भगवंत - नोव्हेंबर ४

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


एक गृहस्थ मला भेटले, ते म्हणाले, “ हिंदू धर्मासारखा धर्म नाही; परंतु देव सगुणात आले हे नाही मला कबूल. म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या ! देव जर निर्गुण निराकार, तर राम, कृष्ण, शिव, दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला? ” पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली, तेव्हा प्रत्येकजण निरनिराळे नाव घेऊन सांगू लागले. कोणी ‘ दादा ’ घरी नाहीत असे म्हणाले, तर कोणी ‘ दामोदर ’ घरी नाही म्हणाले, कोणी ‘ रावसाहेब ’ नाहीत म्हणाले. हे सर्व जरी म्हटले तरी त्यायोगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच, त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणात झाले. भगवंत सुगुणामध्ये आला की, जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत. आपले वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, आणि त्यावरची भाष्ये यांनी निर्गुण स्वरुपाची रुपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचे सुंदर चित्र तयार केले; ही सगुणभक्ती होय. सगुणोपासनेवाचून मोक्ष मिळणार नाही.
उपासना याचा अर्थ अगदी निकट असणे, उपास्याचा गुण अंगी आणणे. तुळशीदासांनी रामोपासना अशी केली की ते स्वतः रामरुप बनले. तुळशीदासांचे रामायण ऐकत असता मनुष्य तल्लीन होऊन जातो. रामरुप होण्यासाठी रामासारखे निःस्वार्थी बनले पाहिजे. रामाने ‘ जग माझ्याकरिता आहे ’ असे न म्हणता, ‘ मी जगाकरिता आहे ’ असे म्हटले. हा खरा परमार्थ, एकपत्नीव्रत, सत्य भाषण हे रामाचे दोन प्रमुख गुण होते. इतर अवतारातही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, परंतु सर्वांत रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्शरुप आहे. रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय आणि अनुकरणीय होय. रामचरित्र वाचताना, सांगताना अथवा ऐकताना, आपण रामप्रेमात स्वतःला विसरुन जाणे ही फार उच्च अवस्था होय.
भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही, ते संतांच्या हाती आहे; म्हणून सत्संगतीने ते साधते. ‘ साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा ’ असे आपण म्हणतो. संत दसरा आणतात, मग दिवाळी आपोआप मागे येते. आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे, ती काढून संत सन्मार्गाला लावतात. तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली.

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP