुख दुःख न पाहिजे वागविलें । हळहळ सांडूनियां ॥८९॥
नवस केल्‍या जरी पुत्र जाले । व्याघ्र सिंह नवसेंविण जन्मले । कल्‍पवृक्ष फळासहि आले । नवस केलियाविण ॥९०॥
जेव्हां देहे इच्छिलें निर्माण । तेव्हांच भूतभविष्‍य वर्तमान । अंगसंगें लागलें जडोन । वेळा काळें उमटे ॥९१॥
चिंता मना अंतरीं वासना बरळे । उमटती नवस करावयाचे चाळे । चौर्‍यांशीचें सुखदुःख सोहळे । कवणे मागितले ॥९२॥
सद्‌गुरु परब्रह्मास विसरणें । तेंच भवदुःख मूळ जाणणें । आत्‍मज्ञानाविण हें खुणें । न पवतील कोणी ॥९३॥
पहा मच्छ सिंधूतें विसरले । आड वोहोळ्याच्या संगें लागलें । उदक सरल्‍या मृत्‍यु पावले । तैसें उन्मत्ता हाईल ॥९४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP