श्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ९

श्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.


अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, मथुरा, प्रयाग, गया आदिकरून तीर्थे करीत करीत तो बंगाल्यात गेला. तेथे चंद्रगिर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता, एका ब्राह्मणाचे घर दिसले. ते पाहताच, त्यास भस्माची आठवण झाली तो मनात विचारू लागला की, मागे मी भस्म मंत्रून दिले होते, ते हेच घर. येथच्या यजमानीणबाईचे नाव सरस्वती, तिला मी बारा वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे तो पहावा, असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून त्याने तिचे नाव घेऊन हाक मारिली. हाक ऐकून ती बाहेर आली व गोसावी पाहून भिक्षा आणून घालू लागली. तेव्हा खूण पटण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवर्‍याचे नाव वगैरे विचारिले. त्यावरून तिने आपले नाव सरस्वती, नवर्‍याचे दयाळ व जात गौडब्राह्मण वगैरे सर्व सांगितले; तेव्हा त्यास खूण पटली. मग मुलगा कोठे आहे, म्हणून त्याने तिला विचारिले असता, मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही, असे तिने उत्तर दिले. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू खोटे का बोलतेस? तुला पुत्र होण्यासाठी मी विभूति मंत्रून दिली होती ती काय झाली? असे विचारताच ती घाबरली व आपण ती उकिरड्यावर टाकिली, हे वाइट केले, म्हणून तिला पूर्व पश्चात्ताप झाला. आता हा कानफाड्या माझी काय दशा करील कोण जाणे? आता मी करू तरी काय? ह्याने तर मला पक्के ओळखले. असे विचार तिच्या मनात येऊ लागल्याने ती भांबावून गेली. तशात मच्छिंद्रनाथ पुत्र दाखविण्यासाठी वारंवार तिला टोचीत होताच. नंतर ती त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली, योगिराज ! माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला, ह्या माझ्या अन्यायाची मला क्षमा करा.

त्या वेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होते, अशा अर्थाचे बहुत विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. ह्या बाईच्या नादी लागल्यामुळे त्या वेळी आपला मूर्खपणा झाला, असे त्याला वाटले. पुत्रप्राप्तीस्तव सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण करून दिलेल्या भस्माची धुळदाणी झाल्याने त्यास रुखरुख लागली. ते भस्म फुकट न जाता त्याला देह झालाच पाहिजे असे वाटून व ते भस्म कोठे टाकिले त्याचा तपास करावा म्हणजे काय अवस्था झाली आहे ते कळेल, असा विचार मनात आणून तो म्हणाला की, माते ! जसे व्हावयाचे तसे घडून आले. तुजवर जरी मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडावयाचे आहे? होणारी गोष्ट होऊन गेली. आता इतके कर की, जेथे ते भस्म टाकिले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले.

मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीति उडाली. मग जेथे ते भस्म टाकिले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले.

मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीति उडाली. मग जेथे भस्म टाकिले होते तो मोठा उंच गोवराचा ढीग त्यास दाखवून येथेच भस्म टाकले. असे ती म्हणाली. ती जागा पाहिल्यावर त्याने मुलास उद्देशून हाक मारिली की, हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता, तू जर गोवरात असलास तर बाहेर नीघ. तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्षे ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेविले आहे. यास्तव हे गोरखनाथा, तू आता उशीर न लावता बाहेर ये. इतके शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले की, गुरुराया, मी गोरक्षनाथ आत आहे; पण गोवराची रास मोठी असल्यामुळे बाहेर निघता येत नाही; यास्तव गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढावे. नंतर खाच उकरून गोरक्षनाथास बाहेर काढिले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. तेव्हा सरस्वतीस फार पश्चात्ताप झाला. असा पुत्र आपल्या हातून गेला. म्हणून तिला तळमळ लागली व ती रडू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितले की, आता रडतेस कशाला? तो मुलगा तुझ्या नशिबीच नव्हता, मग तो तुला कोठून प्राप्त होणार? आता तू येथून जा. कारण माझा कोप प्रत्यक्ष अग्नीप्रमाणे आहे. तो ब्रह्मादिकाना देखील सहन होण्यास कठीण. आता व्यर्थ खेद न करिता जा; नाही तर शाप मात्र घेशील. ते भाषण ऐकून ती घाबरली व मुकाट्याने मागल्या पायी घरी गेली, पुढे गोरक्षनाथ गुरूच्या पाया पडला. त्यास मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वरहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि त्यास नाथदीक्षा दिली. नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला.

मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथास घेऊन तीर्थे करीत हिंडत असता, जगन्नाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागला तेथे येताच तो क्षुधेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठविले. तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृतीथ होती, म्हणून चांगली चांगली पक्वान्ने केलेली होती. तेथे जाऊन गोरक्षनाथाने 'अलख' शब्द केला. तो ऐकून घरधनीण बाहेर आली. तिने त्याच्या त्या गंभीर भव्य व तेजस्वी चेहर्‍याकडे पाहताच हा कोणी तरी योगी असावा, असा विचार तिच्या मनात आला. त्यावेळेस तिने त्यास सर्व पदार्थ वाढलेले घवघवीत पान दिले. अनेक पदार्थ पाहून गोरक्षास समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला. पोटापुरती बेगमी झाली असे पाहून तो जास्त न फिरता माघारी गेला व ती भिक्षा त्याने गुरुपुढे ठेविली. षड्रस पक्वानांनी भरलेले पात्र पाहून गुरूस आनंद झाला. मग तो जेवावयास बसला. ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ प्रीतीने जेवला. त्या योगाने त्याचे पोट भरले; तरी त्याचा त्या पात्रातील वड्यावर हेतु राहून गेला. तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले त्याने काय इच्छा आहे ते कळवावी अशी विनंति केली. त्यावर तो म्हणाला, वड्यावर माझे मन गेले आहे; तो जर आणखी एक असता तर चांगले झाले असते.

गुरूने आपली वासना वड्यावर आहे असे सांगताच मी आता जाऊन वडे घेऊन येतो. असे बोलून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला व गुरूकरिता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागला. तेव्हा ती म्हणाली, गुरूचे नाव कशाला घेतोस? तुला पाहिजेत असे का म्हणेनास? हे ऐकून त्याने तिला सांगितले की, खरोखर मला नकोत, मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठीच वडे मागून नेत आहे. तेव्हा ती म्हणाली, अरे तुला बैरागी समजून मी भक्तिपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून चांगले घवघवीत पान वाढून दिले होते, तू फिरून आलास? असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय? हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाला. मी तुला जे मागशील ते देतो; पण गुरूची इच्छापूर्ण करण्याकरिता मला वडे दे. हे ऐकून त्याची परीक्षा पाहाण्याकरिता तिने त्याचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथाने लागलीच डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व ते तिच्या हवाली करू लागला. तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली. ते साहसकृत्य पाहून तिने तोंडात बोट घातले. तिची छाती दडपून गेली. तिला त्याचा फारच कळवळा आला. ती पाच सात वडे घेऊन बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली, महाराज ! मी सहज बोलले, माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. दुसर्‍याकरिता तुम्ही साधु अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जिवास करून घेता; वगैरे त्यास म्हटल्यावर गोरक्ष म्हणाला, तू का खंती होतेस? वड्यांच्या मोबदला मी तुला डोळा दिला. तेव्हा ती म्हणाली, मजवर कृपा करून बुबुळासह अन्न घेऊन जा व माझे अन्याय पोटात घाला.

मग गोरक्षनाथ तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाला व परत गुरूकडे आला. त्याने डोळ्याचे व्यंग दिसण्यात येऊ नये म्हणून पट्टा बांधिला होता. पट्टा बांधण्याचे कारण गुरूने विचारिले. परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन तो वडे खाणार नाही व त्याची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्याने पट्टा सहज बांधिला म्हणून सांगितले पण गुरूने डोळा दाखविण्यासाठी हट्ट घेतला, तेव्हा गोरक्षाने झालेला सर्व प्रकार कळविला व अन्यायाची क्षमा करण्याकरिता विनंति केली. मग बुबुळ मागुन घेऊन मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते बसवून डोळा पूर्ववत केला व मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरविला. नंतर उभयतांनी भोजन केले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्राने त्यास सर्व साबरी विद्या शिकविली आणि अस्त्रविद्येतहि निपुण केले.

N/A

References : N/A
Last Updated : June 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP